Tuesday, 21 June 2016

बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन – भाग ८)

बहुसंख्य सैनिकांचं दु:ख काय? त्यांना मिळणारा तुटपुंजा पगार, की तुटपुंजा शब्द पुष्कळ वाटेल असा मिळणारा आहार? की आणखी काही वेगळीच, सहजासहजीलक्षात न येणारी गोष्ट? उलगडून बघू जरा..

जॉईन झाले त्या काळी बाबांना एकूण पगार साधारण ७४ रुपये मिळायचा. पैकी बेसिक ५० रुपये, डीए २० रुपये आणि ४ रुपये डीडक्ट व्हायचे. एक तारखेला पगार झाला की दर महिन्याला बाबा लगेच फॅमिली अलॉटमेंट पॉलिसीखाली त्यातले तब्बल ५० रुपये डायरेक्ट इकडे सांगलीला पाठवून द्यायचे, डायरेक्ट कट म्हणजे प्रत्यक्ष हातात तेव्हा २० रुपयेच पडायचे आणि ५० रुपये तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावर पाठवल्याची सही-शिक्क्याची रिसीट असा प्रकार.

हे पैसे स्लो मोशनमधल्या कासवाला किंवा पोलिओ झालेल्या गोगलगायीलाही उसेन बोल्ट ठरवेल अशा पोस्ट ऑफिसच्या वेगवान कारभाराने महिना अखेरीस इकडे पोहचायचे. हे सायकल प्रत्येक महिन्यात. नेहरू सरकारने तेव्हापासूनच सरकारी खात्यांना वेळच्या वेळी कामे करायची सवय लावली असती, लोकांना जरा स्वच्छतेचे महत्त्व पटवायला काही शिस्त लावली असती तर आज नक्कीच वेगळे चित्र दिसले असते. आणि भारत म्हणजे ‘गांधी, गरिबी, रस्त्यावरच्या गायी आणि गारुड्यांचा देश’ अशी इनफेमस इमेज झाली नसती आपली जगभरात. आज मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाची खिल्ली उडवली जाते ती यामुळेच की ‘अरे ६० वर्षे आम्ही रस्त्यावर थुंकत आलो, कचरा इथे तिथे मनसोक्त टाकत रस्त्याचं डेकोरेशन करत राहिलो आणि आता असं मध्येच कसं थांबू’ टाइप. असो, तो वेगळा विषय.

पाठीवर ३ भाऊ, २ बहिणी अशी धाकटी टीम, आई बाबा असे सांगलीत कुटुंब आणि तेव्हा लहान वयात परिस्थितीमुळे कमवायला लागलेले बाबा आणि मोठे काका हे दोघेच. असं त्या काळी बऱ्याच घरी चित्र असायचं की थोरले एकदोघे कमवायला बाहेर पडलेत आणि त्यांच्या खांद्यावर घरचे खर्च निभावून नेले जातायत. अर्थात इतरही भावंडे त्यांना जमतील तशी, मिळतील ती कामे शिकतानाही करून घरच्यांसाठी अर्थार्जन करत राहायचेच.तरी नानांनी बाबांना सांगितलं होतं की ‘अरे तू असे इतके पैसे एकदम पाठवत जाऊ नकोस. तशी काही गरज नाही. किंबहुना १९६६ लाच त्यांनी बाबांना स्वत:चे अकाउंट ओपन करून पैसे साठवायला सांगितले होते. पण बाबांनी ते सिरीयसली घेतले नाही, आणि अगदी १९८० पर्यंत पैसे पाठवतच राहिले.

पण तिकडे सीमेवर असताना पैसा, पॅकेज, फॅसिलिटीज वगैरे गोष्टी अर्थात टोचत नाहीत. टोचते ती वेगळीच गोष्ट. मुळातच ९० टक्के सैनिकांचं दु:ख हेच की आपण कुटुंबापासून इतके दूर आहोत, कित्येक महिने भेट नाही, संपर्क अगदी कमी.. (आज आहे हे सगळं फोन्स, इंटरनेट वगैरे.. तेव्हा फक्त पोस्टकार्ड झिंदाबाद.. क्वचित फोन तेही खूप नंतरच्या काळात) पण फक्त दूर आहोत ही खंत नसते तर आपण त्यांना प्रत्यक्ष तिथे राहून काही मदत करू शकत नाही हे शल्य जास्त.

म्हणजे अचानक कुणी आजारी पडले तर ताबडतोब पोहचणे, किंवा कुणाचे लग्न, मुंज, बारसे वगैरे काही असेल तर ते अटेंड करणे हे दुरापास्त व्हायचे. लेह, लदाख, सियाचीनसारख्या भागात पोस्टिंग असताना तर ही वेदना जास्त भीषण. (होप तार तरी खरंच तारेच्या वेगानं जात असेल तेव्हा) बाबांनाही सगळ्याच भावंडांच्या लग्नात उपस्थित राहणे जमले नाही ते यामुळेच. अर्थात गंमत म्हणजे जे २० रुपये उरायचे त्यातही खर्च निवांत भागायचा. कारण खर्च म्हणजे काय तर फक्त तेल, साबण, ब्रश, टूथपेस्ट, दाढीसामान, चार कपडे वगैरे एवढाच. (शीख सैनिक सोडून शक्यतो कुणालाही परवानगी नसते दाढी ठेवायला, मग इतरांसाठी रोज दाढी करणं आलंच)

इंडियन आर्मी रँक्स 

एक गंभीर आणि खरंतर चुकीची गोष्ट म्हणजे जेवणाच्या बाबतीत घडायची. सैनिकांना जेवण अगदी मर्यादित मिळायचं. दर्जाबद्दल न बोललेलंच बरं. फिजिकल एक्सरसाइज झाल्यावर प्रत्येक सैनिक मग ६-८ केळी हादडायचा. जेवण ऑफिसर्सना चांगल्या प्रतीचं आणि पोटभर, पण इतर रँक्सच्या सैनिकांना मात्र अगदीच साधं, कधीकधी बेचव, निकृष्टच.

कमाल आहे, ज्यांना प्रत्यक्ष फ्रंटवर जाऊन शत्रूशी दोन हात करावे लागतात, त्यासाठी मजबूत व्यायाम करून तब्येत कमवावी लागते, बोजड रायफल्स हाताळत त्या सतत पाठीवर वागवत राहाव्या लागतात, अवजड तोफगोळे वगैरे वाहून न्यावे लागतात, रोज कसरतीत इतका घाम गाळावा लागतो त्यांना सैन्यात ही ट्रीटमेंट. पण कुणी काही बोलू नाही शकायचं, कारण सिपॉय रँकवर जॉईन झालेल्यांपैकी कित्येक तर कमी शिकलेले, अनपढही असत. अशांना आपल्यावर अन्याय होतोय हेही कळत नसतं. किंवा ‘इथे हे असंच असतं’ अशी त्यांनी समजूत करून घेतलेली असते. म्हणजे अपेक्षा काय तर इथल्या कामाला, फ्रंटवर लढायला पाहिजे वाघ आणि आहार मात्र शेळीचा.. असं कसं चालेल?

म्हणजे असं बघा, भाग मिल्खा भाग मध्ये ‘..और मेरी फटिग ड्युटी भी माफ है जी’ असं मिल्खासिंग झालेला फरहान म्हणतो तेव्हा आपण तो ‘कुणाचं काय तर कुणाचं काय’ टाइप कॅटेगरीतला विनोद समजून हसतो, पण त्यामागे ‘मी फटिग ड्युटी मारली तर मला आणखी भूक लागेल, प्लस मला धावायची प्रॅक्टिस तर करायची आहेच, आणि हे सगळं इतक्याशा तुटपुंज्या आहारात कसं होणार उस्ताद.. रनिंग किंवा फटिग ड्युटी एकच काहीतरी जमेल ना’ हा एक मनात म्हणलेला डायलॉगही असतो. पण ही पार्श्वभूमी लक्षात घ्यायला वेळ नसतो आपल्याला. उस्तादकडूनही त्याला विचारले जाते, "तुला दिवसा सराव करायला वेळ मिळत नाही ना?" शिवाय क्रॉस कंट्री दौडमध्ये टॉप टेन सैनिकांना फटिंग माफ आणि स्पेशल डाएट म्हणजे काय तर एक ग्लास दूध आणि दोन कच्ची अंडी हे उस्ताद प्रकाशराज सांगतो तेव्हाही सैनिकांचे चेहरे फुलतात हे आपण त्यात पाहिलंच आहे.

त्यातल्या त्यात बरी गोष्ट म्हणजे १९८० नंतर तरी चित्र हळूहळू का होईना पण बदलत गेलं असं बाबा म्हणतात. ८० हा असा टप्पा होता ज्याआधी नऊ वर्षं मेजर युद्ध करावं लागलं नव्हतं आणि त्याधीच्या नऊ वर्षांत तीन मोठी युद्धं लढावी लागली होती. १९७५ च्या आणीबाणीतून पुढे सरकारनेही आतापर्यंत थोडाफार धडा घेतला होता. ८० च्या दशकापासून राजकीय स्थिती बदलू लागली तसेच इकडे भरती होणारे सैनिकही बऱ्यापैकी शिकलेले असायचे. आणि आताशा तर किमान बारावी झालेलेच असतात बहुसंख्य. त्यामुळे त्यांनाही आपल्या हक्काची जाणीव असते.

आताआणखी समाधानाची बाब म्हणजे मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री झाल्यापासून लष्कराप्रति अनास्था मावळून सरकारी धोरणही सुधारलंय. कोणताही देश सर्वात जास्त खर्च करतो किंवा बजेट राखून ठेवतो ते त्याच्या लष्करासाठी ते का, कशासाठी हे भारताला नऊ वर्षांत तीनयुद्धं झेलल्यावर आणि त्यात अपरिमित झीज सोसल्यावर उशिरा का होईना उमगलं असावं.
पुढच्या भागात बाबांच्या निवृत्तीबद्द्ल..
(क्रमश:)

No comments:

Post a Comment