(प)रागदारी 2
चार बाटल्या व्होडका
(राग: मद्यच माझे गद्य नि पद्य)
चार बाटल्या व्होडका
(राग: मद्यच माझे गद्य नि पद्य)
आज (प)रागदारी या सदरात आपण अभ्यासणार आहोत एक अतिशय गाजलेले गाणे तेही एका अशा महाशयांचे जे आजकाल खूपच लोकप्रियआहेत, प्रसिद्धीच्या लाटेवर असे काही स्वार झाले आहेत की बड्या बड्या कलाकारांना, निर्मात्या दिग्दर्शकांनाही ह्यांचे एकतरी गीत आपल्या चित्रपटात असावेच असे मनापासूनवाटते. भले चित्रपटास काही कथा असो नसो (तिच्याशी कोणत्या गाढवास देणे घेणे असते नाहीतरी), पणह्यांचे एक गाणे असलेच पाहिजे अशा धारणेतून ह्यांना कामहीबरेच मिळते आहे.
मध्यंतरी व्हॉटसअपवर यांच्या थोरल्या भावाचे नाव काय तर ज्येष्ठमध असा एक विनोदही वेगाने फिरत होता. तुमच्यासारख्या चाणाक्ष सुज्ञ सुजाण संगीतप्रेमी रसिकांना एव्हाना समजलेचअसेल की आम्ही कोणाबाबत बोलत आहोत ते... होय होय होय, कलियुगीन संगीतातील एक अद्भुत चमत्कार, एक अलौकिक प्रतिभा,आजच्या तरुण पिढीचे श्रद्धास्थान आणि प्रखर प्रेरणा, असंख्य डिस्कोथेक, क्लब्ज, पब्ज आणि बार संचालकांचे पोशिंदे,वन अंड ओन्ली स्वयंभू rapmaster, अर्थात यो यो हनी सिंग. (काही गुरूंच्या नावाआधी जसे श्री श्री असते, तसे हे यो यो असावे असा आमचा कयास आहे.) आणि त्यांचा आवाज व संगीत लाभून पावन झालेले हे गाणे आहे रागिणी एमएमएस द्वितीय या चित्रपटातले. गाण्यातील गद्य व पद्य दोन्हीही मद्यावर आधारित असल्याने 'मद्यच माझे गद्य नि पद्य' या रागात गुंफलेल्या या 'चार बोतल व्होडका' गाण्याचे शब्द लिहिले आहेत उस्ताद भगदार अली खान साहब यांनी.
चार बोतल व्होडका
काम मेरा रोज का
ना मुझको कोई रोके
ना किसीने रोका
वा वा वा, हनीजी आपल्या नावाप्रमाणेच मधाळ असलेल्या आवाजात गातात की चार बाटल्या व्होडका प्राशन करणे हेच माझे रोजचे काम, हेच माझे जीवितकार्य आणि हे साध्य रोजच्या रोज साध्य करण्यापासून मला कुणीही रोखू शकत नाही. नव्हे, हे पवित्र कार्य उम्रभर करण्यासाठी मी स्वत:ला वाहून घेतलेले असताना आजवरच्या वाटचालीत मला कोणी रोखलेलेही नाही. कुणाची एवढी बिशाद?
मैं रहुं सारी रात इन द बार
दारू पिऊ लगातार
एक आधी सब पी लेते है
मैं तो पिऊ बोतल चार
आय वाना हंगओव्हर टूनाईट
यापुढे हनीसिंग यांच्यामधील विलक्षण सर्जनशील असा अफलातून rapmaster जागृत होतो आणि आवेशाने पण तितक्याच संयतपणे गाऊ लागतो की अरे मी अख्खी रात्र बारमध्ये राहीन आणि एकापाठोपाठ एक मद्याचे प्याले रिचवेन. अर्धी किंवा एखादी बाटली तर कुणीही पीत असेल, परंतु मी मात्र एक नव्हे, दोन नव्हे तर पूर्ण चार बाटल्या सहज संपवतो. कारण मला रात्री असाच कैफ हवा आहे.
समजा पिणारा स्वत: रोज डायरी लिहित असेल तर रोज काही वेगळे लिहावे लागणार नाही. एक जानेवारीला जे लिहिले तेच पुढे वर्षभर होणार असल्याने पुढील सर्व पानांवर केवळ सेम एज एक जानेवारी असे लिहिले तरी काम भागू शकते. किवा पहिल्याच पानावर 'हेच नि असेच पुढे' असे नमूद करून पुढील सर्व पाने एखाद्या गरजू गरीब विद्यार्थ्याला अभ्यासासाठी देताही येतील असा विचारही यामागे असू शकतो. सहीच ना! आम्हाला तर वाटते की स्वत:च्या प्रकृतीची, लिव्हरची तिळमात्र काळजी न बाळगता रोज चार बाटल्या घशात घालण्याचे जीवनविषयक तत्त्वदेखील याच वैचारिक मंथनातून आले असावे. जेणेकरून भंगारवाल्याला दर महिन्याला तब्बल १२० बाटल्या देऊन त्याला बरे आर्थिक दिवस तरी आणता येतील. तुम्हीच सांगा आजकाल कोण करतो दुसऱ्याचा इतका विचार?
सारी रात दारू, सुबह निंबूपानी
पार्टी करनेवालो की है याही कहानी
पेट भरके जितनी भी पीलो
किसी की बंदी को भी हेल्लो
हेल्लो बेबी हाऊ डू यु डू?
एक मिनट तो खद जा तू
पता नि मुझे ये समझ नि आता
मेरे साथ कभी कोई क्लब नही आता
अपने पल्ले से कोई नि पिलाता
मैं पी लू ज्यादा फिर कोई मुंह नही लगाता
क्यू की, क्यू की, क्यू की, क्यू की
नंतर ह्या संगीतरत्नाने एक वैश्विक सत्य अगदीच अलगदपणे आणि सहजतेने कथन केले आहे. तो म्हणतो की रात्रभर मनसोक्त मनमुराद मद्यपान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे (दुपारी १२ च्या सुमारास) उठून निर्मळ मनाने लिंबूपाणी घेणे हीच पार्टी करणाऱ्यांची आज कहाणी आहे. हीच त्यांची कथा आणि व्यथा बनली आहे. पोटभर प्या, कितीही प्या आणि मग कुणाच्याही प्रेयसीला वा पत्नीला मनोभावे नमस्कार करा, आपणच तिचा प्रियकर वा नवरा आहोत असे समजून त्याच्याच प्रेमाने आणि नशेतून आपसूक निर्माण होणाऱ्या जवळीकीतून हाय हेलो म्हणा. आपण कशा आहात अशी आपुलकीने चौकशी करा. आपल्यासोबत क्लबसारख्या मानवनिर्मित शांत, प्रसन्न, रम्य ठिकाणी कधीच कुणी येत का नाही या विचाराने आपण कधी त्रस्त होऊ शकतो. त्यामागील कारणे कितीही विश्लेषण करून कधीकधी आपल्या लक्षा येत नाहीत. पण मग अशा लादल्या गेलेल्या सक्तीच्या एकटेपणातून उद्भवणारे दु:ख विसरण्यासाठीही जर कुणी आपल्या पैशाने पाजत नसेल, तर आपणच आपली आपली प्यावी, मग कुणाची बिशाद आपल्या नादी लागण्याची किंवा त्या बाटलीला तोंड लावण्याची. दुसरे समजून घेत नसताना किंवा मदत करत नसताना स्वत:ची वाट स्वत: चोखाळावी, आपला स्वाभिमान मजबूत ठेवावा, आत्मसन्मानाशी हरगीज तडजोड करू नये अशी महान शिकवण कविवर्य यातून आपणांस ऑफर करतात. आणि ह्याचेही कारण म्हणजे रोजच्या चार बाटल्या व्होडका हेच होय असेही पुढे आत्मविश्वासाने नमूद करून ठेवतात.
सूजी सूजी आंखे मेरी ये फिर भी देखो
लडकियो को कैसे ये निहारे निहारे
अगले दिन उठू मैं हंगओव्हर में फिर भी देखो
लिव्हर मेरा व्होडका पुकारे
क्यूंकी चार बोतल व्होडका...
सूजी सूजी आंखे मेरी ये फिर भी देखो
लडकियो को कैसे ये निहारे निहारे
अगले दिन उठू मैं हंगओव्हर में फिर भी देखो
लिव्हर मेरा व्होडका पुकारे
क्यूंकी चार बोतल व्होडका...
कोणत्याही परिस्थितीत आपल्या ध्येयापासून आपली (तारवटलेली लालसर) नजर हटता कामा नये असे गीतात पुढे म्हटले आहे. म्हणजेच काय तर अति मद्य प्राशन झाल्याने डोळे जरी सुजले, लाल झाले, डोळ्यांची कितीही आग आग होत असली तरीही मुलींवर लाइन मारण्याच्या लाइफ़टाइम कर्तव्यातून तिने माघार घेता कामा नये. सौदर्याची उपासना करावीच, ती केलीच पाहिजे म्हणजे पाहिजेच कारण ते ताज्या तरुण टवटवीत प्रफुल्लीत सदाबहार वगैरे वगैरे मनाचे लक्षण आहे. यातून कवी आपल्या मनावर प्रकृतीपेक्षा वा होऊ शकणाऱ्या संभाव्य धुलाईपेक्षाही कर्तव्यभावना आणि स्वत:ला घालून घेतलेले नियम नि शिस्त यांना वरचे स्थान देतो आणि या गुणांपासून ढळू नये असे सुचवतो. इतके सुरापान केल्यावर दिसणारी प्रत्येक मुलगी नखशिखान्त न्याहाळली नाही तर हाय कम्बख्त, तुझे कुछ चढीच नाही की मर्दा, असा गर्भितार्थसुद्धा यात असू शकतो.
इतकेच नव्हे तर दुसऱ्या दिवशी उठल्यावर (अर्थात १२ वाजता, त्या बेअक्कल सूर्याला कधी उगवावे हे समजत नसेल तर त्याला आपण काय करणार, लेकाचा सहासात तास आधीच येऊन बसतो. तोंडावर आला उजेड, कर दुर्लक्ष) आधीच्या रात्रीचा कैफ तसाच असल्यामुळे आणि हंगओव्हर कायम असल्याने यकृतोबा व्होडका व्होडका असे आर्तपणे पुकारत असतो, तेव्हा त्याकडे मात्र दुर्लक्ष करू नये आणि पुन्हा त्याला खतपाणी घालावे. असे केल्यानेच 'काम मेरा रोज का' ह्या उक्तीचा खरा अर्थ आपल्याला उमगू शकेल अशी शिकवण कवीने दिली आहे. थोडक्यात पिण्यातले समर्थ हनीमहाराज काय म्हणतात - प्यायल्याने होत आहे रे, आधी प्यायलेचि पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजेच, तेही व्होडका पेयाच्या चार बाटल्या. शेवटी तो पुन्हा पुन्हा चार बाटल्या व्होडका अशा किंकाळ्या मारतो.
इतकेच नव्हे तर दुसऱ्या दिवशी उठल्यावर (अर्थात १२ वाजता, त्या बेअक्कल सूर्याला कधी उगवावे हे समजत नसेल तर त्याला आपण काय करणार, लेकाचा सहासात तास आधीच येऊन बसतो. तोंडावर आला उजेड, कर दुर्लक्ष) आधीच्या रात्रीचा कैफ तसाच असल्यामुळे आणि हंगओव्हर कायम असल्याने यकृतोबा व्होडका व्होडका असे आर्तपणे पुकारत असतो, तेव्हा त्याकडे मात्र दुर्लक्ष करू नये आणि पुन्हा त्याला खतपाणी घालावे. असे केल्यानेच 'काम मेरा रोज का' ह्या उक्तीचा खरा अर्थ आपल्याला उमगू शकेल अशी शिकवण कवीने दिली आहे. थोडक्यात पिण्यातले समर्थ हनीमहाराज काय म्हणतात - प्यायल्याने होत आहे रे, आधी प्यायलेचि पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजेच, तेही व्होडका पेयाच्या चार बाटल्या. शेवटी तो पुन्हा पुन्हा चार बाटल्या व्होडका अशा किंकाळ्या मारतो.
त्याने फोडलेला हा हंबरडा पाहून कुणाचेही हृदय आणि यकृतोबा पिळवटून निघेलच. तसे एखाद्याच्या बाबतीत न झाल्यास त्या पामराला 'हाय तूने पीही नही तो क्या समझोगे' असे म्हणून त्याला कस्पटासमान लेखावे, पूर्णत: दुर्लक्ष करावे. पण व्होडकादेवतेचा अपमान सहन करू नये हीच भावना हा कस्पटासमान गायक, (ओह सॉरी सॉरी, हे काय बरे अनवधानाने लिहिले गेले मजकडून.. हन्त हन्त) तर हा असामान्य गायक आपल्या हृदयस्पर्शी आवाजातून व्यक्त करतो हे स्पष्ट जाणवते.
किती उदात्त विचार! मराठीत हे महाशय गाणी कंपोझ करत नाहीत. अरेरे, मराठी भाषेचे आणि रसिकांचे हे केवढे नुकसान. तरी समजा, पुढेमागे जर या गानपानसम्राटास मराठीत rap करायचे झालेच तर ते करताना त्यांनी आमच्या या पुढील रचनेचा जरूर विचार करावा. कदाचित त्यांच्याइतके भारी दर्जेदार जमले नसेल, पण न पिताही तोडकेमोडके सुचले हे काय कमी आहे...
किती उदात्त विचार! मराठीत हे महाशय गाणी कंपोझ करत नाहीत. अरेरे, मराठी भाषेचे आणि रसिकांचे हे केवढे नुकसान. तरी समजा, पुढेमागे जर या गानपानसम्राटास मराठीत rap करायचे झालेच तर ते करताना त्यांनी आमच्या या पुढील रचनेचा जरूर विचार करावा. कदाचित त्यांच्याइतके भारी दर्जेदार जमले नसेल, पण न पिताही तोडकेमोडके सुचले हे काय कमी आहे...
प्या बिंदास अन व्हा मदहोश
व्हा बेहोष नि करा जल्लोष,
भीती नाही कुणाच्या बापाची
आम्ही पितो आमच्या पैशाची,
फिरूदे बार आणि तोलही जाऊदे
अवघा रंग एकचि होऊदे,
स्कॉच असो व्हिस्की, रम असो शाम्पन
मित्रांनो माझ्या तुमच्यासाठी कायपण,
ढोसा खुश्शाल रे सोडा लाज
सगळ्या रोगांवर रामबाण इलाज,
रिचवा दारू उधळूदे वारू
अरे विसरा पारू, या एकेक पेग मारू,
कारण चार बाटल्या व्होडका हेचि काम माझं रोजचं..
व्हा बेहोष नि करा जल्लोष,
भीती नाही कुणाच्या बापाची
आम्ही पितो आमच्या पैशाची,
फिरूदे बार आणि तोलही जाऊदे
अवघा रंग एकचि होऊदे,
स्कॉच असो व्हिस्की, रम असो शाम्पन
मित्रांनो माझ्या तुमच्यासाठी कायपण,
ढोसा खुश्शाल रे सोडा लाज
सगळ्या रोगांवर रामबाण इलाज,
रिचवा दारू उधळूदे वारू
अरे विसरा पारू, या एकेक पेग मारू,
कारण चार बाटल्या व्होडका हेचि काम माझं रोजचं..
.
छे, नाही हो, नाहीच. ती नशिली मजा आणि तो यथेच्छ माज यात दुरान्वयेही नाही. खूपच थिटे पडतो आपण ह्यांच्या काव्यप्रतिभेसमोर हे मोठ्या मनाने (म्हणजे थर्टी नव्हे, तर नाइनटीच्या मापाने) मान्य केलेच पाहिजे. 'कुछ जम्या नही गड्या' हा तुमचा प्रांजळ नि रोखठोक अभिप्रायही पोचला आणि तुम्ही मुरडलेली नाकेही दिसली. असो, रोज साबण घासघासून अंघोळ केली म्हणून कावळा राजहंस थोडाच होतो. असो, तर हे होते आजचे अप्रतिम एकमेवाद्वितीय गीत. पुन्हा पाहू असेच आणखी एखादे गीत. तोपर्यंत ‘चार बाटल्या व्होडका, हेचि काम माझं रोजचं...’
ता. क.: मध्यंतरी टीव्हीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात ख्यातनाम शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आले होते. तेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की सध्याच्या या हनी सिंग इरा आणि या अशा चार बोतल गाण्यांविषयी तुमचे मत काय, तर ते प्रांजळपणे वदले की ‘काय वाटायचं त्यात, असेल ते त्याचे रोजचे काम’... वा वा, पहा सिंगसाब द ग्रेट यांची दिनचर्या किती लोकप्रिय आहे. अक्चुअली याचा (त्यांच्या गाण्यांचा सिनेमाच्या कथेशी चुकूनही नसतो तसाच) इथे काहीही संबंध नाही, पण सहज आठवले म्हणून सांगितले.
अर्थात समजा अशी चार बोतल गाणी चार दिवस टिकणारीच असतात असे जर कुणी म्हणाले तर मात्र तो कितीही खरे बोलत असला तरी आजची तरुणाई त्याचे ऐकून घेणार नाही हे मात्र त्याहून खरे.
No comments:
Post a Comment