कविता

आता गर्दीतला एक

काल हरलो शेवटी मी आता मना तो त्रास नाही
ज्यामध्ये गा तूच नसतेस तो नक्की माझा श्वास नाही

शांत होते ते सुरु आयुष्य माझे त्याच्या गतीने
तू त्यात येता त्यास उरला तू वगळता ध्यास नाही

मित्र होतो आहे कदाचित राहीनही गं यापुढे
साथी ठरावा जीवनाचा एवढाही खास नाही

काल झाला सोहळा तो बदलावया आडनाव एक
तुज दूर दिसला मजपरी जो तो मीच होतो भास नाही

पाणावले होते तुझेही डोळे खुळे सर्वांपुढे
गर्दीत दिसता एक वेडा रड म्हणाले हास नाही
-------------------------------------------------


आहे माझा विश्वास 

एक्च्युअली तसं खूप सोपं गेलं तुझ्या डोळ्यात डोळे घालून बोलताना 
तू येऊपर्यंत आपल्या ठरलेल्या रेस्टॉरंटपाशी तुझी वाट पाहताना 
विषयाला हात घालण्याआधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना 
हीच ती वेळ असं मनाला वाटू देण्याआधी तुझा अंदाज घेत राहताना 

बोलणं सुरु झालं तेव्हाही छान वाटत होतं, वेळ मस्त जात होता 
माझ्या बोलण्यातला तुझा वाढता इंटरेस्ट, बळ माझं वाढवत होता 
विचारांची साखळी, शब्दांची निवड, आवाजात चढउतार करता करता 
नजरेचा पार्टनर मेंदू माझा तुझे एक्स्प्रेशन्सही टिपत होता 

मध्येच लाजत मध्येच हसत, शांत मला पाहून ऐकून घेतलंस तू 
‘तू हे कधीतरी बोलणार मला माहीत होतं’, हेही बोलून गेलीस तू 
ओठात ओठ मुडपलेले तुझे, तुझं मिस्कील हसू दाबत होते 
हेच ऐकायचं होतं वेड्या, हेच ओरडून जणू सांगत होते 

मला आणखी बोल म्हणत होती.. ती माझ्या इच्छेपेक्षा जास्त तुझी देहबोली होती 
जे काही बोलत होतो ते शोषून घेत एन्जॉय करणे.. तुझी सवय, हौस किंवा गरज होती 
आज बोलायचंच, या माझ्या निश्चयाचं वजनच होतं तीन चार मण 
बोलून मात्र हलकं वाटलं, जसे एखाद्या फुलातले परागकण 

तेव्हा जे ऐकणंबोलणं झालं ते अपेक्षेपेक्षा मस्तच झालं
आणि कालही जे झालं तेही एका अर्थी ठीकच झालं 
निघतानाही तशी म्हणालीच होतीस - एक जण सध्या प्रोसेसमध्ये आहे 
बोलतानाही सुचवतच होतीस - आपल्या नात्याची गोडी मैत्रीमध्ये आहे 
मित्रापलीकडे जाऊन पार्टनर माझ्यात दिसत नाही म्हणतेस तू 
‘सिग्नल्स मी दिले नाहीत, तुला ते वाटले’ हेही आता म्हणतेस तू 

तोडून बोलणं फटकून वागणं, तुला शोभत नाही म्हणण्यापेक्षा, जमत नाही म्हणेन मी 
आव आणलेला आपल्या माणसाशी, कळतो त्याला बरोबर, तरीही हे आपल्यातच ठेवेन मी 

मैत्रिणी तुला मनापासून सांगतो एक 
पण ऐकण्याआधी पूर्वग्रह बाजूला फेक 
चांगली आहेस तू..  उगाचच तुझा स्वभाव आवडत आणि ओढत नसेल ना कुणाला  
जेन्युईन राहा स्वत:शी.. आताशा चांगला मित्र गमावणंही परवडत नसेल ना कुणाला 

हसत खेळत मोठी हो, पुढे जा, छंद तुझे जोपास
हे सारं करता करता स्वत:मधली तू तपास 
रागावली नाहीयेस माझ्यावर, आहे माझा कयास 
राहील आपली मैत्री कायम, आहे माझा विश्वास 
राहील आपली मैत्री कायम, आहे माझा विश्वास 
-----------------------------------------------------------



असेच होते विश्वास ठेवा

नयन लाजले ओठही हसले 
तिला पाहता दिल धडधडले 
होतच नव्हते ऐसे बिलकुल
जोवर नव्हते दर्शन तिचे जाहले 

ती जेव्हा दिसते धुके दाटते
नकळत वेगे हृदय धावते
मान अशी वेळावे आणिक
गजरा झोके देत राहते

धमाल नटते कमाल मुरडते  
अदाही कातील वर नखरे ते
जेव्हा जेव्हा दिसते सत्यात 
स्वप्नी येऊन झोप उडवते 

मंद झुळूक ती लहरून गेली
बाग दिलाची बहरून गेली
कशी करेल ती तेथे धकधक
हृदयच येथे विसरून गेली 

प्रेम वाटत होते फसवा चकवा
होणे दिल ते निकम्मा वाटे अफवा
वेडा अनुभव येता झालो शहाणा
होय असेच होते विश्वास ठेवा

त्यातून पोहून तरून गेलो
शिण झटकून जो तरुण झालो
हलले जग मग ढळले अश्रू
प्रेमात पडलो कबूल झालो

ओढ मनाची आस जिवाची 
माझी वरती खाली दशा उराची 
माप खास ते लंघून का ती 
चढेल पायरी याच घराची 

----------------------------------------------

मेक इट क्लियर प्लीज

कित्ती सहज बोलून जातेस गं तू बऱ्याच गोष्टी 
मी विचार करत राहतो नंतर 

कित्ती सहज हसून जातेस गं तू बऱ्याच वेळी 
मी अर्थ लावत राहतो नंतर 

मेंदू शिणतो - पण पक्का विचार होत नाही 
तर्क संपतात - पण नेमका अर्थ लागत नाही

बोलतेस थोडक्यात - पण सूचक 
हसतेस गालात - पण खेचक 

का छळतेस अशी... कसली शिक्षा द्यायचीये का 
का आजमावतेस अशी... कसली परीक्षा घ्यायचीये का?  

इतके नको ना गं घेऊस कष्ट 
असेल मनात तसं काही तर बोल ना स्पष्ट 
व्हॉट यू से ? - जवळची मैत्री, ओढ, की प्रेम?
की नुसतंच "चल बाय, उद्या भेटू.. आज कल्याण क्षेम"

तुझ्याही नकळत किती अतोनात छळ करतीयेस तू माझा सतत 
तुला काही कल्पना?
आणि तरीही एवढं साळसूद फिरताना लाज नाही वाटत 
छे, इतकं बोलायचीही नाही गं जमत वल्गना 

कधी वाटतं... 
कधी वाटतं हे माझेच मनाचे खेळ सारे 
शांत वाहू द्यावेत फक्त मैत्रीचे वारे 
पण पुन्हा वाटतं, तूच माझा शोध थांबवलायस 
जसं लाटांना सहज थांबवतात किनारे 

तूच सांग आता... 
लाटांशीच खेळू की सरळ पोहायलाच शिकू?
स्वत:पासूनच दूर पळू की तुझी वाटचाल रोखू?

निर्णय तुझ्याच हातात.. 
तुझ्याच... 


------------------------------------------------------------


Friday, 15 July 2011

नो गिला शिकवा प्लीज


कित्ती सहज आलीस माझ्या आयुष्यात...आणि गेलीसही नाही,
वाटे आता तू ती नव्हतीसच सये, जिच्या शोधात मी सदैव होतो ... १

बोललो बरेच प्रेमाने पण, प्रियकर म्हणुनि कधीच नाही,
नव्हतेच तुला कर्तव्य त्याशी, मी व्यर्थ वेळ दवडीत होतो ... २

राहिलो तुझा सदा सखा - खास परी कधीच नाही,
सत्य कळाले तेव्हा केवळ, नीर नेत्रीचे लपवीत होतो       ... ३

गेलो मीही विसरून  सारे, तुझ्या लेखी जे घडलेचि नाही,
मीही माझ्या नियतीस जेव्हा, चुकलो समजून होतो      ... ४

मिटवीन वाद सारे नक्की, ठाव जयांचा तुजला नाही,
निर्माण का ते केलेस नकळत, अंदाज फक्त बांधीत होतो ... ५

गैरसमज नव्हतेच कसले, होणेही शक्य नाही,
फरक कुणाला काय पडतो, विश्वव्यापी कण्हत होतो     ...६

------------------------------------------------------------


तसं कुणी

बघ आज प्रथमच प्रयत्न करतोय प्रेमकविता लिहिण्याचा
कविता कसली.. नुसत्याच आठवणी.. थोडंसं पाल्हाळिक 
पण हो.. फक्त तुझ्यासाठीच 
त्या दिवशी कळलं तुला.. मी लिहितो 
बोलून गेलीस - मला फक्त रोमँटिक आणि हॉरर वाचायला आवडतं 
व्वा.. कायपण आवड आहे 
पहिली तुझ्या चेहऱ्याशी सुसंगत, अन दुसरी माझ्या   
आमचं कप्पाळ छान झालं तेव्हा, 
कारण आमच्या लेखनात तर फक्त अक्षय खन्नाचे वडीलच वडील सापडायचे.. 
असो, पण हा प्रयत्न तुझ्यासाठीच फक्त 

'तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणीन, 
तुला तळहातावरच्या फोडासारखी जपीन,
तुला कश्शाकश्शाची कमी पडू देणार नाही 
असली तोडायची वचनं कधीच दिली नाहीत मी तुला...   
पण नक्कीच, 
'तुझ्यासाठी अंगणातच आभाळ बांधीन, 
तुझ्या तळहाताला फोड येऊच नये अशी काळजी घेईन,
अन तुला पुरेसं मिळण्यासाठी मी मला कमी करून घेईन'
अशा भावना डोळ्यातून व्यक्त करण्याचा नेहमीच प्रयत्न केला

पण कशी नशिबानं थट्टा केली.. हाय रे दैवा.. 
दरवेळी चष्मा आड आला - दोघांचाही 
असो (किंवा येवो), तर त्या दिवशी तू मला विचारलंस,
'काय रे, रोमँटिक का लिहीत नाहीस?'
तुझ्या डोळ्यात बघत खोटं उसनं अवसान आणत मी म्हणालो,
'तसं कुणी भेटलं नाही गं अजून'
तशी नेहमीच माझं बोलणं चेष्टेवारी नेणारी तू, 
ते खोटं वाक्य मात्र खरं समजून बसलीस
अंतरातली घुसमट जाणवूही न देता सरळ निघून गेलीस... 
कायमचं अंतर राखण्यासाठी 

कालच्या निमंत्रण पत्रिकेनं तुझ्या 
ते अंतर मिटवलंय थोडंफार... 
पण तुला चि. सौ. कां. रूपात पाहायला 
मी नाही येणार 
म्हणून फक्त अस्तित्व जाणवायला पाठवतोय पात्र 
पोस्टमनने दिलाच वेळेत तर ठीक 
नाही दिलं तर त्याहून ठीक 
पोस्टखात्यावरचा विश्वास वाढेलच माझा 
तुझ्यावरचा कमी होताना 

खरंच 'तसं कुणी' भेटेल का आता मला?

---------------------------------------------------------------------

डोळ्यांत तुझिया 

डोळ्यांत तुझिया पाहताना 
सुटत गेली गहन कोडी
चालू संगे वाट ही आपुली
रबने बनादी प्यारी जोडी...

प्रीत ही जुळली अशी अन 
व्यक्त झाल्या भावना
रीत ही साऱ्या जगाची 
अव्यक्त का तू सांग ना...

जाहलो वेडापिसा मी  
शहाणेच वाटे वेड हे 
सूर जे झंकारती  
साथीस येऊन छेड ते...

आज मजला का कळेना 
काय मी बोलू आता 
शब्द जरी ना थेट सुचले 
हे काव्य मी रोखू कसा..

-----------------------------------------------------------------

ये प्रिये तू ये अशी

नेत्र तुझे तीर आणि 
प्रेममयी तो कमठा 
ये प्रिये तू ये अशी
ओलांडून उंबरठा 

स्वर्ग तुझी ज्वानी जणू 
फुला तुला जाण नाही 
तव देही ना झंकारे  
असे कोठलेच गान नाही

तुझा साज मस्त शृंगार 
मज सतत करी घायाळ 
एक आस दो मनांची 
का यौवनाची आबाळ

पापणी ही लवलवता  
सरकू दे वेळ हा धीमा 
मम स्पंदनात उतरू दे 
तव गालावरील रक्तिमा  

उत्कट ते मीलन होता 
देहात भान हरपू दे
अधीर अधर झाले गं 
श्वासात श्वास झिरपू दे

------------------------------------------------------

काय आहे मुलगी 

आता बाहेर पडत आहे चूल सोडून बाई 
बाहेर पडून कळले तिला फक्त घर जग नाही 

तिच्यादेखील मनी आले शिक्षणाचे खूळ 
नाखुशीने पुरुषांनीही दिली तिला सूट 
संधी मिळताच तिचे तिने केले सोने खूप 
कौतुक ना आले वाट्याला सत्ता पुरुषांची 

जाताहेत अवघड तिला बंधने नात्यांची 
नजर असते वखवखलेली कित्येक प्राण्यांची 
हिमतीने करते सामना साऱ्या नराधमांशी 
बोलणी खाऊन सासरचीही घट्ट उभी ही करारी  

उघड्या डोळ्यांनी पाहते आहे दुनियादारी 
अन जिद्दीने मोडून काढत आहे मक्तेदारी 
नवरे त्यांचे बनत आहेत कर्माने लाचारी 
पैसे खर्चत आहे तरी पती परमेश्वरी 

देश जाणत आहे आता काय आहे मुलगी 
वंशाचा दिवाच कशाला धनाची हवी पेटी 
पण सत्य आहे हो मुलांना मुलीच सुधरवती 
घालू नयेत अटी उगाच सातच्या आत घरी 


(पूर्वप्रकाशित २०१० - वालचंद कॉलेज मॅगझिन)
----------------------------------------------------------

नव्हत्याचे होते होत्याचे नव्हते

निकट तू असता माझ्या, वागण्यातही पथ्य होते ,
माझ्यासाठी मात्र तुझ्या, हसण्यातही तथ्य नव्हते..

तुझी माझी भेट गा, व्हायची हे सत्य होते,
पण तसे घडायचे मात्र, नियतीत काही नित्य नव्हते..

तुजसाठी पूर्ण माझे आयुष्यच मुफ्त होते,
मजसाठी परी तुझे, वेळापत्रकच रिक्त नव्हते..

मन तुझे देव जणू नि माझे तयाचे भक्त होते,
मेहेरबानी करावया तुजला, तेच काही 'फक्त' नव्हते..

पेशीपेशीतून माझ्या 'तूच' नामे तख्त होते,
अन तू म्हणालीस अवचित, ते माझे रक्त नव्हते..  

हरून सर्वही मज तू दिसता,व्हायचे नव्हत्याचे होते,
असेल कसे मज माहीत तेव्हा,व्हायचे हे होत्याचे नव्हते..

---------------------------------------------------------


ए जा गं तू माझ्या आयुष्यातून...

ए जा गं तू माझ्या आयुष्यातून...
मारी जरा रिकामं बसलं की लगेच सुरू तुझ्या आठवणी
त्या तर काय संपत नाहीत - स्मरणशक्तीची चेष्टा जीवघेणी
बुबुळंपण येडी दोन्ही सेंटी सोडतायत मग नळागत  पाणी
आणि या सगळ्याशी तुला मात्र शून्याहूनही कमी देणीघेणी
म्हणूनच म्हणतो..
ए जा गं तू माझ्या आयुष्यातून...

आयला साला स्वतःच असं काय लाईफच राहिलं नाही
आधी माझ्या हृदयाचं स्पंदन-बिंदन दुस-यासाठी ठणकलं नाही
मित्रांशी पैजा जिंकायलापण कधी कुणाला पटवली नाही
बोंबलायला मग तुलापण काय फार सोनं - बिनं लागलं नाही
म्हणूनच म्हणतो..
ए जा गं तू माझ्या आयुष्यातून...

भवाने तू जिंदगीत यायच्या आधीपण दोन दशकं जगलीच की
तू आवडायच्या आधीपण गावभर हजारदा लाईन मारलीच की
च्यायला पण तू येडी का खुळी,येऊन डायरेक्ट हृदयातच घुसलीस की
घुसलीस ती घुसलीस,पण हे तुलाच कळत नाही तो त्रास मलाच होतोय की

म्हणूनच म्हणतो..
ए जा गं तू माझ्या आयुष्यातून...

चल फुट बाहेर या छाताडातनं..अन तिथून निघून डोक्यात जाऊ नकोस हं
टाळकं  आधीच फिरलंय माझं त्यात आणखी धिंगाणा घालू नकोस हं
कवटी सरकलीया माझी त्या बिचारीला तुझा गुलाम बनवू नकोस हं
उद्या यदाकदाचित पस्तावशीलही तेव्हा मला मात्र माघारी बोलावू नकोस हं
म्हणूनच म्हणतो..
ए जा गं तू माझ्या आयुष्यातून...

टाळायचंच होतं मला तर मुळात आलीसच का तू माझ्या आयुष्यात
ढवळाढवळ  तुझी माझ्या पास्ट नि प्रेझेंटमधली  नकोच भविष्यात
नाहीतरी काय फार फरक असतो,प्रेयसी असणा-या नि नसणा-या मनुष्यात
नशीबात प्रेम, तिरस्कार, दुर्लक्ष. . .  जे असेल तेच येणार ना हिश्श्यात
म्हणूनच म्हणतो..
ए जा गं तू माझ्या आयुष्यातून...
  
अगं मंद, मनंच जुळत नाहीत आपली तर गुणांसाठी पत्रिका दाखवा कशाला 
'हो' तर काय  म्हणणार नाहीसच,तर प्रपोज मारून गुलाब वाया घालवा कशाला 
गेलीस उडत,मीच म्हणेन आई-बाबांना "अहो, माझं लव्ह मारेज कशाला ?'
तुम्ही म्हणाल ती पसंत" - उगाच जन्मदात्यांना दुखवा कशाला ?

म्हणूनच म्हणतो..

ए प्लीज. . . .

--------------------------------------------------------------------
                                                                                          
तू फक्त हो म्हण मग मीच नाही म्हणतो 

छळण्यात मला गं तुला काय आनंद मिळतो
पाहायला लावून वाट असा काय मजा येतो
तरीही तुझ्याच प्रेमाची मी मला का सजा देतो
बास  झालं आता तू फक्त हो म्हण मग मीच नाही म्हणतो 

लाडिक भांडणात आपुल्या मी मुद्दामच हरतो
तुझ्या मंदबुद्धीची समजूत काढता भेजा फ्राय होतो
तुला पटवता पटवता मीच कसा गं पटत जातो 
बास झालं आता तू फक्त हो म्हण मग मीच नाही म्हणतो 

तुझी व्यर्थ बकवास का मी ऐकत राहतो
तुझा एक एक शब्द का मज वाहवत नेतो
मेकअपशिवायही कसा मी तुला पाहू गं धजतो
बास झालं आता तू फक्त हो म्हण मग मीच नाही म्हणतो 

कशी कुठून दुर्बुद्धी नि I love u बोलतो
विनाशकाले विपरीतसे मित्र समजावतो 
प्रपोज ना अजुनी स्वप्ने संसारी रंगवितो 
बास झालं आता तू फक्त हो म्हण मग मीच नाही म्हणतो 

किती वेगळी तू किती वेगळा मी
नाहीतच तारा जुळत होईल नाते निकामी 
राहावे तू मनाने रिकामी,मनाने  सुका  मी
बास झालं आता . . . 

-------------------------------------------------------------------

हे काही माझं वय नाही

तू येणार हे तर नक्कीच
तुझी माझी भेट होणं अटळच 
खरंतर हे काही माझं वय नाही
तुझी आठवण काढण्याचं.. तुझे वेध लागण्याचं
हे काही माझं वय नाही 
तुझं अनावर आकर्षण वाटण्याचं.. तुझं वेड लागण्याचं 
पण तुझे विचार कधी कधी मनाचा खोल ताबा घेतात त्याचं काय 
आणि अलीकडे हे कधी कधी वारंवार व्हायला लागलंय त्याचं  तरी काय 
तू निरामय सुंदर असलास तरी
हे मात्र कष्टमय डेंजर आहे 
आज अपयशी असलो म्हणून तू तुला वाट्टेल तशी मनमानी करणार काय 
यातून मला, मला वाचवायचंय 
निसर्गाच्या गतीनुसार माझ्यात तू, तुझ्यात मी तर मिसळणारच आहोत
अपेक्षा माफक इतकीच की माझ्या वाट्याचे श्वास माझ्याशी इमानदारीत वागोत 
माझी बुलंद इच्छाशक्ती सध्या हरवेल तुला निश्चित
चल निघ आता मनातून..
वेळ झाली की ये खुशाल मला करायला निपचित 

------------------------------------------------------------

Sunday, 1 January 2012


द्विधा

आवड असलेल्या क्षेत्रात निवड होणे
हे निवड झालेल्या क्षेत्रात आवड निर्माण
करून घेण्यापेक्षा सोपे की अवघड ?  
हे कळणे महत्त्वाचे...
.... तेही कळेलच आता !!

शेवटी आवड आपली आपण ठरवतो

आणि निवड आपली दुसरे ठरवतात

आवडी - निवडीच्या या खेळात सवड काढून

कोणती कावड धरायची, त्याबद्दल मनाला विचारलं,
तर ते वेडं म्हणालं -

"तेही आता तूच निवड...तुझ्या आवडीने !" 
--------------------------------------------------------------------


Wednesday, 31 August 2011

कांय समजलांत !!!


कुणाला आवडावं म्हणून

लिहित नसतं कुणी,

कुणालातरी आपण आवडावं म्हणून

आपल्याला आवडत नसतं कुणी,

आपली निवड 'तिकडून' होणारच नसेल, 

तर वेळीच अडवावी आपणच आपली आवड,

त्यानंतरही मग न अडणारे आपले अश्रू

अडवायलाही येणार नसतं कुणी...

---------------------------------------------------------------------------



Friday, 15 July 2011

जाणीव झालीये आता..


अलीकडेच वाटतंय प्रचंड
घ्यावा शोध स्वतःचाच
का जन्मलो,कोण आहोत,का जगतोय
उलगडा व्हावा रहस्याचा ...

अलीकडेच वाटतंय प्रचंड
करावं लक्ष्य स्वतःलाच
आरसा तर कौतुकच सांडतो नेहमी
भडीमार व्हावा टीकेचा ...

अलीकडेच वाटतंय प्रचंड
द्यावं आव्हान स्वतःलाच
हार - जीत फैसला झालाच पाहिजे
नाश व्हावा तटस्थाचा ...

अलीकडेच वाटतंय प्रचंड
प्रचंड उत्तुंग बनवावं स्वतःलाच
फोडावी खुजी प्रतिमा माझी माझ्याच मनातली
घालून  घाव इच्छाशक्तीचा ...

अलीकडेच वाटतंय प्रचंड
पुरे,थांबवावं आता अचानक स्वतःलाच
हा अपुरा जन्म खूप अवघड वाटतोय जगताना
पुनर्जन्म घ्यावा स्वतःचा ...


------------------------------------------------------------------




Friday, 15 July 2011

गद्दार


ते माझेच यार होते ज्यांनी, मजवर केला प्रहार होता ,
अन हतबल झाले तेही जेव्हा, चुकविला मी तो वार होता !!

मश्गुल मीही होतो  त्यांच्यात, टाकून गहाण विश्वास सारा,
माघारी माझ्या मात्र घुमला, दग्याचाच झंकार होता  !!

श्वासात मैत्री - मैत्रीत श्वास, असाही  एक काळ सरला
अंती पोटी माझ्या फक्त, रक्ताचाच गोळा गार होता  !!

हेच आपुले दोस्त खरे, साथ कधी ना सोडीन यांची,
मनातच नष्ट आपसूक, झाला हा विचार होता  !!

मित्रांप्रती अविश्वासाचा ठराव, बहुमताने झाला संमत,
प्रत्येकाच्याच नजरेत भासत, प्रत्येकजण गद्दार होता  !!

जिवंत समूहात एका अलगद, आटला प्रेमाचा झरा अख्खा,
उगाच का तो शोभला, मैत्रीच्या शवावर हार होता   !!

--------------------------------------------------


विडंबन - मनमोहन मनमोहन म्हणजे मनमोहन असतात

(मंगेश पाडगावकरांच्या 'प्रेम म्हणजे प्रेम असतं' या कवितेचं किंवा त्यावर बेतलेल्या संदीप खरेंच्या 'लव्हलेटर' या विडंबनाचं विडंबन - एका एका विनोदी पोलिटिकल टीव्ही शोसाठी लिहिलेलं.. मनमोहन सिंग यांची क्षमा मागून...)


मनमोहन मनमोहन म्हणजे मनमोहन असतात
स्वत: हुशार असूनही एकही निर्णय घेत नसतात
मॅडमच्या तालावर नाचून नाचून खुर्ची आपली टिकवत असतात
घोटाळे कितीही झाले तरी आपली इमेज क्लीन ठेवत असतात
मनमोहन मनमोहन म्हणजे मनमोहन असतात

मनमोहन मनमोहन म्हणजे मौनीबाबा असतात
फायली कुठे गेल्या म्हणता ढिम्म गप्प बसून राहतात
हजारो जवाबोंसे अच्छी मेरी खामोशी म्हणत राहतात
आपल्यावर होणारे विनोद सारे सुन्न होऊन सहन करतात
मनमोहन मनमोहन म्हणजे मनमोहन असतात

मनमोहन मनमोहन म्हणजे एक रोबोट असतात
ज्याची किल्ली सोनियांकडे नाईलाजाने देऊन ठेवतात
रुपया कोसळू लागला की डोकं धरून हताश बसतात
कुणी कितीही बोंबलो काही आपल्या दोन टर्म्स रेटत असतात
मनमोहन मनमोहन म्हणजे मनमोहन असतात

मनमोहन मनमोहन म्हणजे भीष्म पितामह असतात
देशाचं चाललेलं वस्त्रहरण हतबल होऊन पाहत राहतात
आडनावापुरते सिंह आणि प्रत्यक्षात मात्र ससा असतात
मनातले शब्द घशात ढकलून लिहून दिलेलंच भाषण करतात
राजकारण नाही विद्वानांचं हे स्वत:च सिद्ध करत राहतात

मनमोहन मनमोहन म्हणजे मनमोहन असतात... 

-----------------------------------------------------------------------------
का 

का काहीजणांना सर्वच गोष्टी सहजासहजी मिळतात 
आणि का काहीजणांना खूप महत्त्वाच्या गोष्टीही कधीच मिळत नाहीत ...१ 

का आपले मन तिच्यावर आपल्याही नकळत जडते 
का तिला मात्र नेमकी दुस-याच कुणाची ओढ असते ...२ 

का एक अनामिक भीती बाळगत आपण नेहमी आपले मन मारतो
का तिच्यावर  निस्सीम प्रेम करूनही आयुष्यभर तिचा मित्रच राहतो ...३ 

का तिच्या एका नजरेला ,हास्याला,भेटीला आपण महाग ठरतो
का तिच्या न येणा-या फोनची वात बघत आपला प्रत्येक दिवस सरतो ...४ 

का आपण तिच्यामागे इतके वेड्यासारखे वाहवत जातो 
का तिला मात्र मागे वळून आपल्याकडे पहायला एकदाही वेळ नसतो ...५ 

का का का . . . शेवटी का आपण तिच्या अव्यक्त प्रेमात पडतो
आणि का खोटे हसत,मूक रडत आपण तिचा हात दुस-या हातात जाताना पाहतो...६  

---------------------------------------------------------------------------


"महाराष्ट्र माझा" गीत 

ज्ञान, माहिती आणि रंजन
खुला  खजिना सदैव ताजा
या राज्याचे सुपुत्र आम्ही
वेद, दैव अन देव आमुचा....महाराष्ट्र माझा
असा हा महाराष्ट्र माझा
जय श्री महाराष्ट्र माझा   //धृ//

कणखर, राकट तरी सहिष्णू  
कलागुणांची खाण ही जणू
भाषा आणिक बहुमानाची
मायमराठी जननी अमुची....
     साहित्यातील सूर्य इथेचि 
     खेळामधले  देव  इथेचि 
     नाट्य-चित्रपट-नृत्य नि संगीत
     सण, परंपरा  ऐटीत  रंगीत....         //१// 
वेद, दैव अन देव आमुचा....महाराष्ट्र माझा
असा हा महाराष्ट्र माझा
जय श्री महाराष्ट्र माझा 

आहे ही भूमी,
रणनीतीत्तील धैर्यशीलांची 
राजनीतीत्तील धुरंधरांची 
संतजनांची सुधारकांची 
शिवबासारख्या महाराजांची....
      उत्पातांचे नाही जरी भय
      पापशक्तींची नाही हयगय
      सर्व क्षेत्री या झेंड्याचा जय
      उमेदीत हे चिरतरुण वय...... //२//
वेद, दैव अन देव आमुचा....महाराष्ट्र माझा
असा हा महाराष्ट्र माझा
जय श्री महाराष्ट्र माझा 

डसले कधी ते जहरी फुत्कार
भ्याड कटांचा पाप हाहाकार
एकजुटीचा मग आविष्कार
सत्यजयाचा घुमे टणत्कार...
     समतेसाठी सदा पुरस्कार
     कुणावरही ना कधी बहिष्कार
     महाराष्ट्रा...तू एक चमत्कार
     स्वीकार शिरसाष्टांग नमस्कार .....//३// 
वेद, दैव अन देव आमुचा....महाराष्ट्र माझा
असा हा महाराष्ट्र माझा
जय श्री महाराष्ट्र माझा 

--------------------------------------------------------------------------

असलंच पाहिजे?

साधूने चांगलंच शिकवायला पाहिजे,
खुंटीने टांगणच डकवायला पाहिजे,  
डेलीसोप त्रांगडयाने पकवायला पाहिजे,     
पुरुषाने रांगडच असायला पाहिजे ?

तुपाने साजूक असलंच पाहिजे,
गुप्तेने चाबूक म्हटलंच पाहिजे,
फेसबुकवर भावूक झालंच पाहिजे,
बाईने नाजूक असलंच पाहिजे ?

सागराने अथांग असलंच पाहिजे,
आकाशाने अमर्याद असलंच पाहिजे,
वेळेने गतिमान असलंच पाहिजे,
समाजाने धर्मांध असलंच पाहिजे ?

दातांनी घास चावलाच पाहिजे,
सांजवेळी दिवा लावलाच पाहिजे,
सेन्सेक्स अखंड धावलाच पाहिजे,
करप्ट नेता नेहमी घावलाच पाहिजे ?

मुंबईत मराठी टिकलीच पाहिजे,
टीम इंडिया नेहमी जिंकलीच पाहिजे,
दैनिक नकोय वीकलीच पाहिजे,                            
नेत्यांनी भारतमाता विकलीच पाहिजे ???
------------------------------------------------------------------------


जाऊदे त्याच्यायला

आताशा निरर्थक वाटतोय एकसमान..
केसातला कोंडा नि कपाळाचा घाम
हात जोडून पूजेमध्ये ओढलेला नाम..
का छळताय  शब्दांनो क्षमस्व माम

सुचू नको कविते डोकं झालंय जाम
सोयही नाही राहिली चोळायची झंडू बाम
कोण जाणे कुठे होईल मुन्नी कुणी बदनाम
काय करेल पुढे ती पहा तिचा पाम

ओ भाऊ ओब्लिक ताई, काय डोक्यावर पडलाय काय...पाम म्हणे पाम
अहो ज्यांना हात नसतात त्यानाही नशीब असतंच की..
जाऊदे 
त्याच्यायला, नशीब कुणाला चुकलंय... टॉपिक चेंज  

कलियुग आहे लेको दाम करी भारी काम
जातातच विकले इथे मानाचे सलाम
काम करा मोठे व्हा झुरू नका तेरे नाम
केस पिकले की बोला बाकी हरिओम हरीनाम

सिरीयस होतंय?.. जाऊदे 
त्याच्यायला... टॉपिक चेंज 
बालपण आमचे मागासच होते
रामरक्षा सुखकर्ता भीमरूपी शुभंकरोती
पण आजची पिढी हुशार महान
पप्पू नसला नाचत तरी  शीला आहे जवान

भरकटलं? जाऊदे.. टॉपिक चेंज
जग तुमची खिल्ली उडवतंय ? गिळून टाका अपमान
कुरतडलेला अस्ताव्यस्त जपा बाणा नि स्वाभिमान
खचू नका उद्या तुम्हीही छेडालच  सुरेल तान
काय लिहिलंय कळेल तेव्हा उंचावल्यावर मान

वगैरे वगैरे...

जाऊदे त्याच्यायला... इथे मोजत बसायला वेळ कुणाला आहे
नाकातला शेंबूड नि कानातला मळ,
डोळ्यातलं पाणी नि मनाचा तळ

संपले टॉपिक.. ऑफलाईन व्हा
कुणाचीतरी लाईफलाईन व्हा...

------------------------------------------

विडंबन - ढुंगणात वाजे समथिंग 

(लोक टायटल सॉंग लिहितात.. हे टॉयलेट सॉंग आहे.)
[चित्रपट: ती सध्या किती बाहेर पडते]

ढुंगणात वाजे समथिंग 
सारे पोट वाटे हॅपनिंग 
असतो सदा मी आता फार्टींग 

हो होss ... असतो उगाच काउंटिंग 
बघता तुला पोट जम्पिंग 
पोटात नकोनकोसे फिलिंग 
हावरे हावरे क्षण सारे 
खा तू अजून सांगणारे 
विसरून डाएट सगळा
वाटे अजून खावे 

टॉयलेटबाहेर मी रोजच्या 
असतो उभा घेऊन तोच जुना डबा 
नंबर येता मी खुश होता  
निघते बाहेर किणकिण ही छान सुगंधी 

रोखुनी किती तू राहशील 
जोर लागताना पाहशील 
आतून येऊन बाहेर तू जाशील 
नळ पाण्याचा सुरु मग होई  
हलके हलके वाटत राही 
पूर्ण दिवस सैलावून जाई 

-------------------------------------------------------------




Thursday, 25 August 2016


एक धक्का

एक धक्का.. इंजिनियरिंगला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंजिनियरिंग हा विषय पहिल्या झटक्यात सुटल्यावर बसलेला

एक धक्का.. रणवीर सिंगला बाजीरावांच्या भूमिकेत पाहून आणि मल्हारीवर टपोरी नाचताना बघून गिळलेला

एक धक्का.. मी माउंट एव्हरेस्टवर गेल्यावर काय देशील असं विचारल्यावर एकाकडून उत्तरात मिळाल्यावर पचवलेला

एक धक्का.. मांजरेकरांच्या हिंदी दे धक्का आवृत्तीत संजय दत्तला बघावं लागणार असल्याच्या जाणिवेने आगाऊ मुदतीत पचवावा लागलेला

एक धक्का.. स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेणाऱ्या याहूची विक्री इतक्या स्वस्तात झाल्याची पाहून बसलेला

एक धक्का.. दीपा कर्माकर टेस्ट इव्हेन्टमधून फायनलला गेल्यावर 'तिने गोल्ड जिंकले' अशी बातमी पसरताना क्रीडाअज्ञानाचा जाणवलेला

एक धक्का.. केजरीवाल, शोभा डे, बरखा, सागरिका, राजदीप, वागळे वगैरेंची फडतूस ट्विटाट्विटी पाहून रोजच्या रोज बसत असलेला

एक धक्का.. तिची फ्रेंड रिक्वेस्ट स्वत:हून आल्यावर त्याला बसलेला

एक धक्का.. ती फ्रेंड रिक्वेस्ट माजोर्डेपणाने डिलीट करून त्याने तिला दिलेला

एक धक्का.. फेसबुकवर काहीजणांची नको तिथे अनावश्यक लुडबुड पाहून बसलेला

एक धक्का.. लिहायला अजून काही सुचत नाही म्हणून आठवणारा मुंबईतला भाऊचा

एक धक्का.. हे असलं काहीतरी वाचून तुम्हाला बसू घातलेला 

----------------------------------------------------------------------------


वानखेडेला जेव्हा जाग येते...



वानखेडेला जेव्हा जाग येते...
 तेव्हा हाका जातात शिवाजी पार्क आणि डी वाय पाटलांनाही
 सामूहिकरीत्या अस्वस्थ होतात तेही आणि आम्हीही 

वानखेडेला जेव्हा जाग येते...
 तेव्हा दिसतात त्याला आपल्या अंगाखांद्यावर क्रिकेट खेळणारी पोरंटोरं 
 त्यांचे प्रशिक्षक शिकवत असतात त्यांना - कसं जावं गोलंदाजांना सामोरं 
 गर्दीत अनेक खेळतात कांबळी आगरकर शर्मा रहाणे 
 प्रत्येकाचाच नशिबी देशासाठी खेळायाची वाट पहाणे 
 बेंट हातात धरायला लागल्यापासून एकच स्वप्न असते  
 पुढच्या सेकंदापासून सचिन तेंडुलकर व्हायचे असते  

वानखेडेला जेव्हा जाग येते...
 तेव्हा आपसूक जागतात त्याच्याही आठवणी - अविस्मरणीय वर्ल्डकप सामन्यांच्या 
 जिथे गाजतात सध्या गल्ल्लाभरू आयपीएल सामने- खिशास कात्री लावून सामान्यांच्या 
 खरे क्रिकेट कसोटी क्रिकेट , तीन तास नव्हे पाच दिवस टिकवा विकेट 
 कळकळीनं ओरडून सांगत असतातही एखादे रमाकांत आचरेकर 
 दुर्लक्ष करतात आचरट - पुढच्या सेकंदास व्हायला निघालेले तेंडुलकर 

वानखेडेला जेव्हा जाग येते...
 तेव्हा तरळतात त्याच्याही मातकट डोळ्यांसमोरून २४ वर्ष
 १९८९ पासूनचे हतबल गोलंदाज पाहून होतो त्यालाही हर्ष
 खरंच आता ते दिवस राहिले नाहीत, पुढे काय होणार काय माहीत
 पण नंबर १० जर्सीवाला तो 'देव' खेळताना आता प्रेक्षक पाहणार नाहीत

वानखेडेला जेव्हा जाग येते...
 तेव्हा पहावे लागले अलीकडे त्याला स्टेडियममधले रिकामे रकाने 
 प्रेक्षकांचं म्हणणं अगदीच साधंसोपं - सचिनच नाही तर कसले सामने 
 आकडे काय विक्रम काय - सचिनसमोर क्षुल्लक ठरले 
 टीव्हीचे बिल खासे वाढले पण डोळ्यांचे मात्र पारणे फिटले 
 असं नाही  की गुणी खेळाडूंची आज वानवा आहे 
 पण सचिनशिवाय क्रिकेट ही एक निव्वळ अफवा आहे 
 क्रिकेट धर्मावर आमची भक्ती श्रद्धा आजही आहे 
 पण सचिनशिवाय क्रिकेट ही २४ केंरेट अंधश्रद्धा आहे 
 २४ एप्रिल दरवर्षी येईल, प्रत्येकजण सचिनला विश करेल
 पण २४ एप्रिल १९९८ - शारजा शतक कोण विसरेल 

वानखेडेला जेव्हा जाग येते...
 तेव्हा आठवतंच त्यालाही हे सारं 
 डोळे होतात चिंब त्याचे वाहतं मंद वारं  
 आणि आयपीएलचे कमर्शियली भुकेले वीर विचारतात क्युरेटरला 
 पाउस पडला नाही तरी मैदान ओलं कसं झालं ?

 वानखेडेला जेव्हा जाग येते...
 तेव्हा जाणवतं त्यालाही गावसकरनंतर तेंडुलकर आलाच की
 आता तेंडुलकर नंतर कोण 
 मग गरज होते निर्माण - कालचक्रे फिरण्याची 
 संघाला पुन्हा एखादा सचिन मिळण्याची 
 देवाचे भक्त जणू तयारच - त्या त्या घरातल्या पुढच्या पिढीतला देव पाहण्यासाठी 
 तेव्हा अर्जुन करतो आटोकाट प्रयत्न - आरशात पाहता त्याला रोहन दिसण्यासाठी 
 मग मात्र गतरम्यतेत हरवलेल्या वानखेडेला खडबडून जाग येते
 आणि आकळते त्याला आपणच आहोत भूमी असा चमत्कार घडण्याची 

आणि मग मात्र वानखेडे जागेच राहते.......
   




------------------------------------------------------------------------





Thursday, 31 December 2015

कसं सांगू पाडगावकर


तुम्हीच ना हो सतत शिकवलंत    
खडतर काळातही आनंदानं कसं जगावं
तुम्हीच ना हो सतत दाखवलंत
दु:खातही कसं सुख शोधावं
या जन्माची या जगण्याची ओळखही करून दिलीत
आता डाव अर्ध्यावरती सोडून गेलात
कसं सांगू तुम्हाला आमचं काय गेलं

तुम्हीच ना हो भिंगापल्याडच्या जगाला लाजून हसवलंत
तुम्हीच ना हो भोलानाथाला हवामान अंदाज ऑफिसात चिकटवलंत
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं हेही सांगितलंत
आता आम्ही सलाम तरी कुणाला करायचा
कसं सांगू तुम्हाला आमचं काय गेलं

तुम्ही असता तर झाले असते आहेत याहून शब्द हे हसरे
तुम्ही असता तर रडले नसते शुक्रतारे अन् मंद ते वारे
अजून रंगली असती बोलगाणी अन् वात्रटिकाही
आता तुम्हाला निरोप तरी कसा द्यायचा कण्हत कण्हत की हसत हसत
कसं सांगू तुम्हाला आमचं काय गेलं

इतकं दिलंत इतकं दिलंत इतकं दिलंत तुम्ही आम्हाला
खरं सांगतो माणूस केलंत तुम्ही आम्हाला
कसं सांगू तुम्हाला आमचं काय गेलं
कसं सांगू तुम्हाला आमचं काय गेलं





------------------------------------------------------------------


Sunday, 1 April 2012

अग्रेसर ग्रेस


त्याने वाजवली कधी ओल्या वेळूची बासरी
तर कधी अचानक त्याचे कावळे उडाले स्वामी
हा Guy ठरला दुर्बोध भोवती बालिश वासरी
तरी बांधली लेखणी घट्ट गहन गूढाशी अंतर्यामी

चौकटीबाहेर होता नेहमीच हा कवी
ओळख जशी दु:खाचा महाकवी
रूढ मराठी काव्याचे निकष वाकवी
पण अर्थ कळता दाद येई - 'वा कवी' !

अहो,माणिक सीताराम गोडघाटे
आता मराठी कवितेचे झाले कडू घाटे
नकोच होते तुम्हां कसले मोठे वाटे
मौनाशब्दातून दु:ख अंतर्मुख दाटे

तो लिहायचा अबलख घोडा म्हणून
आम्ही वाचायचो मूर्ख गाढव म्हणून
अन कविता पोचायची खेचर म्हणून...
रोग कर्काशी झुंज बसून
दु:ख पचवले झिजून हसून
तो ग्रेस अग्रेसर गेला ठरून...

तो ओलांडून गेला पृथ्वी वेस
लिहून ठेवल्या कविता ब्येस
अर्थ कळताना यायचा फेस
अशक्य अस्वस्थ ती एक केस

योगदान नव्हतंच बिलकुल लेस
आणिक नव्हती इतरांशी रेस
गाठणे मुश्कील करता चेस
आता कोठे गेला लागेल का ट्रेस

दुर्बोध ठरून गेला ग्रेस
वा-याने रान हलवून गेला ग्रेस
पाऊस निनादून गेला ग्रेस
भय 'इथले' संपवून गेला ग्रेस



-----------------------------------------------------------------------




Sunday, 11 March 2012



// द्रविडारती //
राहुल द्रविड हा माझा अतिशय आवडता खेळाडू आणि आदर्श...नुकताच निवृत्त झाला - ९ मार्च २०१२ रोजी...जगबुडी याहून वेगळी काय होणार आता या वर्षी ? त्याच्या १६ वर्षांच्या झळाळत्या कारकिर्दीला माझ्या या १६ कडव्यांच्या आरतीतून सलाम !!! (अर्थात इतकी मोठी आरती वाचणे हेही संयमाचेच काम)


      // द्रविडारती //



साडेपाच फुटी देह अन रंग सावळा

दिसायलाही हँडसम, ना बिलकुल बावळा
तंत्रशुद्ध फलंदाजीचा लागला लळा
तपश्चर्या कष्टांची आलीच फळा     //१//
      जय  देव  जय  देव जय  राहुल  द्रविड
      वेड लावलेस आम्हां तू खेळून दशक दीड //धृ//

कसोटीतील महिमा वर्णावा किती

टीकेची केलीस ब्याटने  बंद बोलती
विक्रम तुझे कित्येक हवेत विरती
चुटपुट चाहत्यांना लावून घेतलीस निवृत्ती //२//

जमणार नव्हते म्हणे तुला एकदिवसीय

पण पान हलेना तुजवाचून पाचदिवसीय
क्रिकेट धर्म अमुचा आम्ही भारतवासीय
तूच देव अमुचा असलो जरी महाराष्ट्रीय   //३//

दोन्ही प्रकारांत  धावा दहा  हजार

फटके  नजाकती, गरज पडता प्रहार
कशी खचवावी 'भिंत' गोलंदाज बेजार
ठरलेलीच मग त्यांची मायभूमीही हार  //४//

संघासाठी किती तो नि:स्वार्थी त्याग

आकडेवारीत न रमणे वृत्तीचा भाग
नांगी टाकती जेव्हा भले सिंह नि वाघ
नांगर टाकून सावरणे डाव पडेच भाग  //५//

कठीण समय येता कोण कामास येतो

म्हणायचास तू - "मी आहे ना,पाय रोवतो
विश्वविक्रमी दोनशे दहा झेलही घेतो
वेळ येईल तेव्हा यष्टीरक्षकही  होतो"    //६//

संघाप्रति अफलातून तुझी बांधिलकी

केलीस फलंदाजी तू कोणत्याही क्रमांकी
सहजी पार केलेस तरी आकडे तीन अंकी
विसरू कशा त्या खेळी शतकी-द्विशतकी //७//

गुंडाप्पा- सनीचा तू मोठा चाहता

संयमी प्रणेता शिस्तीचा भोक्ता
आडवेतिडवे फटके टाळून तंत्राचा मक्ता
वैतागे गोलंदाज तू बाद ना होता  //८//

विश्वचषक जो झाला दोन हजार साती

सूत्रे संघाची तुझ्याच हाती रे होती
खाल्ली नसती जर तेव्हा इतरांनी माती
फेरीत पहिल्या वाटचाल संपलीच नसती  //९//

शतके तुझी मित्र  तरी छत्तीस आकडाच

अर्धशतके पुसता केलास छत्तीस उलटाच
विदेशी यशस्वी ठरलास भलताच
अकरा 'ते' करायचे चौफेर नाच //१०//

धन्य ते पुष्पा-शरद माता नि पिता

अन खंबीर जोडीदार ती पत्नी विजेता
समीत-अन्वयचा तू समंजस पिता
अस्सा मैदानाबाहेरही तूच विजेता   //११//

अर्जुन, पद्मश्री, विस्डेनही जिंकलेस तू हुकमी

झाकोळला गेलास नेहमी खेळून संयमी
पदार्पण नंबर सात, मग तीन, पुढे सलामी
पाहू क्रिकेट कोणते मागतो ज्यामी ,सल्ला मी //१२//

वाढल्या अपेक्षा आणि वाढले वय

वाढला दबाव काहीशी हरवली लय
सहा  त्रिफळे  नि  केवढा  प्रलय
' शापित गंधर्व ' तू हेच राहील वलय  //१३//

बरोब्बर कळले तुजला कोठे थांबावे

युवा रक्ता संधी देत मागे हटावे
नव्हते सूर जरी फार की 'आता तू जावे'
परि केलास ' वॉलविदा '  शांत मनोभावे  //१४//

सर्व कसोटी देशी शतक झळकावणे

नशिबी तुझिया पुरेसे कौतुक ना येणे
अफाट कर्तृत्व तरीही तोरा ना मिरवणे
इच्छा एकच रे आता प्रत्यक्ष भेटणे  //१५//

कल्पना करवेना नंबर तीन दुस-याला पाहणे

पचनी पडेना संघात तुझे अस्तित्वच नसणे
पण अमान्य तुला होऊन ओझे खेळतच राहणे
तुज ऐसा खेळाडू पुन्हा नाहीच रे होणे //१६//

                      

                                                             --- पराग





----------------------------------------------------


Friday, 15 July 2011


तुमचा वाढदिवस
खरं सांगू...तुमच्या वाढदिवशी तुमची आठवण येणार असतेच अनेकांना
मग तुमचा बड्डे हैप्पी वाला करायला करतील फोन,एसेमेस प्रकार नाना
वर्षातून हा एक दिवस आठवण काढून टिकवतात (?) ते मैत्री वर्षानुवर्षे जपलेली (?)
तुम्हीही मोठ्या मनाने द्यावी मुभा उरलेले ३६४ दिवस तुम्हांला विसरायची त्यांना

वर्षातून एकदाच तर येतो हो वाढदिवस
हो,इंग्रजी केंलेंडरलाच आम्ही तिथीप्रमाणेसुद्धा मानतो
आयुष्यात असे कितीसे मिळणार असतात हे दिवस
हो,मेल्यावर प्लान्चेटवर बोलावून आमचे सांगा म्हणतो

आपापल्या बिझी शेड्युलमधून खास  वेळ काढतात ते
नंबर मिळवून संपर्क साधून मनापासून विश करतात ते
'नशीब आज तरी आठवण आली' असे फटकळ बोलू नका
तथाकथित जपलेल्या (?) मैत्रीत उगाच विष कालवू नका

नुसतीच बोटे मोडण्याऐवजी मनाच्या आरशात निरखून पहा
'शाळेपर्यंत जिवलग होता' तर मग नंतरचा काळ पारखून पहा
आठवण येते,मिस करतो वगैरे फडतूस बाष्कळ बोलू नका
प्रत्यक्ष भेटता किती,बोलता किती .. ते एकदा तपासून पहा

इगो असतोच ज्याला त्याला
तुम्ही दोघे तरी अपवाद कशाला
____ ला फोन येणारच तुला
कारण ____ ला तूही करतोसच त्याला ...

                                                    --- शाळेतला मी  
-------------------------------------------------------------

June 2011 


पुणे वोरियर्स इंडिया अभिमान गीत 

शूर  आम्ही वोरियर्स आम्हाला काय कुणाची भीती 
जिद्द  पुणेरी  न स्वप्नापायी ब्याट घेतली हाती  //धृ// 

ब्याट आमुची फटके मारी चौकारी -षटकारी 
नडेल कोणी - संपेल क्षणी ही अमुची ललकारी  
बाउन्सर्स तुमचे हतबल होतील... अशी पहाडी छाती  //१//

डेअरडेव्हिल अश्व घेउनी आम्हीच जिंकू रायडर्स
चार्जर्स येवो,रॉयल्स येवो,असो किंग्ज - चालेन्जर्स
इंडियन्सही  सलाम करतील... अशी ब्याटची पाती  //२//

आयपीएल हे आमुच्यासाठी इंडियन पुणेरी लीग
स्टेडीयमही  भरून वाही - पाट्यांची ती रीघ
'भिंत' असो  वा  'देव' असूदे ...जिंकेल दादागिरी    //३//

धावा  रोखू, झेलही  घेऊ, उडवू  तो  त्रिफळा
सिद्ध आहे या संघामधुनी देशी-विदेशी मावळा
पुणे वोरियर्स इंडिया जिंकेल ...आयपीएलची स्वारी   //४//  

-----------------------------------------------------------------------



May 2011

थय थय महाराष्ट्र माझा

(नुकताच १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा झाला..अभिमान आहेच...पण सध्या एकूणच जे चित्र आहे त्यावर 'जय जय महाराष्ट्र माझा' च्या चालीतून भाष्य करण्याचा छोटासा प्रयत्न केलाय ..कडवट वाटेलही कदाचित ..पण सत्य कटूच असतं म्हणे....त्यामुळं गोड मानून घ्या म्हणायचा प्रश्नच येत नाही...जय महाराष्ट्र !!!)

थय थय महाराष्ट्र माझा
छळही आता बास माझा 

संख्या नियमन लोकां नाही
भारनियमन दिशांना दाही        
चैत्रापासून फाल्गुन माही
मतपेट्यातून शगुन नाही
   वीज, पाणी तरी दे रे राजा
   अथवा गळा काप माझा....

स्फोट जाहले, पाट  वाहिले 
शोक सुरक्षित, डोळे  सुकले 
फाशी सुनावून ढिम्म राहिले 
बिर्याणीचे लाड पुरविले 
  होय होय, हा संताप माझा
  पस्तावा सालाबाद ताजा ....

'आम आदमी' - शिवी जाहली  
प्रामाणिकता शाप वाटली   
या भूमी ना शिस्त राहिली
'लोंढे' घुसता सुस्त निद्रिली
  हाय हाय,दशा काय झाली....
  अवतर, आता तूच वाली

चित्र अघोरी दिसते सध्या
कला बाजारी,ढोबळ विद्या
पुरुनी उरला नात्या 'घ्या-द्या'
''उठव किसना'' - बहि-या पेंद्या
  म्हणे वाट, कुठे काय लागली
  थाट बाट 'टोपी ' हौस भागली....

शेत जरी हे कुंपण खाते
शांत भ्रांत उसळोनी शमते
राज्यदिनी या मन तळमळते
स्वप्न उद्याचे मनी नांदते
     शिवा दे जरा हात तुझा
     मरगळ जाईल - शब्द माझा .... 

----------------------------------------------------------------------
May 2011

बदला

ही कहाणी आहे एका राष्ट्राची
मी रहात असलेल्या महान देशाची
तो होता छावणी ब्रिटीश,मुघल,डचांची
४७ ला झाली पहाट त्याच्या आजादीची..

आकाराने देश लईच मोठा

लोकसंख्येने तर लईलईच मोठा
बैल निपजतात जेथे यूपी - बिहारात
नि गोठा वाढतो सहिष्णू महाराष्ट्रात ...
कीड देशाला प्रचंड लागली
वाट सहजच तत्त्वांची लागली
घोटाळे करून नेत्यांची खाज नाही भागली
भ्रष्टाचाराची तोफ अभिमानाने  डागली ...
बाई इटली सोडून आली
सत्तेची किटली दिल्लीत बसली
साठ वर्षे पक्षाने सूत्रे हलवली
इमानी समाजाची गुणसूत्रे पळवली...
सवय पुढे मग झाली याचीच
आज ना उद्या होती होणार गोचीच ..

एक दिवस मग असा आला - कोणी कुणाला ओळखत नाही

निरक्षर बेकारी गलिच्छ रोगराई व्यसनी तरुणाई बोंब बारमाही
समाज हलकट - निद्रिस्त रहा
नेते नालायक - खातच रहा
सिनेमे लोचट - सेन्सॉर आडवा
क्रिकेट खेचक - वर्ल्डकप आठवा
चाललंय आपलं चालूदे
देश मातीत जाऊदे
मला पोटभर खाऊदे
गरीब भुकेने मरूदे...

लाख कोटी शब्द विसरले

पेटी खोका जिभेवर रुळले
आरक्षण - डोनेशन बहुत झाले
शिक्षणसम्राटच डॉन झाले
स्विस ब्यांकेत खातं 'आदर्श' ठरलंय
जाईल तिथे खाणं तत्त्वच जडलंय
भ्रष्ट पैशाने 'टेबलाखालून' पछाडलंय
ओवाळून सत्तेचा लिंबू राज्याराज्यात झपाटलंय
सगळीकडेच झाला अंधार
अखेर दोन डोळ्यांत फुलला अंगार
ही बदलली पाहिजे सिस्टीम भंगार
मिळूदे स्वच्छ निरोगी सरकार ...

हजारांत एखाद्यालाच एवढं सगळं जाणवलं

त्या हजारांत एकाचं नाव अण्णा हजारे निघालं
बसला गडी करायला उपोषण प्राणांतिक बिणान्तिक
जाणीवा जागृत झाल्या तुमच्या आमच्या सामाजिक बिमाजिक
सोबत ते डेंजर विकीलीक्स काढायचं उकरून टूजी -  थ्रीजी
देशही म्हणाला अण्णांना - 'व्हॉट एन आयडीया सरजी ! '
सरकारला दिसल्या ' हजारे ख्वाहिशे ऐसी '
त्यांच्या नियमांची झाली ऐशी कि तैशी
एक झाले सगळे एकदम
फुस्स झालं शासन बेरहम
लोकपाल विधेयक जिंकून गेलं
लिंबूपाणी  घेत उपोषण सोडलं
च्यानेल पेपर्सनी बरंच कमावलं
सिस्टीमनं बेअरींग डेअरींग गमावलं

शांत शांत ...

वाटलं.. आता सगळं सुधारलं.. जिणं वधारलं

काल स्वप्नात आले बोस, टिळक, आगरकर, सावरकर

विचारलं त्यांना "दादा, खुश ना ? सारं बदललं ना लवकर ?"
खाड्कन मग कानाखाली बसली
वर चार शब्द ऐकवून गेली
"होय बाळा, जरा बदललेलं दिसतंय हे तात्पुरतं,
जसं जेवणात लोणचं तोंडी लावण्यापुरतं
उद्या सर्व पुन्हा 'जैसे थे' होईल
'वो भी क्या दिन थे' म्हणत जिंदगी जाईल
स्वप्नात आलोय म्हणजे तू झोपलाच आहेस
पुढचा अण्णा बसेपर्यंत झोपेतच राहशील "

... ताड्कन उठलो आरशात पाहिलं

मी नाही समाज दिसला
आरती प्रेयर नमाज पाहिला
कुठूनसा मागून आवाज आला,
'जागे व्हा,विचार बदला, देश बदला
नाहीतर सोडा नाद नि सरळ 'देशच बदला'
पुढचा अण्णा आत्ताच अदला - बदला
प्रत्येकाने उठा नि घ्या हक्काने बदला
प्रत्येकाने उठा नि घ्या हक्काने बदला '
--------------------------------------------------------

No comments:

Post a Comment