Monday, 20 June 2016

बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन - भाग २)

आपण पाहिले की बर्फाळ प्रदेशात सैनिकांचे जीवन कसे खडतर असते. सियाचीनमध्ये दैनिक पुढारीने काही वर्षांपूर्वी निधी गोळा करून सैनिकांसाठी सुसज्ज हॉस्पिटल बांधले, त्यावरही बाबांची प्रतिक्रिया ‘बरे झाले’ फॉलोड बाय दीर्घ मौन अशी कमी शब्दात बरेच काही सांगून जाणारी होती. पण बाकी कित्येक वेळी जंगलातही जेव्हा सैनिकांना झाडाझुडपांशी अगदी साधर्म्य साधणारे हिरव्या रंगाचे कपडे घालून, जणू सरडा होऊन, शत्रूचा माग घेत बराच वेळ बसावे लागते, (आठवा: द लोन सर्वायव्हर, लक्ष्य किंवा गेलाबाजार टँगो चार्ली तरी) तेव्हा काय? दुश्मन येईल तेव्हा मारूच, चकमक होणारच.. पण खाण्याचे काय?

जंगलात मिशनवर असलेले सैनिक 
तर अशा वेळी हेलिकॉप्टर्समधून अन्नाची पाकिटे सैनिकांसाठी टाकण्यात येतात हे माहीत असेलच. शक्यतो टिकाऊ पदार्थ, म्हणजे सुका मेवा–बदाम, अक्रोड, चीज, लोणी, अंड्याचे पदार्थ, चिकन पिसेस वगैरे हाय कॅलरीजचे पॅक्ड आयटेम्स असतात ते. पण कित्येकदा प्रचंड भूक लागूनही त्या वातावरणामुळे ते सैनिकांना खावेसे वाटत नाहीत, किंवा कधीकधी आधीच कुणा जंगली जनावराच्या तावडीत ती पाकिटे पडून फस्त होतात. मग सैनिक काय करणार? पुढच्या हेलिकॉप्टरची वाट पाहणार? लोकांना काय जातंय इथे व्हेज नॉनव्हेजवर पौष्टिक वाद घालायला किंवा नॉनव्हेज खाणाऱ्याना नाके मुरडायला. मुद्दा असा की तिथे काहीही खाण्याची तयारी असावी लागते. फळे मिळून मिळून किती मिळणार? मग काही छोटे प्राणी, प्रसंगी सापही मारून त्याचे विष काढून तो कसा खावा याचे ट्रेनिंग सैनिकांना दिलेले असते. डिस्कव्हरीवर ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ बघताना माझं नुसत म्हणायला काय जातंय की, “ईss, तो असा कोणताही प्राणी पकडून कच्चा भाजून कसा काय खाऊ शकतो?”, पण त्यावर बाबा म्हणतात, “का नाही खाणार?” आणि हे म्हणताना त्यांचे तेव्हा काहीच गेलेले नसते असे नाहीच नाही.. किमान तशी काही अन्नाची पाकिटे तरी नक्कीच.

 ओळखा पाहू किती आहेत?
    झाडाझुडपाशी साधर्म्य साधणाऱ्या पोशाखातील सैनिक

सैन्यातले ट्रेनिंग, तिथल्या शिक्षा, प्रत्येक ठिकाणी गेल्यावर राहायची करावी लागणारी तयारी, युद्ध किंवा सराव सेशन असताना तोफखान्याचे नेमके काम, सैनिकांची एकमेकांत चालणारी चेष्टामस्करी वगैरे गोष्टींवर लिहीनच. पण त्याआधी.. भरती झाल्यावर अधूनमधून आधी झालेल्या युद्धांच्या काही गोष्टी, आठवणी सहकारी, सिनियर्सकडून नव्या सैनिकांना कळत असतातच. युद्धस्य कथा रम्य: म्हणतात ते उगीच नाही. तर बाबा ऑगस्ट १९६५ मध्ये भरती होण्याआधीच १९६२चे जे युद्ध झाले होते, ते १९६२ इंडो-चायना वॉर आपण हरलो होतो. लाजिरवाणा पराभव म्हणून इतिहासात नोंद झाली, त्याची कारणे सांगणारी अनेक पुस्तकेही आज मिळतात.  


 ‘न सांगण्यासारखी  गोष्ट’ हे त्यावरचे सध्या नवीन गाजत असलेले पुस्तक. शिवाय शिव कुणाल वर्मा यांचे The War That Wasn’t हे पुस्तकही आहे.  बाबा म्हणतात की कोल्हापूरचे तेव्हाचे सेनेत एक्टीव्ह लेफ्टनंट जनरल थोरात यांनीही चीनपासून भारताला धोका असल्याचे त्या युद्धापूर्वीच सांगितले होते. पण या इशाऱ्याकडे 'हिंदी  चिनी भाई भाई' म्हणत भारतीय सरकारने साफ दुर्लक्ष केले आणि त्याचेच पुढे परिणाम भोगले. यावर लेफ्टनंट जनरल बी एम कौल यांचे अनटोल्ड स्टोरीहे १९६७ साली प्रकाशित झालेले पुस्तकही तेव्हा प्रचंड गाजले होते. थोरातसरांसारख्या बऱ्याच सेनाधिकाऱ्यांचे तेव्हा म्हणणे होते की चीनने ज्या जबर ताकदीने हल्ला केलाय ते पाहता आपण आत्ता युद्धासाठी तयार नाही आहोत. नाऊ हियर कम्स इन पिक्चर मिस्टर पंडित नेहरू.

अहिंसा पक्षातून पुढे मोठे झालेले हे नेते.. सक्तीने हिंसा करावी लागणाऱ्या युद्धासारख्या प्रसंगी प्लानिंग करताना दूरदृष्टीचा कायच्या काय अभाव कसा जास्तीत जास्त असावा आणि अशा प्रतिष्ठेच्या मोठ्या लढाईसाठी नियोजन कसे अजिबात नसावे याचे उत्तम आदर्श उदाहरण तेव्हा नेहरूंनी घालून दिले. सैन्याच्या कोणत्या भागातल्या तुकड्या कितपत आणि कुठे जाऊन लढण्यासाठी सक्षम आहेत हे तरी बेसिकली पाहावे लागते. त्या ट्रूप्सचे प्लेसमेंट कसे असू नये हे दाखवत नि मिलिटरी ऑफिसर्सना न जुमानता हट्टी नेहरूंनी दक्षिण भारतीय सैनिकांच्या तुकड्यांना (मद्रास रेजिमेंट, मराठा बटालियन रेजिमेंट वगैरे) त्या फ्रंटवर पाठवलेज्यांना अशा थंडीचा अनुभव नव्हता. १९६२च्या या डिसेंबर थंडीतल्या युद्धासाठीच्या भारताच्या अतिगचाळढिसाळ नियोजनावर जग हसले. छी थू भारतीय लष्कराची झाली, पण सैनिकांना त्या खाईत लोटणारी मागची डोकी राजकारणी होती ज्यांनी काही गोष्टी करायला तेव्हा सेनाधिकाऱ्याना भाग पाडले.


जगात कित्येक देशांमध्ये लष्कराने उठाव केला की काय काय होऊ शकते हे आपण पाहिलेय, मग लष्करी राजवटच! (इराक, पाकिस्तान वगैरे). आपले सैन्य संस्कारी, पण ६२ साली मात्र गोष्टच जरा वेगळी होती. कित्येक सैनिक लढून नव्हे तर त्या जीवघेण्या थंडीनेच मेले. हो, दुर्दैवाने मेले हाच शब्द. म्हणजे साधी ब्लँकेट्सच ती काय फक्त होती, पण किमान साधी चांगल्या प्रतीची स्नो क्लोथ्सही सैनिकांकडे नव्हती.. सरकारी उदासीनता जिंदाबाद.. मरायचे तेवढे मेले. (‘सैनिकच तर आहेत ते, मरणारच की, ते मरण्यासाठीच असतात’ हा बेबीतला मुरली शर्माचा डायलॉग मध्येही एका कोंग्रेसी नेत्याने मारला होताच कुठेतरी त्यांची सत्ता असताना) त्यावेळी ब्लँकेट्स, की वेपन्स, की थंडी, की शत्रू, की अपुरे जेवण, की एकूणच खडतर हवामान, की असलेली तोकडी कुमक आणि अपुरी रसद, की मिळणाऱ्या आणि फॉलो कराव्या लागणाऱ्या ऑर्डर्स असे अजिबातच कन्फ्युजन नव्हते सैनिकांचे. परिणाम व्हायचा तोच झाला.. आपली प्रचंड मनुष्यहानी (सैनिकहानी शब्द कसा वाटतो) आणि अरुणाचलचा काही भाग चीनकडे.


अर्थात १९६५ युद्धावेळी इतकी खराब अवस्था नव्हती. गुलझारीलाल नंदा, आणि मग लालबहादूर शास्त्रींकडे सूत्रे असण्याचा तो काळ. मग ताश्कंद करार काय होतो, तो होताच लालबहादूरांचे नैसर्गिक (की घातपाती?) निधन काय होते, मग संशयाची सुई तेव्हाचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यावर काय येते आणि इन्फॉर्मेशन मिनिस्ट्रीसारख्या तेव्हाच्या फुटकळ खात्याच्या मंत्री इंदिरा गांधी थेट पंतप्रधान काय होतात.. सारेच अनाकलनीय. नाही का?


इंदिरा गांधींवरून आठवले.. बाबा नेहमी म्हणतात की माझ्या खरंतर तीन आया – एक माझी आई, दुसरी भारतमाता आणि तिसरी इंदिरा गांधी. म्हणजे झाले असे की ७१च्या युद्धावेळी जखमी सैनिकांना भेटायला पंतप्रधान या नात्याने त्या गेल्या होत्या, जसे अलीकडे नरेंद्र मोदी हनुमंतअप्पांना भेटले होते. सर्वाना पुरून उरणाऱ्या त्या खमक्या बाईने सैनिकांशी केलेला शेकहॅंड, खांद्यावर ठेवलेला हात सैनिकांचे बळ निश्चितच वाढवणारा होता. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त जी परेड असते त्यातही बाबा इंदिरा काळात १९७१/७२/७३ अशी तीन वर्षे सहभागी होते. तीन-तीन वर्षांचं रोटेशन असतं म्हणे रेजिमेंट्सना याचं.. तेव्हा तरी असायचं.


बरं फक्त हेच नाही, तर बाबांचे बरेचदा दिल्लीत इंदिरा सरकारच्या ऑफिसातही जाणे व्हायचे. सिसफायर मॅप मार्किंग घेऊन दिल्लीत साउथ ब्लॉक हेडक्वार्टरमध्ये जावं लागायचं. इंदिरा गांधी, जनरल, विंगकमांडर अशा मोठ्या अधिकाऱ्यांच्या तिथे मीटींग्ज व्हायच्या. काही सिक्रेट/ कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्सच्या फाईल्स, अपडेटेड नकाशे असलेल्या फाईल्स वगैरे तिथे नेऊन देणे हे जबाबदारीचे काम.. सिनियर सर्व्हेयर म्हणून ते एकदा बाबांकडे आलं, नीट केलं, आणि मग पुढे बरेचदा ते त्यांच्याच गळ्यात पडलं. ती फाईल एकदा सबमिट केली की हाशहुश व्हायचं असं बाबा म्हणतात.

दिल्लीत गेल्यावर बाबा बहुतेकदा त्यांच्या आत्येबहिणीकडे जेवायला जायचे. तिचे मिस्टर सिव्हील आर्मीत सिनियर कॅमेरामन म्हणून काही लष्करी डॉक्युमेंटरीज, इतर फोटोज, व्हिडिओज वगैरे कामे करायचे. जेवण तिथे झाले तरी, किंवा दिवसभर बाहेर असलात तरी रात्री झोपायला मात्र सक्तीने हेडक्वार्टर्समध्येच यावे लागायचे. आता ही आत्येबहीण कोण? (थोडेसे इंटरेस्टिंग विषयांतर) तर तिची आई म्हणजेच बाबांची सख्खी आत्या ही सुप्रसिद्ध संगीतकार शंकरराव व्यासांची पत्नी. हे व्यास म्हणजे रामराज्य, भरतभेट, इंद्रासन, सुदाम्याचे पोहे या सारख्या सुरुवातीच्या काळातील अनेक बोलपटांचे संगीतकार. मराठी, हिंदी, गुजराती अशा भाषांमधील अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. त्या काळात सुधीर फडके आणि गदिमांसोबत त्यांचे बरेचदा येणे व्हायचे सांगलीला, तेव्हा आमच्या वाड्यात उतरायचे आणि आवरून मग नृसिंहवाडीला जाणे, (आम्ही मूळचे नृसिंहवाडीचे श्री दत्तगुरूंचे पुजारी/वाडीकर) तिथे ठरला असल्यास दत्तचरणी संगीत कार्यक्रम वगैरे प्लान्स.. १९५६-५७ पर्यंत गीतरामायणामुळे बाबूजी-गदिमा जोडी चांगलीच फेमस झाली होती नि त्यांच्यासोबत काही प्रोजेक्ट्समध्ये शंकरराव व्यास असल्याने ते सांगलीत घरी उतरले की तोबा गर्दी व्हायची. तेव्हा बालपणी या त्रयीचा थोडाफार सहवास बाबांना मिळाला.

मग अधूनमधून का होईना पण असे कल्चरल वातावरण असतानाबाबांना अचानक लष्करात जावेसे नेमके कधी आणि का वाटले? काय पाहिले त्यांनी १९६१ साली?आणि कुठे? जाणून घेऊ पुढच्या भागात..

(क्रमश:)




No comments:

Post a Comment