Monday, 20 June 2016

बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन – भाग ३)

बाबांना का वाटले मिलिटरी जॉईन करावेसे? तेव्हा घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. बाबांना चार भाऊ आणि दोन बहिणी.. नानांना (आजोबा) आपला आणि खर्च नको म्हणून साधारण सातवीनंतर पुढच्या शिक्षणासाठी बाबा कर्नाटकात त्यांच्या मामाकडे राहायला गेले.. केरूर येथे. तेव्हा अशी पद्धत अनेक घरांत होती की कुणी काम करत शिकण्यासाठी वा थेट आपल्या पायावर उभं राहून कुटुंबाला आधार देण्यासाठी, बाकी भावंडांची शिक्षणे निभावण्यासाठी लहान वयातच बाहेर पडत. बाबांचे थोरले भाऊ विलासकाकाही वयाच्या चौदाव्या वर्षीच लेथ मशीनवर उभे राहिले ते म्हणूनच. तर बाबा जेव्हा केरुरला होते, त्या काळात म्हणजे साधारण १९६१-६२ च्या दरम्यान गोवा एक्शन सुरु होती, अर्थात गोवा मुक्तीसंग्रामच.. ज्यात लष्कराचा सक्रीय सहभाग होता. तर तिथून मिलिटरीच्या अनेक गाड्या जायच्या. त्या लष्करी गाड्या, त्या तोफा, ते सैनिक, त्यांची ऐट नि ते रुबाबदार पोषाख पाहून बाबा आणि त्यांची मित्रमंडळी कुतूहल म्हणून त्यांच्या मागे मागे पळत जायची. तेव्हा बाबा आठवी-नववीत असतील. त्या परिसरातून लष्करी विमानेही अगदी जवळून जाताना त्यांना दिसायची. मग तर आकर्षण आणखीनच वाढले.

अर्थातच ती विमाने सातत्याने पाहून बाबांचाही कल आर्मी किंवा नेव्हीपेक्षा एअरफोर्सकडे जास्त होता. आणि तो काळ असा होता की तेव्हा तरुणांना देशभक्ती शिकवायला लागायची नाही, ताजं ताजं स्वातंत्र्य मिळालं होतं, त्याची लोकांना किंमत होती, ग्लोबलायझेशनच्या नावाखाली विदेशी आक्रमण व्हायला १९९२ अजून खूप लांब होतं सो विदेशी वस्तूंचं आकर्षण तितकंसं नसायचं. त्यात बाबा म्हणजे कट्टर सावरकर आणि टिळकभक्त.. टिळक ज्यांनी विदेशी वस्तूंची होळी केली. काहीही बरळण्यासाठीच आपला जन्म झाला असून आपले हे जीवितकार्य आपण (ते कितीही चुकीचे असले तरी) पार पाडलेच पाहिजे अशी काही नेते नि विद्यार्थ्यांची तेव्हा समजूत नव्हती. समाज अजून तितकासा बनचुका झाला नव्हता आणि महत्त्वाचं म्हणजेभारत माता की जयम्हणण्यावरून तेव्हा वाद होत नसत. वपुर्झात वपु म्हणतात त्याप्रमाणे देशभक्ती आणि प्रामाणिकपणा या गोष्टी टक्केवारीत नसतात, त्या एकतर तुमच्यात मुरलेल्याच असतात किंवा अजिबातच नसतात.

शिवाय गांधीवध झाल्यावर देशभरात ठिकठिकाणी ज्या ब्राह्मणविरोधी दंगली उसळल्या, त्यांचा फटकाही त्यांना (ते आजीच्या पोटात असताना) बसला होताच.. म्हणजे सांगलीत आमच्या वाड्यावरही हल्ला झाला होता (सशस्त्रच असावा, किमान काठ्या तरी असतातच अशावेळी), जबरदस्तीने घरातून हुसकावून लावणे वगैरे आणि तुरळक जाळपोळ प्रकार. तेव्हा कृष्णा नदीच्या तीराने अनेकांना, ते जीव मुठीत धरून बसण्याचे काही दिवस, आश्रय दिला होता.

तर अशी काहीशी पार्श्वभूमी निगर्भसंस्कार’ असल्याने ते कसलेसेनेशन फर्स्टवाले बाळकडू उपजतच असावे. पण एकूणच त्या गोष्टींनी भारावले असल्याने ड्रिव्हन बाय दॅट जुनून, केरुरची ती चार मुलं चक्क एकदा थेट बेंगलोरला पळून गेली.

आता बेंगलोरच का.. तर तिथे येळहांका एअरफोर्स स्टेशन आहे. (फोटो पहा) तिथल्या ऑफिसरला कसंतरी गाठून या पोरांनी सांगितलं कीआम्हालापण एअरफोर्स जॉईन करायचंय’. त्या कंपूत बाबाच वयाने आणि शिक्षणाने इतरांपेक्षा मोठे आणि तब्येतीनेही मजबूत.बाकी तिघे कम शिकलेले असल्याने आणि बाबा मॅट्रिकच्या उंबरठ्यावर असल्याने त्या भल्या माणसाने नीट समजावून सांगितलं कीएअरफोर्स जॉईन करायचं तर किमान मॅट्रिक तरी पाहिजे, ते आधी पूर्ण करून या मग विचार करू.’ तेवढं शिक्षण नसेल तर तिथं काम मिळत नाही असं नाही, पण मग कूक, स्वीपर, हेल्पर वगैरे कामे असतात.
 येळहांका एअरफोर्स स्टेशन


बाबा परत आले, काही काळ गेला. पण स्वस्थ बसू देईल ती देशभक्ती कसली. (आजकालही देशभक्त लोक स्वस्थ बसत नाहीत, निष्पाप अतिरेक्यांसाठीबाबा रे, हम शरमिदा है, तेरे कातील जिंदा है वगैरे घोषणा देतात एवढंच) जायचं तर लष्करातच हे ठरलं होतं, मग एवढी कळ कुठली निघायला. शेवटी एअरफोर्स नाहीतर नाही, पण काही करून मिलिटरीत जायचेच आणि आत्ताच जायचे म्हणून बाबांनी आर्मी निवडली आणि जॉईन करूनच लवकरात लवकर मॅट्रिक (जुनी अकरावी) पूर्ण केली. ते होऊपर्यंत ते तिथे टेक्निकल असिस्टंट म्हणून कार्यरत होते, मॅट्रिक झाल्यावर सर्व्हेयर झाले.

 येळहांका एअरफोर्स स्टेशन

समाधानाची बाब म्हणजे आर्टिलरी सेक्शन मिळाला, कारण इन्फंट्री म्हणजे मरणाचे हाल असतात. आर्टिलरीला फिरायला गाड्या, जीप वगैरे तरी असतात, इन्फंट्री (पायदळ) म्हणजे सगळीकडे पायीच जायचं तेही अंगावर सतत ओझं घेऊन, फार खडतर ट्रेनिंग. काय खातात, काय जेवतात त्यांचं त्यांना माहीत.

बाबा म्हणतात, मिलिटरीत तर आर्टिलरी किंवा इतर कोणत्याही सेक्शनमधल्या सैनिकांची आपसांत चेष्टामस्करी चाललेली असली की ते असंच म्हणायचे- ‘तुझ्या मुलाला उचलून आणून इन्फंट्रीत टाकेन आणि तुला सांगणार पण नाहीकिंवा तो असेल त्या भाषिक प्रांताचा उल्लेख करून मुद्दाम दुसऱ्या सैनिकाशी टारगटपणे बोलणे पण तेही टार्गेटला ऐकू जाईल असे कीअरे इन्फंट्रीला तमिळ डोकी पाहिजेत म्हणे अजून, जोरात भरती सुरु आहे, गरज पडल्यास आर्टिलरीतून उचलणार आहेत म्हणे.. नाही म्हणजे उस्ताद कुणाशीतरी बोलत होता ते कानावर आलं काहीतरी की रंगनाथन दणकट आहे आर्टिलरीवाला.. लिस्टमध्ये घेवगैरे. मग तो चेहऱ्यावरचे रंग उडालेला तमिळ रंगनाथन कुठला पोटभर जेवतोय त्या दिवशी. बाकीचे भले नाचतीलहवन करेंगेम्हणत, पण शेवटी त्या तमिळाची समजूतही काढतील आणि हसत खेळत एका ताटात ते (असेल त्या दर्जाचं अपुरं जेवण) जेवतील. तेवढाच रिलीफ, तेवढेच मनोरंजन.. नाहीतर विरंगुळा म्हणून बोलणार तरी काय ना..


भारतीय लष्करातील काही रणगाडे - तोफा  

अर्थात ऑगस्ट १९६५ ला जॉईन झाल्याने आणि तेव्हाच्या युद्धात आपली सैनिकहानी प्रचंड झाली असल्याने नवीन दमाची फळी तयार करण्यासाठी मिलिटरी प्रशासनानेही काही कठोर पावले उचलली. तीन वर्षात दोन मोठी युद्धे, त्यामुळे झालेला बॅकलॉग भरून काढायचा तोही लवकरात लवकर.. कारण पुन्हा पुढचे युद्ध कधी होईल सांगता येत नाही, तयार असलं पाहिजे (जे झालंच पुढे सहा वर्षांनी) पण एकूणच त्याचा फटका तेव्हा जॉईन झालेल्या या बॅचला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या प्रचंड बसला. कारण एरवी जॉईन झाल्यावर जे एकूण ५६ आठवड्यांचे ट्रेनिंग असतं ते या बॅचसाठी मात्र केवळ ३२ आठवड्यात पूर्ण करण्यात आलं. म्हणजे काम तेवढंच, ट्रेनिंग तेवढंच.. फक्त ते शिकण्यासाठी कालावधी कमी.

इतक्या फास्ट रनरेटने शिकलेली ही फळीही अर्थातच तितकीच टफ तयार होणार होती आणि झालीही. त्या प्रचंड खडतर ट्रेनिंगच्या काळात वैतागून आणि हार मानून पळून जाणारेही काही कमी नसतात.. कमकुवत असाल तर गुडघे टेकायला लावायला तेवढी पिळवणूकच इनफ असते. ‘लक्ष्यमध्ये हृतिक हे आपल्या पिढीला नीट दाखवतो. रोज पहाटे चारला उठून अमुक वेळेतच आवरून अमुक किलोमीटर रनिंग, मग त्या कठोर शारीरिक कसरती (आठवा: प्रहार), तो सहकाऱ्यांसोबत सराव, ते वेपन ट्रेनिंग, स्विमिंग, नेमबाजी वगैरे सेशन्स. फिजिकल फटिग प्रचंड असायचा, पण अर्थात फुटबॉल, पोलो, हॉकी वगैरे खेळही खेळायलाही मिळायचे. ट्रेनी सैनिकांना रांगडे मैदानी खेळ खेळवून दमवणे म्हणजे मिलिटरीच्या दृष्टीने एक प्रकारचा व्यायाम असला तरी ते खेळ असायचे आणि उस्ताद, सिनियर्सकडून काहीशी सूट असायची. (या कसरती करून घेणाऱ्या मास्तरांना खरंच उस्ताद म्हणतात.. मला वाटायचंभाग मिल्खा भागमध्ये उगाच प्रकाशराजला रिस्पेक्ट म्हणून फरहान तसं म्हणत होता की काय)

मग काय, तारांखालून क्रॉलिंग किंवा १५-२० फूट जाळी पाय अडकवत अडकवत चढून जाताना जो घाम निघायचा, त्यापेक्षा खेळून निघणारा घाम आणि थकवा सैनिक एन्जॉय करायचे. कुणी फ्रस्ट्रेशन काढत असला तर तो घोड्याला चांगलंच दामटवायचा, किंवा चार गोल जास्त करायचा जे या उस्तादवर्गाला सैनिकांमधली जिद्द, नेव्हर क्विट एटीट्यूड आणि विजीगिषु वृत्ती वाढवायला बरेच पडायचे. त्यांना काय जातंय मग गालातल्या गालात हसायला. बाबा हॉकी छान खेळायचे, सर्व्हिसेसच्या लोकल टीममधूनही खेळले होते.

हां पण हे सारे असले तरी आणखी एक निगेटिव्ह गोष्ट मात्र सैन्यातही होती, अजूनही असेलच. जिचा काहींना फटका बसायचाच.. विशेषत: ट्रेनी सैनिकांना. ही गोष्ट मुळातच आपल्या देशात पूर्वापार चालत आली आहे, अगदी प्रत्येक क्षेत्रात आणि काही केल्या जाता जात नाही. कळले असेलच म्हणा या वाक्यावरून. पण तरीही त्याबद्दल आणि इतर काही गोष्टी पुढच्या भागात...
(क्रमश:)


No comments:

Post a Comment