Tuesday, 14 June 2016

 शान्ताबाई व्हर्सेस शांताबाय 

शांताबाय: काय वो, कोन तुमीहिकड कुट चाल्लासा
शान्ताबाई: अं.. कोण? मला काही म्हणालात का?
शांताबाय: व्हय मगन्हाईतर कुनाला. हित दुसर कुन्नीतरी हाये का.. आन काय त्ये डोक्यावर पदर डोल्याला चश्मा भारीये की ध्यान आस कोन दिसतच नाय वो अलिकड
शान्ताबाई: हम्म, अच्छा. जमाना बदलतो  कालाय तस्मै नमः 
शांताबाय भाजपवाल्या काय तुमी नमः म्हनताय म्हंजे
शान्ताबाई विनोदी दिसतेस हो पण (स्वतःशीच) मी महाराष्ट्रातच आलीये ना, ही जी कोण आहे ती मला ओळखत कशी नाही मग
शांताबाय: वो बोला की.. व्हय तुमी म्हाराष्ट्रातच आलासा पावनं
शान्ताबाई: पावनंमाझ्या घरात मीच पाहुणी? बरं सांगते बाई, मी शान्ता शे
शांताबाय: बाय बाय बाय, मीपण शांताच की वोपॉर्न नाव काय?
शान्ताबाई: बाईपूर्ण असा शब्द आहे तो. तुला दहावीला किती होते मराठीत. जाऊदे, मी शान्ता शेळके. आणि तूपण शांताच काछानय की. तूही कविता वगैरे करतेस का मग? 
शांताबाय: नाय बा, म्या फकस्त नाचते
शान्ताबाई: हो का, बरं बऱं. नृत्य हीपण एक कलाच आहे. चांगलं अभिमानाने सांगतेयस म्हणजे तितकीच छान गाणीही असतील ना तुझ्या नृत्यासाठी
शांताबाय: काय कशासाटीकुटली बाशा बोलतायसा अवो तसलं काय अरबट चरबट बोलू नगा हां सांगून ठिवते. ड्यान्स म्हना बास. आनी गानी म्हनाल तर तशी फ्याक्टरीच हाये आपल्याकड, पण सगळ्यात मेन त्ये ह्येच की -- शांताबाई
शान्ताबाई:अरे वा, माझ्या मातीने माझी आठवण ठेवली म्हणायची. पण एकदम माझ्या नावानं गाणं म्हणजेवाह, भारावूनच गेले बाई मी अगदी
शांताबाय: काय, कसलं उनव्हय उन जरा ज्यास्तच यन्दा अवो अनि तुमच्यावर कंच सॉंग? माझ्यावर हाये ते, माजं टायटल साँगच म्हना ना, त्यावर अनि फ्याक्टरीतल्या बाकी गान्यानवर म्या बी नाचते आन बाकीच्यांनाबी नाच नाच णाचीवते
शान्ताबाई: फ्याक्टरी? म्हणजे आणखी कोणती गाणी आहेत का? मुळात मला हे शांताबाई गाणंच माहीत नाही
शांताबाय: अग्गो बायकसं व्हनार वो मंग तुमचंशंबर वरसातून एकदाच व्हत अस सॉंग. आन अशुद्द बोलू नगासा, शांताबाई नाय, शांताबाय हाय तेरुपाची खान दिसती छान आन मग फुल चकरा नखरा चकरा नखरा  वाटल काय. रुबाब हाय आपला तेवडा हां, आनि बाकीची म्हनाल तर कळूलाच पानी कशाला ढवळील, शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेला वर, तुजी चिमणी उडाली भुर्र भुर्र माजा पोपट पिसाटला  वग्रे वग्रे लई हायेतआता म्हनू नगा की हेबी काय म्हाइत नाय
शान्ताबाई: अरेच्चा  हे काहीच माहित नाही मलाइतकी मागे पडले की काय मीकी कालबाह्यच झालेय
शांताबाय: कायकाय झालाय? मराटी बोला वो, कीतीन्दा सांगू. मराटी तर येत नाय आन म्हने माज्यावर गानं.. येवडीच हौस आसल तर सोताची सोता लिवा की गानी.. पर अवगड आसत हां ते चकरा नखरा वग्रे यमक का काय याय लागतय जाग्यावर बरुबर 
शान्ताबाई: हे मी काय ऐकतेय? अगं मी गाणीच लिहायचे, खूप सिनेमांसाठी लिहिली. अभिषेकी बुवा, पंडित हृदयनाथ, बाबूजी, राम कदम, श्रीधर फडके, आनंदघन वगैरे दिग्गजांनी संगीत दिलं, तितक्याच दिग्गजांनी ती गायलीही. खरंतर मी आधी कविता करायचेतशी कवयित्रीच मी
शांताबाई:एक सबुद कळल तर शपत...  काय बोलता कसली कुटली नाव घेता काय बी उमजणा. पण गानी लिवली म्हनला ते समजल, पण कुटली? उगा थापा मारू नगा. सांगा बगू
शान्ताबाई: काय बाई सांगू कस सांगूमलाच माझी वाटे लाज
शांताबाय: हा त्येच वाटली ना लाज मंग आदी खोट कशापायी बोलायाचं की गाणी लिवली म्हून. आता बस्ला की न्हाई करत काय सांगू आन कस सांगू हिला करत  
शान्ताबाई: अगं नाही नाही, खरंच लिहिलीत. हे जे सांगितल ते एक गाणंच आहे माझं. बरं  तुला काटा रुते कुणाला, दाटून कंठ येतो, तोच चन्द्रमा नभात, जिवलग राहिले रे दूर घर माझे, शूर आम्ही सरदार ही गाणी तर माहीतच असतील ना
शांताबाय: नाय वो. ही गानी कदी  आली. कदी का यीनात पन नावं आयकून तर यातलं येक बी नाचायसारक वाटनाअजून सांगा
शान्ताबाई: ओह अच्छा,  तू नृत्यांगना नाही का, थांब हं सांगते तशी हलकीफुलकी गाणी माझी. हां रेशमाच्या रेघांनी, ही चाल तुरुतुरु, वादलवारं सुटल गो, मी  डोलकर डोलकर वगैरे आहेत की काहीनाहीतर मग पप्पा सांगा कुणाचे, किंवा किलबिल किलबिलसारखं बालगीत घे
शांताबाय: आता तर कन्फमरच झाल….तुमी काय गानी बिनी लिवली नाय. आईकून घेतीया म्हून काय पायजे ते बोलतायसा त्वान्डाला यील ते…  देवाला तर घाब्रा
शान्ताबाई: अरेच्चा, पटत कसं नाही तुला? देवावर म्हणशील तर तशीही गाणी आहेत काही माझी.  म्हणजे गजानना श्री गणराया, गणराज रंगी नाचतो, मागे उभा मंगेश, जय शारदे वागीश्वरी विधीकन्यके विद्याधरी
शांताबाय: अवो बास बास…  कुटल्या ग्रहावरून आलायसा कुटली बाशा बोलतायसा कळना येकतर. कुटून आलायसावरून आठवलं, कशापायी आलायसा, काय काम
शान्ताबाई: काम असा नाही, याच दिवशी गेले होते मी सगळं सोडून. मग आज कित्येकजण आठवण काढतात माझी, कुठे कुठे कार्यक्रम ठेवतात, मग चक्कर मारते झालं, बरं वाटतं. त्यांना दिसत नाही हो मी, पण मला छान वाटतं, माझ्याबद्दल लिहितात लेख, कविता वगैरे
शांताबाई: व्हय काय, बर बै , अश्शील मंग तू खरच कुनीतरी मोट्टी बै.. मीच जर नवीन हाये ना - वर्सच जर जास्त दंगा घालाया लागलीये मी
शान्ताबाई: असेल असेल. मीच अडाणी म्हणायची मला माहित नाही म्हणजे.
शांताबाय:सनिगते म्या जायाचय नाचाया 
शान्ताबाई: बर चल मीही निघते, अजून पाहते कोण कोण आठवण काढतंय. तुलाही नाचायला जायचं असेल नामराठी माणसाने प्रगती केली की छानच वाटत बघ मलापुन्हा म्हणावस वाटतंय - स्वराज्य तोरण चढे, गर्जती तोफांचे चौघडे, मराठी पाउल पडते पुढे
_________________________________________________________________________


- मुलानो यातून आपण काय शिकलो, कोण सांगेल तात्पर्य ?
--
बाई मी सांगू
-
हां सांग गं.. शारदा नाव ना तुझं
--
काय बाई सांगू कसं गं सांगू
-
बरं बस खाली बाकी कुणी
--
तस नाही सांगते ना हेच की शांताबायसारख्या पौष्टिक नसलेल्या जंकफूड फास्टफूडवर पालन पोषण झालं असेल तर शान्ताबाई शेळके यासारख्या अस्सल विद्यापीठात मिळणारा सकस पौष्टिक आहारही खोटा वाटू लागतो, पटत नाही आणि जंकफूडच खरा आहार वाटून आपलं कुपोषण होतय हेही समजत नाही.. अगदी शेवटपर्यन्त. मग फारतर हे काही आपल्याला झेपणार नाही आवाक्याबाहेरचं आहे हे समजून काढ़ता पाय घेतला जातो टिकाव धरणे अवघड असते म्हणून
-
शाब्बास बस खाली म्हणा सगळे 
जय शारदे वागीश्वरी





















(६/६/२०१६ रोजी लिहिले…. शान्ताबाई शेळके स्मृतिदिन )

No comments:

Post a Comment