Monday, 20 June 2016

बाबांवर मी बोलतो काही  (लष्करी जीवन - भाग १)

माझे बाबा लष्करात होते. कित्येक दिवस त्यांच्या लष्करी जीवनावर त्यांच्याकडून ऐकलेल्या थोड्याफार माहितीवर लिहीन लिहीन म्हणत होतो, पण होत नव्हते, यंदा बाबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लिखाणाचा प्रयत्न सुरु केला. एक्च्युअली ही लेखमाला फेसबुकवर आधी सहज लिहायला सुरुवात केली, आणि अल्पावधीत मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहून जाणवलं की लोकांनाही या विषयाबद्दल जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे. मग अर्थातच ते सर्व लेख एकत्र असावेत, ऑल अंडर वन रूफ.. जेणेकरून वाचकांनाही ते सोयीचे जाईल, या हेतूने इथे ब्लॉगवरही यावेत असं वाटलं, म्हणून आता इथेही शेअर करतोय. अर्थात या लेखमालेचा हा एक महत्त्वाचा हेतू आहेच की लोकांना कळावे की सैनिक आणि त्यांचे संघर्षमय जीवन म्हणजे काय चीज असते, जे कव्हर करायला कुणी मीडिया तिकडे जात नाही.

सदर लेखमालेतील पहिला भाग...

श्री. प्रकाश पुजारी
    बाबा: द  डॅशिंग-ए-रुबाबदार  .   
माझे बाबा श्री. प्रकाश लक्ष्मण पुजारी हे आर्मीत १८ वर्षे होते. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी त्यांनी मिलिटरी जॉईन केली (१९६५ च्या युद्धावेळी आणि ते झाल्यावरही प्रचंड प्रमाणात सैनिक भरती सुरु होती त्या सुमारास) १९६५ चे युद्ध संपताना भरती झालेले असल्याने त्या युद्धात तितकेसे सहभागी नसले तरी १९७१ च्या भारत – पाकिस्तान युद्धात ते होते, त्यात त्यांचा सेक्शन कोणता तर – आर्टिलरी.. म्हणजे तोफखाना. फ्रंटवर थेट गोळीबार करणारी पहिली फळी, त्यामागे सज्ज आणि गरज पडल्यास त्याही फळीत जायला तत्पर असणारी फळी.. इतक्या जवळून युद्धात सहभागी असल्यामुळे बाबांकडे युद्धाचे आणि एकूणच लष्करी जीवन कसे असते याचे बरेच किस्से, आठवणी आहेत. ते त्यावर बोलायला लागले की ऐकत रहावेसे वाटते. (‘बॉर्डर’ त्यावेळी आम्हाला आवडला पण त्यात बाबांनी किमान १५-२० चुका काढल्या होत्या आणि हसत सुटले होते.. विशेषत: सनी देओलचा रोल. पण बाबांना ‘प्रहार’ आवडला होता, नाना पाटेकरांनी त्यासाठी स्वत: प्रत्यक्ष जाऊन ट्रेनिंग घेतले होते, हे काहींना माहीत असेलही.)

१८ वर्षांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेत बाबांचा जवळपास संपूर्ण उत्तर आणि ईशान्यपूर्व भारत फिरून झाला होता. डेहराडूननंतर कुपवाडासारख्या ठिकाणी दोन वर्षे सर्व्हिस होती तेव्हा तिथे बर्फाळ भागात तात्पुरती घरे बांधण्यासाठी तिथल्या उंच सूचीपर्णी वृक्षांच्या लाकडी फळ्या वगैरे सैनिकांना वापराव्या लागायच्या. ‘जोरदार बर्फवृष्टी सुरु झाली’ असे बातम्यात आपण ज्या भागाविषयी अधूनमधून पाहतो त्या राजौरी भागातही ते दोन वर्षे होते, तसंच पूंछ, लेह, लदाख, सिलीगुडी वगैरे पोस्टिंग्ज. आणि बाकी झाशी, मथुरा, भरतपूर याही ठिकाणी काही इतर जबाबदारीच्या कामांनिमित्त. यापैकी भरतपूर येथे एका किल्ल्यात त्यांच्या अख्ख्या रेजिमेंटची व्यवस्था करण्यात आली होती.


बाबांची मेडल्स


त्या काळात काही वर्षे सर्व्हिस झालेले बाबा सिनियर या नात्याने तिथे Map Reading Instructor म्हणून काम करत होते. त्यासाठी २० सैनिकांच्या बॅचचे रोज क्लासेस घेणे हे काम, पण तेही कसे तर.. म्हणजे वाचताना वाटेल की त्यात काय एवढे, नकाशा असतो तो फक्त समजावून तर सांगायचा अमीर खान सरफरोशमध्ये बाहीद नेमकं कुठेय हे दाखवतो तसं.. तर मित्र हो.. इथे लक्षात घेतले पाहिजे की तो एक सिनेमा असतो..त्यात हिंदी.नकाशा तयार असेल तर कशाला कष्ट पडले असते हो एवढे. आता कसले कष्ट.. तर मुळात.. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो की तिथे ६-७ किलोमीटर पट्ट्यातले काही मार्किंगच अव्हेलेबल नव्हते, म्हणजेच ती ठिकाणे नीट पाहून त्यानुसार नकाशा तयार करणे भाग असते. हे करणारा एक चमू असतो, होय प्रसंगी सैनिक अशी महत्त्वाची जबाबदारीची कामेही करतात. अहो आपल्या देशात शिक्षक नाही का जनगणनेच्या कामाला किंवा पोलिओ डोस शिबीराची पत्रके वाटायला जात! तर बाबा आणि ते इनचार्ज असलेली २० जणांची त्यांची टीम रोज जीपमधून त्यासाठी वेळीअवेळी फिरायचे.. हळूहळू जास्तीत जास्त प्रिसाईज माहिती घेत नकाशा तयार व्हायचा. या दरम्यान फतेहपुर सिक्री, वृंदावन, आग्रा, मथुरा वगैरे भागही त्या निमित्ताने फिरून झाला. मार्किंग अव्हेलेबल नसणारे असे बरेच भाग असायचे, (दहशतवादी अशाच भागात रेकी करण्यासाठी आधी घुसतात.. कारण स्पष्ट आहे..) ते जास्तीत जास्त निर्दोष मार्किंग करून योग्य करण्याचे काम असतेच अशा टीम्सचे. ते झाले की होणारा आनंद वेगळाच. आपण नाही का गुगल अर्थ मॅपवर आपल्या बिल्डींगचे नाव टाकून किंवा पाहून खुश होत? सलग दोन वाक्यात सूर्य आणि काजवा कसा येऊ शकतो बघा.

आर्टिलरीत इतकी वर्षे सर्व्हिस करणाऱ्याच्या घरी असे एखादे मॉडेल असायचेच.
लहानपणापासून मग आम्हालाही इतर खेळण्यांचे नाही तितके याचे अप्रूप आणि कौतुक आहे
कुपवाडा, सिकंदराबाद इथे दोन वर्षे आणि मग बिकानेरला वर्षभर झाल्यावर बाबा १९८३ साली रिटायर झाले. उत्तरेकडे जोधपूर, गंगापूर, जयपूर, जैसलमेर या प्रदेशातही त्यांची सर्व्हिस झाली होती. बाबा सांगतात त्याप्रमाणे, जैसलमेर भागातले रस्ते तेव्हा खूप कन्फ्युजिंग असायचे (सत्तरचे दशक).. म्हणजे तुम्ही पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे पाहिले तर तुम्हाला वाळू दिसेल, पण दक्षिण उत्तर पाहिले तर मात्र तुम्हाला वाळू दिसणार. हां पण समजा तुम्ही जर आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य धुंडाळले तर मात्र तुम्हाला वाळू दिसेल बरं का. थोडक्यात त्यातून इच्छित रस्ता शोधणे महामुश्किल. ड्रायव्हर शहाणा, तिथला माहीतगार असेल तर मुक्कामी पोहोचता यायचे, अन्यथा सतत कंट्रोल रूमशी वायरलेसने संपर्क साधून दिशा, सूचना मिळेल तसे जायचे. कंट्रोल रूममधून कॉऑर्डीनेटस सांगितले जायचे, ते फॉलो करायचे.. अगदीच गोंधळ असेल, तर रडार ऑब्झरव्हेशन सुरु केले जायचे.. मग पुन्हा कंट्रोल रूम सांगायचे‘हे असे इकडून या, लेफ्ट घ्या’ वगैरे. आजकाल मोबाईलमध्ये जीपीएस असतं तरी आपण कूलकॅबला अड्रेस सांगताना चुकतो किंवा तो ड्रायव्हर तरी रस्ता कन्फर्म करून घेऊन अगदी ठरल्याप्रमाणे दुसऱ्याच रस्त्याला भरकटून आपल्याला चौकात ताटकळत ठेवतो.

अलीकडेच सियाचीनच्या बर्फात हिमस्खलनातही जिवंत राहिलेल्या लान्स नायक हनुमंतअप्पा यांची केस आपल्याला माहीतच आहे. (दुर्दैवाने नंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, त्याचवेळी जेएनयूत देशद्रोही देशभक्त ठरत होते.. काय योगायोग) पण ‘हाऊ डीड ही सर्वाइव्ह’ टायटलखाली काही सचित्र लेख होते नेटवर ते वाचले होते. अशा धोकादायक भागात काम करणाऱ्या सैनिकांना अर्थात पोस्टिंगच्या त्या कालावधीसाठी पगार भले जास्त असतो, पण त्या कंडीशन्सचं काय? तरीही देशासाठी एवढा धोका पत्करतात हे जांबाज सैनिक.

त्या भागातील सैनिकांना आधी काय वेगळे प्रशिक्षण दिले जाते याविषयी कुतूहल म्हणून नेटवर सर्च केले आणि सांगलीला घरी गेलो तेव्हा बाबांनाही याबाबत विचारले होते.प्रमोशन होण्याआधी बाबाही काही काळ लान्स नायक होते आणि सियाचीन भागात हनुमंतअप्पा होते तितक्या उंचीवर नसले तरी त्या खोऱ्यात बाबांचंही काही काळ पोस्टिंग होतंच.. मायनस टेम्परेचर आणि बर्फाळ प्रदेशातलीकाही खतरनाक हिंस्र श्वापदं एखाद्या माणसाचं काय करू शकतात हे कळायला आपल्याला लिओचा ‘द रेव्हनंट’ बघावा लागतो, आपले सैनिक रोज ते प्रत्यक्ष जगत असतात. तर अशा ठिकाणी असताना सैनिकांना बंदुकीच्या दस्त्याने बर्फ खोदणे (खरंतर ताकद लावून तो कायच्या काय घट्ट बर्फ फोडणे), त्यातून जमल्यास काही भुयारे, बंकर्स, छुपे मार्ग तयार करणे नि त्यात राहणे वगैरे करावे लागते. काही करून थंडीपासून बचाव करणे हे पहिले ध्येय असते, त्यासाठी या ना त्या मार्गाने शरीरात उर्जा उष्णता निर्माण करून स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठीही हाल हाल होतात. रेव्हनंटमध्ये लिओ घोड्याला फाडून त्याच्या पोटात झोपतो ती अतिशयोक्ती वाटत नाही ती म्हणूनच, प्राण्यांचे रक्त उष्ण!

ग्लेशियर होऊन बर्फाखाली दबले गेल्यास रायफल वा जी कोणती साधने, हत्यारे असतील त्यांच्या सहाय्याने अशाच पद्धतीने आपल्याभोवती एक ऑक्सिजन स्पियर तयार करावा लागतो. तो प्रत्येकवेळी जमतोच असंही नाही, हनुमंतअप्पाना हे महाकठीण काम जमलं होतं. त्या गोलात अंगाचं मुटकुळं करून बसावं लागतं, किती काळ ते सांगता येत नाही. अशा परिस्थितीत श्वसन कसे करावे हेही सैनिकांना शिकवले जाते. तिथे रामदेवबाबांचे स्मरण करून उपयोग नसतो. हातापायाची बोटे वळलेली असतात, त्यावर बर्फ.. त्यात ते हँड्ग्लोव्जही वेगळे असतात, म्हणजे लास्ट बॉलआधी धोनी सेकंदात डाव्या हातातला ग्लोव्ह काढू शकतो तसे नसतात.

हे झाले बर्फातले, बाकी कित्येक वेळी जंगलातही जेव्हा सैनिकांना झाडाझुडपांशी अगदी साधर्म्य साधणारे हिरव्या रंगाचे कपडे घालून,जणू सरडा होऊन, शत्रूचा माग घेत बराच वेळ बसावे लागते,  तेव्हा काय?  सांगतो पुढच्या भागात

(क्रमश:)

No comments:

Post a Comment