
लेखकांचे वर्गीकरण करता येते का ? म्हणजे कथा-कविता-कादंबरी-समीक्षा इत्यादी प्रकार सोडून,किंवा ते धरूनच ? म्हणजे हे विनोदी लिहिणारे,ते गंभीर लिहिणारे,तिला कवितेपेक्षा चारोळयाच छान जमतात,किंवा चांगल्या कथा लिहित होता तर उगाच कशाला लांबलचक रटाळ कादंबरी लिहायच्या फंदात पडला. . . किंवा चरित्रात्मक,टीकात्मक,ललित,रहस् य,विज्ञान,व्यक्तिमत्त्व विकास,धार्मिक,सामाजिक,आर्थिक, राजकीय,मानवी नातेसंबंध . . . .
बाप रे, बरीच मोठी यादी की ! संपणारच नाही बहुतेक ! 'अमुकच एक प्रकार चांगला हाताळू शकणारे' अशा वर्गात मोडणारे अनेक लेखक होऊन गेले,आहेत,येत राहतील. सर्वच नाही पण बहुतेक लेखनप्रकार सारख्याच समर्थपणे हाताळणारे मोजकेच !मग अशांना 'सिद्धहस्त' म्हणण्यात गैर ते काय ? पण अगदीच 'दैवी देणगी' म्हणून त्यांना माणसातून बाजूला करून मोकळेही होऊ नये. नाहीतर ते त्या कलावंताला, आधी 'दैवी' म्हणून सुखावणारं नि नंतर सक्तीने आलेल्या 'एकटेपणा'तून दुखावणारं ठरू शकतं.मनात प्रचंड वेदना,अनेक समस्यांशी झगडा अन तरीही रसिकांना निखळ वाचनाचा आनंद देणारे,हसवणारे,हसता हसता डोळ्यात कारुण्याचे अश्रू वाचकाच्याही नकळत उभे करणारे,त्याला हळूच अंतर्मुख करणारे खूप म्हणजे खूपच कमी ! वपु त्यापैकीच एक !
आज २७ जून..वपुंची पुण्यतिथी. पुण्यतिथी वगैरे शब्द फार जड,मोठे वाटतात ना; कारण आजवर आपण शिवाजी, सावरकर, टिळक, भगतसिंग अशा लोकोत्तर कार्य करून अजरामर झालेल्या हस्तींच्या मृत्युदिनालाच असं म्हणत आलोय.(यादीतील शेवटच्या नावावर खरेखुरे अभ्यासू वाचक आक्षेप घेणार नाहीत याची खात्री आहे.) असो, विषयांतर नको.
बट वपु, यू आर ग्रेट...आर...हो,तुमच्यासारखी माणसं कधीच वेअर होत नसतात.
एकच माणूस शिक्षण-व्यवसायाने आर्किटेक्ट असूनही अफाट गुणवान लेखक,कथाकथनकार,व्हायोलीन-हार्मोनियमवादक, उत्तम फोटोग्राफर...रसिक-वाचक-सुंदर हस्ताक्षर असलेला नि हरेक सुंदर गोष्टीचं वेड असणारा असू शकतो ? वपुंची कारकिर्द सुरू होण्यापूर्वी या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असावं,असं वाटतं.
आपण काय वाचतो ? पुस्तकं,वृत्तपत्रं,ई-मेल्स,ई- बुक्स,मेसेजेस......वगैरे वगैरे .
आणि माणसं ?
वपुंकडे ही एक विलक्षण हातोटी होती,ते 'माणसं' वाचायचे. त्यात त्यांना 'घर हरवलेली माणसं' भेटली,'लोंबकळणारी माणसं' भेटली,'चतुर्भुज' मंडळी भेटली.गेलाबाजार 'कर्मचारी'ही भेटले...बरेच. सगळेच त्यांचे 'दोस्त' बनले,अनेकांनी वपुंना आपला 'पार्टनर' मानलं. 'काही खरं काही खोटं' असा हा दुनियेचा 'मायाबाजार'..'भुलभुलैय्या'च म्हणा ना हवं तर...
"अहो,यात तुम्ही काय करताय?"
वपु म्हणायचे,"मी यात काय करतोय? 'मी माणूस शोधतोय'."
माणूस हा पदार्थ वपुंइतका स्पष्ट कितीजणांना कळाला माहीत नाही..पण तरीही ही नम्रता त्यांच्या ठायी होती हे खरं. महाराष्ट्र सरकारने त्यांना 'उत्तम लेखक' म्हणून गौरवलं. पु.भा.भावे पुरस्कार विजेत्या वपुंना अमेरिकेतील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवण्याचा मान मिळाला.
वपु एकेक करत त्यांचे 'प्लेजर बॉक्स' वाचकांसमोर रिते करत गेले. त्यातून वाचकांचेच रंगीबेरंगी 'रंग मनाचे' त्यांनी उलगडून दाखवले.
"आमचं काय हो.इकडून एक टोलावतोय,तिकडून एक ढकलतोय..नुसता 'झोपाळा' झालाय आयुष्याचा ",असं उद्वेगाने म्हणणा-यांना 'मोडेन पण वाकणार नाही' हे फिलिंग देत वपुंनी त्यांच्या अवघ्या जगण्याचाच 'महोत्सव' करून टाकला असणार यात शंका नाही. मग त्यांना 'आपण सारे अर्जुन' असं वाटलं असल्यास त्यात नवल ते काय ! अशा कित्येकांचा 'स्वर' वपुंनी अचूक ओळखला असेल....त्याची गणतीच नाही.
'ऐक सखे' म्हणत 'सखी'ला 'तप्तपदी'तून पुढे ओघानेच आयुष्यात येणारा अव्यक्त मनाचा अस्फुट 'हुंकार' त्यांनी जाणवून दिला असेल. तिला " 'ही वाट एकटीची' गं,ती तुडवताना तू प्रत्येकच वेळी कशी गं 'इंटिमेट' होणार?,मनाची 'ठिकरी' होऊनही सारं सहन करणारी तू "..असं हलकेच सांगितलं असेल.
त्या म्हणतील, 'नवरा म्हणावा आपुला' आणि गप्प बसावं झालं.
ते म्हणतील,आमचं आयुष्य आम्ही जगू.मग ते 'वन फॉर द रोड' झालं तरी हरकत नाही.नुसतं 'बाई,बायको,कलेन्डर' करत बसण्यापेक्षा तोच बेटर ऑप्शन वाटतो काहीवेळा.
अशांना वपु विचारतात, "एवढंच होतं माझ्या राजा,तर मग 'का रे भुललासी' "
वपु एक लेखक होते? की एक तत्त्व होते? की एक वृत्ती होते?
की एक विचार म्हणून जगले असतील?
नेमकं उत्तर आमची मागची पिढी देऊ शकेल काय ?
खरंच, ही 'वपुर्वाई' म्हणजे अजबच ! 'वपुर्झा' काळजीपूर्वक,विचारपूर्वक वाचल्यानंतर तर आयुष्याकडे बघण्याची एक नवीनच दृष्टी मिळते. आपले सो कॉल्ड ह्यूज प्रॉब्लेम्स.दु:खं वगैरे आवाक्यातली वाटू लागतात ..पर्यायाने दुस-यांचीही ..आपण ते प्रॉब्लेम्स सोडवूही शकतो. हे असंच का? आणि हे माझ्या बाबतीतच का? हे जे दोन प्रश्न वेळोवेळी आपल्याला छळत असतात,त्यामागची कारणेही मिळू शकतात...आपल्याला न आवडणा-या,न पटणा-या अन तरीही सातत्याने घडत असणा-या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती मिळते.वाचकांना इतकी अफाट ताकद देणा-या या मनस्वी लेखक कलावंताला त्याच्या योग्यतेचं विस्तीर्ण 'वलय ' लाभलं का? ....... नाहीच बहुधा.
आमची पिढी नक्की कसं भाष्य करणार यावर? माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी जन्मलो १९८७ मध्ये...वपु गेले २००१ मध्ये. मी होतो १४ वर्षांचा...अन दुर्दैवाची अतिकरंटी महानतद्रष्टी गोष्ट अशी की तोवर मी वपुंचं एकही पुस्तक वाचलं नव्हतं. आज हे सांगायला लाज वाटते खरी..पण पर्याय नाही. तेव्हा चिं.वि.,पु.ल.,अत्रे अशा विनोदी लाटाच भेटायच्या खूपदा. मानवी नातेसंबंध वगैरे कुठले कळायला ?
सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतच राहुल द्रविड नावाचा हिरा भारतीय क्रिकेटला लाभला.....नंबर टू च राहिला..कोण काय करणार ? त्याप्रमाणेच पुलंच्या काळातील त्यांना समकालीन असे बरेच प्रतिभावान लेखक पुलंसमोर झाकोळले गेले...याचा सर्वात मोठा फटका वपुंनाच बसला असंही वाटतं. कथाकथनात मात्र पु.ल.,शंकर पाटील यांच्यापेक्षा वपु अधिक लोकप्रिय ठरले हे खरं. निखळ हसायचंय?... 'बदली' ऐका...हसता हसता अंतर्मुख व्हायचंय?...'हसरं दु:ख' ऐका.
असो..'वा गुरु' नाटकात एक डायलॉग आहे, "व्होट्स राँग इन बीइंग नंबर टू ?"
हो..असूदेत मोठे सचिन आणि पु.ल...आम्हाला आपले राहुल आणि वपुच 'अधिक' आवडतात..काय म्हणणं आहे?
वपुंना प्रत्यक्ष भेटता आलं नाही,ही खंत तर राहीलच नेहमी....इलाज नाही. हे टोचणंच काहीतरी नवनवीन सुचवत जाईल कदाचित.त्यांचं लिखाण वाचण्यापूर्वी एक मन दुस-याला म्हणायचं 'तू भ्रमत आहासी वाया' ..नि पुढे वपु या 'पाणपोई'चं अस्सल अभिजात पाणी चाखायला मिळालं. वाचनाचं समाधान मिळू लागलं. वाढती बौद्धिक भूक शमू लागली..पण अजून बरंच वाचायचं आहे
अशी त्यांच्या पुस्तकांची नावे वाक्यांत बसवून त्यांना बंदिस्त नाही करता येत...त्यांना जवळही नाही आणता येत.
हेही खरंच...आणि कहरच ! थिटा पडतोय..शब्द सापडत नाहीयेत.. वपु तुम्ही यात मावत नाही आहात ... गुड ! आणि गूढही !!
मिस्टर वसंत पुरुषोत्तम काळे .....ते ..ते.. तेवढं भेटायचं राहिलं.
'गोष्ट हातातली होती'.
No comments:
Post a Comment