Tuesday, 10 May 2016

जमात-ए-हेल्पलाइन


प्रशांत आणि अर्चना यांची कहाणी नागराजअण्णांनी आपल्याला सैराटमधून दाखवली.. आपण ती झिंग झिंग झिंगाट होऊन बघितली. सगळ्यांनी त्यावर बरंच काय काय लिहून झालं. संगीत आणि बॅकग्राउंड स्कोर तर लाजवाबच. प्रथेप्रमाणे सिनेमा बनवणाऱ्यांची, बघणाऱ्यांची, कौतुक-टीका करणाऱ्यांची जातबितही काढून झाली, पण मला लिहायचंय ते जातीवर नाही, तर एका जमातीवर. होय.. जमातच, जी या सिनेमात दिसते, आपलं अस्तित्व जाणवून देते. प्रमोशन आणि मार्केटिंग इतकं की सिनेमाचं अफाट कौतुक झालं, पण अशा कहाण्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या घटकाकडे – या जमातीकडे दुर्लक्ष होण्याची परंपराही जपली गेली.

ही जमात म्हणजे प्रेमात पडलेल्या मित्राला काय वाट्टेल ते झालं तरी मागे न हटता मदत करणारे मित्र, प्रसंगी संकट आलं तरी पहिला वार आपल्यावर झेलणारे मित्र. सिनेमात असे प्रदीप आणि सलीमसारखे मित्र प्रशांतला लाभले हे त्याचं भाग्यच (की लेखकाचं क्रेडिट हो?).. जे त्याच्या प्रेमासाठी स्वत:ही वाहवत जाऊन मार खातात, परश्या गाडीत आर्चीशी चुम्माचुम्मी खेळत असताना स्वत: बाहेर पहारा म्हणून उभा राहणारा मित्र.. आणि त्यापायी लाथही आधी खाणारा मित्र. चला हे दोघे तर झालेच, ते परश्याचे मैतरच हायेत वो, पर त्यो मंग्या, ज्याची आर्ची ही मामेबहीण असते, तोही ऐनवेळी परश्या आणि आर्चीच्या लव्हस्टोरीत मदत करतो. तिला सांगतो तुझी सही घेतली गेलीये ती चुकीच्या कारणासाठी, शिवाय त्यांच्या मागावर असलेल्यांपासून त्याना वाचवतो रानात मार्ग बदलायला लावून.

का असतात असे मित्र? का भेटतात किंवा घट्ट ठाम राहतात असे मित्र अशा टप्प्यावर? का वाटतं त्यांना की आपलं काहीही होवो, पण ह्यांना आपण मदत केली पाहिजे. कदाचित प्रेमात पडलेल्या त्या दोन जीवांनाही हे माहीत नसतं की आपलं प्रेम यशस्वी व्हावं ही आपल्यापेक्षा जास्त तीव्र इच्छा या मित्रांचीच आहे.. कोणत्याही गनिमी काव्यात किंवा चिठ्ठीमार्गात मदत किंवा स्वत:च्या गॅरेजच्या कामासाठी असलेला मोबाइल मित्राच्या लव्हस्टोरीसाठीच जास्त वापरणं वगैरे कसं जमवतो सल्या.. पण का असतो असा एक सल्या? आपल्या स्वत:च्या प्रेमाची थट्टा चिठ्ठीतून तिची नखं मिळाल्यावर परश्याकडून झाल्यावरही त्याची साथ न सोडणारा प्रदीप, ज्याच्या पायातल्या दोषामुळे परश्या त्याला नेहमी लंगड्या म्हणून खिजवत असतो, सतत ज्याची खिल्ली उडवली जात असते, असा प्रदीप. पण का असतो असा एक प्रदीप? तो शाहीद गॅरेजवाला जेव्हा सल्या आणि प्रदीपला म्हणतो की “मानलं ह्या दोघांचं लफडं हाय म्हणा किंवा प्रेम हाय म्हणा. पण तुम्ही दोघं? तुम्ही दोघं का म्हणून पळताय? का उगचच.. दोस्ती म्हणून? पिक्चरमध्ये आणि खऱ्यामध्ये लई फरक असतो लेका. घरची शिकवत्यात काय, तुम्ही करताय काय?”.. तो सीन बघताना नेमकं काय वाटतं? समजा काही वाटलं नाही तरी पुढे जेव्हा प्रदीप सल्याला म्हणतो की ”सल्या, तू जा घरी.. मी परश्याबरोबर जाणार..” आणि मग सगळेच पोलिसांच्या तावडीत सापडतात.. मित्राच्या प्रेमासाठी हे का जातात फरपटत? ते सगळं बघताना कसं वाटतं एक्झॅक्टली?

मान्य आहे की, मित्राची किंवा मैत्रिणीची लव्हस्टोरी सक्सेसफुल व्हावी म्हणून आपल्याकडून फुल मदत करणारी जमात दाखवणारा हा काही पहिला सिनेमा नाही. अलीकडच्या रहना है तेरे दिल में, कहो ना प्यार है, अजब प्रेम की गजब कहानी, जाने तू या जाने ना सारख्या हिट हिंदी सिनेमातही ही जमात मुबलक प्रमाणात दिसते. पण अशा सिनेमांतून ही 'अशा' मित्रांची जमात वजा करून सिनेमाची कल्पना करून बघा.. जाणवतो का तो इफेक्ट? कधीकधी भावंडांकडूनही अशी मदत होते, ‘कॉफी आणि बरंच काही’ मधली बिनधास्त बहीण अशीच.. तिच्या मोठ्या बहिणीला स्वत: लहान असून मौलिक ज्ञान नि सल्ले देणारी.. हां अर्थात हे साले मित्रलोक किंवा भावंडे चिडवाचिडवीही तितकीच हक्काने करतात. चालायचंच, चेष्टामस्करी त्यांनी नाही तर काय ऑफिसमधल्या बॉसने करायची की सकाळी दूध, पेपर टाकायला येणाऱ्या पोऱ्यानं करायची? (हे इमॅजिन करून बघाच)

चला मित्रमंडळ राहूद्या.. पण इंटरव्हलनंतर ती बाई जी परश्या आणि आर्चीला राहायला जागा देते, जेवू घालते, गुंडांपासून वाचवते तिचं काय? तिला काय पडली होती या अनोळखी, भरकटत कुठेतरी दुसऱ्या शहरात आलेल्या या पाखरांना मदत करायची? पण असतात असे लोक. असतो तिचाही काही भूतकाळ.

सिनेमा पुढे पुढे सरकत जातो तसे दुसऱ्या भागात आपण सल्या आणि प्रदीपला विसरत जातो. कथा शेवटाकडे जाते तसं त्या आसरा आणि संरक्षण देणाऱ्या माउलीलाही विसरतो. परश्याला बॅटिंग देणारा नि पर्यायाने प्रेक्षकांच्या नजरेत त्याला हिरो व्हायला मदत करणारा मंग्या आणि ‘तुला किडनॅप करून तुझ्यावर रेप केलाय म्हणून त्या पोरांवर केस टाकलीये’ हे आर्चीला सांगून सावध करणारा मंग्याही विसरत जातो.  

अशीच असते ही जमात. काहीवेळा लक्षात ठेवली जाण्यासाठी, पण पुढे ‘तिकडे’ सर्व सुरळीत झालं की  बहुतेकदा विसरली जाण्यासाठी, किमान तसा फील मिळण्यासाठी.. कधी नुसतीच पॅरलल जाणारी... पण याबाबतीत मित्रमैत्रिणीच्या आयुष्यात जी कॉम्प्लिकेशन्स चाललीत त्यापासून अलिप्त राहू न शकणारी, हा आपलाच प्रॉब्लेम समजून मित्र अडचणीत दिसला की बाकी प्रिओरीटीजना भस्सकन त्वरित गुंडाळून ठेवणारी, खरंतर त्या फाट्यावरच मारणारी, प्रसंगी या बाबतीतलं स्वत:चं करियर सोडूनही फ्रेंडांना जमेल तशी मदत करणारी ही जमात. या जमातीतलाच एक म्हणून काही वर्षं त्यात करियर केलेला, प्रसंगी अनोळखी घराबाहेरूनच हाकलून देण्यात आलेला, रात्री दोन अडीचला वगैरे आलेले फोनकॉल्स शांतपणे घेऊन योग्य ती कार्यवाही केलेला, लव्हलेटर, संबंधितांची अख्खी लव्हस्टोरी किंवा सुटेबल कविता लिहून देणारा गोपनीय मित्र वगैरे म्हणून हे लिहावंसं वाटलं असेल कदाचित..

जाऊदे ते महत्त्वाचं नाही, पण अनेकांच्या आयुष्यात असेलच म्हणा ही जमात-ए-हेल्पलाइन.. त्या त्या वेळी २४*७ उपलब्ध.. आज तुमचं वय २०, ३०, ४०, ५० काहीही असो पण ते दिवस, ते मित्रमैत्रिणी आठवून बघा आणि त्या जमातीला कधी विसरू नका.. ते तेव्हा होते जेव्हा तुम्ही तिच्यासोबत किंवा त्याच्यासोबत नव्हतात.. आणि ते तेव्हा नसते तर कदाचित आज तुम्ही तिच्यासोबत किंवा त्याच्यासोबत नसतात. ते आयुष्यात डोकावतात तेव्हा ती लुडबुड वाटू नये, ती त्याना वाटणारी काळजी असते, प्रेम असतं. तुमची तुमच्या आयुष्याच्या जोडीदारापेक्षाही कधी कधी अशा मित्रांशीच टेलीपथीची नाळ घट्ट जुळलेली असते, म्हणून तर तुम्ही टेन्शनमध्ये असता तेव्हा अचानक नेमक्या त्याच वेळी तुम्हाला त्याचा फोन किंवा मेसेज येतो.. मग तो ‘काय रे, कसा आहेस, कुठाय पत्ता?’ असा बुळबुळीतही असेल किंवा मग ‘का बे भैताडा, अणकुचीदार दात आले का तुले, माह्या ज्योकवर हसला का म्हून नाईस बे मगाशी ग्रुपवर’, किंवा ‘ए काय करायलायस भावड्या, लई शिंगं फुटली का, किती लांब?’ असे प्रेमळ असतात तुमच्यातुमच्या भाषेप्रमाणे.. पण हेतू एकच – ‘हा माणूस पाहिजे मला माझ्या आयुष्यात’...

आणि हो, बरं का मंडळी.. मित्र 'याबाबतीत' कन्फ्यूज असेल किंवा चुकीचा, रादर त्याला सूट न होणारा जोडीदार निवडतोय असं वाटलं तर तर हे मित्रच त्याला त्यातून बाहेरही काढतात. आठवा 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मधला तो ऐतिहासिक सीन: जेव्हा हृतिक -फरहान हे अभयला त्याचा आतला आवाज ऐकायला लावून पुढे त्याचे लाइफ कल्किमय होण्यापासून वाचवतात. :)
तुमच्या लग्नात पुलंचा नारायण म्हणून मनापासून वावरलेले हे मित्र लग्नानंतर तुम्हाला तुमची स्पेसही देतातच.. अनावश्यक घुसखोरी कधी करू नये याचे धडे त्यांना तुमच्या लव्हस्टोरीच्या प्रवासातूनच मिळालेले असतात. शिवाय तुमची घुसमट, तगमग झाली की हेच असतात तुम्हाला व्हेंटिलेशन पुरवणारी खिडकी. त्यांना तुमच्या या सुफळ संपूर्ण प्रवासातली अगदी ‘सिक्रेट स्टेशन्स’ही माहीत असतात, खरंतर काहींच्या बाबतीत अशा स्टोरीजचीच स्टेशन्स...

असो, सिनेमाची कथा असो की कुठलाही प्रवास.. ‘मार्गात येणाऱ्या’ गोष्टी ठळक जाणवतात.. ‘पॅरलल’ जाणाऱ्या नाही.. ते छेदत नाहीत, मस्करीत छेडतात एवढंच काय ते.. मैत्रीची तार सतत छेडली जात रहावी, ती गंजू नये या भावनेतून.... तरीही मित्रों, ते सोबतच असतात.. पॅरलल.. आयुष्यभर.. ये वादा रहा...

आयुष्य सुंदर आहे फक्त ते अशा मित्रांसोबत जगायला पाहिजे - आयुष्यभर.. 

No comments:

Post a Comment