Tuesday, 21 June 2016

बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन – भाग ८)

बहुसंख्य सैनिकांचं दु:ख काय? त्यांना मिळणारा तुटपुंजा पगार, की तुटपुंजा शब्द पुष्कळ वाटेल असा मिळणारा आहार? की आणखी काही वेगळीच, सहजासहजीलक्षात न येणारी गोष्ट? उलगडून बघू जरा..

जॉईन झाले त्या काळी बाबांना एकूण पगार साधारण ७४ रुपये मिळायचा. पैकी बेसिक ५० रुपये, डीए २० रुपये आणि ४ रुपये डीडक्ट व्हायचे. एक तारखेला पगार झाला की दर महिन्याला बाबा लगेच फॅमिली अलॉटमेंट पॉलिसीखाली त्यातले तब्बल ५० रुपये डायरेक्ट इकडे सांगलीला पाठवून द्यायचे, डायरेक्ट कट म्हणजे प्रत्यक्ष हातात तेव्हा २० रुपयेच पडायचे आणि ५० रुपये तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावर पाठवल्याची सही-शिक्क्याची रिसीट असा प्रकार.

हे पैसे स्लो मोशनमधल्या कासवाला किंवा पोलिओ झालेल्या गोगलगायीलाही उसेन बोल्ट ठरवेल अशा पोस्ट ऑफिसच्या वेगवान कारभाराने महिना अखेरीस इकडे पोहचायचे. हे सायकल प्रत्येक महिन्यात. नेहरू सरकारने तेव्हापासूनच सरकारी खात्यांना वेळच्या वेळी कामे करायची सवय लावली असती, लोकांना जरा स्वच्छतेचे महत्त्व पटवायला काही शिस्त लावली असती तर आज नक्कीच वेगळे चित्र दिसले असते. आणि भारत म्हणजे ‘गांधी, गरिबी, रस्त्यावरच्या गायी आणि गारुड्यांचा देश’ अशी इनफेमस इमेज झाली नसती आपली जगभरात. आज मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाची खिल्ली उडवली जाते ती यामुळेच की ‘अरे ६० वर्षे आम्ही रस्त्यावर थुंकत आलो, कचरा इथे तिथे मनसोक्त टाकत रस्त्याचं डेकोरेशन करत राहिलो आणि आता असं मध्येच कसं थांबू’ टाइप. असो, तो वेगळा विषय.

पाठीवर ३ भाऊ, २ बहिणी अशी धाकटी टीम, आई बाबा असे सांगलीत कुटुंब आणि तेव्हा लहान वयात परिस्थितीमुळे कमवायला लागलेले बाबा आणि मोठे काका हे दोघेच. असं त्या काळी बऱ्याच घरी चित्र असायचं की थोरले एकदोघे कमवायला बाहेर पडलेत आणि त्यांच्या खांद्यावर घरचे खर्च निभावून नेले जातायत. अर्थात इतरही भावंडे त्यांना जमतील तशी, मिळतील ती कामे शिकतानाही करून घरच्यांसाठी अर्थार्जन करत राहायचेच.तरी नानांनी बाबांना सांगितलं होतं की ‘अरे तू असे इतके पैसे एकदम पाठवत जाऊ नकोस. तशी काही गरज नाही. किंबहुना १९६६ लाच त्यांनी बाबांना स्वत:चे अकाउंट ओपन करून पैसे साठवायला सांगितले होते. पण बाबांनी ते सिरीयसली घेतले नाही, आणि अगदी १९८० पर्यंत पैसे पाठवतच राहिले.

पण तिकडे सीमेवर असताना पैसा, पॅकेज, फॅसिलिटीज वगैरे गोष्टी अर्थात टोचत नाहीत. टोचते ती वेगळीच गोष्ट. मुळातच ९० टक्के सैनिकांचं दु:ख हेच की आपण कुटुंबापासून इतके दूर आहोत, कित्येक महिने भेट नाही, संपर्क अगदी कमी.. (आज आहे हे सगळं फोन्स, इंटरनेट वगैरे.. तेव्हा फक्त पोस्टकार्ड झिंदाबाद.. क्वचित फोन तेही खूप नंतरच्या काळात) पण फक्त दूर आहोत ही खंत नसते तर आपण त्यांना प्रत्यक्ष तिथे राहून काही मदत करू शकत नाही हे शल्य जास्त.

म्हणजे अचानक कुणी आजारी पडले तर ताबडतोब पोहचणे, किंवा कुणाचे लग्न, मुंज, बारसे वगैरे काही असेल तर ते अटेंड करणे हे दुरापास्त व्हायचे. लेह, लदाख, सियाचीनसारख्या भागात पोस्टिंग असताना तर ही वेदना जास्त भीषण. (होप तार तरी खरंच तारेच्या वेगानं जात असेल तेव्हा) बाबांनाही सगळ्याच भावंडांच्या लग्नात उपस्थित राहणे जमले नाही ते यामुळेच. अर्थात गंमत म्हणजे जे २० रुपये उरायचे त्यातही खर्च निवांत भागायचा. कारण खर्च म्हणजे काय तर फक्त तेल, साबण, ब्रश, टूथपेस्ट, दाढीसामान, चार कपडे वगैरे एवढाच. (शीख सैनिक सोडून शक्यतो कुणालाही परवानगी नसते दाढी ठेवायला, मग इतरांसाठी रोज दाढी करणं आलंच)

इंडियन आर्मी रँक्स 

एक गंभीर आणि खरंतर चुकीची गोष्ट म्हणजे जेवणाच्या बाबतीत घडायची. सैनिकांना जेवण अगदी मर्यादित मिळायचं. दर्जाबद्दल न बोललेलंच बरं. फिजिकल एक्सरसाइज झाल्यावर प्रत्येक सैनिक मग ६-८ केळी हादडायचा. जेवण ऑफिसर्सना चांगल्या प्रतीचं आणि पोटभर, पण इतर रँक्सच्या सैनिकांना मात्र अगदीच साधं, कधीकधी बेचव, निकृष्टच.

कमाल आहे, ज्यांना प्रत्यक्ष फ्रंटवर जाऊन शत्रूशी दोन हात करावे लागतात, त्यासाठी मजबूत व्यायाम करून तब्येत कमवावी लागते, बोजड रायफल्स हाताळत त्या सतत पाठीवर वागवत राहाव्या लागतात, अवजड तोफगोळे वगैरे वाहून न्यावे लागतात, रोज कसरतीत इतका घाम गाळावा लागतो त्यांना सैन्यात ही ट्रीटमेंट. पण कुणी काही बोलू नाही शकायचं, कारण सिपॉय रँकवर जॉईन झालेल्यांपैकी कित्येक तर कमी शिकलेले, अनपढही असत. अशांना आपल्यावर अन्याय होतोय हेही कळत नसतं. किंवा ‘इथे हे असंच असतं’ अशी त्यांनी समजूत करून घेतलेली असते. म्हणजे अपेक्षा काय तर इथल्या कामाला, फ्रंटवर लढायला पाहिजे वाघ आणि आहार मात्र शेळीचा.. असं कसं चालेल?

म्हणजे असं बघा, भाग मिल्खा भाग मध्ये ‘..और मेरी फटिग ड्युटी भी माफ है जी’ असं मिल्खासिंग झालेला फरहान म्हणतो तेव्हा आपण तो ‘कुणाचं काय तर कुणाचं काय’ टाइप कॅटेगरीतला विनोद समजून हसतो, पण त्यामागे ‘मी फटिग ड्युटी मारली तर मला आणखी भूक लागेल, प्लस मला धावायची प्रॅक्टिस तर करायची आहेच, आणि हे सगळं इतक्याशा तुटपुंज्या आहारात कसं होणार उस्ताद.. रनिंग किंवा फटिग ड्युटी एकच काहीतरी जमेल ना’ हा एक मनात म्हणलेला डायलॉगही असतो. पण ही पार्श्वभूमी लक्षात घ्यायला वेळ नसतो आपल्याला. उस्तादकडूनही त्याला विचारले जाते, "तुला दिवसा सराव करायला वेळ मिळत नाही ना?" शिवाय क्रॉस कंट्री दौडमध्ये टॉप टेन सैनिकांना फटिंग माफ आणि स्पेशल डाएट म्हणजे काय तर एक ग्लास दूध आणि दोन कच्ची अंडी हे उस्ताद प्रकाशराज सांगतो तेव्हाही सैनिकांचे चेहरे फुलतात हे आपण त्यात पाहिलंच आहे.

त्यातल्या त्यात बरी गोष्ट म्हणजे १९८० नंतर तरी चित्र हळूहळू का होईना पण बदलत गेलं असं बाबा म्हणतात. ८० हा असा टप्पा होता ज्याआधी नऊ वर्षं मेजर युद्ध करावं लागलं नव्हतं आणि त्याधीच्या नऊ वर्षांत तीन मोठी युद्धं लढावी लागली होती. १९७५ च्या आणीबाणीतून पुढे सरकारनेही आतापर्यंत थोडाफार धडा घेतला होता. ८० च्या दशकापासून राजकीय स्थिती बदलू लागली तसेच इकडे भरती होणारे सैनिकही बऱ्यापैकी शिकलेले असायचे. आणि आताशा तर किमान बारावी झालेलेच असतात बहुसंख्य. त्यामुळे त्यांनाही आपल्या हक्काची जाणीव असते.

आताआणखी समाधानाची बाब म्हणजे मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री झाल्यापासून लष्कराप्रति अनास्था मावळून सरकारी धोरणही सुधारलंय. कोणताही देश सर्वात जास्त खर्च करतो किंवा बजेट राखून ठेवतो ते त्याच्या लष्करासाठी ते का, कशासाठी हे भारताला नऊ वर्षांत तीनयुद्धं झेलल्यावर आणि त्यात अपरिमित झीज सोसल्यावर उशिरा का होईना उमगलं असावं.
पुढच्या भागात बाबांच्या निवृत्तीबद्द्ल..
(क्रमश:)
बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन – भाग ७)

जमिनीवरून जमिनीवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये दोन्ही बाजूंनी इन्फंट्री (पायदळ) आणि आर्टिलरी (तोफखाना) याच मुख्य घटकांत युद्ध होत असतं. पण मग एअर अटॅक झाला तर काय करायचं?आणि युद्धातले धोके, घ्यायची काळजी कोणती?

बाबा म्हणतात की १९७१ च्या भारत – पाकिस्तान युद्धात मजा आली. ३ ते १६ डिसेंबर या कालावधीत लढलं गेलेलं आणि जिंकलं गेलेलं हे जगातलं आजपर्यंतचं सर्वात जलद निकाली लागलेलं मोठं युध्द आहे. शत्रूची फायटर प्लेन्स हवेत बागडतात तेव्हा खाली लोक दिसले की ती प्लेन्स सहज खाली येऊन नुसता एक फर्राटा मारून जातात, हे तर घडलंच. अगदी एक एक इंचावरूनही गोळ्यांचा वर्षाव व्हायचा, अशी प्लेन्स सगळी बंकर्स झटक्यात उद्ध्वस्त करू शकतात. मग सिनियर्स काही अतिउत्साही सैनिकांना वेळीच मागेही खेचायचे, ‘सालों तुमभी मरोगे हमे भी मारोगे.. याद रहे दस दस को मारे बिना हमे मरना नही है’ वगैरे सूचना मिळायच्याच मग. (बॉर्डरमध्ये सुनील शेट्टी हातात ग्रेनेड घेऊन डायरेक्ट त्यांच्या हद्दीत घुसून गोळा टाकतो, तो सीन पाहून बाबा हसत सुटले होते. आणि चेहऱ्यावर ‘अरे कोण आहे हा, काय करतोय’ टाइप भाव.)



पण एक आहे, एअरफोर्सला आर्टिलरीची भीती असतेच. या दोघांमध्ये फार खुन्नस असते. कारण आपल्यावर गोळा कसा कुठून येईल हे एअरफोर्सवाल्यांना एकदम ओळखता येत नाही. आणि इकडे रडार सिस्टीम परफेक्ट सिग्नल्स देत असेल तर एअरफोर्सचे होत असलेले आणि संभाव्य हल्लेही आर्टिलरी नामोहरम करू शकते. थेट विमानांवरच निशाणा साधून विमानंच उडवून टाकणं. ना रहेगा बांस ना बजेगी बांसुरी. एकेका विमानात बराचसा दारुगोळा असतो, त्यामुळं एक फायटर प्लेन नेम धरून बंबार्डमेंट करत हवेतच उद्धवस्त केलं की पुढचा आपल्याकडचाही बराचसा संहार टळतो. थोडक्यात वेळीच घातलेला एक टाका पुढचे नऊ टाके वाचवतो,Prevention is better than cure वगैरे..


अर्थात युद्धात मात्र आर्टिलरीचं मुख्य काम हे इन्फंट्रीला (पायदळ) सपोर्ट करणं हेच असतं. मग इन्फंट्रीचं त्याना मिळणाऱ्या ऑर्डर्सनुसार advancement करणं सुरु असेल किंवा  withdrawal करणं, दोन्हीवेळी तोफखाना त्याना प्रोटेक्शन देत पुढे नेतो किंवा धोक्यातून बाहेर काढत मागे आणतो. कारण कधी कधी आठ पावलांची झेप घ्यायला चार पावलं मागे यावं लागतं. शिवाय शत्रूला खोटा कॉन्फीडन्स देऊन आपलं मनोबल खचलंय असं दाखवत त्यांना बेसावध करून अचानक डबल ताकदीनिशी हल्ला करणं वगैरे असतंच. असो, वॉर टेक्निक्स हा पूर्ण वेगळा आणि मोठा भाग.

युद्धातला एक मोठा धोका म्हणजे फुटबॉलमध्ये सेल्फगोल. म्हणजे आपल्याच चुकीनं आपलेच सैनिक मारले जाण्याची शक्यता असते, ते मरू नयेत म्हणून काळजी घ्यावी लागते. ट्रूप प्लेसमेंट नीट आखावं लागतं, अगदी मायनर पोझिशन्सही.. म्हणजे जे स्वत: प्रत्यक्ष लढत नसतात असेहीसैनिक. उदाहरणार्थ, एका तुकडीकडची रसद संपत आलीय असा संदेश मिळाला की अमुक ठिकाणी इतके इतके गोळे आणि गोळ्या नेऊन देणारे सैनिकही कुठून कसे जातील हे ठरलेलं असतं. कारण तिथे सगळा मामला अक्षांश रेखांशावर चालत असतो. ‘पुढे दोन खडक जाऊन उजव्या अंगाला खाली वळा’ अशी भाषा नसते. वॉकीटॉकीवरून एक्झॅक्ट कोऑर्डीनेट्सच कम्युनिकेट केले जातात आणि त्याप्रमाणे पोझिशन्स घेतल्या जातात, बदलल्या जातात.

हे कोओर्डीनेट्स फार अभ्यासपूर्वक ठरवावे लागतात की कोण कुठे बसेल, उभा राहील, कोणती तुकडी किती एरिया कुठल्या दिशेने प्रोग्रेस होत कव्हर करेल, तिथे गरज पडल्यास उरलेल्यांपैकी कोणत्या तुकडीतले सैनिक धाडायचे, प्रत्येक गटात लीडर कोण असेल वगैरे सगळंच आधी ठरवावं लागतं. थोडक्यात जोश में होश खो दिया आणि जिथे जाणं अपेक्षित नाहीये तिथे घुसून तिथल्या टीमचा बॅलन्स बिघडवला, त्यांचं लक्ष विचलित होऊन ते शत्रूच्या गोळ्यांना बळी पडलेअसं चालत नाही. किंवा अमुक ठिकाणी खडकांत, झाडीत आपलीच एक दुसरी तुकडी बसलीय आणि त्यांच्या पलीकडे शत्रू असला तरी सावधानतेने फायरिंग करावं लागतं. अशा वेळी विशिष्ट ठिकाणी फायरिंगची ऑर्डर असेल तर अमुक अँगलनेच गोळीबार करावा लागतो, कारण तिथे बसलेल्या आपल्याच सैनिकांना आपलीच गोळी लागू नये. आपलेच दात आपलेच ओठ टाइप..

भारतीय लष्कराच्या ताफ्यातील एक रणगाडा तोफ 
अशावेळी इथला एक डावपेच म्हणजे शत्रूच्या टप्प्यात ती तुकडी असली तरी त्यांना ती दिसत नाही आणि इकडून आपली दुसरीच तुकडी फायरिंग करून त्याना छळते, मग आधीच बिथरलेला शत्रू चूक करून दोन पावलं पुढे आला की अचानक ती संधी साधून तिथली तुकडी उठून त्यांना मारते. कधी उठायचं त्याचेहीसिग्नल त्यांना मिळत असतात. ते तिकडून थेट इकडे गोळीबार करतायत म्हणजे मध्ये कुणीच नाही, रस्ता क्लियर आहे अशी आधी त्यांची रीतसर गैरसमजूत करून द्यावी लागते. हीपण वॉर स्ट्रेटेजीच.

इंडियन फायटर प्लेन - मिग २९
प्रतिस्पर्धी एअरफोर्स आणि आर्टिलरी म्हणजे साप आणि मुंगुस. कितीही तयारी करून आलेल्या फायटर प्लेन्सना जसा तोफखाना भारी पडतो तसाच एअर अटॅक झाला तर आर्टिलरीलाही विशेष काळजी घ्यावी लागते. म्हणजे एकाच वेळी सगळ्या तोफा त्यांच्या हल्ल्याने डॅमेज होऊ नयेत म्हणून अर्ध्या तोफा या रूटला तर अर्ध्या तोफा त्या रूटला जातात.शिवाय इमर्जन्सीमध्ये अगदी ऐनवेळी कितपत तोफगोळे, सैनिक, ऑपरेटर इत्यादी कुमक आपल्या मदतीला येऊ शकते याचाही अंदाज घ्यावा लागतो.


यासाठी फेमस टेक्निक म्हणजे सँड मॉडेल्स किंवा क्लोथ मॉडेल्स बनवून त्यानुसार आधीच सूचना देऊन ठेवणं. त्यासाठी आवश्यक ते आर्टवर्क आधी तयार करणं. वॉर प्लॅनिंग खरं यातच होत असतं. अर्थात या सर्वच टॉप सिक्रेट गोष्टी, ज्या फक्त रेजिमेंट कमांडर, ऑन ड्युटी ऑफिसर आणि सर्व्हे ऑफिसर यांनाच माहिती असतात. मग इतर लहानमोठे ऑफिसर किंवा ट्रूप लीडर्स मौका बघून यापैकी कुणाशी सलगी असेल तर मागे लागतात की ‘सांग ना, आमची पोझिशन कुठे आहे’, ‘अगदीच जबड्यात जायचंय आधीच की टप्प्याटप्प्यानं’,‘उद्या आम्ही जात्यात आहोत की सुपात’ ही अशी विचारणा होतच असते. पण अशा ‘अवांतर’ वेळी कोणतीही माहिती या ऑफिसर्सकडून काही केल्या पुरवली जात नाही. सर्व अलॉटेड पोझिशन्स आणि वॉर प्लेसमेंट्स सर्व एक्टीव्ह रेजिमेंट्स आणि डिपार्टमेंट्सना (हेल्पिंग, वॉर मटेरियल सप्लायिंग, रिप्लेसमेंट फॉर इंज्युर्ड सोल्जर्स, रेस्क्यू, मेडिकल हेल्प वगैरे विभाग) एकाच वेळी सांगण्यासाठी एक स्पेशल नॅरेटीव्ह सेशन असतो, तेव्हाच या गोष्टी सांगितल्या जातात.

अशी मॉडेल्स बनवणं, आर्टवर्क करणं, सांग सांग म्हणून मागे लागलेल्यांना मार्किंग्ज, पोझिशन्स न सांगणं, आणि फायनली ती जबाबदारीची सेशन्स नीट नॅरेट करणं ही सगळीच कामं सर्व्हे ऑफिसर झाल्यावर बाबांनाही करायला मिळाली. मुळातच उत्तम असलेलं ड्रॉइंग आणि जॉईन झाल्यावर घेतलेलं टेक्निकल नॉलेज, नाशिकला केलेला Counter Bombardment(CB 52)कोर्स या सगळ्याच गोष्टींचा त्याना हा एक महत्त्वाचा पण तितकाच जोखमीचा अनुभव मिळवण्यासाठी चांगलाच फायदा झाला.

हे इतकं सगळं शिकायला मिळत असताना सैनिकांकडे कोणत्या बाबतीत दुर्लक्ष होत असतं? त्यांना मिळणारं वेतन, एकूणच सोयीसुविधा (?), आणि महत्त्वाचं म्हणजे आहार त्यांच्या जबर शारीरिक कामाला, रोजच्या कष्टांना आणि त्यागाला साजेसा असतो काय? त्यांना कोणत्या एका गोष्टीची सर्वात जास्त खंत असते? हा भाग पुढच्या लेखात..
(क्रमश:)

बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन – भाग ६)

आर्टिलरीचे काम नेमके कसे चालते? तोफखान्यात काम करताना तिथल्या जबाबदाऱ्या काय असतात? सैनिकांना तोफांबद्द्ल खास असे काय आणि कधी शिकवले जाते?

एकतर युद्धाच्या प्रसंगी सर्वात बेसिक पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तोफा कुठेकुठे ठेवायच्या, त्यांच्या पोझिशन्स नेमक्या काय असाव्यात, किती स्थिर तोफा वापरायच्या, किती मोबाइल तोफा वापरायच्या आणि कधी (ज्या एखाद्या वाहनातून गरज पडल्यास ऐनवेळी चटकन दुसरीकडे नेता येतील) हे ठरवणं. कुठून तोफगोळे टाकले तर जास्तीत जास्त एरिया कव्हर करता येईल हे आर्टिलरी टीमला आधी ठरवून घ्यावे लागते.
तोफांचे मार्किंग, आणि ते गोळे किती लांबवर पडू शकतील त्याचा अंदाज (गोळ्याचे वजन, वेग, अँगल, ट्रॅजेक्टरी या सगळ्याचा विचार करून) घेऊन ते शत्रूच्या हद्दीत पडून कितपत डॅमेज करतील हे सांगणं. मिलिटरी भाषेत ‘एस्टिमेटेड डेंजर झोन’ ठरवून सांगणं. परिस्थितीचा अभ्यास करून काही कॅल्क्युलेशन मांडणं, आणि मग वेग, वेळ, विध्वंसक क्षमता वगैरे त्रैराशिक मांडून पाहणं कोणती तोफ कुठे सुटेबल ठरेल, त्यानुसार डिप्लॉयमेंट ठरलेले.


डिरेक्टर थिओडोलाइट
या कामी काही उपकरणं वापरावी लागायची. उदाहरणार्थ, तोफेचा अँगल नेमका मिळवण्यासाठी डिरेक्टर थिओडोलाइट हे साधन वापरणे, तर अंतर ठरवण्यासाठी रेंज फाईंडर हे उपकरण वापरणे. याशिवाय बाकी मेटॅलिक टेप वगैरे असायचेच, ज्याच्या सहाय्याने ३०-३० मीटर अंतर मोजत जायचे. तोफगोळ्याची ट्रॅजेक्टरी ठरवणे.. गोळा रिलीज करताना जास्त हाईटवरून जाणार असेल तर तो फार दूरवर पडणार नाही, तोकमी पल्ल्याचा असेल.. आणि व्हाइसव्हर्सा, म्हणजे कमी उंचीवरून सोडला जाणार असेल तर तो बराच लांब पडून विध्वंस करू शकेल. अर्थात हे गोळ्याच्या वजनावरही ठरते, गोळे हेवी वेट, मीडियम वेट, लाईट वेट असू शकतात.. एकेक गोळा ४० किलोपर्यंत वजनाचाही असतो (अशाच हेवी वेट गोळ्यांचे लोडिंग अनलोडिंग करताना एकदा मेजर इंज्युरी होऊन मेडिकल रिझन्समुळे बाबांना पुढे रिटायरमेंट घ्यावी लागली, पण तो भाग नंतर).



खरंतर तसा डेटा उपलब्ध असतोही, की कोणत्या कॅटेगरीतला गोळा किती अंतरावर किती सेकंदांत जाऊन पडेल आणि कितपत डिस्ट्रक्शन करू शकेल. पण जर एखादेवेळेस अशी तयार माहिती उपलब्ध नसेल तर मात्र प्रॉपर trigonometry कॅल्क्युलेशन वापरून ते Sin, Cos, Tan वगैरे मित्रांच्या मदतीने अँगल्स आकडेमोड करून शोधून काढणे आणि सांगणे, हे काम असायचे.


डिरेक्टर थिओडोलाइटचा वापर (फोटो प्रातिनिधिक)
आता साहजिक प्रश्न येतो की हे गणिती ट्रेनिंग सैनिकांना कधी दिले जाते. इंजिनियरिंगला नाही का पहिल्या वर्षी सगळ्यांना सारखाच सिलॅबस देऊन सारखेच सामूहिक हाल करतात, पण मग सेकंड इयरपासून त्या त्या ब्रँचला त्या त्या ब्रँचचाच छळवाद अलॉट केला जातो, तसेच १९६५ ला जॉईन झाल्यावर तिथले बेसिक ट्रेनिंग झाल्यावर बाबांना आणि एकूणच आर्टिलरी टीमला नंतर तीन महिन्यांचा एक कोर्स करण्यासाठी पाठवले गेले. या कोर्सचे नाव ‘Counter Bombardment CB52’ आणि हा कोर्स नाशिकजवळच्या देवळाली या ठिकाणी असणाऱ्या आर्टिलरी सेंटरमध्ये पार पडला होता. हे सेंटर ब्रिटिश काळापासून आहे, तेव्हा अशा सेंटर्सची बेळगाव, पुणे, नाशिक, डेहराडून अशी strategic placements  होती.



देवळाली आर्टिलरी सेंटर - तोफ 

तर नंतर हैद्राबाद हे सेंटर होते जिथे ‘स्कूल ऑफ आर्टिलरी’ मध्ये वेगवेगळे कोर्सेस शिकवले गेले. अर्थात त्यासाठीही एक्झाम्स असायच्याच. म्हणजे नाशिक सेंटरमधून पास झाल्यावर इकडे विशिष्ट कोर्ससाठी एडमिशन घेताना पुन्हा एखादी एक्झाम वगैरे. पूर्ण युनिटमध्ये तीसच विद्यार्थी असायचे. हा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला की त्या सैनिकाचे पुन्हा आर्मीत जाताना Instructor म्हणून प्रमोशन व्हायचे, कारण नाशिक कोर्सपेक्षा ही अजून एक हायर ग्रेड आता अचिव्ह केलेली असायची. थोडक्यात पोस्ट ग्रॅज्युएशन. पण हैद्राबाद सेंटरमधून कोर्स पूर्ण केल्यावर तिथून पुन्हा मिलिटरीत जावे लागायचे, कारण आता हे सैनिक कोर्स क्वालिफाइड झालेले असायचे. आणि Counter Bombardment म्हणजे ऑलरेडी आधीच शत्रूच्या तोफखान्याकडून हल्ला झाला तर कसे प्रत्त्युत्तर द्यायचे याचेही ट्रेनिंग झालेले असायचे, म्हणजेच लगेच उद्या जरी हल्ला झाला, युद्ध छेडले गेले तरी हे सैनिक काउंटर अटॅक करायला सज्ज आहेत असे समजले जायचे.

या कोर्सेसमध्ये तोफा, त्यांचे काम कसे चालते, त्यांची निगा कशी राखावी, तोफगोळे नि त्यांची माहिती, प्रत्येकाची वजनानुसार destruction power, गोळे बनवतानाचे त्यातील ingredients, वाऱ्याचा किंवा एकूणच हवामानाचा गोळ्याच्या गतीवर आणि गोळा लँड होताना अंतिम विध्वंसक शक्तीवर होणारा परिणाम वगैरे माहिती आणि इतर काही पूरक अभ्यासक्रम म्हणजे मॅप मार्किंग करताना तोफांची strategic locations, युद्धाच्या वेळी आवश्यक त्या मानसिकतेचा अभ्यास, शत्रूच्या हल्ल्यांचा अंदाज घेणे, आपल्याकडे पडू शकणाऱ्या गोळ्यांची फ्रिक्वन्सी, एकूणच विध्वंस पाहून लगेच पुढच्या ऐनवेळी बदलाव्या लागू शकणाऱ्या उपाययोजना, अचानक दिशा किंवा वजनी गोळे बदलून शत्रूचा अंदाज चुकवणे वगैरे अनेक गोष्टी शिकवल्या जायच्या.

देवळाली आर्टिलरी सेंटर - सराव 

आता हे कौशल्य आत्मसात करून आल्यावर या सैनिकांची जबाबदारीही तेवढीच वाढलेली असायची. म्हणजे गोळा सांगितलेल्या ठिकाणापेक्षा दुसऱ्या point वर पडला तर ती चूक अर्थात यांची. गोळा त्याच ठिकाणी पडला पाहिजे. मॅप मार्किंग करताना झालेली बॉर्डर मार्किंग आणि एक्च्युअल मार्किंग यांचा proportion नुसार अंदाज घेऊन आणि ग्रीड रेफरन्स तयार करून कमांडरला देणे हे एक काम असायचे.

गोळा नेमका कुठे आणि किती वेळात पडेल याचीही एक सेट एक्युरसी असते. ते प्रिसाईजली ठरवण्यासाठी आधी सर्व्हे टीमलाही जावे लागायचे. म्हणजे सर्व्हे करून मॅप्स अपडेट करणे, रूट चार्ट तयार करणे इत्यादी. हे सारे काम त्यावेळी जास्तीत जास्त मॅन्युअली करावे लागायचे, पण आता ते टेक्नॉलॉजीमुळे खूप सोपे झाले आहे आणि त्यामुळे अर्थातच बहुमूल्य मानवी श्रम आणि वेळ वाचतो आहे असं बाबा म्हणतात. ही वाचलेली एनर्जी सैनिकांना पुढे युद्धासाठी राखून ठेवता येते.

आता हे सगळे झाले जमिनीवरून जमिनीवर होणाऱ्या हल्ल्यांसाठी, त्या युद्धांसाठी जिथे दोन्ही बाजूंनी  इन्फंट्री (पायदळ) आणि आर्टिलरी (तोफखाना) याच मुख्य घटकांत युद्ध होत असतं. पण मग एअर अटॅक झाला तर काय करायचे? हा भाग पुढच्या भागात पाहू…
(क्रमश:)
बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन – भाग ५)

एखादी जादा येत असलेली भाषा सैन्यात मदतीला धावून कशी येऊ शकते? हा फायदा बाबांनाही झाला होता. आता हे कसं? सैन्यात असताना काय असतो फायदा अशी एक्स्ट्रा भाषा अवगत असेल तर..

सातवीपर्यंत इकडे मराठी माध्यमात शिक्षण झाल्यावर पुढे सातवीनंतर बाबा केरूर भागात राहिले असल्याने तेव्हा कन्नड भाषेतूनही शिक्षण झाले होतेच. त्यावेळी काकांकडे राहताना घरातली काही कामे करत करतच ते सांभाळून शिक्षण, दरम्यान त्या भागातून सतत जाणारी एअरफोर्सची विमाने पाहत मनात उत्पन्न झालेले सैन्याचे आकर्षण, त्यापायी एकदा मित्रांसोबत थेट बेंगलोरला पळून जात येळहांका एअरफोर्स स्टेशनवर मारलेली धडक असा सगळा मामला काहीच वर्षांपूर्वी बाबांच्या बाबतीत घडून गेलेला होता.

६५ साली सैन्यात भरती झाल्यावर सैन्याचे ५६ आठवड्यांचे ट्रेनिंगही ३२ आठवड्यात पूर्ण करण्यात आले होते. ६२ आणि ६५ च्या युद्धात झालेला प्रचंड लॉस, ती जीवितहानी लवकरात लवकर भरून काढण्यासाठी केलेली उपाययोजना म्हणजे इकडे वाढवलेला हा असा रनरेट, नवीन फळी एएसएपी तयार झाली पाहिजे ना.. कारण पुढचं युद्ध कधी होईल सांगता येत नाही.. जे झालंच पुढे सहा वर्षात १९७१ साली.

ट्रेनिंगच्या काळात कुठेही कॅम्प गेला की ट्रेनी सैनिकांना शक्यतो पहिले काम म्हणजे तिथे तंबू उभारणं, स्नेक स्ट्रेचिंगसाठी खड्डा खोदणं वगैरे. कधी शत्रूची चाहूल लागली किंवा काही टीप मिळाली की तिथे जवळपासच्या भागात जाऊन तळ ठोकणं.. टिल फर्दर ऑर्डर.. मग हे कॅम्प लागले की खुदाईकाम आलेच. तिकडून पाकिस्तानची काही चुळबूळ, हेरगिरी वगैरे सुरु असली की वायरलेसहून येणारे मेसेजेस कॅच करणं हे टेक्निकल टीमचं पहिलं काम.. आणि त्याबरहुकूम इकडची आपली लाइन ऑफ एक्शन ठरवणं. त्यांची भाषा अर्थात उर्दू, हिंदी.. ते मेसेजेस इकडे डिकोड करता यायचे, तेव्हा पंजाबी, यूपीमधल्या उत्तर भारतीय वगैरे सैनिकांना फायदा कारण त्यांचे हिंदी चांगले, मग त्यांना खुदाईकामातून मोकळीक मिळून या कामात गुंतवून ठेवले जायचे. येणारे मेसेजेस किंवा जितके कॅच करता येतील ते डिकोड करून सांगणे, मग इकडे पुढची हालचाल करता यायची.

...आणि इथे फायदा होतो भारतीय सैन्याला भारत बहुभाषिक असण्याचा. कारण पुढच्या आपल्या हालचाली, त्यासाठी होणारे संभाषण किंवा जनरल गोष्टीही जेव्हा पाकडे कॅच करायचे तेव्हा त्यांना ते समजू नये, डिकोड करता येऊ नये याची पूर्ण काळजी घेतली जायची/जाते. म्हणजे आपल्याकडे असतात तसे त्यांच्याकडेही ट्रान्सलेटर्स असतातच, पण गंमत म्हणजे पाकिस्तानी गोटात हिंदी, मराठी, बंगाली, पंजाबी, गुजराती अशा भाषा डिकोड करून अर्थ सांगणारे होते, कारण या भाषा त्यांच्या हिंदीलाही तशा जवळच्याचं आहेत आणि लिपीतही फारसा फरक नाही.. पण कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्ल्याळमसारख्या दाक्षिणात्य भाषांचे काय? त्या या पाकड्यांना घंटा कळत नाहीत. आणि इथेच भारताचा फायदा व्हायचा.

इकडे आपल्याआपल्यात काय बोलणं चाललंय ते शत्रूला कळू नये म्हणून ही सगळी दक्षता. एकमेकांत इकडे वायरलेसहून येणारे मेसेजेस, त्यांच्या गोटातले कॅच केलेले सांकेतिक किंवा साधे संदेश आणि रिसिव्हिंग एन्डला इकडे बसून ते डिकोड करणे आणि इन चार्ज ऑफिसरला माहिती देणे, रिपोर्ट करणे हे अशा अतिरिक्त भाषा येणाऱ्यांचे काम. त्यामुळे मग अशी स्कीम करायची असली की दाक्षिणात्य भाषा येणाऱ्यांना खुदाईकामातून सूट आणि तंबूत टेक्निकल टीमची मदत करणे हे काम..

‘वो पुजारी को इधर भेजो, कन्नडा में बोलना है, समझना है.. जाओ ये खुदाई तुम करो’ वगैरे आदेश सुटायचे. या सगळ्याचा फायदा डायरेक्ट फ्रंटवर... मग ती एखादी छोटीशी चकमक असो की प्रत्यक्ष मोठे युद्धच.. कारण ठरल्याप्रमाणे आपले सैनिक कन्नड, तमिळ वगैरे भाषेची चेन करून बोलायचे.

कधी कधी शत्रूची दिशाभूल होण्यासाठी मध्येच काही हिंदी किंवा उर्दू शब्द टाकायचे, जेणेकरून तो तेवढाच शब्द पकडून शत्रू काहीतरी हमखास चुकीचा अंदाज लावून त्याप्रमाणे त्याचा प्लान ठरवणार आणि मग इकडे चकमकीत आपल्यालाहवी ती बाजू शत्रूकडून ढिली व्हायची किंवा कधी आपणच एखाद्या दिशेकडून आधीच सैनिक पेरून ठेवायचे आणि मेसेजमध्ये बोलताना मुद्दाम ‘अंडू गुंडू अंडू गुंडू पहाडी की पीछेसे अपना ट्रूप क्लियर करो, सबको वापस बुलाओ अंडू गुंडू’ (इथे अंडू गुंडू म्हणजे कोणतीही दाक्षिणात्य भाषा, मला येत नाही म्हणून सोय) वगैरे पावशेर टाकायचं.झालं.. शत्रू गंडला खुश होऊन तिथे जाऊन.




अर्थात कधी कधी संपूर्ण संभाषणंच दाक्षिणात्य भाषेत व्हायची. बहुतेकदा गन पोझिशनवरून (GP) ऑब्झर्व्हेशन पोस्टला (OP) जाणारे अतिशय महत्त्वाचे मेसेजेस शत्रूने कॅच करू नयेत म्हणून या अशा दाक्षिणात्य भाषांचा तिथे उपयोग केला जायचा. GP आणि OP दोन्हीकडे अर्थात तसे सक्षम भाषाप्रभुत्व असलेले, गरज पडल्यास सांकेतिक भाषेतून बोलू शकणारे सैनिक असायचे जे ट्रान्समीटर्स आणि रिसिव्हर्स म्हणून त्यांची कामगिरी चोख पार पडायचे. बाकी मेसेज डिकोड करणारी, ट्रान्सलेट करणारी टीम मदत म्हणून असायचीच. ‘हे हे अमुक बोलायचंय.. बोल कन्नडमधून’ असं सांगणारे ऑफिसर्स तिथे असायचे. हे असं दोन्ही एन्ड्सना चालायचं. जे पोचवायचंय ते सहकाऱ्याला हिंदी वा इंग्रजीत सांगणे, मग त्याने ते कन्नड, तमिळमध्ये वगैरे तिकडे पोचवणं आणि तिकडे हीच क्रिया उलट, म्हणजे कन्नड समजून घेऊन ते हिंदीतून सांगणे, त्यावरील उत्तर हिंदीत ऐकून कन्नडमध्ये पोचवणं.. आणि असं कितीही वेळ.

कधी कधी तास दोन तासातून एखादा मेसेज.. पण दोन्ही बाजूंचे सैनिक कानात प्राण आणून ते ऐकत बसलेले असतात. तशी प्रक्रिया फार वेळखाऊ, नि किचकट, पण शत्रूला थांगपत्ता लागू नये म्हणून तितकीच गरजेचीही. या सगळ्याचा आढावा घेऊन त्यानुसार योजना आखत फ्रंटवर काय व्हावे, तोफा अमुक अंतर मागे घ्या, पुढे घ्या, या दिशेने आणखी सैन्य पाठवा, इकडे इतकी रसद पुरवा, किंवा कधी तिकडून त्यांची स्वत:हून काही हालचाल होईपर्यंत ढिम्म रहा वगैरे ऑर्डर्स देणारा अधिकारी पुढे असायचा.

पण नेमके आर्टिलरीचे काम कसे चालते? तोफखान्यात काम करताना तिथल्या जबाबदाऱ्या काय असतात, त्याना तोफांबद्द्ल खास असे काय शिकवले जाते? पाहू पुढच्या भागात..
(क्रमश:)
बाबांवर मी बोलतो काही (लष्करी जीवन –  भाग ४)

सैन्यात शिस्त पराकोटीची. सिनियर्सचे आदेश पाळणं आवश्यक. पण हे सगळं असलं तरी आणखी एक निगेटिव्ह गोष्ट मात्र सैन्यातही होती, अजूनही असेलच. जिचा काहींना फटका बसायचाच.. विशेषत: काही गुणी ट्रेनी सैनिकांना. ही गोष्ट मुळातच आपल्या देशात पूर्वापार चालत आली आहे, अगदी प्रत्येक क्षेत्रात आणि काही केल्या जाता जात नाही. कळले असेलच म्हणा या वाक्यावरून. बरोबर.. जाता जात नाही तीच म्हणजे जात.
बाबा जॉईन झाले तेव्हा दिवसा परेड, वेपन ट्रेनिंग वगैरे भाग तर रात्री काही टेक्निकल वर्क.. सर्व्हेयिंग, मार्किंग, कंट्रोल रूमचे काम कसे चालते वगैरे काही गोष्टी शिकून घेणं. आधीच ५६ ऐवजी ३२ आठवड्यात पूर्ण करण्यात आलं होतं. तरी २८ आठवड्यानंतर १० दिवसांची एक सुट्टी मिळाली होती. मग पुन्हा काही फिजिकल टेस्टस आणि फायरिंग वगैरे टेस्टस झाल्या.. आणि मग बाबांना साधारण एप्रिल-मे १९६६ च्या सुमारास पहिलं पोस्टिंग मिळालं ते डेहराडूनचं.

डेहराडूनला गेल्यावर जाणवलं की तिथेएकूणच संख्येने मराठे कमी होते, आणि शीख नि केरळी वगैरे जास्त होते. मग त्यांच्या त्या त्या प्रांतीय अधिकाऱ्यांचा त्यांच्या कंपूतल्या सैनिकांना सॉफ्ट कॉर्नर असायचा. जातपात आणि प्रांतवाद, भाषावाद हा नाही म्हटलं तरी तिथेही प्रत्ययाला आलाच. कुठेही कॅम्प गेला की सैनिकांना तिथे तंबू उभारून राहावे लागायचे. मग दिवसभर ग्राउंडवर्क आणि रात्रीचा वेळ टेक्निकल गोष्टींच्या सरावासाठी दिल्यावर तुम्हाला कुणी वाली नसेल तर अशावेळी बाहेर गस्त घालायला उभं राहावं लागायचं हातात दंडुका धरून. मग झोप किती मिळेल, किंबहुना मिळेल की नाही हे सांगता यायचं नाही. त्यात ती सैन्याची शिस्त, त्यामुळं वर तोंड करून विचारायची सोय नाही. कारण ऑर्डर डिसओबे झाली की शिक्षाही तितक्याच कडक असायच्या. म्हणजे आता पुढची वाक्यं वाचून आपण फक्त कल्पना करायची हं.

उदाहरणार्थ पाठीवर एक फार नाही, पण चाळीस किलो वजन असलेलं ओझं.. तेही काट्यावर वजन करून. ती बॅग/ सॅक जास्तीत जास्त जड कशी होईल आणि सैनिक मध्येच थकून बसला तर पुन्हा उठणं जास्तीत जास्त कठीण कसं होईल याची काळजी घेतली जाऊन भरली जाणारी बॅग.. म्हणजे त्या बॅगेत रेती, वाळू, दगड, जड रायफल्स आणि इतर काही जड गोष्टी वगैरे असायचेच. आणि मग सुटायच्या ऑर्डरी – ‘याला वन पॅक ड्रिल द्या’. हे ओझे पाठीवर घेऊन सांगितलेले अमुक अंतर धावत जाणे, राउंड मारणे किंवा रांगत जाणे- क्रॉलिंग करणे म्हणजे मिलिटरीच्या भाषेत पॅक ड्रिल.. वन, टू जितके सांगितले असतील तितके पॅक ड्रिल्स करणे म्हणजे तितक्यावेळा तसे तेवढे अंतर धावणे, राउंड मारणे किंवा क्रॉलिंग करणे. बरं हे क्रॉलिंग तरी साधं सरळ जरा माणसातलं ठेवावं, तर तेही नाही.. म्हणजे सक्तीने मुद्दाम शर्टच्या बाह्या वर घेऊनच जायचं, जेणेकरून ढोपरं फुटलीच पाहिजेत, रक्ताळलीच पाहिजेत, मग भले दुसऱ्या दिवशी आर्मी डॉक्टरकडे ड्रेसिंग करून घ्यायला जा, पण तेव्हा ते पॅक ड्रिल विदाउट फेल परफॉर्म झालं पाहिजे म्हणजे पाहिजेच. (या ‘च’चं महत्त्व सैनिकांना कधीच वेगळ्याने शिकवावं लागत नाही.) कधीकधी त्यासाठीही टाईम लिमिट.. एवढ्या वेळात हे करून पुन्हा पुढच्या सेशनला जायचं वगैरे छान शारीरिक लाड.


या शिक्षाही शक्यतो भर उन्हात.. तितकंसं ऊन त्यावेळी नसेल तर जेव्हा ऊन पडेल तेव्हा ‘स्टार्ट’ म्हणायचं. हे जरा क्रूर किंवा कठोर वाटेल, पण सैन्यात सगळ्यांच्याच हातात रायफल असते, काहीही करू शकतील ना.. मग म्हणूनच अशा काही गोष्टींतून शिकाऊ सैनिकांच्या अंगी शिस्त बाणवण्याचा प्रयत्न केला जातो आणि हाच हेतूही असतो. हां आता इथेही तो जात मुद्दा असू शकतोच, कसा ते आता पुन्हा सांगत बसण्याची गरज नाही. पण जरब हवीच हे सगळं कंट्रोल करायला म्हणून मग हे असं. अंगठे धरून उभं केलं म्हणून पालकांना फोन करता येत नाही तिथं. ‘च्यायला पाठवा सरळ बॉर्डरवर.. गोळ्या घालून आणि खाऊन युद्धात तरी मरतो एकदाचा, पण हे असं रोज मरण नको’ असं सैनिकांना या काळात वाटतंच. आणि यातूनच ते कायच्या काय सॉलिड टफ होत जातात. कधी शत्रूच्या तावडीत सापडल्यावर युद्धकैदी त्यांचे कितीही हाल झाले तरी तोंड उघडत नाहीत नि काही माहिती फोडत नाहीत ती सहनशक्ती येते कुठून तर इथून. देते कोण देते कोण देते कोण देते ही सहनशक्ती? तर आर्मी आणि तिथलं खडतर ट्रेनिंगच!




सैन्यात एखाद्या ज्युनियरने सिनियरला किंवा सहकाऱ्याला गोळी घातली अशी कधीतरी बातमी, अगदी क्वचित का होईना, पण आपण वाचतो. हे शक्यतो टाळण्यासाठीही ही शिस्त, आदरयुक्त भीती उपयोगी पडते. मुळात सिनियर्सविषयी मनात आदर असला की असं काही घडायची शक्यता कमीच. पण जर शारीरिक क्षमता आणि मनोबल कमी पडत असेल तर मात्र मग ते शिकाऊ सैनिक सरळ पळून येतात तिथून. (तिथून पळून येणंही सोपं नसतं. उगाच शाळा/कॉलेजात आपली प्रेझेंटी देऊन मागच्या दाराने वर्गाबाहेर पळून जाण्याचे वैयक्तिक अनुभव आठवू नये. पण मला तरी हे वाक्य नेमकं इथंच का सुचावं.. छे, भूतकाळ काही पिच्छा सोडत नाही)

कुठेही कॅम्प लागला की तंबू जे तयार करावे लागायचे ते काम तर सैनिकांना असायचेच. पण पहिले काम म्हणजे तिथे बंकर्ससाठी योग्य जागा शोधून ते आधी तयार करणे. अर्थात त्याचीही मोजमापे ठरली असतात. साधारण साडेचार फूट खोल आणि अडीच फूट रूंद.. म्हणजेच दोन-तीन सैनिक बसू शकतील आणि रायफलचे टोक खड्ड्याच्या एजवर जमिनीला समांतर येईल असे. शिवाय भोवती किंवा आवश्यक त्या दिशेला हिरवी झाडीझुडपे आणून लावणं.

एखाद्या मोहिमेवेळी असं करताना अशा खड्ड्यात कितीवेळ बसावं लागू शकतं याचा अंदाज नसतो, भूक लागली आणि अन्नाची पॅकेट्सही नसतील तर लगेच खा ती हिरवी पाने तरी असंही करता येत नाही, कारण आपण तिथे बसलोय हे शत्रूला दिसता कामा नये, पोषाखही त्याच रंगाशी मिळताजुळता असतो. सरडा जसं भक्ष्य टिपण्यासाठी कितीही वेळ बसून राहतो, आणि भक्ष्य टप्प्यात आलं की कायच्या काय लांब जीभ बाहेर काढून त्याला टिपतो, तसंच सैनिकांना करावं लागतं. शत्रू टप्प्यात आला की हा गोळीबाराचा समन्वयही साधावा लागतो. वायरलेस प्रत्येकवेळी असतीलच असं नाही, डिपेंड्स मोहीम कितपत मेजर आहे (अशा प्रत्येक मिशनलाही खास नावं दिलेली असतात.. मिशन अमुक किंवा ऑपरेशन तमुक), मग कधी खड्डे जवळजवळ असतील तर खाणाखुणा किंवा आधीच ठरलेले संकेत – पक्ष्याचा आवाज, विशिष्ट शिट्टी, किंवा रायफलनेझाडीत किंचीतशी हालचाल वगैरे. आणि मग दे दणादण... ठ्या ठ्या ठ्या धूड धूड धूड धूड.. (गोळीचा ढिश्क्यांव असा आवाज फक्त हिंदी सिनेमातच येतो)

खड्डा खोदणं ही डोकेदुखी असते खरी, पण ते गरजेचंही असतं. शिवाय जंगलात किंवा दुर्गम डोंगराळ  भागात तंबू लागले की अजून एक काम वाढतं. म्हणजे अजून एक खड्डा खणावा लागतो, पण तो आपल्यासाठी नाही तर सापासाठी. त्याला ‘स्नेक स्ट्रेच’ म्हणतात. विशिष्ट आर्क करत तीन फूट खोल आणि दीड फूट रूंद आणि लांबी अख्ख्या तंबूला कव्हर करेल एवढी.अशा काही भागातले साप म्हणे त्यांच्या शरीररचनेमुळे त्या खड्ड्यात पडले तर तिथून चढून वर येऊ शकत नाहीत, पर्यायाने तंबूपर्यंत पोहचू शकत नाहीत. हां प्रत्येकवेळी हे वर्क होईलच असं नाही, कारण मग तो सापांच्या बुद्धिमत्तेचा अपमान ठरेल. पण अशा मेथड्स वापरून कधी दुसऱ्या दिवशी खड्ड्यात पडलेले वळवळणारे साप दिसायचेही.

हे बंकर्स आणि स्नेक स्ट्रेचिंगसाठीचे खड्डे खोदणं, तंबू लावणं वगैरे कामही असायचीच.. फक्त तेथील संबंधित हायर रँकचे क्लास वन ऑफिसर्स आणि ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर्स (जेसीओ) यांना या कामातून सूट असायची. अर्थात इतरांकडून कामं नीट करून घेणं ही त्यांची जबाबदारी असायचीच, म्हणजे काम सांगून हा स्वत: आत तंबूत जाऊन झोपला असं नसतं, त्या अधिकाऱ्यालाही लक्ष ठेवण्यासाठी जागावंच लागतं. तो लष्करी तंबू असतो, सरकारी ऑफिस नव्हे.

पण या कामातून प्रसंगी कधी कधी मोकळीकही मिळायची, तेही अधिकाऱ्यांकडूनच.. एखादी जादा येत असलेली भाषा मदतीला धावून यायची, काय.. आता हे कसं? सांगतो पुढच्या भागात..
(क्रमशः)