Monday, 28 November 2011

हरभजन @ कौन बनेगा करोडपती ..

हा एपिसोड खरोखर शूट झाला आहे...हरभजन टीममधून  शूट झाल्यावर त्वरित...हरभजनच्या पंख्यांनी हे वाचू नये प्लीज....
तर एके दिवशी काय झाले...हरभजन  गेला कौन बनेगा  करोडपती' मध्ये खेळायला (काय करणार,तसंही सध्या काही काम नाही...चार पैसे मिळवायचे तर इकडे तिकडे जाऊन 'येस सर' म्हणत प्रेझेंटी लावली पाहिजे ना !)  अमिताभ बच्चन नेहमीच्या रुबाबात समोर बसलेले...हॉट सीट वर येऊन बसला भज्जी...

अमिताभ : आणि आता आपल्या सोबत आहे हरभजन सिंग ...एकेकाळचा टर्मिनेटर ऑफ टीम इंडिया ! भज्जी...एकूण १३ प्रश्न आहेत,४ पर्याय..आणि एकही लाईफलाईन नाही तुला..कारण तुझी लाईफलाईन तर भारतीय क्रिकेट निवड समितीकडे आहे.आणि हो,तू गेम क्विट ही करू शकत नाहीस,तुला संपूर्ण गेम खेळावाच लागेल.. पण तुला तुझा मनचाहा पडाव कुठ हवाय ते बोल...
भज्जी : अरे वा..ते मी ठरवायचं असतं? ते ते माझ्या हातात आहे का?
अमिताभ : मग काय...हे काय तुझं टीम मधलं स्थान आहे काय तुझ्या हातात नसायला...बोल बाळा.
भज्जी : पहिला प्रश्न ...कारण ५००० सुद्धा खूप आहेत सध्या माझ्यासाठी...तेवढे तरी नक्की मिळूदेत ..जय वाहे गुरु !

अमिताभ : ठीक आहे..तर पहिला प्रश्न - आजघडीला या जगत सर्वात दु;खी.फ्रस्ट्रेटेड,निराश,हताश,हतबल असा कोण मनुष्य आहे? -- पर्याय आहेत..हरभजन सिंग, भज्जी, टर्मिनेटर-वन्स अपॉन अ टाईम, वरील सर्व ?
भज्जी : वरील सर्व.

अमिताभ : सही जवाब...आता तू कमीत कमी ५००० तरी घेऊन जाऊ शकशील.पुढचा प्रश्न, यापैकी कोण सध्या तुझा सर्वात मोठा शत्रू आहे? --  प्रग्यान ओझा,अमित शर्मा, पियुष चावला,आर.अश्विन ?
भज्जी : आर. अश्विन...

अमिताभ : बरोब्बर..तू जिंकलेस १०००० ! तिसरा प्रश्न..'यापैकी कुणाला तू कधीच माफ करणार नाहीस?' --  आंड्र्यू सायमंड्स , एस.श्रीशांत, गीता बसरा, आर. अश्विन ?
भज्जी :  अश्विन .

अमिताभ : करेक्ट...चौथा प्रश्न..' यापैकी कोणत्या खेळाडूला सर्वात आधी भारत रत्न  दिला पाहिजे?' -- सचिन तेंडुलकर, ध्यानचंद, अभिनव बिंद्रा, आर. अश्विन ?
भज्जी : वेल..बाकी तिघे ग्रेट आहेतच..त्यानाही मिळावं अशी इच्छा आहेच. पण सर्वात आधी मात्र अश्विनच ..कारण माझ्यासारख्या अव्वल,जागतिक दर्जाच्या,गुणवान,अफलातून ,सामना एकहाती फिरवणा-या,अनेक सामने जिंकून दिलेल्या फिरकी खेळाडूला बाहेर करून माझी जागा मिळवणे हे महाकठीण  काम..ते त्याने करून दाखवलंय..त्यामुळे अश्विनच ! लॉक करा.

अमिताभ : ओके..लॉक अश्विनला तर करता नाही येणार..तो तर आता सुसाट सुटला आहे..विकेटपण  घेतोय,शतकपण करतोय,आता रे तू काय करशील? आणि जे जे काय स्वत:बद्दल बोललास बोजड अवजड विशेषणे लावून...तो सगळा तुझा गैरसमज आहे बाळा. उगाच आमची फिरकी घेऊ नकोस. पण तुझं उत्तर लॉक केलंय..आणि ते बरोबर आहे..ग्रेट..आता पाचवा प्रश्न..'रिकाम्या जागा भरा.समज तबेल्यात एक घोडा आहे..तर हे वाक्य पूर्ण कर. - ______ तबेला. -- घोडा अंदर, हॉर्स इनसाइड ,वारू आत , अश्विन ?
भज्जी : अश्विन..कारण स्पेलिंग ashw  in  असे होते ना ..म्हणजेच ती रिकामी जागा.

अमिताभ : सही उत्तर ! जशी तुझी संघातील जागा त्याने भरून काढली तशीच...ग्रेट ! सहावा प्रश्न १,६०,००० साठी..' नेहमीप्रमाणे भारतीय टीमला 'त्याने'च जिंकून दिले,तर यापैकी काय म्हणावं लागेल?'  -- अश्विनी ये ना,  ऐश बच्चन, अष्टविनायक, अश्विन नायक ?
भज्जी : अश्विन नायक..सध्या तरी तोच नायक आहे संघाचा..तोच टोचतोय मला सारखा...तोच तोच तोच !

अमिताभ : बिलकुल सही जवाब..आता सातवा प्रश्न. 'ज्याच्यावर सूर्य आणि चंद्र हे दोघेही प्रसन्न आहेत असा तो कोण? बहुव्रीही समास आहे नीट लक्षात घे..' --  सनमून, हनिमून,आचंद्रसूर्य नांदो, अश्विन ?
भज्जी : अश्विन...कारण त्याचे नावच 'रवी चंद्रन ' आहे हो..त्यामुळे तोच तोच तोच.

अमिताभ : हेही बरोबर आहे..जिंकलास तू ३,२०,०००. आता आठवा प्रश्न..नीट ऐक, ' एकदा अभिषेक आणि ऐश्वर्या क्यारम खेळत होते..यू नो क्यारम ना, अश्विन मस्त टाकतो बघ क्यारम बॉल. .जो तुला जन्मात जमणार नाही..हा,तर ऐक..खेळात ऐश्वर्या जिंकली तार यापैकी मी काय म्हणेन ? ' --  अभी जीत , सून जिंकली रे, पोरगा परत फ्लॉप, अश्विन
भज्जी : अश्विन..कारण स्पेलिंग ash win असे होते ना !

अमिताभ :  अचूक आहे रे,आता नववा प्रश्न, अगदी सोपा 'भाद्रपद्च्या नंतर आणि कार्तिकच्या आधी कोणता महिना येतो?' -- नववा महिना, मेरा नाम हिना, अधिक महिना, अश्विन ?
भज्जी : नववा प्रश्न आहे म्हणून नववा महिना असं काही नसतं ओ,अंधश्रद्धा आहे सगळी ... उत्तर आहे अश्विन...

अमिताभ : ग्रेट..तू जिंकलास १२,५०,००० ! आता दहावा प्रश्न...'समज एक दिवस सूर्य नि चंद्र दोघेही ना उगवता  संपावर गेले तर  या अफाट विश्वाचा कारभार सांभाळून तो सुरळीत चालवू शकेल असा
या जगातील एकमेवाद्वितीय महापुरुष कोण?' --  रजनी कान्ट, पॉवरफुल शरद पवार, चंद्र मी सूर्य मी पत्रिकेतला मंगळपण मी, अश्विन ?
भज्जी : अश्विनच हो परत...म्हटलंच आहे - 'रविचंद्र  न  अश्विन'...म्हणजे रवी-चंद्र नसले तरीही अश्विन आहे ना..

अमिताभ : अरे वा..हुशार आहेस..हेदेखील बरोबर उत्तर आहे. आता प्रश्न अकरावा...ज्या अकरामध्येही तुला आता घेत नाहीत..असा अकरा आकडा तुझ्या खास आवडीचा असेल ना..तर प्रश्न आहे, ' यापैकी तुझा आदर्श आणि गुरु कोण?' -- शेन वॉर्न,अनिल कुंबळे, मुथय्या मुरलीधरन, अश्विन ?
भज्जी : अश्विनच हो परत एकदा...बाकीचे तिघे महान आहेतच..पण सिनियर फिरकी गोलंदाजाला बाहेर करून आपण संघात कायमस्वरूपी स्थान मिळवावे यासाठी मी जे माझ्या कारकिर्दीत अखंड प्रयत्न नेहमी केले..हो,बरोबर अनिल कुंबळेच...पण ते मला काही जमलं नाही..अश्विनने मात्र मला बाहेर केलंय..त्यामुळे तोच तोच तोच !

अमिताभ : अरे वा..हेसुद्धा योग्य उत्तर आहे की रे ..आणि अशा प्रकारे आता तू जिंकले आहेस तब्बल पन्नास लाख रुपये ! पुढचा प्रश्न, बारावा, ज्या नंबरचाही खेळाडू म्हणून तुला सध्या संघात कोणी घेत नाही- पाणी नेवून देणे,ग्लोव्हज,बेंट,पॅड नेऊन देणे वगैरे कामे करणारा रे.. असो...तर प्रश्न नीट ऐक..अचूक उत्तर दिलेस तर तू जिंकू शकशील तब्बल एक करोड रुपये..'तू भारतीय क्रिकेट संघात कमबेंक कधी करणार ?' -- आणखी वर्षभरात, दोन वर्षांनी, ४ वर्षांनी, अश्विनचा नातू टीमचा कर्णधार म्हणून निवृत्त झाल्यावर ?
भज्जी : अश्विनचा नातू टीमचा कर्णधार म्हणून निवृत्त झाल्यावर.................त्या आधी तर काही स्कोप नावाचा प्रकारच नाही ना माझ्यासाठी..

अमिताभ : अभिनंदन........तू जिंकला आहेस एक करोड रुपये...वा वा वा..हार्दिक अभिनंदन...आता पुढचा आणि अंतिम प्रश्न ,तेरावा प्रश्न, संघातील तुझ्या स्थानाचा एव्हाना तेरावा झालाच आहे..आता या तेराव्यावर लक्ष केंद्रित कर...अचूक उत्तर तुला मिळवून देईल तब्बल पाच करोड रुपये...तय्यार?..तर प्रश्न आहे की...'तू क्रिकेटमध्ये शेवटची विकेट कधी घेतली होतीस?' - कॉलेजात असताना,
शाळेत असताना, जन्मलास तेव्हा, मागच्या जन्मी ?
भज्जी : ओ..कसला अवघड प्रश्न...नाही येत बघा उत्तर ..काय आठवतच नाय तर.........
अमिताभ : नाही नाही..असं नाही..उत्तर दिलंच पाहिजे तुला..अरे टीम सिलेक्टर्सना  तुला ते सांगता आलं पाहिजे ना-पुन्हा संघात यायचं असेल तर? स्मरणशक्तीला ताण दे आणि सांग बाळा..आणि फार वेळ घेऊ नकोस  हं, विकेट घ्यायला घेतोस तेवढा तर अजिबातच घेऊ नकोस बरं का..सांग आता .
भज्जी : (खूप खूप खूप विचार करून,बराच वेळ पगडी खाजवून..कारण पगडीच्या आत काही नाहीच ना )  मागच्या जन्मी !
अमिताभ : ओह ..
भज्जी : काय झालं सर..चुकलं का..जाऊ का ? माझे ते ५००० तरी द्या..निघतो मी..तुम्हांला भेटून बरं वाटलं !
अमिताभ : नाही बेवकूफ....काय हे कुणीपण येतं आणि पाच करोड जिंकून जातं असं म्हणायची वेळ आलीये आता तुझ्यामुळ...अरे भुरट्या,तू जिंकला आहेस तब्बल पाच करोड रुपये. अभिनंदन...तू या जन्मात एकही विकेट घेतली नाहीस त्याबद्दल..
भज्जी : आं ?
अमिताभ :  काही नाही काही नाही..काय हे..लायकी काय,जिंकतो किती! छे !! असो..तर आज तुला पाच करोडचा चेक देण्यासाठी इथे आली आहे एक खास व्यक्ती..टाळ्यांच्या काद्काडतात स्वागत करूया..(हरभजन सवयीप्रमाणे नखे खात उत्सुकतेने डोळ्यात प्राण अन्णून पाहू लागतो).........दि  ग्रेटेस्ट मिरेंकल ऑफ इंडियन क्रिकेट टीम एव्हर ...प्लीज वेलकम -- मिस्टर रविचंद्रन अश्विन !!!
(सर्वजण टाळ्या वाजवू लागतात..अमिताभ  अश्विनशी गप्पांमध्ये गुंग होतो..त्याला सांगू लागतो मीच तो दिवार,शोले,जंजीर,डॉन, अभिमान,बागबान,पा मध्ये काम केलेला इसम वगैरे..सगळे प्रेक्षक पटापट येऊन अश्विनची स्वाक्षरी मिळवण्यासाठी एकच गर्दी करतात..इकडे पाच करोड जिंकलेल्या हरभजनला कोणीच विचारात नाही...तो हिरमुसलेला..मनातून तुफान चरफडत असलेला,पण तितकाच हतबल..सर्व केंमेरेही  अश्विनवर रोखलेले...हरभजनचा घोर अपमान..त्याला हे सहन होत नाही...तो हळूच एका कोप-यातून निघून जाऊ  लागतो,ते अमिताभ पाहतो.)
अमिताभ : इस्टोप भज्जी...(मग हां लपंडाव नाही,करोडपतीचा सेट आहे  हे लक्षात येऊन ) स्टोप भज्जी...
(भज्जी थांबतो..बाणेदारपणे समोर येतो आणि म्हणतो..एक ऐतिहासिक डायलॉग..)

भज्जी : जीव गेला तरी चालेल ...पण या दुष्ट अश्विनच्या हातून हे बक्षीसच काय, पाणीसुद्धा घेणार नाही..
('वाह..वाह..,क्या डायलॉग मारा है..फिरसे बोलो ' असे प्रेक्षक म्हणतात...पण त्यावर तर सरदारजी भज्जी आणखीनच भडकतो..)
भज्जी: तुम्हांला चेष्टा वाटतेय..मला खरंच नकोयत हे पाच करोड रुपये..आता मी पुन्हा टीम मध्ये येऊनच  पाच करोड रुपये माझ्या खेळातून मिळवेन...ही इथली अशी भीक नकोय..जाता जाता एकच अमितजी..तुमचाच डायलॉग मारून जातो,पण तो या परमदुष्ट अश्विनला उद्देशून..."आज खुश तो बहोत होगे तुम..हांयी....."

आणि एवढे बोलून तो निघून गेला....सगळेच पुरेसे थक्क झाले ...खरंच गेला हो...खोटं नाही बोलत..अश्विन शप्पथ..
आता तर असंही कानावर आलंय की अमिताभच्या एबीकॉर्पतर्फे या पाच करोडमधून हरभजन-अश्विन यांच्यावर हिंदी सिनेमा तयार होणार आहे..आणि या दोन्ही प्रमुख पात्रांसाठी योग्य कलाकारांचा शोध सुरू आहे....

-- पराग पुजारी.

Saturday, 26 November 2011

*मी हरविंदर पवार बोलतोय.....*

*मी हरविंदर पवार बोलतोय.....*

   दिनांक २४ नोव्हेंबर २०११  ...पवारांवर 'हल्ला' झाला. ('हल्ला'..हा शब्द
तीनवेळा वेगवेगळ्या दिशेने चेह-यावर चित्रविचित्र भाव आणून म्हणा
पटकन...एखाद्या डेली सोपसाठी विचार करण्यात येईल -- हां, तर एका नाजूक
सरदारजीने प्रेमाने मारलेली एक हलकीशी चापट म्हणजे हल्ला ?...छे छे..काय हे
मिडीयावाले,उगाच राईचा कावळा आणि पराचा पर्वत करतात.) कुण्या हरविंदर सिंग
नामक शूरवीराने (याला समानार्थी शब्द म्हणून चानेलवाल्यानी 'भ्याड';'माथेफिरू'
असे काहीतरी पापभिरू शब्द वापरलेत..ते सोडा भिडू..माझच ऐका..आय मीन - वाचा.)
होय..माझ्याकडे जरा आतल्या गोटातल्या न्यूज आहेत...त्या मी देतोय...कुण्णा
कुण्णाला म्हणून सांगायच्या नाहीत बर का! प्लोमिश ?...वाचा तर मग !

सर्वप्रथम ...  मी गेलो भेटायला अजित पवारांना...
अजित : काय झु-या ...कसा आहेस..काय म्हणतोस?
मी : ठीक आहे...माझीच कृपा.
अजित : तुझी रे कशी...अशावेळी आपलीच कृपा असं उद्देशून म्हणावं आमच्यासारख्या
नेत्यांना..सत्ता आहे आमच्या हातात..अजिबात म्यानर्स म्हणून नाहीत हा
तुला..असा कसा रे तू..पण तू जर माझा सच्चा कार्यकर्ता झालास तर मी या ठिकाणी
असे आश्वासन देऊ इच्छितो की तू नक्कीच एक चांगला,सुजाण आणि कर्तबगार असा
नागरिक. . . 
मी : गट्टी फू करीन हां परत बोर करायला लागलात तर...
अजित: अरे नको रे बाबा...असे नको करू.बोल आज कसं काय येणं झालं गरीबाकड ? 
मी : ते काय ते...तुमच्या काकांवर कोणी हात टाकला म्हणे..
अजित: टाकला नाही रे ..उगारला म्हण...'टाकला' चा अर्थ वेगळा होतो..
मी : हां..ते नॉलेज तुम्हांला जरा जास्तच नाही का..विसरलोच..हसताय काय तुमच्या
काकांसारखे..आय मीन निर्लज्जासारखे..बोट काढा आधी ते नाकावरच..आणि उगारला तर
माझा मामा राहतो हॉ. असो तर कोण तो हरविंदरसिंग,त्याने काकांना थोबाडीत मारली
म्हणे..
अजित: म्हणे काय म्हणे..अरे मारलीच...पण आम्ही त्या अजाण नादान फड्तुसाला
मोठ्या मनाने माफ केलंय.

 मग काय..बोलणंच खुंटलं..निघालो तडक सुप्रिया सुळेन्कडे  . (असल्याना आपण
दादा,ताई,अक्का,माई,तात्या वगैरे म्हणून आपल्या जिभेची शान घालवत नाही
हां..सांगूनशान ठिवतो आधीच)
मी: हाय...व्होट्स अप?
सुप्रिया: सीलिंग पंखा आणि कोळ्याची २ जाळी,स्लाबचा फिक्कट पिवळा रंग..
मी: मंद...व्होट्स अप म्हणजे असं वर मान करून बघून नाही उत्तर द्यायचं...
तिकडे पिताश्रींवर हल्लाबिल्ला झालाय ना...काय मग..कसं वाटतंय आता?
सुप्रिया: हा हा ते होय..ते काही नाही रे...निवळेल सगळ..व्यर्थ हल्लागुल्ला
कशाला त्याचा एवढा ...जॉर्ज बुश, पी.चिदंबरमना तर चप्पल मारलेली की...उगाच
प्रसिद्धी मिळवायला काहीबाही करतात हे लोक.
मी: नाहीतर काय...उगाच थोबाडीत वगैरे खातात अनोळखी माणसाकडून..
सुप्रिया: तेच की...अरे परू...तसं नाही रे..तू कुणाच्या बाजूने आहेस..मी त्या
हरविंदर का फर्विन्दारच बोलतेय..काय गरज होती त्याला असं करायची...मेला वेडाच
आहे झालं. दिला सोडून...सुखरामाना काय मारतो...बाबांना काय मारतो..जळल मेलं
लक्षण ते!
मी: होय..तुम्ही पवार कुटुंबीय सोडून सगळे वेडेच की...सा-या 'बारा' गावची
'मती' तुम्हालाच नाही का! धान्य आहे..सॉरी..धान्य नव्हे..ते
कृषिमंत्र्यांकडे...धन्य म्हणायचय मला..निघतो..टेक केअर !

वाटेत यशवंत सिन्हा भेटले...
मी: काय हो...खुशीत दिसताय..जाणतो बरं आम्ही सगळं. परवाच म्हणालात की 'देशात
महागाई इतकी वाढत आहे की उद्या जर कुणा आम आदमीने  हिंसक मार्ग अवलंबला तर
आम्हास आश्चर्य वाटणार नाही '...आणि आज हे असं....योगायोगच ना?
सिन्हा: नाहीतर काय रे...पण आमचा काही हात नाही बर यामागे,आमचं तर कमळ
आहे.....तेच ओरडून सांगतोय जगाला माझ्या स्टेटमेंटचा काही संबंध जोडू नका
म्हणून..कुठे कर्णा मिळतो का बघ सेकण्ड ह्यांड...आवाज बसलाय आता माझा. आम जनता
तुम्ही..एवढी महागाई...भ्रष्टाचार पाहून गप्प का बसाल...चालायचंच. जातो
पुजारी..,बाय ...अडवाणींनी बोलावलंय हेल्मेट घालून..गेलं पाहिजे.

हेपण गेले निघून...मग दिसले सर्वांचे लाडके आर.आर.पाटील.
मी : अहो ते शरद पवारांना...
आर.आर. : कळलं ते...
मी: मग तुमची प्रतिक्रिया...आणि प्लीज मराठीतच बोला हं...तुमचं हिंदी जगजाहीर
आहे.
आर.आर. : प्रतिक्रिया काय देणार आता...काय बोलावं ते सुचत नाही अशा ज्या काय
मोजक्या वेळा येतात माझ्यावर - वर्षातल्या ३६५ दिवशी..तेव्हा जे बोलतो तेच
बोलतो...हिंदीतच बोलू दे रे...शेवटी मुंबईत राहतो म्हटलं मी..हा बोलतो हां..एक
दोन साडे माडे त्रिफळा , ''ऐसे बडे बडे शहरो में ऐसे छोटे छोटे हाद्से तो होते
रहते है "

ये तो हद से गुजर गये असे मनात म्हणत मी पुढे गेलो..तर दिसले लोकपालवाले 
किसन  हजारे. (सांगितलं ना...अण्णा,नाना,काकामिका काही म्हणत नाही मी कुणाला)
मी: मौनव्रत सोडलंय ना...उपोषणपण नाही  ना..मग बोलाल का,जे घडलंय त्यावर काही?
हजारे: एकच का मारली...अजून जरा...
मी: (शक्य तितके डोळे मोठे करत आणि आ वासत) काय?
हजारे: (सावरून घेत ) पण पराग, लोकशाहीत असं होणे ही खेदजनक गोष्ट आहे..या
गोष्टीमागचा खरा जनक कोण ते आता शोधून काढलं पाहिजे..शोधूदेत बापडे..मी आपला
जातो..काय त्या बेदी,केजरीवाल,भूषणनी घोळ  घातला नाही ना परत यावर काहीतरी
बडबडून, ते मलाच पाहिलं पाहिजे रे बाबा...

गेले की हेपण लगेच...आणि येताना दिसले राज ठाकरे.
मी : जय महाराष्ट्र...मला कुसुमाग्रजांच्या सगळ्या कविता पाठ
आहेत...शिवाजीमहाराज की.. असं कुणी कधीही म्हणालं तरी आपसूक माझ्या तोंडातून 
'जय' येतं,,,मी राहतो त्या इमारतीचे  नाव मराठीत लिहिलेले आहे..मी मराठी
माध्यमाच्या शाळेतच शिकलेलो आहे..मी मराठी मुलीशीच लग्न करणार आहे.. मी....
राज: बास बास....फार पुढे गेलास...लग्नाला बोलाव म्हणजे झालं...अभिमान वाटतो
तुझ्यासारख्या मराठी तरुणांचा..आता मुद्द्यावर ये.
मी : अहो...आज ते घड्याळवाले  ...त्यांना कोणीतरी दिल्लीत दिली गालावर ठेवून...
राज: चांगलं झालं की मग..तुमच्यासारखे तरुण रोज स्वप्नात काय वेगळं करतात
मग...फरक एवढाच की तुमचे हात फक्त शिवशिवतात...पण त्या हरविंदरने  ते करून
दाखवलं...लाज वाटते राजे लाज वाटते...हे शुभकार्य एखाद्या मराठी युवकाने का
नाही केलं !! हन्त हन्त...आणि श्रीमुखात भडकावायचीच होती तर मनमोहनसिंगापासून 
सुरुवात का नाही केली..पंजाबात तरी कुठे भ्रष्टाचारमुक्त सरकार आहे ?
असो...मला जायला पाहिजे...पेपर्स तयार करायचेत उमेदवारांसाठी...स्वस्थ बसून
नाही चालणार...
मी: ठीक आहे...बरोबर आहे तुमचं.
राज : ते तर नेहमीच असतं...जाता जाता एकच सांगतो..लग्न कर म्हणे..पण मुलांना
मात्र मराठी माध्यमाच्या शाळेतच घालायचं...नाहीतर तुझी काही खैर नाही...लक्ष
आहेच माझं तुझ्यावर...अरे,एक सांगू का..मी जन्मलो ना,तेव्हाही आवर्जून मराठीतच
रडलो होतो माहितेय का तुला...आता तुझ्यापासून काय लपवायचे रे पग्या...म्हणून
सांगितलं. निघतो...गर्वच नव्हे तर यथार्थ आणि यथेचछ माज बाळग मराठी असल्याचा..
जय महाराष्ट्र !!

काय रुबाब,काय माज,काय आत्मविश्वास!!!....पण थक्क व्हायला पण पुरेसा वेळ
मिळाला नाही मला...कारण समोरून चक्क चक्क सचिन  तेंडुलकर येताना
दिसला...आयला..टेस्ट चालू आहे तिकडे हिंदुस्थान - पश्चिम इंडिजची(राज अजून फार
लांब गेले नव्हते हो अजून...म्हणून ) आणि हा इथे काय करतोय...आता मला राहुल
द्रविडच कितीही आवडत असला तरी सचिन कुणी परका का आहे...त्याला जसा विनोद, तसा
मी...
मी : अरे सचिन...तू?
सचिन : अरे पराग ..तू?
मी: चल..परत हेच म्हणूया नावांची अदलाबदल करून..म्हणजे पुढच्या वेळी त्या
केडबरीच्या जाहिरातीत आपल्या दोघांना घेतील...
सचिन : व्होट एन आयडिया...ओके ! स्टार्ट... मी असा परत तिथून चालत येतो...तो
खांद्यावरचा आदिदासचा लोगो दिसत होता ना रे नीट मगाशी...टेन्शनच आम्हाला
नेहमी...आलोच.
मी: अरे थांब...जाऊदे ते ...आणि मी एयरटेल वापरतो...त्यामुळे विषयच मिटला..मला
सांग..तू इथे कसा? आणि तुझं ते महाशतक. . .
सचिन: अरे नको रे बाबा पुन्हा आठवण ...टेन्शन येते परत...शेवटी मीही माणूसच
ना. अरे ते पवारांवर कुणी हल्ला...
मी: हायला सचिन..हे माहिताय तुला ? मला वाटलं कसोटीत तू बिझी आणि ते
'महाशतक'चे  प्रेशर...त्यात न्यूज पोचली नसेल तुला.
सचिन : अरे असं कसं प-या...पवार आयसीसीचे अध्यक्ष होते...आमच्याच क्षेत्रातले
ना..माहिती ठेवावी लागते यार. पण थोबाडीत आज खाल्ली...आय मीन...बसली हे एका
अर्थी बरंच झालं म्हणायचं.
मी : हायला सचिन...हे काय बोलतोस तू?
सचिन : अरे ऐकून तर घे...गैरसमज नकोय प्लीज... हे बघ., मी आज ६७ वर नाबाद
राहिलोय...उद्या प्रोब्याबली सेन्चुरी ठोकेनच असं वाटतंय मला..आणि दिवस अखेर
६०+ स्कोर करून नाबाद राहिल्यावर मी गेल्या सलग ७ डावात दुस-या दिवशी येऊन १००
केलंय,आणि कारकिर्दीत तर असं १४ पैकी ११ वेळा केलंय...
मी : परत एकदा ह ह हायला  सचिन...एवढं कसं रे आठवत तुला ? काय मेमरी...व्वा !!
सचिन :नाही रे...मलाही मघाशीच कळलं हे आज तक वरून...असो. तर उद्या
शतक...नव्हे,महाशतक केले की मिडीयाच सगळा फोकस माझ्यावर...आज केले असते तर
अर्धा मिडिया गेला असता ना पवारांकडे...सो...आय मीन..यू नो...
मी : हायला सचिन..कुणाला काय तर कुणाला काय....चांगलाय चांगलाय.. कर महाशतक.
हार्दिक शुभेच्छा.
सचिन : धन्यवाद...जातो रे, बाय. माही धोनी आणि डंकन फ्लेचर येतील शोधत नाहीतर.

आणि तो गेलाही...मला वाटलं..चला,संपले आता सगळे...आता कोणी भेटणार नाही. .जावं
शांत घरी..तर तेवढ्यात कुठल्याशा कोप-यातून एक हुंदका ऐकू आला...मला आधी वाटलं
भास झाला असेल..पुढे गेलो..तर परत कानात...मग बघूयाच म्हटलं ..तर तिथे कोणीतरी
एक माणूस गुडघ्यात डोकं खुपसून बसलेला..हा रडत का असेल ? राष्ट्रवादीचा
कार्यकर्ता असेल का? जवळ गेलो....हातानी धरून उठवलं..

मी : काय रे,कोण तू ? कोणत्या गावचा ? आणि असा रडतोस का ?
तो : मला काही नाव-गाव नाही...फक्त आम आदमी म्हणा..आणि फक्त लढ म्हणा.
मी: बर..पण झालं काय? बोल तर खरं...
तो : आयला त्या पवारला एक मस्त हाणली आज त्या सरदारन... कलेजा खुश झाला...पण
कानाखाली लावली याचेच भांडवल नुसते चहूकडे...का लावली याचे त्याने जे कारण
दिले त्याबाबत कोणी चकार शब्द काढत नाहीये अजून...इथे रोज मरतोय आम्ही या
महागाईने..बोंबला...महागाई,भ्रष्टाचार,बेरोजगारी,काळा
पैसा,भारनियमन,निरक्षरता...एक ना अनेक... या समस्या सोडवू असे कुणी म्हणत
नाहीये नेता कुठला एवढ होऊनही,काय तर म्हणे 'पवार मोठ्या मनाचे,माफ केलं
त्याला,उदो उदो त्या पवारचा आणि त्याच्या पॉवरचा,साले काका-पुतणे आवाहन करतायत
जनतेला शांत रहा,जाळपोळ नको,बंद नको,संप नको...आणि नंतर हळूच फोन करून म्हणतील
गोटात "हे काय,त्या भागात सगळ आनंदी कसं काय,दंगल नाही,दुकाने उघडी
आहेत..तोडफोड नाही..झोपलात काय...लागा कामाला.."    ह्यांच्या तर....  वर काय,
तर तो म्हणे माथेफिरू होता...अरे तो तर मला 'डोंबिवली फास्ट'मधला माधव आपटे
वाटला..' एक अण्णा हजारे निर्माण नाही झाला तरी चालेल..पण असे हजारो हरविंदर
पाहिजेत...आणि  काय हा मीडिया पण..ऐश्वर्याचं बाळ दिसतं यांना...आमच्या
पोटातला जाळ नाही दिसत...थूत तिच्या आयला...कसं होणार या देशाचं...


 तो बरंच काही बोलत राहिला नंतर असं काय काय...पण मला काही ऐकूच आलं नाही..कान
ऐकायला अधीर होते खरतर,पण मन बधीर झालय ना,संवेदना तर बोथट १९४७ पासूनच
झाल्यात देशाच्या...
मान खाली घालून आलो घरी...टीव्ही लावलेला...'पवारने कहा की...','इंतजार होगया
खत्म,सचिन करेंगे अब महाशतक अपने घरेलू मैदान में ', 'पाहूया आपण उद्धवजी काय
म्हणताहेत या थप्पड प्रकरणावर ..','तर कशी स्थिती आहे आत्ता सांगली आणि
कोल्हापूरमध्ये ?...','भ्याड पवारांवर हल्ला झाला आहे...माफ करा,पवारांवर
भ्याड हल्ला झाला आहे ',' थप्पड से डर नही लगता साब,सरदार से लगता
है"......................

अखंड रे बाबा.....

--- पराग पुजारी.

Wednesday, 31 August 2011

कांय समजलांत !!!

कुणाला आवडावं म्हणून
लिहित नसतं कुणी,
कुणालातरी आपण आवडावं म्हणून
आपल्याला आवडत नसतं कुणी,
आपली निवड ' तिकडून ' होणारच नसेल,
...तर वेळीच अडवावी आपणच आपली आवड ,
त्यानंतरही मग न अडणारे आपले अश्रू
अडवायलाही येणार नसतं कुणी ...

Tuesday, 30 August 2011

थोडंसं डोकं फिरलंय...

थोडंसं डोकं फिरलंय...
          म्हणजे झालं असं की मघाशी फेसबुकवर असताना, आमच्या बेस्ट रीड्स ग्रुपमध्ये एका मित्राने जीव तोडून लिहिलेलं एक आर्टिकल वाचलं.. बेस्ट रीड्स -  कॉलेजात असताना हा इव्हेंट,तो इव्हेंट वगैरे नावाखाली जे  उपद्व्याप  केले, त्यातूनच  तयार  झालेला हा एक ग्रुप ! एवढीच व्याख्या करता  येईल. (जास्त डिटेल्स - कमी  डिटेल्स कुठे द्यावेत हे कळतेच ना वयोमानाप्रमाणे :P) असो,तर त्यात बरेच नमुने भेटले..काहीना अस्मादिकही नमुना  वाटले..काय करणार..ओळखतात काहीजण बरोब्बर ! असो..तो विषय नाही इथे.
           तर 'फ्रेन्डशिप डे'बद्दल म्हैशाने (हेच खरं नाव,पण काही ठिकाणी - म्हणजे pan card,लायसन्स,पासपोर्ट इत्यादी सटर-फटर कागदपत्रांवर त्याचे नाव महेश जाधव असे आहे.)  एक लईच भारी लेख लिहून पोस्ट केला ग्रुपमध्ये..तसा मोठाच लेख..शब्दांनीही आणि अर्थाने तर नक्कीच नक्की..भिडेल असंच लिहितो भिडू नेहमी..एकदम मनाला टचून जातं टाईप. मग काय..त्या लेखावर लाईक्स and कमेंट्स वगैरे आल्याच..अजूनही येत आहेत..येत रहाव्यात. बहुतेक कमेंट्समधून कौतुकसोहळा पार पडला होता....जो रास्तही होता..मीही त्यात सामील होतोच. पण सगळं सुरळीत,गोड गोड सुरू असतानाही अमेरिकेवर ७/११ ओढवलाच की !
          सांगायचा मुद्दा हा की...येणेप्रमाणे एक कमेंट तिथे प्रविष्ट जाहली...
      '3 tas vaya ghalvalas evadh type karnyat..... study kar.........'

 आणि या वाक्यामुळे सादर ब्लॉगचे पहिले वाक्य माझ्या  मन:स्थितीचे निदर्शक झाले.
 मग मी असा रिप्लाय टाकला as a comment -     किंवा अशी कमेंट टाकली as a reply -
      'हेल ..काय हे...३ तास 'वाया'? यू युज्ड वर्ड 'वाया'? असो..तुम्हांला काय नि कसं कळणार लेखक (फारच मोठा शब्द वाटतोय का..'लिहिणारा' म्हणू हवं तर..) किती पोटतिडकीने लिहित असतो ते..एक माध्यम तर हवं असतं त्याला व्यक्त होण्यासाठी... बाकीच्यांना (फारच मिळमिळीत शब्द वाटतोय का..'भल्याभल्यांना' म्हणू हवं तर ) जे जमत नाही ते तो शब्दांच्या मागे वेडे होत सहज करून जातो...ते सगळं काय हे 'असलं' ऐकण्या/वाचण्यासाठी? हेची फळ काय तस्य तपाला ?
आता मला तुझा रिप्लाय माहीत आहे.."वॉज जस किडिंग रे"......
निषेध ....... :X'


झालं...गोष्ट छोटीशीच म्हणायला हवी नाही का तसं पहायला गेलं तर ...but still काहीतरी तुटलं आत ..नेमकं असं शब्दात वगैरे पकडून किंवा बांधून नाही सांगता येणार..पण . . .
लेखकांना शापच आहे काय हा ?

Friday, 15 July 2011

जाणीव झालीये आता..

अलीकडेच वाटतंय प्रचंड
घ्यावा शोध स्वतःचाच
का जन्मलो,कोण आहोत,का जगतोय
उलगडा व्हावा रहस्याचा ...

अलीकडेच वाटतंय प्रचंड
करावं लक्ष्य स्वतःलाच
आरसा तर कौतुकच सांडतो नेहमी
भडीमार व्हावा टीकेचा ...

अलीकडेच वाटतंय प्रचंड
द्यावं आव्हान स्वतःलाच
हार - जीत फैसला झालाच पाहिजे
नाश व्हावा तटस्थाचा ...

अलीकडेच वाटतंय प्रचंड
प्रचंड उत्तुंग बनवावं स्वतःलाच
फोडावी खुजी प्रतिमा माझी माझ्याच मनातली
घालून  घाव इच्छाशक्तीचा ...

अलीकडेच वाटतंय प्रचंड
पुरे,थांबवावं आता अचानक स्वतःलाच
हा अपुरा जन्म खूप अवघड वाटतोय जगताना
पुनर्जन्म घ्यावा स्वतःचा ...
     

गद्दार

ते माझेच यार होते ज्यांनी, मजवर केला प्रहार होता ,
अन हतबल झाले तेही जेव्हा, चुकविला मी तो वार होता !!

मश्गुल मीही होतो  त्यांच्यात, टाकून गहाण विश्वास सारा,
माघारी माझ्या मात्र घुमला, दग्याचाच झंकार होता  !!

श्वासात मैत्री - मैत्रीत श्वास, असाही  एक काळ सरला
अंती पोटी माझ्या फक्त, रक्ताचाच गोळा गार होता  !!

हेच आपुले दोस्त खरे, साथ कधी ना सोडीन यांची,
मनातच नष्ट आपसूक, झाला हा विचार होता  !!

मित्रांप्रती अविश्वासाचा ठराव, बहुमताने झाला संमत,
प्रत्येकाच्याच नजरेत भासत, प्रत्येकजण गद्दार होता  !!

जिवंत समूहात एका अलगद, आटला प्रेमाचा झरा अख्खा,
उगाच का तो शोभला, मैत्रीच्या शवावर हार होता   !!

         

नो गिला शिकवा प्लीज

कित्ती सहज आलीस माझ्या आयुष्यात...आणि गेलीसही नाही,
वाटे आता तू ती नव्हतीसच सये, जिच्या शोधात मी सदैव होतो ... १

बोललो बरेच प्रेमाने पण, प्रियकर म्हणुनि कधीच नाही,
नव्हतेच तुला कर्तव्य त्याशी, मी व्यर्थ वेळ दवडीत होतो ... २

राहिलो तुझा सदा सखा - खास परी कधीच नाही,
सत्य कळाले तेव्हा केवळ,नीर नेत्रीचे लपवीत होतो       ... ३

गेलो मीही विसरून  सारे,तुझ्या लेखी जे घडलेचि नाही,
मीही माझ्या नियतीस जेव्हा, चुकलो समजून होतो      ... ४

मिटवीन वाद सारे नक्की,ठाव जयांचा तुजला नाही,
निर्माण का ते केलेस नकळत, अंदाज फक्त बांधीत होतो ... ५

गैरसमज नव्हतेच कसले, होणेही शक्य नाही,
फरक कुणाला काय पडतो, विश्वव्यापी कण्हत होतो        ...६

तुमचा वाढदिवस

खरं सांगू...तुमच्या वाढदिवशी तुमची आठवण येणार असतेच अनेकांना
मग तुमचा बड्डे हैप्पी वाला करायला करतील फोन,एसेमेस प्रकार नाना
वर्षातून हा एक दिवस आठवण काढून टिकवतात (?) ते मैत्री वर्षानुवर्षे जपलेली (?)
तुम्हीही मोठ्या मनाने द्यावी मुभा उरलेले ३६४ दिवस तुम्हांला विसरायची त्यांना

वर्षातून एकदाच तर येतो हो वाढदिवस
हो,इंग्रजी केंलेंडरलाच आम्ही तिथीप्रमाणेसुद्धा मानतो
आयुष्यात असे कितीसे मिळणार असतात हे दिवस
हो,मेल्यावर प्लान्चेटवर बोलावून आमचे सांगा म्हणतो

आपापल्या बिझी शेड्युलमधून खास  वेळ काढतात ते
नंबर मिळवून संपर्क साधून मनापासून विश करतात ते
'नशीब आज तरी आठवण आली' असे फटकळ बोलू नका
तथाकथित जपलेल्या (?) मैत्रीत उगाच विष कालवू नका

नुसतीच बोटे मोडण्याऐवजी मनाच्या आरशात निरखून पहा
'शाळेपर्यंत जिवलग होता' तर मग नंतरचा काळ पारखून पहा 
आठवण येते,मिस करतो वगैरे फडतूस बाष्कळ बोलू नका
प्रत्यक्ष भेटता किती,बोलता किती .. ते एकदा तपासून पहा

इगो असतोच ज्याला त्याला
तुम्ही दोघे तरी अपवाद कशाला
____ ला फोन येणारच तुला
कारण ____ ला तूही करतोसच त्याला ...

                                                    --- शाळेतला मी  

Thursday, 30 June 2011

ए भाऊ डोकं नको खाऊ

(सदर फिल्मचे नुकतेच पुण्यात शूटिंग झालेले आहे..बट इट वॉज नॉट फॉर प्रोफेशनल पर्पज !)
 
सीन नं. १
डे - सकाळ          (पात्रे : नेत्रा)             इंटे/हॉल

नेत्रा:  (अक्राळविक्राळ  हसत येते - पूर्ण काळे कपडे )
 हा हा हा, मी पुन्हा जिंकत आहे.होय,मला कोणीही थांबवू शकत नाही. अनादिकाळापासून मी माझा प्रभाव दाखवत आले आहे. रामायण,महाभारतापासून ते आज या कलीयुगापर्यंत अनेक भांडणे मीच लावते. कलियुगात दोन भावांमध्ये  सत्ता,इस्टेट,जमीनजुमला,संपत्तीवर हक्क सांगण्यासाठी मीच त्यांना चिथावते.मी कोण ? मी कोण ? मी आहे - भाऊबंदकी. हा हा हा..पहायचंय  तुम्हांला,हे पहा..माझी ताकद.

सीन नं. २
डे - सकाळ              (पात्रे : उज्ज्वल,रोहित,साना,ऋजुता,गौरी,श्रुती)           इंटे/हॉल

(साना,ऋजुता या दोघी टीव्ही न्यूज चानेलच्या anchors आहेत.  गौरी,श्रुती या correspoandents आहेत. गौरी,श्रुती या अनुक्रमे मुकेश व अनिल यांची वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखत घेत आहेत.)

साना : हां,गौरी तर काय म्हणताहेत मुकेशजी ?
गौरी :  आपण मुकेशजीनाच  विचारूया. मुकेशजी,झालेल्या वाटणीबद्दल  आपलं काय मत आहे?
उज्ज्वल : हे पहा,वडील गेल्यानंतर कंपनीचा इतका मोठा डोलारा सांभाळताना आम्हा दोन्ही भावांमध्ये खटके उडू लागले.त्यांचा कंपनीच्या वाटचालीवर,प्रगतीवर अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून आम्ही दोघांनी विचारपूर्वक वेगळं व्हायचा  निर्णय घेतला आहे.नि पुढे तर माझीच कंपनी जास्त यशस्वी होईल.
गौरी : तर मग यापुढेही आपण एकत्र काम करणार नाही का?
उज्ज्वल : हं,मला नाही वाटत पुन्हा आम्ही एकत्र येऊ असं.
गौरी : साना,जसं की आपण ऐकलंच आहे की मुकेशजी या वाटणीबद्दल समाधानी आहेत आणि पुढेही त्यांना अनिलजीबरोबर  काम करायची इच्छा नाहीये.कमेरामन गौरवसह मी गौरी,'भाऊ माझा' न्यूज,मुंबई.
ऋजुता : हां श्रुती, तिथे अनिलजीच काय म्हणणं आहे?
श्रुती : त्यांच्याकडूनच जाणून घेऊ..अनिलजी,जे झालंय त्याविषयी आपल्याला काय म्हणायचं आहे?
रोहित : आमच्यातील मतभेदांचा कंपनीवर काही परिणाम  होऊ नये,म्हणूनच आम्ही वेगळे झालो. अन माझी खात्री आहे की माझीच कंपनी त्याच्या कंपनीपेक्षा पुढे जाईल.
श्रुती : तुम्ही दोघे पुन्हा एकत्र. .?
रोहित : ते शक्य नाही.
श्रुती : अनिलजीना झालेल्या वाटणीबद्दल कसलीही खंत नाहीये.नि हेच चित्र पुढेही कायम राहील असं त्यांचा म्हणणं आहे.कमेरामन श्रेयससह मी श्रुती,'भाऊ माझा' न्यूज,मुंबई.
साना : तर आपण पहिलाच की,मुकेश-अनिल या दोन भावांच चांगलं नातं आता बनलंय भाऊबंदकीचं - संपत्तीमुळे.
ऋजुता : 'सख्खा भाऊ पक्का वैरी' असंच एकूण चित्र आहे.तर आज आम्ही इथेच रजा घेतो, उद्या पुन्हा भेटू याचवेळी याच शोमध्ये - 'ए भाऊ डोकं नको खाऊ'

सीन नं. ३
डे - सकाळ              (पात्रे : उज्ज्वल,रोहित,साना,ऋजुता,गौरी,श्रुती)           इंटे/हॉल

साना : जाणून घेऊ गौरीकडून,काय म्हणणं आहे युसूफच ?
गौरी : युसूफ, भारतीय संघात तू इरफाननंतर आलास,पण आता तुझाही टीममधलं स्थान दलामली झालंय, काय वाटतं ?
उज्ज्वल : मीच त्याच्यापेक्षा च्नाग्ला खेळाडू आहे,अष्टपैलू आहे.मीच चौकार-षटकारांची आतषबाजी करू शकतो. IPL मध्येही आम्ही एकमेकाविरूद्धच खेळतो.मी नक्कीच संघातील स्थान टिकवेन.
गौरी ; युसूफ म्हणतोय की he is better than Irfan. कमेरामन गौरवसह मी गौरी,'भाऊ माझा' न्यूज,मुंबई.
ऋजुता ; तर श्रुती,तिकडे इरफान काय म्हणतोय?
श्रुती : इरफान,टीममध्ये तुझं पदार्पण दादाच्या आधी झालं,पण सध्या तू संघात नाहीस,तर काय वाटतं?
रोहित : वाईट तर वाटतंय,पण एक नक्की,मीच त्याच्यापेक्षा सरस अष्टपैलू खेळाडू आहे.मीच भेदक इनस्विंग,आउटस्विंग टाकू शकतो,तो कसला दादा. मैदानात तर IPL मध्येही  मीच दादा.लवकरच तुम्ही मला भारतीय संघात पहाल
श्रुती : इथ इरफानच मत आहे की, क्रिकेटमध्ये तर तोच युसूफचा दादा. (हसत) पण कदाचित दोघेही हे विसरतायत की खरा दादा तर सौरव गांगुली आहे. कमेरामन श्रेयससह मी श्रुती,'भाऊ माझा' न्यूज,मुंबई.
साना : तर युसूफ - इरफान य भावांचं नातं बनलंय भाऊबंदकीचं - क्रिकेट आणि संघातील स्थानामुळे.
ऋजुता : पुन्हा एकदा -  'सख्खा भाऊ पक्का वैरी'तर आज आम्ही आपली रजा घेतो, उद्या पुन्हा भेटू याचवेळी याच शोमध्ये - 'ए भाऊ डोकं नको खाऊ'

सीन नं. ४
डे - सकाळ              (पात्रे : उज्ज्वल,रोहित,साना,ऋजुता,गौरी,श्रुती)           इंटे/हॉल

साना : पाहूया, येत्या निवडणुकांसाठी वरुणजींची काय तयारी आहे? गौरी . .?
गौरी : वरुणजी, तर काँग्रेसविरुद्ध  तुमचा लढा . . .
उज्ज्वल : (तोडत) केवळ काँग्रेसविरुद्धच नव्हे,तर राहुलविरुद्धही..पण पहा पुन्ही,यंदा भाजपच सत्तेत येणार.मी एकसे एक आक्रमक भाषणे देऊन राहुलचा लोकांवरील प्रभाव नष्ट करून टाकेन.
गौरी : वरुणजी म्हणताहेत की ते यावेळी राहुलजींवर भारी पडतील. कमेरामन गौरवसह मी गौरी,'भाऊ माझा' न्यूज,दिल्ली.
ऋजुता : श्रुती,राहुलजींची योजना कशी आहे?
श्रुती : राहुलजी,याहीवेळी तुमचेच सरकार येईल असं वाटतं का?
रोहित : हो तर,आहेच कोण य देशात काँग्रेसला आव्हान देणारा? वरुण आणि त्याचा भाजप कितीही प्रयत्न करूदेत, पण जिंकणार काँग्रेसच. शिवाय माझ्यासमोर वरुण म्हणजे कीस झाड की पत्ती !
श्रुती  : हं, तर राहुलजीना पूर्ण विश्वास आहे की  याहीवेळी काँग्रेसच बाजी मारणार. कमेरामन श्रेयससह मी श्रुती,'भाऊ माझा' न्यूज,दिल्ली.
साना :  थोडक्यात, राहुल - वरुण दोघेही एकमेकांविरुद्ध यावेळी संपूर्ण ताकद पणाला लावणार हे नक्की.यांची भाऊबंदकी - सत्तेसाठी.
ऋजुता : 'चुलतभाऊ  पक्का वैरी'. तर आता आम्ही आपली रजा घेतो, उद्या पुन्हा भेटू याचवेळी याच शोमध्ये - 'ए भाऊ डोकं नको खाऊ'


सीन नं. ५
डे - सकाळ              (पात्रे : उज्ज्वल,रोहित,साना,ऋजुता,गौरी,श्रुती)           इंटे/हॉल

साना : तर आज शिवाजी पार्कवरील मेळाव्यात उद्धवजी काय म्हणाले ते जाणून घेऊया गौरीकडून. ..गौरी..?
गौरी : उद्धवजी, येत्या विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाची तयारी. . ?
उज्ज्वल  : अगदी जोरात सुरू आहे.फुटिराना,गद्दारांना  आम्ही चांगलाच धडा शिकवू. त्यांना नाक घासायला लावू. पक्ष सोडून स्वत:ची नवी चूल मांडल्याचा त्यांना पश्चात्ताप झाल्याशिवाय राहणार नाही.
गौरी : आपण राजसाहेबांबद्दल बोलत आहात का?
उज्ज्वल  : साहेब? तो कसला साहेब? होय,त्यालाच म्हणतोय मी. घाबरतो का काय? त्या राजला राजकारणातलं काय कळत ? शिवसेना,मराठी आणि हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब हे जनतेला आजही तितकेच  प्रिय आहेत, हे विधानसभेवर भगवा फडकल्यावर कळेलच तुम्हांला ..आणि त्या राजलाही. मग बस म्हणावं तुझी व्यंगचित्रं काढत !
गौरी : तर उद्धवजीना १००% खात्री आहे की यावेळी त्यांना राजसाहेबच  काय,तर कोणीही अडवू शकणार नाही. कमेरामन गौरवसह मी गौरी,'भाऊ माझा' न्यूज, मातोश्री,मुंबई.
ऋजुता : तर पत्रकारपरिषदेत आज राजसाहेबांचा एकूणच सूर कसा होता,सांगतीये आपल्याला श्रुती.  श्रुती. . ?
श्रुती : राजसाहेब,यंदा तुमचा पक्ष आणखी उंच भरारी मारणार का?
रोहित : नक्कीच,त्यात काही शंकाच नाही.जनतेने आम्हाला 'मनसे' पाठिंबा दिलाय नि आम्हीही 'मनसे' त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटत आलोय. आता इरादा पक्का - प्रस्थापितांना धक्का.
श्रुती : हं टोला उद्धवजीना समजायचा का?
रोहित : समजायचा काय ? आहेच..मी घाबरतो काय कुणाला? एक नक्की.माझं मराठीवर जेवढं प्रेम आहे ,तेवढाच प्रेम नि आदर काकांप्रती आहे.पण फोटोग्राफर्सना मी भाव देत नाही.यावेळी पहाच तुम्ही, निवडणुकात माजेल 'राज का रण' !
श्रुती : राजसाहेबांनी 'मनसे' ही सत्तास्पर्धा जिंकण्याची तयारी केलेली आहे. तसेच  उद्धवजीही त्यांचं काही वाकडं करू शकणार नाहीत असा त्यांना विश्वास आहे. कमेरामन श्रेयससह मी श्रुती,'भाऊ माझा' न्यूज, कृष्णकुंज.मुंबई.
साना : दोघंही भाऊ एकमेकांना भाव देत नाहीयेत. उद्धवचा उद्धार होणार की राजचं राज्य येणार ,हे आपल्याला कळेल निवडणुकानंतरच. या भावांचीही कट्टर भाऊबंदकी - महाराष्ट्राच्या गादीसाठी.
ऋजुता : इथेही तेच - 'चुलतभाऊ  पक्का वैरी'. तर आता आम्ही आपली रजा घेतो, पुन्हा पहायला विसरू नका आपला आवडता शो - 'ए भाऊ डोकं नको खाऊ'


सीन नं. ६
डे - सकाळ              (पात्रे : नेत्रा,साना,ऋजुता,गौरी,श्रुती)           इंटे/हॉल

नेत्रा : हा हा हा. पाहिलंत ना ..मीच लावते अशी भांडणं भावा-भावांमध्ये.माझा शाप असतो त्यांच्या नात्याला.ही आहे माझी अफाट शक्ती. हा हा हा
चौघी : थांबव हे सगळं,तुझ्यामुळे सर्वांचच नुकसान होतंय.
नेत्रा : हा हा हा ,होऊदे. होतच राहणार. मला कोण अडवणार ? हा हा हा
(चौघी नेत्राला पकडण्याचा प्रयत्न करतात;पण ती त्यांच्या तावडीतून निसटून जाते.)
चौघी : (प्रेक्षकांना)  काय ही भाऊबंदकी अशीच सुरू राहणार ? कधी थांबणार हे सारं ? कधी ?

                                                             ----   समाप्त  ----

Wednesday, 29 June 2011

श्रीगणेशा

ब्लॉग...
मी ब्लॉग सुरु केलाय ...खरंतर  आय एम एकदमच नवीन इंटू धिस बरं का !
सो..नेहमी ..नियमित लिहिनच असंही काही नाही..
पण बाकीचे लिहितात..म्हणून आपणही खरडाव काहीतरी..असंही नाही.
थोडक्यात काय..जेव्हा काही लिहिण्यासारखं असेल..तेव्हाच येथे भर पडेल.
अगेन..जेव्हा जेव्हा काही लिहिण्यासारखं असेल,तेव्हा तेव्हा ते मी इथेच लिहावं असं थोडंच आहे.
इंटरनेटवरून  कोणता शब्द,वाक्य,लेख,कविता कसं कुठे जाईल काही सांगता येते का भाऊ/ताई  (एज अप्लीकेबल  :P)
म्हणून अस्मादिक जरा खबरदारी घेतील एवढंच...
वाचणारे किती असतील माहीत नाही....त्यावर प्रतिक्रिया देणारे तर त्याहून कमी..दिलीच तरीही ''मित्राने लिहिलंय,तर नावं कशी ठेवणार? लिहू - 'छान आहे' म्हणून"...
वगैरे प्रकार होणार नाहीत कशावरून...
मग यातून माझी लेखक म्हणून जडण-घडण सुनिश्चित दिशेने आणि योग्य प्रकारेच होईल हे तरी कशावरून ??
छे !! खूपच प्रश्न बाबा..
जाऊदेच...
काय म्हणालात?
फॉलो करायलाच पाहिजे का?
नाही हो..असा नियम थोडाच असतो...
आपण गांधीवादी नाही..सावरकरवादी आहे म्हटलं.."याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याविना"
ओके...इट्स इनफ ना..तसंपण  आधीच दोन पोस्ट्स 'मार्गी' लावल्यात...आणि मग त्यानंतर  हा 'पहिल्यावहिल्या' पोस्टचा प्रपंच पाहिजेच कशाला? उगीच औपचारिकता...
असो...
चला...आटोपतं घेतो..
इथं काही कागद वाचवणे किंवा शाई वाचवणे हाही हेतू नाही..:P
की-बोर्डवरच्या कीजसुद्धा झिजत भिजत  नाहीत बरं ! (पावसात थोडाच बसलोय,पीजे होता..हसू नका)

भेटत राहूच अधून मधून... 
टेक केअर ...कीप रीडिंग ...कीप रॉकिंग :)






बदला

ही कहाणी आहे एका राष्ट्राची
मी रहात असलेल्या महान देशाची
तो होता छावणी ब्रिटीश,मुघल,डचांची
४७ ला झाली पहाट त्याच्या आजादीची..

आकाराने देश लईच मोठा
लोकसंख्येने तर लईलईच मोठा
बैल निपजतात जेथे यूपी - बिहारात
नि गोठा वाढतो सहिष्णू महाराष्ट्रात ...
कीड देशाला प्रचंड लागली
वाट सहजच तत्त्वांची लागली
घोटाळे करून नेत्यांची खाज नाही भागली
भ्रष्टाचाराची तोफ अभिमानाने  डागली ...
बाई इटली सोडून आली
सत्तेची किटली दिल्लीत बसली
साठ वर्षे पक्षाने सूत्रे हलवली
इमानी समाजाची गुणसूत्रे पळवली...
सवय पुढे मग झाली याचीच
आज ना उद्या होती होणार गोचीच ..

एक दिवस मग असा आला - कोणी कुणाला ओळखत नाही
निरक्षर बेकारी गलिच्छ रोगराई व्यसनी तरुणाई बोंब बारमाही
समाज हलकट - निद्रिस्त रहा
नेते नालायक - खातच रहा
सिनेमे लोचट - सेन्सॉर आडवा
क्रिकेट खेचक - वर्ल्डकप आठवा
चाललंय आपलं चालूदे
देश मातीत जाऊदे
मला पोटभर खाऊदे
गरीब भुकेने मरूदे...

लाख कोटी शब्द विसरले
पेटी खोका जिभेवर रुळले
आरक्षण - डोनेशन बहुत झाले
शिक्षणसम्राटच डॉन झाले
स्विस ब्यांकेत खातं 'आदर्श' ठरलंय
जाईल तिथे खाणं तत्त्वच जडलंय
भ्रष्ट पैशाने 'टेबलाखालून' पछाडलंय
ओवाळून सत्तेचा लिंबू राज्याराज्यात झपाटलंय
सगळीकडेच झाला अंधार
अखेर दोन डोळ्यांत फुलला अंगार
ही बदलली पाहिजे सिस्टीम भंगार
मिळूदे स्वच्छ निरोगी सरकार ...

हजारांत एखाद्यालाच एवढं सगळं जाणवलं
त्या हजारांत एकाचं नाव अण्णा हजारे निघालं
बसला गडी करायला उपोषण प्राणांतिक बिणान्तिक
जाणीवा जागृत झाल्या तुमच्या आमच्या सामाजिक बिमाजिक
सोबत ते डेंजर विकीलीक्स काढायचं उकरून टूजी -  थ्रीजी
देशही म्हणाला अण्णांना - 'व्हॉट एन आयडीया सरजी ! '
सरकारला दिसल्या ' हजारे ख्वाहिशे ऐसी '
त्यांच्या नियमांची झाली ऐशी कि तैशी
एक झाले सगळे एकदम
फुस्स झालं शासन बेरहम
लोकपाल विधेयक जिंकून गेलं
लिंबूपाणी  घेत उपोषण सोडलं
च्यानेल पेपर्सनी बरंच कमावलं
सिस्टीमनं बेअरींग डेअरींग गमावलं

शांत शांत ...
वाटलं..आता सगळं सुधारलं.. जिण वधारलं

काल स्वप्नात आले बोस,टिळक,आगरकर,सावरकर
विचारलं त्यांना "दादा,खुश ना ? सारं बदललं ना लवकर ?"
खाड्कन मग कानाखाली बसली
वर चार शब्द ऐकवून गेली
"होय बाळा, जरा बदललेलं दिसतंय हे तात्पुरतं,
जसं जेवणात लोणचं तोंडी लावण्यापुरतं
उद्या सर्व पुन्हा 'जैसे थे' होईल
'वो भी क्या दिन थे' म्हणत जिंदगी जाईल
स्वप्नात आलोय म्हणजे तू झोपलाच आहेस
पुढचा अण्णा बसेपर्यंत झोपेतच राहशील "

... ताड्कन उठलो आरशात पाहिलं
मी नाही समाज दिसला
आरती प्रेयर नमाज पाहिला
कुठूनसा मागून आवाज आला,
'जागे व्हा,विचार बदला,देश बदला
नाहीतर सोडा नाद नि सरळ 'देशच बदला'
पुढचा अण्णा आत्ताच अदला - बदला
प्रत्येकाने उठा नि घ्या हक्काने बदला
प्रत्येकाने उठा नि घ्या हक्काने बदला '

Sunday, 26 June 2011

** वपु **


        लेखकांचे वर्गीकरण करता येते का ? म्हणजे कथा-कविता-कादंबरी-समीक्षा इत्यादी प्रकार सोडून,किंवा ते धरूनच ? म्हणजे हे विनोदी लिहिणारे,ते गंभीर लिहिणारे,तिला कवितेपेक्षा चारोळयाच छान जमतात,किंवा चांगल्या कथा लिहित होता तर उगाच कशाला लांबलचक रटाळ कादंबरी लिहायच्या फंदात पडला. . . किंवा चरित्रात्मक,टीकात्मक,ललित,रहस्य,विज्ञान,व्यक्तिमत्त्व विकास,धार्मिक,सामाजिक,आर्थिक,राजकीय,मानवी नातेसंबंध . . . .

       बाप रे, बरीच मोठी यादी की ! संपणारच नाही बहुतेक ! 'अमुकच एक प्रकार चांगला हाताळू शकणारे' अशा वर्गात मोडणारे  अनेक लेखक होऊन गेले,आहेत,येत राहतील. सर्वच नाही पण बहुतेक लेखनप्रकार सारख्याच समर्थपणे हाताळणारे मोजकेच !मग अशांना 'सिद्धहस्त' म्हणण्यात गैर ते काय ? पण अगदीच 'दैवी देणगी' म्हणून त्यांना माणसातून बाजूला करून मोकळेही होऊ नये. नाहीतर ते त्या कलावंताला, आधी 'दैवी' म्हणून सुखावणारं नि नंतर सक्तीने आलेल्या 'एकटेपणा'तून दुखावणारं ठरू शकतं.मनात प्रचंड वेदना,अनेक समस्यांशी झगडा अन तरीही रसिकांना निखळ वाचनाचा आनंद देणारे,हसवणारे,हसता हसता डोळ्यात कारुण्याचे अश्रू वाचकाच्याही नकळत उभे करणारे,त्याला हळूच अंतर्मुख करणारे खूप म्हणजे खूपच कमी ! वपु त्यापैकीच एक !
       आज २७ जून..वपुंची पुण्यतिथी. पुण्यतिथी वगैरे शब्द फार जड,मोठे वाटतात ना; कारण आजवर आपण शिवाजी, सावरकर, टिळक, भगतसिंग अशा लोकोत्तर कार्य करून अजरामर झालेल्या हस्तींच्या मृत्युदिनालाच असं म्हणत आलोय.(यादीतील शेवटच्या नावावर खरेखुरे अभ्यासू वाचक आक्षेप घेणार नाहीत याची खात्री आहे.) असो, विषयांतर नको.
       बट वपु, यू आर ग्रेट...आर...हो,तुमच्यासारखी माणसं कधीच वेअर होत नसतात.
       एकच माणूस शिक्षण-व्यवसायाने आर्किटेक्ट असूनही अफाट गुणवान लेखक,कथाकथनकार,व्हायोलीन-हार्मोनियमवादक, उत्तम फोटोग्राफर...रसिक-वाचक-सुंदर हस्ताक्षर असलेला नि हरेक सुंदर  गोष्टीचं वेड असणारा असू शकतो ? वपुंची कारकिर्द सुरू होण्यापूर्वी या  प्रश्नाचं उत्तर 'नाही' असावं,असं वाटतं.
       आपण काय वाचतो ? पुस्तकं,वृत्तपत्रं,ई-मेल्स,ई-बुक्स,मेसेजेस......वगैरे वगैरे .
       आणि माणसं ?
वपुंकडे ही एक विलक्षण हातोटी होती,ते 'माणसं' वाचायचे. त्यात त्यांना 'घर हरवलेली माणसं' भेटली,'लोंबकळणारी माणसं' भेटली,'चतुर्भुज' मंडळी भेटली.गेलाबाजार 'कर्मचारी'ही भेटले...बरेच. सगळेच त्यांचे 'दोस्त' बनले,अनेकांनी वपुंना आपला 'पार्टनर' मानलं. 'काही खरं काही खोटं' असा हा दुनियेचा 'मायाबाजार'..'भुलभुलैय्या'च म्हणा ना हवं तर...
              "अहो,यात तुम्ही काय करताय?"
              वपु म्हणायचे,"मी यात काय करतोय? 'मी माणूस शोधतोय'."
      माणूस हा पदार्थ वपुंइतका स्पष्ट कितीजणांना कळाला माहीत नाही..पण तरीही ही नम्रता त्यांच्या ठायी होती हे खरं. महाराष्ट्र सरकारने त्यांना 'उत्तम लेखक' म्हणून गौरवलं. पु.भा.भावे पुरस्कार विजेत्या वपुंना अमेरिकेतील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवण्याचा मान मिळाला.
         
वपु एकेक करत त्यांचे 'प्लेजर बॉक्स' वाचकांसमोर रिते करत गेले. त्यातून वाचकांचेच रंगीबेरंगी 'रंग मनाचे' त्यांनी उलगडून दाखवले.
 "आमचं काय हो.इकडून एक टोलावतोय,तिकडून एक ढकलतोय..नुसता 'झोपाळा' झालाय आयुष्याचा ",असं उद्वेगाने म्हणणा-यांना 'मोडेन पण वाकणार नाही' हे फिलिंग देत वपुंनी त्यांच्या अवघ्या जगण्याचाच 'महोत्सव' करून टाकला असणार यात शंका  नाही. मग त्यांना 'आपण सारे अर्जुन' असं वाटलं असल्यास त्यात नवल ते काय ! अशा कित्येकांचा 'स्वर' वपुंनी अचूक ओळखला असेल....त्याची गणतीच नाही.
        'ऐक सखे' म्हणत  'सखी'ला 'तप्तपदी'तून पुढे ओघानेच आयुष्यात येणारा अव्यक्त मनाचा अस्फुट 'हुंकार' त्यांनी जाणवून दिला असेल. तिला " 'ही वाट एकटीची' गं,ती तुडवताना तू प्रत्येकच वेळी कशी गं 'इंटिमेट' होणार?,मनाची 'ठिकरी' होऊनही सारं सहन करणारी तू "..असं हलकेच सांगितलं असेल.
 त्या म्हणतील, 'नवरा म्हणावा आपुला' आणि गप्प बसावं झालं.
 ते म्हणतील,आमचं आयुष्य आम्ही जगू.मग ते 'वन फॉर द रोड'  झालं तरी हरकत नाही.नुसतं 'बाई,बायको,कलेन्डर' करत बसण्यापेक्षा तोच बेटर ऑप्शन वाटतो काहीवेळा.
अशांना वपु विचारतात, "एवढंच होतं माझ्या राजा,तर मग 'का रे भुललासी' "

        वपु एक लेखक होते? की एक तत्त्व होते? की एक वृत्ती होते?
        की एक विचार म्हणून जगले असतील?
        नेमकं उत्तर आमची मागची पिढी देऊ शकेल काय ? 
     खरंच, ही 'वपुर्वाई' म्हणजे अजबच ! 'वपुर्झा' काळजीपूर्वक,विचारपूर्वक वाचल्यानंतर तर आयुष्याकडे बघण्याची एक नवीनच दृष्टी मिळते. आपले सो कॉल्ड ह्यूज प्रॉब्लेम्स.दु:खं वगैरे आवाक्यातली वाटू लागतात ..पर्यायाने दुस-यांचीही ..आपण ते प्रॉब्लेम्स सोडवूही शकतो. हे असंच का? आणि हे माझ्या बाबतीतच का? हे जे दोन प्रश्न वेळोवेळी आपल्याला छळत असतात,त्यामागची कारणेही मिळू शकतात...आपल्याला न आवडणा-या,न पटणा-या अन तरीही सातत्याने घडत असणा-या  गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती मिळते.वाचकांना इतकी अफाट ताकद देणा-या या मनस्वी लेखक कलावंताला त्याच्या योग्यतेचं  विस्तीर्ण 'वलय ' लाभलं का? ....... नाहीच बहुधा.





       आमची पिढी नक्की कसं भाष्य करणार यावर? माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी जन्मलो १९८७ मध्ये...वपु गेले २००१ मध्ये. मी होतो १४ वर्षांचा...अन दुर्दैवाची अतिकरंटी महानतद्रष्टी गोष्ट अशी की तोवर मी वपुंचं एकही पुस्तक वाचलं नव्हतं. आज हे सांगायला लाज वाटते खरी..पण पर्याय नाही. तेव्हा चिं.वि.,पु.ल.,अत्रे अशा विनोदी लाटाच भेटायच्या खूपदा. मानवी नातेसंबंध वगैरे कुठले कळायला ?
सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतच राहुल द्रविड नावाचा हिरा भारतीय क्रिकेटला लाभला.....नंबर टू च राहिला..कोण काय करणार ? त्याप्रमाणेच पुलंच्या काळातील त्यांना समकालीन असे बरेच प्रतिभावान लेखक पुलंसमोर झाकोळले गेले...याचा सर्वात मोठा फटका वपुंनाच बसला असंही वाटतं. कथाकथनात मात्र पु.ल.,शंकर पाटील यांच्यापेक्षा वपु अधिक लोकप्रिय ठरले हे खरं. निखळ हसायचंय?... 'बदली' ऐका...हसता हसता अंतर्मुख व्हायचंय?...'हसरं दु:ख' ऐका.

असो..'वा गुरु' नाटकात एक डायलॉग आहे, "व्होट्स राँग इन बीइंग नंबर टू ?" 
हो..असूदेत मोठे सचिन आणि पु.ल...आम्हाला आपले राहुल आणि वपुच 'अधिक' आवडतात..काय म्हणणं आहे?

       वपुंना प्रत्यक्ष भेटता आलं नाही,ही खंत तर राहीलच नेहमी....इलाज नाही. हे टोचणंच काहीतरी नवनवीन सुचवत जाईल कदाचित.त्यांचं लिखाण वाचण्यापूर्वी  एक मन दुस-याला म्हणायचं  'तू भ्रमत आहासी वाया' ..नि पुढे वपु या 'पाणपोई'चं अस्सल अभिजात पाणी चाखायला  मिळालं. वाचनाचं समाधान मिळू लागलं. वाढती बौद्धिक भूक शमू लागली..पण अजून बरंच वाचायचं  आहे
अशी त्यांच्या पुस्तकांची  नावे वाक्यांत बसवून त्यांना बंदिस्त नाही करता येत...त्यांना जवळही नाही आणता येत.
हेही खरंच...आणि कहरच ! थिटा पडतोय..शब्द सापडत नाहीयेत..  वपु तुम्ही यात मावत नाही आहात ... गुड ! आणि गूढही !!

मिस्टर  वसंत पुरुषोत्तम काळे .....ते ..ते.. तेवढं भेटायचं राहिलं.
'गोष्ट हातातली होती'.

                                                                                                                                            ----- पराग