Thursday, 30 June 2011

ए भाऊ डोकं नको खाऊ

(सदर फिल्मचे नुकतेच पुण्यात शूटिंग झालेले आहे..बट इट वॉज नॉट फॉर प्रोफेशनल पर्पज !)
 
सीन नं. १
डे - सकाळ          (पात्रे : नेत्रा)             इंटे/हॉल

नेत्रा:  (अक्राळविक्राळ  हसत येते - पूर्ण काळे कपडे )
 हा हा हा, मी पुन्हा जिंकत आहे.होय,मला कोणीही थांबवू शकत नाही. अनादिकाळापासून मी माझा प्रभाव दाखवत आले आहे. रामायण,महाभारतापासून ते आज या कलीयुगापर्यंत अनेक भांडणे मीच लावते. कलियुगात दोन भावांमध्ये  सत्ता,इस्टेट,जमीनजुमला,संपत्तीवर हक्क सांगण्यासाठी मीच त्यांना चिथावते.मी कोण ? मी कोण ? मी आहे - भाऊबंदकी. हा हा हा..पहायचंय  तुम्हांला,हे पहा..माझी ताकद.

सीन नं. २
डे - सकाळ              (पात्रे : उज्ज्वल,रोहित,साना,ऋजुता,गौरी,श्रुती)           इंटे/हॉल

(साना,ऋजुता या दोघी टीव्ही न्यूज चानेलच्या anchors आहेत.  गौरी,श्रुती या correspoandents आहेत. गौरी,श्रुती या अनुक्रमे मुकेश व अनिल यांची वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखत घेत आहेत.)

साना : हां,गौरी तर काय म्हणताहेत मुकेशजी ?
गौरी :  आपण मुकेशजीनाच  विचारूया. मुकेशजी,झालेल्या वाटणीबद्दल  आपलं काय मत आहे?
उज्ज्वल : हे पहा,वडील गेल्यानंतर कंपनीचा इतका मोठा डोलारा सांभाळताना आम्हा दोन्ही भावांमध्ये खटके उडू लागले.त्यांचा कंपनीच्या वाटचालीवर,प्रगतीवर अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून आम्ही दोघांनी विचारपूर्वक वेगळं व्हायचा  निर्णय घेतला आहे.नि पुढे तर माझीच कंपनी जास्त यशस्वी होईल.
गौरी : तर मग यापुढेही आपण एकत्र काम करणार नाही का?
उज्ज्वल : हं,मला नाही वाटत पुन्हा आम्ही एकत्र येऊ असं.
गौरी : साना,जसं की आपण ऐकलंच आहे की मुकेशजी या वाटणीबद्दल समाधानी आहेत आणि पुढेही त्यांना अनिलजीबरोबर  काम करायची इच्छा नाहीये.कमेरामन गौरवसह मी गौरी,'भाऊ माझा' न्यूज,मुंबई.
ऋजुता : हां श्रुती, तिथे अनिलजीच काय म्हणणं आहे?
श्रुती : त्यांच्याकडूनच जाणून घेऊ..अनिलजी,जे झालंय त्याविषयी आपल्याला काय म्हणायचं आहे?
रोहित : आमच्यातील मतभेदांचा कंपनीवर काही परिणाम  होऊ नये,म्हणूनच आम्ही वेगळे झालो. अन माझी खात्री आहे की माझीच कंपनी त्याच्या कंपनीपेक्षा पुढे जाईल.
श्रुती : तुम्ही दोघे पुन्हा एकत्र. .?
रोहित : ते शक्य नाही.
श्रुती : अनिलजीना झालेल्या वाटणीबद्दल कसलीही खंत नाहीये.नि हेच चित्र पुढेही कायम राहील असं त्यांचा म्हणणं आहे.कमेरामन श्रेयससह मी श्रुती,'भाऊ माझा' न्यूज,मुंबई.
साना : तर आपण पहिलाच की,मुकेश-अनिल या दोन भावांच चांगलं नातं आता बनलंय भाऊबंदकीचं - संपत्तीमुळे.
ऋजुता : 'सख्खा भाऊ पक्का वैरी' असंच एकूण चित्र आहे.तर आज आम्ही इथेच रजा घेतो, उद्या पुन्हा भेटू याचवेळी याच शोमध्ये - 'ए भाऊ डोकं नको खाऊ'

सीन नं. ३
डे - सकाळ              (पात्रे : उज्ज्वल,रोहित,साना,ऋजुता,गौरी,श्रुती)           इंटे/हॉल

साना : जाणून घेऊ गौरीकडून,काय म्हणणं आहे युसूफच ?
गौरी : युसूफ, भारतीय संघात तू इरफाननंतर आलास,पण आता तुझाही टीममधलं स्थान दलामली झालंय, काय वाटतं ?
उज्ज्वल : मीच त्याच्यापेक्षा च्नाग्ला खेळाडू आहे,अष्टपैलू आहे.मीच चौकार-षटकारांची आतषबाजी करू शकतो. IPL मध्येही आम्ही एकमेकाविरूद्धच खेळतो.मी नक्कीच संघातील स्थान टिकवेन.
गौरी ; युसूफ म्हणतोय की he is better than Irfan. कमेरामन गौरवसह मी गौरी,'भाऊ माझा' न्यूज,मुंबई.
ऋजुता ; तर श्रुती,तिकडे इरफान काय म्हणतोय?
श्रुती : इरफान,टीममध्ये तुझं पदार्पण दादाच्या आधी झालं,पण सध्या तू संघात नाहीस,तर काय वाटतं?
रोहित : वाईट तर वाटतंय,पण एक नक्की,मीच त्याच्यापेक्षा सरस अष्टपैलू खेळाडू आहे.मीच भेदक इनस्विंग,आउटस्विंग टाकू शकतो,तो कसला दादा. मैदानात तर IPL मध्येही  मीच दादा.लवकरच तुम्ही मला भारतीय संघात पहाल
श्रुती : इथ इरफानच मत आहे की, क्रिकेटमध्ये तर तोच युसूफचा दादा. (हसत) पण कदाचित दोघेही हे विसरतायत की खरा दादा तर सौरव गांगुली आहे. कमेरामन श्रेयससह मी श्रुती,'भाऊ माझा' न्यूज,मुंबई.
साना : तर युसूफ - इरफान य भावांचं नातं बनलंय भाऊबंदकीचं - क्रिकेट आणि संघातील स्थानामुळे.
ऋजुता : पुन्हा एकदा -  'सख्खा भाऊ पक्का वैरी'तर आज आम्ही आपली रजा घेतो, उद्या पुन्हा भेटू याचवेळी याच शोमध्ये - 'ए भाऊ डोकं नको खाऊ'

सीन नं. ४
डे - सकाळ              (पात्रे : उज्ज्वल,रोहित,साना,ऋजुता,गौरी,श्रुती)           इंटे/हॉल

साना : पाहूया, येत्या निवडणुकांसाठी वरुणजींची काय तयारी आहे? गौरी . .?
गौरी : वरुणजी, तर काँग्रेसविरुद्ध  तुमचा लढा . . .
उज्ज्वल : (तोडत) केवळ काँग्रेसविरुद्धच नव्हे,तर राहुलविरुद्धही..पण पहा पुन्ही,यंदा भाजपच सत्तेत येणार.मी एकसे एक आक्रमक भाषणे देऊन राहुलचा लोकांवरील प्रभाव नष्ट करून टाकेन.
गौरी : वरुणजी म्हणताहेत की ते यावेळी राहुलजींवर भारी पडतील. कमेरामन गौरवसह मी गौरी,'भाऊ माझा' न्यूज,दिल्ली.
ऋजुता : श्रुती,राहुलजींची योजना कशी आहे?
श्रुती : राहुलजी,याहीवेळी तुमचेच सरकार येईल असं वाटतं का?
रोहित : हो तर,आहेच कोण य देशात काँग्रेसला आव्हान देणारा? वरुण आणि त्याचा भाजप कितीही प्रयत्न करूदेत, पण जिंकणार काँग्रेसच. शिवाय माझ्यासमोर वरुण म्हणजे कीस झाड की पत्ती !
श्रुती  : हं, तर राहुलजीना पूर्ण विश्वास आहे की  याहीवेळी काँग्रेसच बाजी मारणार. कमेरामन श्रेयससह मी श्रुती,'भाऊ माझा' न्यूज,दिल्ली.
साना :  थोडक्यात, राहुल - वरुण दोघेही एकमेकांविरुद्ध यावेळी संपूर्ण ताकद पणाला लावणार हे नक्की.यांची भाऊबंदकी - सत्तेसाठी.
ऋजुता : 'चुलतभाऊ  पक्का वैरी'. तर आता आम्ही आपली रजा घेतो, उद्या पुन्हा भेटू याचवेळी याच शोमध्ये - 'ए भाऊ डोकं नको खाऊ'


सीन नं. ५
डे - सकाळ              (पात्रे : उज्ज्वल,रोहित,साना,ऋजुता,गौरी,श्रुती)           इंटे/हॉल

साना : तर आज शिवाजी पार्कवरील मेळाव्यात उद्धवजी काय म्हणाले ते जाणून घेऊया गौरीकडून. ..गौरी..?
गौरी : उद्धवजी, येत्या विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाची तयारी. . ?
उज्ज्वल  : अगदी जोरात सुरू आहे.फुटिराना,गद्दारांना  आम्ही चांगलाच धडा शिकवू. त्यांना नाक घासायला लावू. पक्ष सोडून स्वत:ची नवी चूल मांडल्याचा त्यांना पश्चात्ताप झाल्याशिवाय राहणार नाही.
गौरी : आपण राजसाहेबांबद्दल बोलत आहात का?
उज्ज्वल  : साहेब? तो कसला साहेब? होय,त्यालाच म्हणतोय मी. घाबरतो का काय? त्या राजला राजकारणातलं काय कळत ? शिवसेना,मराठी आणि हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब हे जनतेला आजही तितकेच  प्रिय आहेत, हे विधानसभेवर भगवा फडकल्यावर कळेलच तुम्हांला ..आणि त्या राजलाही. मग बस म्हणावं तुझी व्यंगचित्रं काढत !
गौरी : तर उद्धवजीना १००% खात्री आहे की यावेळी त्यांना राजसाहेबच  काय,तर कोणीही अडवू शकणार नाही. कमेरामन गौरवसह मी गौरी,'भाऊ माझा' न्यूज, मातोश्री,मुंबई.
ऋजुता : तर पत्रकारपरिषदेत आज राजसाहेबांचा एकूणच सूर कसा होता,सांगतीये आपल्याला श्रुती.  श्रुती. . ?
श्रुती : राजसाहेब,यंदा तुमचा पक्ष आणखी उंच भरारी मारणार का?
रोहित : नक्कीच,त्यात काही शंकाच नाही.जनतेने आम्हाला 'मनसे' पाठिंबा दिलाय नि आम्हीही 'मनसे' त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटत आलोय. आता इरादा पक्का - प्रस्थापितांना धक्का.
श्रुती : हं टोला उद्धवजीना समजायचा का?
रोहित : समजायचा काय ? आहेच..मी घाबरतो काय कुणाला? एक नक्की.माझं मराठीवर जेवढं प्रेम आहे ,तेवढाच प्रेम नि आदर काकांप्रती आहे.पण फोटोग्राफर्सना मी भाव देत नाही.यावेळी पहाच तुम्ही, निवडणुकात माजेल 'राज का रण' !
श्रुती : राजसाहेबांनी 'मनसे' ही सत्तास्पर्धा जिंकण्याची तयारी केलेली आहे. तसेच  उद्धवजीही त्यांचं काही वाकडं करू शकणार नाहीत असा त्यांना विश्वास आहे. कमेरामन श्रेयससह मी श्रुती,'भाऊ माझा' न्यूज, कृष्णकुंज.मुंबई.
साना : दोघंही भाऊ एकमेकांना भाव देत नाहीयेत. उद्धवचा उद्धार होणार की राजचं राज्य येणार ,हे आपल्याला कळेल निवडणुकानंतरच. या भावांचीही कट्टर भाऊबंदकी - महाराष्ट्राच्या गादीसाठी.
ऋजुता : इथेही तेच - 'चुलतभाऊ  पक्का वैरी'. तर आता आम्ही आपली रजा घेतो, पुन्हा पहायला विसरू नका आपला आवडता शो - 'ए भाऊ डोकं नको खाऊ'


सीन नं. ६
डे - सकाळ              (पात्रे : नेत्रा,साना,ऋजुता,गौरी,श्रुती)           इंटे/हॉल

नेत्रा : हा हा हा. पाहिलंत ना ..मीच लावते अशी भांडणं भावा-भावांमध्ये.माझा शाप असतो त्यांच्या नात्याला.ही आहे माझी अफाट शक्ती. हा हा हा
चौघी : थांबव हे सगळं,तुझ्यामुळे सर्वांचच नुकसान होतंय.
नेत्रा : हा हा हा ,होऊदे. होतच राहणार. मला कोण अडवणार ? हा हा हा
(चौघी नेत्राला पकडण्याचा प्रयत्न करतात;पण ती त्यांच्या तावडीतून निसटून जाते.)
चौघी : (प्रेक्षकांना)  काय ही भाऊबंदकी अशीच सुरू राहणार ? कधी थांबणार हे सारं ? कधी ?

                                                             ----   समाप्त  ----

No comments:

Post a Comment