नींद खोणे, चैन खोणे आणि हिंदी गाणी
हिंदी सिनेमांसाठी गाणी लिहिणाऱ्या गीतकार समीर यांनी आजवर ५०० पेक्षा जास्त सिनेमांसाठी गाणी लिहून एक विश्वविक्रम प्रस्थापित केलाय आणि यासाठी त्यांचे नाव गिनीज बुकमध्येही नोंदवले गेलेय. त्यांचे वडील अंजान हेही गीतकारच होते, समीर यांनी लिहिलेल्या गाण्यांमधलं वैविध्य हा खरंतर वादाचा मुद्दा आहे... पण का आहे? समीर म्हणजे मागणी तसा पुरवठा या तत्त्वावर चालणारी गाण्यांची फॅक्टरी असंच पहिल्यापासून समजलं गेलंय.. तीनवेळा फिल्मफेअर जिंकलं खरं पण या मेहनती गीतकाराची गणना साहिर, हसरत, शैलेंद्र, किंवा आजकालचे इर्शाद, प्रसून, स्वानंद यांच्या केटेगरीत केली जात नाही, का होत असेल असं? खऱ्या अर्थाने दर्जात्मक म्हणता येईल असं काव्य कमी पडत असेल का? की तेच तेच वेगळ्या शब्दात समोर आणणं हे झालं असेल?
समीरचा फॉर्मातला काळ म्हणजे नव्वदीचं बॉलिवूड म्युझिक.. तेव्हाच यांनी आपल्याला आशिकी, बेटा, दीवाना, साजन, दिलवाले, कुछ कुछ होता है, राजा हिंदुस्थानी, धडकनची सुपरहिट गाणी दिली.. यावरून कळतेच की प्रेमगीते लिहिण्यात यांचा हातखंडा आहे. आपल्याकडच्या एका सिनेमात तेव्हा संख्येनेही जास्त गाणी असायची, अशावेळी पाचशे प्लस सिनेमे म्हणजे खूपच जास्त.. हे काम अवाढव्य आहे. पण क्वांटिटी वाढली की क्वालीटी कितपत राखता येत असेल? जाऊदे, विषय व्हरायटीचा चालला होता ना तर आपण समीरलिखित गाण्यांमध्ये वैविध्य पाहू..
१९९०: आमीर - माधुरीच्या गाजलेल्या 'दिल' या सिनेमात - 'मुझे नींद ना आये, मुझे चैन ना आये, कोई जाये जरा ढुंढके लाये, न जाने कहां दिल खो गया'
१९९७: आमीर - जुही, अजय - काजोल यांच्या 'इष्क' या सिनेमामधले हे गाणे - 'नींद चुरायी मेरी किसने ओ सनम - तूने, चैन चुराया मेरा किसने ओ सनम - तूने' आणि त्याच सिनेमात 'जब नींद ना आये, जब याद सताये'
२०००: सलमान - संजय - करिष्माच्या 'चल मेरे भाई' सिनेमातले एक गाणे - 'मेरी नींद जाने लगी है, मेरा चैन खोने लगा है, मुझे इष्क होने लगा है' आणि हेच विचार त्याच सिनेमातील दुसऱ्या एका गाण्यात पहा - 'चोरी चोरी सपनों में आता है कोई, सारी सारी रात जगाता है कोई, दिल मेरा बेकरार हो गया, ऐसा लगता है मुझे प्यार हो गया'
शाळेत (हो गेलोय) इंग्रजी व्याकरणात आम्हाला 'मेक इट अफर्मेटिव्ह सेन्टेन्स' असा एक प्रकार असायचा.. म्हणजे दिलेल्या वाक्याचा अर्थ न बदलता ते वाक्य सकारात्मक शब्द टाकून तयार करा जेणेकरून त्यातला नकारात्मक भाव निघून जाईल.. तसं आहे हे - 'मेरी नींद जाने लगी है' मध्ये निद्रानाश विकार जाणवतो, पण तेच 'सारी सारी रात जगाता है कोई' म्हटलं की त्या जागवणाऱ्या एखाद्याचंच कौतुक वाटतं, उगाचच रोमँटिक वगैरे वाटतं.. आणि मग 'मुझे इष्क होने लगा है' ला समानार्थी म्हणून 'ऐसा लगता है मुझे प्यार हो गया' आहेच..
मग या सगळ्यावरून 'इन्स्पायर्ड' होऊन बँड ऑफ बॉईजने आपलंही एक गाणं आणलं होतं बघा - मेरी नींद उड गयी है, मेरा चैन खो गया है.. खूपच हिट झालं होतं.
असो, जोक्स (हेतू नव्हता, पण जाणवले असतील तर) अपार्ट.. पण नींद, चैन हे फार पूर्वीपासूनच आहे म्हणा हिंदी गाण्यांमध्ये.. समीर यायच्या आधीपासूनच.. जरा डोक्याला ताण दिला तर सहज आठवतील.
No comments:
Post a Comment