किशोर कुमार, सचिन पिळगावकर, साहित्य संमेलनाध्यक्ष आणि ळ
साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणाले
की संस्कृतचा प्रभाव कमी होऊन मराठीत हिंदी, उर्दू, पारसी वगैरे शब्द जास्त आले पाहिजेत.
(त्यांची भाषा समृद्धीची, संवर्धनाची व्याख्या वेगळी असावी. या अक्षयकुमारपेक्षा त्या
अक्षयकुमारलाही मराठीबद्दल जास्त आत्मीयता वाटत असेल.) तर यावरून आठवला एक वाचलेला
किस्सा - सचिन पिळगावकर यांच्या 'हाच माझा मार्ग' या आत्मचरित्रात वाचला
होता. 'अश्विनी ये ना' हे गाणं गाण्यासाठी सचिनजींना किशोर कुमारच हवे होते. किशोरदांनी आधी यथेच्छ खिल्ली उडवली मराठी भाषेची.. म्हणाले,
"मुझसेही क्यूं चाहिये? वो तुम्हारे सुरेश वाडकरसे करो ना.. वो कैसे गाता है तुझ्झी माझ्झी करके.. जाओ, मराठी मुझे नही आता है"
"नहीं लेकिन आपही ये अच्छा गाओगे"
"अरे मुझे वो मराठी वर्ड्स नही आते है.. ण तो बोल सकता हूं, लेकिन वो और एक होता है ना तुम्हारा - अड.. अड, वो नही आता है"
"मजाक कर रह हो क्या.. मराठी मी 'अड' ऐसा कोई शब्द है ही नही"
"अरे वो होता है ना तुम्हारा.. कमल को क्या बोलते हो मराठी में - कमअड"
मग सचिनजींना लक्षात आले की हिंदी वळणाची जड जीभ असल्याने त्यांना ळ म्हणता येत नव्हते, ळ ला ते अड म्हणत होते. मग सचिनजींनी सांगितलं, "ठीक आहे, ळ तुमच्या आवाजातल्या गाण्यात येणारच नाही असं गाणं मी लिहून घेईन, मग तर गाल."
किशोरदा तयार झाले आणि मराठीत पहिल्यांदाच त्यांचं पार्श्वगायक म्हणून आगमन झालं. 'अश्विनी ये ना' गाण्यात राणी, आणीबाणी, दिवाणा हे णमय शब्द त्यांनी झकास गायलेत. तर याच गाण्यात 'तुला छळून मी जळून गेले रे' अशी एक ओळ आहे, पण ती हुशारीने नायिकेला दिली आहे, त्यामुळं ते ळमय शब्द गायिका अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात आले आहेत.
हिंदीचाच मराठीवर प्रभाव हवाय
तर अक्षयकुमार यांनी
ळ ऐवजी मराठीत
अड चालेल असं
पुढे जिथे कुठे
भाषण देतील तिथे
बिनदिक्कत सांगावं.
हे काय, ओहोहो..
चला पोस्ट आवरती
घेतो. ऐन
प्रपोज डे ला
‘तुझ्या गअडा माझ्या
गअडा’ गाणं ऐकू
येतंय कुठूनतरी.. ना बेटा ना,
गैरसमज नको.. घरी नअड
आणि बादली एकमेकांना
म्हणतायत हे असं.. पाणी झुअडूझुअडू
वाहत चाललंय बहुतेक
तर नअड बंद
करतो आधी, भले
त्याचा काअड आला
असेल पण वेअड
आली नसेल तरीही.. कअडालं
का? नाही..? जाऊदे,
अक्षयकुमार काअडेना कअडालं असेल
नक्कीच.
No comments:
Post a Comment