Wednesday, 22 March 2017

जेव्हा तळपायाची मस्तकाला जाते.. 

मध्यंतरी दोन व्हिडीओ पाहिले, वाईट वाटले.

बीएसएफचे जवान तेजबहादूर यादव यांनी जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट अन्नाविषयी केलेला व्हिडीओ व्हायरल झाला, तो पाहिला. चॅनेल्सच्या त्यावर चर्चा झडल्या. सीआरपीएफचे जवान जीत सिंग यांनी शेअर केलेला व्हिडीओही पाहिला. दोघांची बाजू पटते.

तेजबहादूर तर स्पष्ट म्हणतात की आमची कोणत्याही सरकारबद्दल तक्रार नाही, पण मिळणारी मदत लष्करी अधिकारीच त्या वस्तू, धान्य बाहेर विकून कमिशन खाऊन टाकतात. बीएसएफ जवानांना मिळणारे अन्न पाहिले आणि धक्काच बसला. खाऊन उरलेले अन्न लोक प्राण्यांना किंवा भिकाऱ्यांना खायला म्हणून टाकून देतात तेही याहून बरे असेल. आणि हे असले निकृष्ट अन्न खाऊन जवानांनी करायचंय काय तर ११-१२ तास गोठवणाऱ्या थंडीत उभं राहून ड्युटी. व्वा.. अपेक्षाच कशी करता येईल अशी? मग काय हरकत आहे उद्या या जवानांनी बंड केले किंवा संपावर गेले तर? देशात जरा काही झालं की ते ते लोक काम बंद करतातच की - बँकवाले, रिक्षा-टॅक्सीवाले, शिक्षक लोक सगळेच. तेजबहादूर यांच्यावर शिस्तभंगाची काही कारवाया यापूर्वी झाल्या आहेत, पण आधीचे काही चार्जेस वेगळे होते आणि आता ही बाब वेगळी आणि जास्त  गंभीर आहे. अशा अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं शिस्तभंग ठरत असेल तर असा शिस्तभंग झालाच पाहिजे. आय सपोर्ट हिम.

आता तर त्यांची बदली बीएसएफच्या मुख्यालयात केली असून त्यांना चक्क प्लंबरचे काम देण्यात आलेय. शिवायचे लष्करी वरिष्ठांनी तो व्हिडीओ मागे घ्यावा, यासाठी दबाव आणलाय असंही बाहेर आलंय, यापूर्वीही भारतीय लष्करातील भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली होती, मग ते बोफोर्स असो की टाट्रा ट्रक घोटाळा.. जवान भुकेने मरतात आणि मलई हे भ्रष्ट अधिकारी खातात. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई तर झालीच पाहिजे. नाना पाटेकर यांनीही हे तर जवानांचे खच्चीकरण असं म्हणून संताप व्यक्त केलाय आणि स्वतः ते कमांडर कमल नयन चौबे यांच्याशी याबद्दल बोललेतसुद्धा. पण ही वेळच का येते?

हे कमी म्हणून की काय आता सीआरपीएफचे जवान जीत सिंग यांनी सीआरपीएफ जवानांची व्यथा असाच एक व्हिडीओ करून मांडली आहे आणि या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लक्ष घालावे अशी विनंती केली आहे. आर्मी जवानांना मिळणाऱ्या सुविधांबद्दल काही म्हणणे नाही, पण आम्हाला मिळणाऱ्या अशा सुविधा बंद का केल्या हा या २६ वर्षांच्या सैनिकाचा प्रश्न बिनतोड आहे. लष्कराच्या जवानांना पेन्शन तरी मिळते. मात्र सीआरपीएफ दलाच्या जवानांना २० वर्षांच्या सेवेनंतरही माजी सैनिकांचा कोटा, कँटीन सोय, आणि वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत, निवृत्तीनंतर एक्स-सर्व्हीसमन हा टॅगच त्याना लागत नाही तर पुढे त्यांचं काय होत असेल? हे भयंकर आहे. पेन्शन आधी मिळायची तीच आता बंद केलीये. सीआरपीएफचे जवान म्हणजे असे लोक असतात ज्यांना त्यांची कामे करावी लागतातच, प्लस कमी तिथे आम्ही म्हणत त्यांना पाठवतील तिथे, किंवा ऐनवेळी देतील ते काम करावं लागतं त्यांना. मग पंचायतीपासून लोकसभेपर्यंत कोणत्याही निवडणुका असोत, किंवा संसद भवन, एअरपोर्ट्स, मंदिरे मशिदी चर्च आणि व्हीआयपींच्या सुरक्षेसाठीही नेहमी तैनात होते ती सीआरपीएफच. पूर, भूकंप, वादळ काहीही आलं कि आधी मदतीला येतात त्या बीएसएफ, सीआरपीएफ दलांना अशी वागणूक मिळत असेल तर हि किती शरमेची बाब आहे.

तिकडे कॅनडा अमेझॉनवर भारताचा तिरंगा पायपुसणं म्हणून विकतोय हे कळल्यावर उद्रेक होतोय ना, सुषमा स्वराजनी लगेच बिनशर्त माफी मागायला सांगून आणि ते प्रॉडक्ट्स हटवा म्हणत अमेझॉनवाल्यांची इंडियन व्हिसा प्रोसेस बंद केली ना लगेच.. जे चांगलंच आहे... मग तो तर बाहेरचा देश.. तर ही आपल्याच आतली पण सीमेवरची परिस्थिती पाहून काही वाटत नाही? चौकशी कसली होणार तर म्हणे त्याच्याकडे मोबाईल कुठून आला? व्वा.. बाकी मीडिया लगेच तेजबहादूर यांच्या आईवडील, मित्राकडे गेली विचारायला, त्यातून अजूनच गंभीर माहिती बाहेर आलीये. शिवाय काश्मीर, श्रीनगर आणि तिथल्या लष्करी कॅम्प्सजवळ राहणाऱ्या ग्रामस्थानीही याला दुजोरा दिलाय की 'हो, आम्हाला लष्करी कोट्यात येणाऱ्या वस्तू, मसाले, धान्य, तांदूळ वगैरे गोष्टी निम्म्या किमतीत मिळतात.. पेट्रोल-डिझेलही मिळते'.. भयंकर.. उद्या हेच लोक बुऱ्हान वानीसारख्यांचा जयजयकार करत तुमच्यावर दगडफेक करायला येतात ना, मग पॅलेट गन्स वापरल्यावर उत्तरे तुम्हालाच द्यावी लागतात ना? त्या कृतघ्न लोकांचं काय जातंय, ते दोन्हीकडून ओरबाडतात आणि खाल्ल्या थाळीत भोक पाडतात. तिथले फर्निचर विक्रेते तर म्हणतात की  आमच्याकडून सुमार दर्जाचं फर्निचर लष्कर खरेदी करते, हे पैसे वाचवून करतात काय हे अधिकारी? खोटी बिले दाखवून किती कमिशन खाल? कमिशन आणि एकूणच खाबुगिरीला छाप लावायला लष्करात -टेंडरची पद्धत का सुरु करत नाहीत? स्वार्थी लष्करी अधिकाऱ्यांची ही मनमानी आणि दलाली थांबलीच पाहिजे. हे मोजके अधिकारी अख्ख्या रेजिमेंटचं नाव खराब करतात हे याना लक्षात येत नसेल का?


शनिवार-रविवार सुट्ट्या प्लस बाकी इतक्या सणांच्या वगैरे सुट्ट्या ओरबाडत वर्षातले १०० दिवस सुट्टीवर असूनही तक्रार करणारे आपण.. आणि कोणतीही सुट्टी घेता कोणत्याही हवामानात, खडतर प्रदेशात  काम करणारे बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीएफ, फायरब्रिगेडचे हे जवान.. अशा तितकेच महत्त्वाचे काम करणाऱ्या जवानांना सुविधा का मिळत नाहीत? यांनी निवृत्त झाल्यावर काय करायचे? यांच्या कुटुंबीयांनी काय करायचे?

No comments:

Post a Comment