Wednesday, 22 March 2017

शुद्धलेखन - का आणि कसे ?

सध्या साहित्य संमेलनाध्यक्षांच्या (अव)कृपेने मराठी भाषा, शुद्धलेखन, व्याकरण यावर चर्चा सुरुच आहे तर एक सहज आठवण. २०११-१२ च्या सुमारास पुण्यात 'डायमंड पब्लिकेशन्स'मध्ये उपसंपादक म्हणून काम करत होतो तेव्हाची गोष्ट. एडिटिंग करणं, लेआउट डिझाईन करणं याबरोबरच प्रूफरिडींग अर्थात बरंच करावं लागायचं. एखादं अक्षर इकडचं तिकडे झाल्याने किंवा एखाद्या चुकीच्या वेलांटी, उकार, मात्रेनेही झालेल्या काही चुका वाचायला मिळायच्या. प्रा. सु. . जोशी सर हे गाढे मराठी भाषा अभ्यासक, निवृत्त प्राचार्य तिथे सिनियर प्रूफरीडर होते. आमची टेबलं लागूनच असल्याने आम्ही सख्खे शेजारी पक्के शेजारी होतो. त्यांच्याकडून मराठी भाषेविषयी आम्हाला बरेच शिकायला मिळायचे. त्यांची बरीच पुस्तकेही, प्रामुख्याने बालसाहित्याची, उपलब्ध आहेत. व्याकरणाची ओळख, त्यातली सहज लक्षात येणारी गंमत सांगण्यासाठी त्यांनी असाच एकदा सांगितलेला किस्सा या निमित्ताने सांगतो.

एका राजाच्या राज्यात एक गरीब वैद्य राहत असतो, जो रुग्णांवर उपचार ते जे देतील त्या मोजक्या पैशातून करत आपले पोट भरत असतो. जनता गरीब असते, अनेक रुग्णांचा खर्च हा राजाच्याच खजिन्यातून होत असतो. राजा आणि वैद्य यांची कधीकधी भेटही होत असते. एकदा बोलता बोलता वैद्य राजाला म्हणतो, "तुम्हीही रुग्णदेव आणि मीही रुग्णदेव"

राजाला आला राग, हा कोण स्वत:ची तुलना माझ्यासारख्या श्रीमंत शक्तिमान राजाशी करणारा.. फडतूस कफल्लक वैद्य कुठला.. राज्याच्या नियमानुसार तो त्याला राज्यातून बाहेर काढण्याची शिक्षा फर्मावणार इतक्यात वैद्याने आपलं म्हणणं जरा स्पष्ट करून सांगण्याची परवानगी मागितली. आता तो काय सारवासारव करतोय हे पाहायला उत्सुकतेने राजानेही ती दिली.
वैद्य म्हणाला, "महाराज मी आपल्या दोघांनाही 'रुग्णदेव' म्हणालो. आणि उगाच सारवासारव करत मी माझा शब्द मागेही घेत नाहीये. पण शब्द एकच असला तरी दोन्हीचे अर्थ वेगळे आहेत."
राजाला वाटले हा उगाच शेंडी लावतोय, त्याने विचारलं, "ते कसे काय रे? शब्द एकच आणि अर्थ वेगवेगळे, असं कसं होईल?"

"सांगतो ना", वैद्य म्हणाला, "अहो तुम्ही रुग्णदेव म्हणजे षष्ठी तत्पुरुष - रुग्णांचे देव या अर्थाने आणि मी रुग्णदेव म्हणजे बहुव्रीही, अर्थात रुग्ण आहेत देव ज्याचे. तुम्ही त्यांचा आर्थिक आधार आहेत, ते माझे आर्थिक आधार आहेत.. पण तुमच्याइतकाच रुग्णदेव ते मलाही मानतात पण तो प्रकृतीच्या दृष्टीने, आर्थिक नाही. म्हणजेच गंमत अशी की मी रूग्णांना औषध देऊन बरं करतो म्हणून ते मला षष्ठी तत्पुरुष चा रुग्णदेव समजतात, पण माझी आर्थिक परिस्थिती पाहता मला सत्य असे ठामपणे माहीत आहे की मी बहुव्रीही रुग्णदेवच आहे. आता याउपर तुम्ही जो निकाल द्याल तो मला मान्य आहे."
गरीब वैद्याच्या या चतुर उत्तरावर राजा खुश झाला आणि त्याने त्याची शिक्षा रद्द केली. त्याला राज्यातून कायमचा मिळणार असलेला नारळीभात रद्द झाला.

अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी सर्वांना सांगितल्या. अनुस्वाराचे तीन नियम सांगितले. आता काही शब्द पाहू. निवडणुकांचे वारे आहेत तर सुरूवात तिथूनच करू.
                                           ---------------------------------------
निवडणूक, (आणि निकालानंतरची) मिरवणूक अशा शब्दात णू दीर्घ, पण तोच निवडणुकीत, मिरवणुकीत होताना ऱ्हस्व होतो. म्हणजेच जेव्हा पुढचे अक्षर बदलते तेव्हा.

हाच नियम इथेही - 'जाहीर, माहीत' मध्ये ही दीर्घ, पण 'जाहिरात, माहिती' मध्ये हि ऱ्हस्वकोल्हापूर, पंढरपूर मध्ये पू दीर्घ..पण कोल्हापुरात, पंढरपुरात इथे पु ऱ्हस्व

'आणि' या अर्थाने येणारा नि हा नि किंवा नी असा दोन्ही चालतो, हे त्यांनी व्याकरणाच्या पुस्तकातून दाखवून दिले.

शब्दाला इय प्रत्यय लागत असेल तर अलीकडचे अक्षर दीर्घ (राष्ट्रीय, भारतीय इत्यादी)

शब्दाला इक प्रत्यय लागत असेल तर अलीकडचे अक्षर ऱ्हस्व (सामाजिक, आर्थिक, वाचिक इत्यादी)

षष्ठी तत्पुरुष समास असताना नेहमीच तो शब्द तोडून लिहिता एकच लिहावा (भाषा वैशिष्ट्य लिहिता भाषावैशिष्ट्य किंवा शाळा सोबती लिहिता शाळासोबती असे.. कारण चा, ची, चे, च्या हे विभक्ती प्रत्यय लागतात - शाळेचा सोबती.. समजा 'शाळेतला/ शाळेतील सोबती' असे सप्तमी द्वितीया अर्थाने असेल तरीही शब्द एकत्रच येतो)

हाच नियम द्वितीया विभक्ती साठी - जसे वरती 'निकालानंतर' असं लिहिलंय, निकाला नंतर असं नाही.. तोडून लिहायचे झाल्यास षष्ठी तत्पुरुष वापरावा - निकालाच्या नंतर

षष्ठी तत्पुरुष असताना जातींची व्यवस्था या अर्थाने असणारा शब्द जातिव्यवस्था असा होतो म्हणजेच ति ऱ्हस्व होतोहेच स्फूर्तिस्थान, शक्तिपीठ याबाबतीत.

जा, दे, पी, खा असे मूळ धातू असलेल्या क्रियापदाचे धातुसाधित होताना जाऊन, देऊन, पिऊन, खाऊन हे योग्य.. पण ठेव, अडकव चे शेवटी आल्याने तो बदलून ठेवून, अडकवून होते.. ठेऊन, अडकऊन असे लिहू नये हे त्यांनी सांगितले. राहणे, रहाणे, राहाणे हे तिन्ही प्रचलित असले तरी त्यापैकी राहणे हा शब्द जास्त योग्य.. तेच पाहणे, वाहणे च्या बाबतीत.

चिकटवणे की चिटकवणे याबाबतीत अनेकांचा गोंधळ होतो. पण मूळ शब्द चिकट असल्याने चिकटवणे हेच योग्य.

मुलाचे नाव म्हणून वेदांत चूक आणि वेदान्त योग्य, तेच 'वेदांमध्ये' या अनेकवचनी अर्थाने असल्यास वेदांत योग्य. दोन्हीचे उच्चार वेगवेगळे.

नवीन नियमांप्रमाणे ठराविक, लवचिक, दुर्मिळ हे चूक आणि ठरावीक, लवचीक, दुर्मीळ हे योग्य
'पेक्षा, हून' आणि 'प्रमाणे, नुसार, सम, सारखा' हे प्रत्यय तुलना किंवा साम्य दर्शवत असल्याने ते आधीच्या शब्दाला जोडूनच आले पाहिजेत, हाच नियम 'करिता, साठी, सुद्धा, ही, देखील' या प्रत्ययांसाठी.
'ज्या वेळी, त्या तिथे, त्या ठिकाणी' असे शब्द तोडूनच आले पाहिजेत.

एकारान्त आडनावे असताना त्या व्यक्तीविषयी बोलताना आपलं  त्यांच्याशी असलेलं अंतर लक्षात घेऊन बोलावं. मी पुल देशपांड्याना भेटलोय, वपु काळ्यांना पाहिलंय असं म्हणता देशपांडेंना, काळेंना असं म्हणावं. देशपांड्या, काळ्या यात उगाच सलगी, मैत्री जाणवते. थोडक्यात पाटील, दामले, गडकरी या माझ्या मित्रांना मी गपे पाटला, अबे दामल्या, गडकऱ्या म्हणू शकतो.. पण शंकर पाटील, केशवसुत किंवा राम गणेश (किंवा अगदी नितीन) गडकरी यांना तसं म्हणू शकत नाही.

आदर या भावनेलाही आदर द्यावा जरा.. आणि शुद्धलेखनालाही.

- पराग पुजारी

No comments:

Post a Comment