विराट कोहली त्या चाहत्याला (?) काय म्हणाला यावरून सध्या फार वाद सुरू आहेत, आणि कदाचित ते उगाच सुरू आहेत. मग विराटचे दात त्याच्याच घशात घालण्यासाठी त्याचाच तो अंडर १९ वर्ल्डकपमध्ये कर्णधार असतानाच्या त्याच्या एका (नेहमीप्रमाणे) शतकी खेळीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला, ज्यात तो सुरुवातीला म्हणतो की त्याचा आवडता खेळाडू दक्षिण आफ्रिकेचा हर्षल गिब्ज आहे. शिवाय त्याचे मिनरल वॉटर कसे फ्रान्सहून येते आणि त्याने लग्न कसे इटलीत केले, मग हा कोण देशभक्ती शिकवणारा पासून पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी तिकीट हवंय वाटतं याला वगैरे आणखी टोमणे सुरू झाले. फेसबुकवरही या निमित्ताने आलेल्या दोन्ही बाजू घेणाऱ्या काही पोस्ट्स, कमेंट्स वाचल्या. पुलंच्या फेमस 'तुम्हाला पुणेकर व्हायचे असेल तर आपण पालिकेत उंदीर मारायच्या विभागात नोकरीला आहोत हे विसरून अमेरिकेची अर्थव्यवस्था कशी असावी यावर बिनधास्त मत ठोकून देता आले पाहिजे' वाली उपमाही जोडून झालेली दिसली. (कारण त्या तोडीची चपखल उपमा पुढे कुणी तयार करूच शकलं नाही, हेही एक कारण आहेच नेहमी तेच उदाहरण अशावेळी वाचनात येण्यामागे.)
तर आता पुलंचा म्हणजे एका दैवताचा उल्लेख आलाच आहे तर सामान्यजन विराटवर काय म्हणतात यापेक्षा क्रिकेटमधील सभ्यतेच्या दैवतांचे म्हणणे यावर काय आहे हे एक छोटासा (सहा फुटी) क्रीडाप्रेमी म्हणून माझ्या लेखी तरी जास्त महत्त्वाचे आहे. आपण त्याला उदाहरणार्थ राहुल द्रविड म्हणू. पूर्वी एका मुलाखतीत त्याला विराटच्या अग्रेशनबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला होता, "ते अग्रेशनच त्याच्यातील बेस्ट कामगिरी त्याच्याकडून करवून घेत असेल तर त्यात चुकीचं काय आहे, हेच काम माझ्यासाठी शांतपणाने केले होते. तो कदाचित जाणीवपूर्वक काही वक्तव्ये करत असेल. शेवटी स्वतःच्या स्वभावाशी ओथेंटिक राहणे गरजेचे. आणि तसंही अखेरीस मैदानातील कामगिरीच तर मॅटर करते ना." सोबत त्या दोन मिनिटांच्या व्हिडिओची लिंक देतो आहेच, मॅगी तयार होईपर्यंत पाहूनही होईल. अर्थात यात शेवटी त्याने मांडलेला गंभीर मुद्दाही विचार करायला लावणारा आहेच.
https://www.youtube.com/watch?v=Gc_spTXnXRs
गांगुलीने संघात अग्रेशन आणले आणि युवराज, हरभजन, श्रीशांत प्रतिस्पर्ध्यांना खुन्नस द्यायला शिकले. युवीचे सहा सिक्स, भज्जीचे शोएबला सिक्स मारत भारताला जिंकून देणे याचे क्रेडिट फ्लिंटॉफ, शोएब यांनाही जातेच. हरभजन - श्रीशांत तर पुढे आयपीएलमध्येही एकमेकांत 'कोण कोणास लगावते' खेळत राहिले. पण एकूणच गांगुलीच्या आक्रमकतेच्याही पुढची पायरी विराट आहे. मुळातच कोणता दिल्ली का लौंडा सभ्यतेसठी ओळखला गेलाय सांगा. विराट, शिखर, गंभीर, सेहवाग, नेहरा कुणीही घ्या. मग क्रिकेटच्या चष्म्यातून पाहिले तर दिल्ली ही भारताची कमी आणि ऑस्ट्रेलियाची राजधानी जास्त वाटते. शांत, सभ्य, समंजस वगैरे विशेषणे मिरवण्यासाठी कर्नाटकी श्रीनाथ, प्रसाद, कुंबळे, द्रविड.. किंवा मराठी सचिन, अजिंक्य वगैरे आहेत ना.. यांचा संयम अगदी क्वचित ढळला होता. (गावस्करांचे नाव टाकले नाही कारण त्यांचे 'अरे ला कारे' चे बरेच किस्से फेमस आहेत.) पण टीममध्ये असे शांत आणि आक्रमक कॉम्बिनेशन असणे कधीही चांगले नाही का? टीमला अकरा द्रविड नको असतात तसेच अकरा विराटही नकोच असतात हे मान्यच. पण वर्ल्ड क्रिकेट डॉमिनेट करताना 'तुम्ही आमच्यासमोर तुच्छ आहात, आम्ही तुम्हाला फाट्यावर मारण्यासाठीच तुमचा जन्म आणि मग क्रिकेट करियर सुरू झाले आहे' हा सत्तरीच्या विंडीज संघाचा आणि नव्वदीच्या ऑसी संघाचा माज एक दोन दशके राहिला आहे. आणि मैदानातील कामगिरीने त्यांनी तेव्हा तो योग्यही ठरवला आहे. विराट असाच वाटतो. सचिन बॅटने बोलायचा, विराट त्यासाठी बॅट आणि तोंड (आणि ट्विटर) देखील वापरतो.
विराट कधी एकदा सलग जबरी फ्लॉप जातो आणि आपण त्याच्यावर तुटून पडतो अशी वाट त्याच्या पदार्पणापासून पाहत आलेल्यांना त्यात तर कधी फारसे यश आले नाही. मग कधी त्याची कामगिरी जरा जरी खराब झाली की त्याची लगेच अनुष्कावरून खेच, कधी तू कितीही रेकॉर्डस कितीही वेगाने कर, पण देवाची जागा कधीच घेऊ शकणार नाहीस.. वगैरे काय वाट्टेल ती मुक्ताफळे सुरू होतात. सोशल मीडियावरील पोस्ट्स, कमेंट्सवर मनोरंजन कर लावलाच पाहिजे आता. बेशिस्त सेन्स ऑफ ह्यूमरला मानाने आणि ताठ मानेने बाहेर पडायला वाट मिळत नाही आणि मग ट्रोलिंग, रोस्ट, मीम्ससारखे प्रकार हिट होऊन अशा लोकांसाठी राजमार्ग ठरू लागले. हे करण्यासाठी कोणतीही कर्तृत्वाची पात्रता लागत नाही हीच मुख्य पात्रता असल्याने सगळेच यात हात धुवून घेऊ लागले. अर्थातच यातले बहुसंख्य ट्रोलभैरव हे पालिकेत उंदीर मारायच्या विभागातले असतात यात शंका नाहीच.
पण सत्य हेच आहे की या अत्युच्च लेव्हलला पोचलेल्या खेळाडूंची कमिटमेंट आपल्यासारख्या पामरांना कधीच कळणार नसते. वडिलांचे निधन झाल्यावर परतीचा विमानप्रवास करत इंग्लंडमध्ये शतक ठोकणारा सचिन, रणजीत दिवसाचा खेळ संपून वडिलांच्या चितेला अग्नी देऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी ९० धावा ठोकणारा विराट, जबड्याला बँडेज लावून बोलिंग करत लाराची विकेट काढणारा कुंबळे, किंवा व्हायरल फिव्हरने नकोसे केले असताना ऐतिहासिक कोलकाता टेस्टमध्ये लक्ष्मणला साथ द्यायला येऊन १८० धावा करणारा द्रविड... सांगा कुणाची कमिटमेंट आणि देशभक्ती समजून घेऊ शकतो आपण? उंदीर मारायच्या विभागात कामाला आहोत की स्वतःच उंदीर आहोत?
विराट, अनेकजण तुझे गर्वाचे घर खाली व्हावे म्हणून देव (या शब्दात डबल मीनिंग नाही याची नोंद घ्यायच्ये त्या ठिकाणी) पाण्यात बुडवून बसलेत. तू त्यांना ती संधी देणार नाहीसच. आणि काही फरकही पडत नाही रे, एखादा मोठा खेळाडू माणूस म्हणून आणि गुणांचा पुतळा म्हणूनही मोठा नाही ठरला तरी. भारतीय क्रिकेटचा नव्हे तर जागतिक क्रिकेटचा इतिहासही तुझ्याशिवाय लिहिला जाणार नाहीये. तू सातत्याचा आणि कमाल फिटनेसचा पुतळा आहेस. आजच्या काळात याला बोलिंग करायला मला कदाचित भीती वाटली असती हे साक्षात वसिम अक्रम ज्याच्याबद्दल म्हणतो, हा माणूस ब्रॅडमनचे रेकॉर्ड वगळता सर्व रेकॉर्डस तोडेल असे ज्याच्याविषयी स्टीव्ह वॉ म्हणतो, आणि मला मागे टाकू शकतील असे या हॉलमध्ये दोनजण आहेत असं आपल्या निवृत्तीनंतरच्या सन्मान सोहळ्यात म्हणून जेव्हा खुद्द सचिन तुझे आणि रोहित शर्माचे नाव घेतो तेव्हाच तुझे मोठेपण नि वेगळेपण सिद्ध झालेले असते. तरीही तुझे कॅरॅक्टर टेस्ट करण्यासाठी अधूनमधून लावल्या जाणाऱ्या अशा सोप्या सोप्या जाळ्यात तू अडकू नयेस ही मनापासून इच्छा आहेच.
तुला जे म्हणायचंय ते नीट सांगण्याची एक पद्धत असतेच. तुमच्या सर्व नातेवाईकांचे मृत्यू तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर पहावे लागणार आहेत असे भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाला अकबराने शंभर फटके दिले, पण तुमच्या अख्ख्या कुटुंबात तुम्ही सर्वात दीर्घायुषी ठरणार आहात असे (तेच भविष्य पण बिरबलाच्या सल्ल्याने त्याच्या शब्दात) सांगणाऱ्या ज्योतिषाला मात्र त्याने शंभर मोहरा दिल्या अशा पेपरातल्या बोधकथा पौगंडावस्थेत वाचून तुझ्याच वयाचे (पण अनुष्का ओळखत नसलेले) आम्ही मोठे झालो आहोत. अर्थात तेव्हा दिल्लीत तुझ्या घरी तुम्ही मराठी दैनिक पुढारी घेत नसणार यात तुझीही काही चूक नाही. चूकवरून आठवलं, कोच कुंबळेशी वाद झाल्यावर माझ्यासकट कित्येकांच्या तू डोक्यात गेला होतास. नंतर आलेल्या रवीने आपण आता कोच असून ताकात नाही एवढे जरी लक्षात ठेवले तरी तो तुला घुसळणे बंद करेल, जो आरोप त्याच्यावर नेहमी होतो. खरे खोटे माहीत नाही, पण आधी म्हणालो तसं तू कोणत्याही जाळ्यात अडकू नयेस एवढंच.
शुभेच्छा!!!
(भारत कधीही सोडून न गेलेला)
पराग पुजारी