Sunday, 25 November 2018

नाळ


नाळ पाहिला. आवडला. 

खरं तर लहान मुले आणि त्यांचे निरागस भावविश्व वगैरे थीमवरचे इतके चित्रपट गेल्या काही वर्षात झाल्याने नाळ पाहणार नव्हतो. पण आज पाहून आल्यावर मात्र मला दे जा व्हू फिलिंग आलं. म्हणजे एका मित्राने आदल्या दिवशी रात्री #अंधाधुन सजेस्ट केल्यावर त्याबद्दल शून्य उत्सुकता असताना तो दुसऱ्याच दिवशी सकाळी पाहून आलो, तसेच काल एका मैत्रिणीने #नाळ सुचवला, म्हणून पाहून आलो. पहिला जॅकपॉट होता, तर आजची ही दुसरी लॉटरी तरी नक्कीच. जाण्याआधी स्वतःची परमिशन घेतली आणि 'जाऊ दे ना वं' म्हणत गेलो.

सिनेमा आई मुलाच्या नात्यावर म्हटल्यावर खरं म्हणजे 'किल्ला' आठवला होता, पण इथे थीम जरा वेगळी आहे. किल्लाही छानच होता, पण नाळ हा #किल्ला इतका इंटेन्स हाताळणीचा आणि तितका मानसिक ताण निर्माण करणारा नाहीये. अर्थात इथेही कथा खूप अलगदपणे उलगडली आहे. तर कथा अशी आहे की... जाऊ दे ना वं, पडद्यावरच पहा. सुरुवातीलाच येणाऱ्या या 'जाऊ दे ना वं' गाण्याचं चित्रिकरण आणि त्यात ते दिसणारं बालपण लाजवाब आहे.



देविका दफ्तरदार यांनी पुन्हा एकदा कमाल केलीय. त्यांनी साकारलेली आई खासच. श्रीनिवास पोकळेने केलेला तो लहानगा चैतन्य पण धमालच, तोच संपूर्ण सिनेमाचं चैतन्य आहे. आणि विशेष म्हणजे शूटिंगसाठी कदाचित डॉ. नीलेश साबळेच्या तारखा न मिळाल्याने यामध्ये नागराज मंजुळे यांचं काम नागराज मंजुळे यांनी स्वतःच केलंय आणि भारीच केलंय. या सिनेमाचे #मंजुळे स्वतःच संवाद लेखक आणि सहनिर्माते असूनही त्यांनी यात वडपाच्ची म्हणणे सोडाच, पण साधा कॅरमही खेळलेला नाही. ओम भुतकर पाहुणा कलाकार म्हणून हार्डली ४-५ मिनिटे झळकतो, पण तेवढ्यात पण तो जो काही मुळशी पॅटर्न किडा करून जातो त्याभोवती पुढे संपूर्ण सिनेमा फिरतो, त्यामुळे त्याचीही भूमिका छोटीशी असली तरी महत्त्वाचीच. 

सिनेमाचे टीझर, ट्रेलर येते तेव्हा त्यात विषय, संवाद, एडिटिंग, कॅमेरावर्क, डान्स वगैरे पैकी कशाची ठसठशीत झलक दाखवली आहे हे पाहिले की त्यावरून दिग्दर्शनाचा कल कळतो. नाळच्या बाबतीत ते म्हातारीचं पीस हवेतून फिरवून आणणारा टीझर आधी आला, त्यात अगदी शेवटी त्या चिमुकल्याचा चेहरा दिसला, संवाद तर नाहीच.. मग पुढे सफाईदार ट्रेलर आलं ज्यात सिनेमाचा मुख्य विषय खुबीने लपवला आहे. असो, तर कॅमेरावर्कला इतकं महत्त्व असण्यामागचं कारण म्हणजे सिनेमाचे सिनेमॅटोग्राफरच दिग्दर्शक आहेत - सुधाकर रेड्डी यक्कंटी. त्यामुळे गाव, रान, तिथली घरं, मुलांचे खेळ दाखवताना काही ठिकाणी हे अफलातून कॅमेरावर्क इतर इलिमेंटसवर भारी पडतंही, पण एकूण परिणाम साधताना तेही फायदेशीर ठरलं आहेच. काही गोष्टी सांकेतिक, त्या पडद्यावर पाहण्यातच मजा.

'...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' नंतर आणखी एक झकास कलाकृती पाहिल्याचे समाधान 'नाळ' ने दिले, आणि मराठी सिनेमांची नाळ वेगवेगळ्या कथा, नाजूक विषय, त्यांची तितकीच अलगद हाताळणी यांच्याशी नेहमीसारखीच घट्ट जोडली गेली आहे याचा पुन्हा प्रत्यय आला. संपूर्ण टीमला शुभेच्छा. 

बघायचाय?
जाऊन या ना वं

- पराग पुजारी

Friday, 23 November 2018

...आणि कडक संवाद

* काश्या सांभाळ स्वतःला, मी उठलो तर तू पडशील हां.. (पणशीकर घाणेकर यांना, ते दोघे हातगाडीवर एकेका टोकाला बसलेले असताना)

* मोठ्या झाल्यावर त्यांचा हिरो बदललेला असेल (एका लहान मुलीला घाणेकर यांची सही मिळवून दिल्यावर डॉ. लागू पणशीकर यांना)

* त्याला त्या दिवशी कळलं की मी कोण होतो.. आणि मलाही कळलं की मी फक्त होतो, पण तो आहे आणि असणार होता (घाणेकर लागू यांच्या नाटकात व्यत्यय आणून मग यांच्याविषयी सांगताना)

* पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यांवरती..
(काशिनाथ - कांचन यांच्याविषयी समजल्यावर, आणि मग ते तिघे कारमधून निघताना 'आता तू पुढेच बस मला उतरायचेच आहे लवकरच' असं म्हणत स्वतः 'बॅकसीट' घेणाऱ्या 'सौ.' इरावती यांच्या डोळ्यांवर फोकस आणि या गाण्याची सुरूवात)

* कांचनला नक्कीच काहीतरी वेगळं म्हणायचं होतं. पण मी तिच्या मनाचा इतका का विचार करत होतो की माझं मन तिचा विचार करत होतं? (घाणेकर कांचनबद्दल विचार करताना.. हा संवाद फक्त शब्दांचा खेळ नाही हे त्यावर जरा विचार केला की कळतं)

* एक असतो रंगारी जो लोकांना हवं ते हवं तसं रंगवून देतो, आणि एक असतो चित्रकार जो लोकांचा अनुनय, कलेशी तडजोड न करता त्याच्या कलेशी प्रामाणिक राहतो. (नेमके शब्द आठवत नाहीत पण आशय हाच.. डॉ. लागू तथाकथित घाणेकर - लागू युद्धाबद्दल पत्रकाराला सांगताना)

* आवडीच्या क्षेत्रात अपयश मिळण्यापेक्षा जास्त ट्रॅजिक असतं नावडीच्या क्षेत्रात यश मिळणं (घाणेकर पत्नी इरावतीला सांगताना.. या फिलॉसॉफीबाबत सर्वसामान्य जनमानसात मतभेद असू शकतात, पण असामान्य मनस्वी कलाकारांमध्ये नसू शकतात.)

* मी हात मत द्यायला नाही, मत मांडायला वर केलाय (पणशीकर नाट्यनिर्मात्यांच्या मीटिंगमध्ये)
................



सिनेमात काय घडतंय किंवा पुढे काय घडत जाणार आहे (सिनेमात.. पर्यायाने घाणेकर यांच्या आयुष्यात) याची हिंट देणारे हे असे अनेक #संवाद कडक आहेतच, बरेचदा असे परफेक्ट सिंबॉलिकही आहेत. 'उसमे क्या है' असा त्या त्या संवादावर सिरीयसली विचार केला की त्या संवादातले रिडिंग बिटविन द लाइन्स लक्षात येते, आणि मग त्या त्या जागा लक्षात घेऊन सिनेमा बारकाईने पाहिला की सिनेमाची जास्त मजा येते, सिनेमा फक्त पाहिल्याचा नाही तर तो ग्रहण केल्याचा फील येतो. मग पटकथेतले त्या त्या वेळेचे सूचक लेखन, योजलेल्या घटना, पूरक पण कमीत कमी शब्दांतले संवाद आणि #अभिजीत_देशपांडे यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याची आणखीच कमाल वाटते.

#आणि_डॉ_काशिनाथ_घाणेकर

- पराग पुजारी

विराट, द्रविड, पुल, उंदीर मारणारे कर्मचारी, आणि अकबर बिरबल


विराट कोहली त्या चाहत्याला (?) काय म्हणाला यावरून सध्या फार वाद सुरू आहेत, आणि कदाचित ते उगाच सुरू आहेत. मग विराटचे दात त्याच्याच घशात घालण्यासाठी त्याचाच तो अंडर १९ वर्ल्डकपमध्ये कर्णधार असतानाच्या त्याच्या एका (नेहमीप्रमाणे) शतकी खेळीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला, ज्यात तो सुरुवातीला म्हणतो की त्याचा आवडता खेळाडू दक्षिण आफ्रिकेचा हर्षल गिब्ज आहे. शिवाय त्याचे मिनरल वॉटर कसे फ्रान्सहून येते आणि त्याने लग्न कसे इटलीत केले, मग हा कोण देशभक्ती शिकवणारा पासून पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी तिकीट हवंय वाटतं याला वगैरे आणखी टोमणे सुरू झाले. फेसबुकवरही या निमित्ताने आलेल्या दोन्ही बाजू घेणाऱ्या काही पोस्ट्स, कमेंट्स वाचल्या. पुलंच्या फेमस 'तुम्हाला पुणेकर व्हायचे असेल तर आपण पालिकेत उंदीर मारायच्या विभागात नोकरीला आहोत हे विसरून अमेरिकेची अर्थव्यवस्था कशी असावी यावर बिनधास्त मत ठोकून देता आले पाहिजे' वाली उपमाही जोडून झालेली दिसली. (कारण त्या तोडीची चपखल उपमा पुढे कुणी तयार करूच शकलं नाही, हेही एक कारण आहेच नेहमी तेच उदाहरण अशावेळी वाचनात येण्यामागे.)

तर आता पुलंचा म्हणजे एका दैवताचा उल्लेख आलाच आहे तर सामान्यजन विराटवर काय म्हणतात यापेक्षा क्रिकेटमधील सभ्यतेच्या दैवतांचे म्हणणे यावर काय आहे हे एक छोटासा (सहा फुटी) क्रीडाप्रेमी म्हणून माझ्या लेखी तरी जास्त महत्त्वाचे आहे. आपण त्याला उदाहरणार्थ राहुल द्रविड म्हणू. पूर्वी एका मुलाखतीत त्याला विराटच्या अग्रेशनबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला होता, "ते अग्रेशनच त्याच्यातील बेस्ट कामगिरी त्याच्याकडून करवून घेत असेल तर त्यात चुकीचं काय आहे, हेच काम माझ्यासाठी शांतपणाने केले होते. तो कदाचित जाणीवपूर्वक काही वक्तव्ये करत असेल. शेवटी स्वतःच्या स्वभावाशी ओथेंटिक राहणे गरजेचे. आणि तसंही अखेरीस मैदानातील कामगिरीच तर मॅटर करते ना." सोबत त्या दोन मिनिटांच्या व्हिडिओची लिंक देतो आहेच, मॅगी तयार होईपर्यंत पाहूनही होईल. अर्थात यात शेवटी त्याने मांडलेला गंभीर मुद्दाही विचार करायला लावणारा आहेच.

https://www.youtube.com/watch?v=Gc_spTXnXRs


गांगुलीने संघात अग्रेशन आणले आणि युवराज, हरभजन, श्रीशांत प्रतिस्पर्ध्यांना खुन्नस द्यायला शिकले. युवीचे सहा सिक्स, भज्जीचे शोएबला सिक्स मारत भारताला जिंकून देणे याचे क्रेडिट फ्लिंटॉफ, शोएब यांनाही जातेच. हरभजन - श्रीशांत तर पुढे आयपीएलमध्येही एकमेकांत 'कोण कोणास लगावते' खेळत राहिले. पण एकूणच गांगुलीच्या आक्रमकतेच्याही पुढची पायरी विराट आहे. मुळातच कोणता दिल्ली का लौंडा सभ्यतेसठी ओळखला गेलाय सांगा. विराट, शिखर, गंभीर, सेहवाग, नेहरा कुणीही घ्या. मग क्रिकेटच्या चष्म्यातून पाहिले तर दिल्ली ही भारताची कमी आणि ऑस्ट्रेलियाची राजधानी जास्त वाटते. शांत, सभ्य, समंजस वगैरे विशेषणे मिरवण्यासाठी कर्नाटकी श्रीनाथ, प्रसाद, कुंबळे, द्रविड.. किंवा मराठी सचिन, अजिंक्य वगैरे आहेत ना.. यांचा संयम अगदी क्वचित ढळला होता. (गावस्करांचे नाव टाकले नाही कारण त्यांचे 'अरे ला कारे' चे बरेच किस्से फेमस आहेत.) पण टीममध्ये असे शांत आणि आक्रमक कॉम्बिनेशन असणे कधीही चांगले नाही का? टीमला अकरा द्रविड नको असतात तसेच अकरा विराटही नकोच असतात हे मान्यच. पण वर्ल्ड क्रिकेट डॉमिनेट करताना 'तुम्ही आमच्यासमोर तुच्छ आहात, आम्ही तुम्हाला फाट्यावर मारण्यासाठीच तुमचा जन्म आणि मग क्रिकेट करियर सुरू झाले आहे' हा सत्तरीच्या विंडीज संघाचा आणि नव्वदीच्या ऑसी संघाचा माज एक दोन दशके राहिला आहे. आणि मैदानातील कामगिरीने त्यांनी तेव्हा तो योग्यही ठरवला आहे. विराट असाच वाटतो. सचिन बॅटने बोलायचा, विराट त्यासाठी बॅट आणि तोंड (आणि ट्विटर) देखील वापरतो.

विराट कधी एकदा सलग जबरी फ्लॉप जातो आणि आपण त्याच्यावर तुटून पडतो अशी वाट त्याच्या पदार्पणापासून पाहत आलेल्यांना त्यात तर कधी फारसे यश आले नाही. मग कधी त्याची कामगिरी जरा जरी खराब झाली की त्याची लगेच अनुष्कावरून खेच, कधी तू कितीही रेकॉर्डस कितीही वेगाने कर, पण देवाची जागा कधीच घेऊ शकणार नाहीस.. वगैरे काय वाट्टेल ती मुक्ताफळे सुरू होतात. सोशल मीडियावरील पोस्ट्स, कमेंट्सवर मनोरंजन कर लावलाच पाहिजे आता. बेशिस्त सेन्स ऑफ ह्यूमरला मानाने आणि ताठ मानेने बाहेर पडायला वाट मिळत नाही आणि मग ट्रोलिंग, रोस्ट, मीम्ससारखे प्रकार हिट होऊन अशा लोकांसाठी राजमार्ग ठरू लागले. हे करण्यासाठी कोणतीही कर्तृत्वाची पात्रता लागत नाही हीच मुख्य पात्रता असल्याने सगळेच यात हात धुवून घेऊ लागले. अर्थातच यातले बहुसंख्य ट्रोलभैरव हे पालिकेत उंदीर मारायच्या विभागातले असतात यात शंका नाहीच. 

पण सत्य हेच आहे की या अत्युच्च लेव्हलला पोचलेल्या खेळाडूंची कमिटमेंट आपल्यासारख्या पामरांना कधीच कळणार नसते. वडिलांचे निधन झाल्यावर परतीचा विमानप्रवास करत इंग्लंडमध्ये शतक ठोकणारा सचिन, रणजीत दिवसाचा खेळ संपून वडिलांच्या चितेला अग्नी देऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी ९० धावा ठोकणारा विराट, जबड्याला बँडेज लावून बोलिंग करत लाराची विकेट काढणारा कुंबळे, किंवा व्हायरल फिव्हरने नकोसे केले असताना ऐतिहासिक कोलकाता टेस्टमध्ये लक्ष्मणला साथ द्यायला येऊन १८० धावा करणारा द्रविड... सांगा कुणाची कमिटमेंट आणि देशभक्ती समजून घेऊ शकतो आपण? उंदीर मारायच्या विभागात कामाला आहोत की स्वतःच उंदीर आहोत?

विराट, अनेकजण तुझे गर्वाचे घर खाली व्हावे म्हणून देव (या शब्दात डबल मीनिंग नाही याची नोंद घ्यायच्ये त्या ठिकाणी) पाण्यात बुडवून बसलेत. तू त्यांना ती संधी देणार नाहीसच. आणि काही फरकही पडत नाही रे, एखादा मोठा खेळाडू माणूस म्हणून आणि गुणांचा पुतळा म्हणूनही मोठा नाही ठरला तरी. भारतीय क्रिकेटचा नव्हे तर जागतिक क्रिकेटचा इतिहासही तुझ्याशिवाय लिहिला जाणार नाहीये. तू सातत्याचा आणि कमाल फिटनेसचा पुतळा आहेस. आजच्या काळात याला बोलिंग करायला मला कदाचित भीती वाटली असती हे साक्षात वसिम अक्रम ज्याच्याबद्दल म्हणतो, हा माणूस ब्रॅडमनचे रेकॉर्ड वगळता सर्व रेकॉर्डस तोडेल असे ज्याच्याविषयी स्टीव्ह वॉ म्हणतो, आणि मला मागे टाकू शकतील असे या हॉलमध्ये दोनजण आहेत असं आपल्या निवृत्तीनंतरच्या सन्मान सोहळ्यात म्हणून जेव्हा खुद्द सचिन तुझे आणि रोहित शर्माचे नाव घेतो तेव्हाच तुझे मोठेपण नि वेगळेपण सिद्ध झालेले असते. तरीही तुझे कॅरॅक्टर टेस्ट करण्यासाठी अधूनमधून लावल्या जाणाऱ्या अशा सोप्या सोप्या जाळ्यात तू अडकू नयेस ही मनापासून इच्छा आहेच. 

तुला जे म्हणायचंय ते नीट सांगण्याची एक पद्धत असतेच. तुमच्या सर्व नातेवाईकांचे मृत्यू तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर पहावे लागणार आहेत असे भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाला अकबराने शंभर फटके दिले, पण तुमच्या अख्ख्या कुटुंबात तुम्ही सर्वात दीर्घायुषी ठरणार आहात असे (तेच भविष्य पण बिरबलाच्या सल्ल्याने त्याच्या शब्दात) सांगणाऱ्या ज्योतिषाला मात्र त्याने शंभर मोहरा दिल्या अशा पेपरातल्या बोधकथा पौगंडावस्थेत वाचून तुझ्याच वयाचे (पण अनुष्का ओळखत नसलेले) आम्ही मोठे झालो आहोत. अर्थात तेव्हा दिल्लीत तुझ्या घरी तुम्ही मराठी दैनिक पुढारी घेत नसणार यात तुझीही काही चूक नाही. चूकवरून आठवलं, कोच कुंबळेशी वाद झाल्यावर माझ्यासकट कित्येकांच्या तू डोक्यात गेला होतास. नंतर आलेल्या रवीने आपण आता कोच असून ताकात नाही एवढे जरी लक्षात ठेवले तरी तो तुला घुसळणे बंद करेल, जो आरोप त्याच्यावर नेहमी होतो. खरे खोटे माहीत नाही, पण आधी म्हणालो तसं तू कोणत्याही जाळ्यात अडकू नयेस एवढंच. 

शुभेच्छा!!!

(भारत कधीही सोडून न गेलेला)
पराग पुजारी

Monday, 29 October 2018

मुंबई टू मेक्सिको - 'रॉ'नेस ते परफेक्टनेस

मुंबई टू मेक्सिको - 'रॉ'नेस ते परफेक्टनेस 

'मुंबई टू मेक्सिको' वाचलं. बेक्कार आवडलं. बेबी किंवा एक था टायगर सारखे सिनेमा पाहताना जसे आपण रॉ एजंट्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते बघतो, तसे डोळे देत आपल्याला वेगवेगळे देश आणि भारताची तिथली रॉची मिशन्स बर्वे या पुस्तकातून फिरवून आणतात, मला तरी तसंच भारीतलं फिलिंग आलं. पुस्तकाचा विषयच तो आहे. मराठीत रॉची कामगिरी दाखवणारी अशी पुस्तके अभावानेच असतील.   

हे पुस्तक चाळताना काही नावे दिसली, उत्सुकता चाळवली गेली आणि आपोआपच पुस्तक सलग वाचून झालं. तुम्हीच सांगा, या पुस्तकात आर्मीला फ्री हॅण्ड देणारे भारताचे डॅशिंग पंतप्रधान नरेंद्र कश्यप, ग्लोबल प्लॅटफॉर्मवर पाकिस्तानची पिसे काढणाऱ्या परराष्ट्रमंत्री रश्मी स्वराज, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजेंद्र सबनीस अशी नावे असल्यावर (आणि बर्वेंचे सोशल मीडियावर झळकणारे राजकारण प्रेम माहीत असल्यावर) दुसरं काय होणार. 

कादंबरी अगदी कट टू कट, उगाच फापटपसारा किंवा नको तिथे विनोदनिर्मिती नाही. कथा उलगडत जाते मुंबई क्राइम ब्रान्चमधून रॉमध्ये गेलेले तडफदार ऑफिसर अजय भाटवडेकर यांच्या दृष्टिकोनातून. रॉ ऑफिसर निरंजनचीही पुढे त्यांना परदेशातील मिशन्समध्ये तितकीच मदत होत जाते. मुंबईत ९३ चे बॉम्बस्फोट करणारा आणि कित्येक वर्षे भारतीय कायद्याच्या कचाट्यातून सुटत राहिलेला अस्लम कासकर, नन्हें मुजाहिद्दीनचा अजहर मेहमूद, आयएसआयचा अताउल्लाह हे सगळे प्रत्यक्षातले कोण आहेत हे समजले की (आणि किमान कादंबरीत यांचे पुढे काय होणार हे कुतूहल निर्माण झाले की) वाचायला आणखीच मजा येते. बरं बर्वेंचे निरीक्षण काय म्हणता.. बारीक गोष्टी दाखवायच्या म्हणजे किती, तर संजय खेतान नावाचा एक भारतीय मद्यसम्राट बँकांची मोठी कर्जे बुडवून लंडनमध्ये राहतोय आणि अतिरेक्यांच्या केसेस घेऊन लढणारी एक वकील तस्लिमा आहे. यूपीतला एक मंत्री रामसरण सहाय फुल करप्ट आहे, त्याच्या आणि आणखी काहींच्या स्विस खात्यात इस्लामाबादहून शेकडो मिलियन डॉलर्स येतायत ते भारतात मोठा घातपात घडवून आणण्यासाठी. या घातपाताविषयी आपल्या इंटेलिजन्सने पकडलेला कोड मेसेज काय तर - इस बार दिवाली एप्रिल - मई २०१९ में होगी. मग तर अजूनच एकसाईटमेंट वाढून आपण कथेत गुंतून जातो. 

गुन्हेगारी जगतात बरेच गुन्हेगार एकमेकांनाच मारून संपतात, तसे इथेही एकमेकांना डबलक्रॉस करणारे कैसर, मुनाफ हे युरोपियन आर्म्स डीलर्स आणि इसिसचा आर्म्स डीलर कासम आहेच. मेक्सिको सिटीत बसून ग्लोबल ड्रग्स मार्केट हॅन्डल करणाऱ्या आंद्रेला काही दहशतवाद्यांनी हाताशी धरुन भारतातल्या तरुण पिढीला ड्रग्सच्या विळख्यात घ्यायचे ठरवलेय. या आंद्रे, अस्लम, कैसर वगैरेंचे पुढे काय होते, कर्नाटकमधला चंदनतस्कर अय्यप्पन नेमकी काय भूमिका बजावतो, रॉचे सिनियर ऑफिसर भट्टाचार्य योग्य माणसे निवडत कशी वेगवेगळी मिशन आखतात नि त्यासाठी आपले देशोदेशीचे जुने कॉन्टॅक्टस कसे वापरतात, पंतप्रधान कश्यप या सगळ्याकडे कसे पाहतात या कित्येक प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी वाचलीच पाहिजे 'मुंबई टू मेक्सिको'. 

एकूणच कादंबरी आपल्या आजच्या परिस्थितीशी खूप साधर्म्य दर्शवणारी आहे. करप्ट मीडिया दाखवायला एखादे देशद्रोही चॅनेल आणि सो कॉल्ड पुरोगामी कथेत असते तर अजून रिलेट करता आले असते. पण ऑलरेडी खूप पात्रे, खूप घटना, खूप ठिकाणे आहेत. लिहिताना बर्वेंच्या डोक्यातला फळा त्यावरील चार्टस, टेबल्स, नात्यांच्या ट्री डायग्रामस आणि अनेक नकाशांसह खूप बरबटला असणार बहुतेक. सलग वाचले तरच शक्यतो गोंधळ न होता मागचेपुढचे संदर्भ समजत जातात. हे असलं काही सुचायला मेंदूही ती बरबट नीट चॅनलाईज करून मार्गी लावू शकेल असाच लागतो. इंजिनीयरिंग, फोटोग्राफी, जंगल सफारी, टूर्स, लेखन, इव्हेंटस, पब्लिशिंग आणि खाल्ल्या अन्नाला जागत धुमाळेचे उमाळे येऊन सतत प्रवास करणाऱ्याकडे तो असतो असे वेदांमध्ये लिहिले आहे, नेमकी 'ऋचा' बर्वे सांगतील.

भारत, जर्मनी, मेक्सिको, स्वित्झर्लंड, पाकिस्तान, दुबई अशा अनेक देशांत फिरवून आणल्याबद्दल धन्यवाद बर्वे. अशीच आणखी हटके पुस्तके लिहीत रहा. शुभेच्छा...

- पराग पुजारी

Tuesday, 9 October 2018

होम स्वीट होम - आपल्या घरातली गोष्ट


होम स्वीट होम अगदी साधा तरीही प्रभावी असा सिनेमा. झी मराठीच्या एका पुरस्कार सोहळ्यात 'जोश्यांची फळबाग' पाहिल्यापासून मी ज्यांचा फॅन आहे आणि ज्यांचं कोणतंही नाटक, सिनेमा, अगदी नांदीसारखं पुस्तक किंवा लोकप्रभातले 'दुसरी बाजू' हे सदरही सोडलं नाही त्या हृषीकेश जोशी यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा. हृषीकेशसोबत मोहन जोशी, रीमा, स्पृहा जोशी, विभावरी देशपांडे यांच्या मुख्य भूमिका आणि पाहुणे कलाकार म्हणून प्रसाद ओक, सुमित राघवन, मृणाल कुलकर्णी, आणि माझ्यासारख्या क्रिकेटप्रेमींसाठी आणखी एक सुखद धक्का म्हणजे चक्क विक्रम साठ्ये अशी फौज.

हृषीकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांच्या लेखणीतून साकार झालेली सिनेमाची कथा तशी अगदी साधी, सरळ, तरीही गुंतवून ठेवणारी. खुसखुशीत संवाद पेश करत सिनेमा आपल्याला कितीतरी प्रसंगात रिलेटेबल वाटत जातो, विशेषतः: मुंबईत वर्षानुवर्षे राहणाऱ्यांना नक्कीच. एका जुन्या इमारतीत राहतायत एक रिटायरमेंट झालेले साठीला आलेले जोडपे विद्याधर महाजन - श्यामल महाजन (मोहन जोशी - रीमा) आणि त्यांच्याकडे राहणारी त्यांची एक पेइंग गेस्ट कम भाची देविका (स्पृहा जोशी). त्यांची ही राहती जागा तशी शहरातली अगदी मोक्याची, त्यामुळे घर विकायचं म्हटलं तर मार्केटमध्ये या जागेला तीन-साडेतीन कोटींचा भाव आहे, हे उत्साही इस्टेट एजंट सोपान शिंदे (हृषीकेश जोशी) याच्यामुळे त्यांना कळतं. लिफ्ट नसलेल्या इमारतीत चौथ्या मजल्यावर असणारे घर म्हणजे वयोमानानुसार गुडघेदुखी असणाऱ्या श्यामल महाजन यांच्यासाठी डोकेदुखीच. पण जोडीने हे घर घेतानाच्या आठवणी आणि तिथला शेजारपाजार यात रुळलेल्या विद्याधर यांच्यासाठी हे फक्त विकणं तितकं सहजासहजी शक्य नाही. मग त्यांनी ते विकून लिफ्ट असणाऱ्या नवीन टॉवरमध्ये रहायला जावं म्हणून आपले युक्तिवाद लढवणाऱ्या श्यामल आणि ते होऊ देण्यासाठी विद्याधर यांनी मांडलेले मुद्दे, त्यातून पुढे काय काय घडत जातं, ते राहतं घर विकून नवीन घरी रहायला जातात का याभोवती मग कथा फिरत राहते आणि ज्याप्रमाणे परफेक्ट क्षणी मध्यंतर होतो, त्याप्रमाणेच एक सुयोग्य शेवट करत सिनेमा संपतो. हा सिनेमा अगदी अलगदपणे घर, माणसं, मानवी भावभावना, जुने, नवे, सोयीसुविधा, आपुलकी जिव्हाळा अशा अनेक गोष्टींना वेळोवेळी एकमेकांसमोर उभे ठाकायला लावतो, आणि तरीही बऱ्याच गाठी अलवार सोडवत जातो हे या सिनेमाचे माझ्या मते मुख्य यश.  


खरं तर सांगलीत, पुण्यात, मुंबईत जिथे कुठे आजवर राहिलो - तिथे सगळीकडे खूप घरं बदलत राहत आलेला मी, आणि त्यामुळे एकाच घराशी भावनिकरीत्या दीर्घकाळ नाळ जुळलेला मी - तरीही या सिनेमाने मला गुंतवून ठेवलं. याच क्रेडिट मी या सिनेमाची कथा, मांडणी, दिग्दर्शन, अभिनय, संगीत या सगळ्याच घटकांना देईन.

विशेषतः अभिनयात तर सर्वानीच बाजी मारली आहे. रीमाजींना पाहून सतत आपण काय ताकदीची अभिनेत्री गमावलीये हे वाटत राहतं. (त्यांच्यासाठी निर्मिती सावंत यांनी केलेलं डबिंगदेखील त्या भूमिकेच्यागरजेप्रमाणे आणि कित्येकदा तर हा रीमाजींचाच आवाज असं वाटावं इतक्या चपखलपणे  झालेलं आहे)

आणखी एक विशेष आवडलेली गोष्ट म्हणजे वेळोवेळी येणाऱ्या वैभव जोशींच्या कविता. घर हे या सिनेमातलं एक पात्रच आहे, त्यामुळे वैभव जोशींच्या कवितांमधून घर बोलतं, घराच्या भावना बोलतात, त्या भावना जगलेली माणसं बोलतात.

अगं चार भिंती आणि दोन खिडक्या नाहीयेत फक्त या घराला, आपण सामावून घेतलंय आपल्यात अवघ्या चराचराला
चार भिंती आणि दोन खिडक्या नाहीयेत फक्त या घराला, आपण फॅमिली मेंबर करून घेतलंय काळाच्या निसटत्या पाऱ्याला

हे असलं काही सुचण्याचे हे वैभवदादा क्लासेस का घेत नाहीत?

असो, नक्की पाहावा असा (आणि मी प्रीमियरला या सिनेमाचीच स्टारकास्ट आणि इतर अनेक कलाकारांच्या उपस्थितीत पाहिलेला सिनेमा) - 'होम स्वीट होम'

- पराग पुजारी




अंधाधुन हँगओव्हर


माझे आयुष्य सरळ, सुटसुटीत, अजिबात गुंतागुंत नसलेले का आहे?

. मी क्रिकेट खूप खेळलो असलो तरी चौदाव्या वर्षी मला डोक्याला बॉल लागून माझी काही ऑप्टिक नस वगैरे डॅमेज झाली नाही, त्यामुळे माझी दृष्टी जाऊन मी आंधळा होण्याचा प्रश्नच उद्भवला नाही

. (चष्मा असला तरी) मी (वर सांगितलेल्या कारणामुळे) अंध नाही, वर मला पियानोही वाजवता येत नाही, त्यामुळे एखाद्या एनजीओकडून पुण्यात प्रभात रोडवर अंध मेहनती होतकरू कलाकाराला मदत म्हणून दरमहा पाचशे रुपयात मला राहायला घरही मिळाले नाही

. आणि मला जर मुळात पियानो वाजवताच येत नाही, तर जुन्या जमान्यातल्या कुण्या नटाने मला घरी त्याच्या वेडिंग अनिव्हर्सरीला पियानोवादनासाठी (तेही पुणे बंद असण्याच्या वेळी म्हणजे भर दुपारी एक वाजता) बोलावण्याचाही प्रश्न कधी उद्भवला नाही. त्यामुळे अशा कोणत्या नटाने कमी वयाच्या नटीशी लग्न केले असल्यासही माझा त्या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. मग त्यांच्यासमोरील फ्लॅटमध्ये कुणी वृद्ध स्त्री राहत असल्यास तर मला ते माहीत असण्याचीही गरज नाही

. किडन्या काढून घेणारा कुणी डॉक्टर किंवा एखादी लॉटरीची तिकिटे विकणारी बाई किंवा गेलाबाजार ऐश्वर्या रॉयचे पोस्टर रिक्षाच्या मागे लावणारा असा कोणताही रिक्षा ड्रायव्हर माझ्या ओळखीत नाही

. माझ्या घरी कुणी आल्यावर मी त्यांच्यासाठी कॉफी करत असताना ते भुताचा भीषण भयावह वगैरे मास्क घालून किंवा हॉलिवूडच्या फेमस स्केअरी  मूव्हीचे पोस्टर क्रॉप करून ते चेहऱ्यावर लावून किचनमध्ये आगाऊपणे येऊन बसत नाहीत

. लहानपणी ससा, कासव, घोडा, हत्ती अशा प्राण्यांच्या आणि त्यांच्या चेहऱ्याच्या आकारातली भरपूर बिस्किटे मी मजेत खाल्ली आहेत, पण सशाच्या चेहऱ्याचे मॉडेल वा डिझाईन असलेली कोणतीही वस्तू - उदाहरणार्थ, आपण काठी म्हणू, माझ्याकडे अजिबातच नाही.  

#अंधाधुन_हँगओव्हर