Thursday, 23 March 2017

नींद खोणे, चैन खोणे आणि हिंदी गाणी  

हिंदी सिनेमांसाठी गाणी लिहिणाऱ्या गीतकार समीर यांनी आजवर ५०० पेक्षा जास्त सिनेमांसाठी गाणी लिहून एक विश्वविक्रम प्रस्थापित केलाय आणि यासाठी त्यांचे नाव गिनीज बुकमध्येही नोंदवले गेलेय. त्यांचे वडील अंजान हेही गीतकारच होते, समीर यांनी लिहिलेल्या गाण्यांमधलं वैविध्य हा खरंतर वादाचा मुद्दा आहे... पण का आहे? समीर म्हणजे मागणी तसा पुरवठा या तत्त्वावर चालणारी गाण्यांची फॅक्टरी असंच पहिल्यापासून समजलं गेलंय.. तीनवेळा फिल्मफेअर जिंकलं खरं पण या मेहनती गीतकाराची गणना साहिर, हसरत, शैलेंद्र, किंवा आजकालचे इर्शाद, प्रसून, स्वानंद यांच्या केटेगरीत केली जात नाही, का होत असेल असं? खऱ्या अर्थाने दर्जात्मक म्हणता येईल असं काव्य कमी पडत असेल का? की तेच तेच वेगळ्या शब्दात समोर आणणं हे झालं असेल?

समीरचा फॉर्मातला काळ म्हणजे नव्वदीचं बॉलिवूड म्युझिक.. तेव्हाच यांनी आपल्याला आशिकी, बेटा, दीवाना, साजन, दिलवाले, कुछ कुछ होता है, राजा हिंदुस्थानी, धडकनची सुपरहिट गाणी दिली.. यावरून कळतेच की प्रेमगीते लिहिण्यात यांचा हातखंडा आहे. आपल्याकडच्या एका सिनेमात तेव्हा संख्येनेही जास्त गाणी असायची, अशावेळी पाचशे प्लस सिनेमे म्हणजे खूपच जास्त.. हे काम अवाढव्य आहे. पण क्वांटिटी वाढली की क्वालीटी कितपत राखता येत असेल? जाऊदे, विषय व्हरायटीचा चालला होता ना तर आपण समीरलिखित गाण्यांमध्ये वैविध्य पाहू.. 

१९९०: आमीर - माधुरीच्या गाजलेल्या 'दिल' या सिनेमात - 'मुझे नींद ना आये, मुझे चैन ना आये, कोई जाये जरा ढुंढके लाये, न जाने कहां दिल खो गया'

१९९७: आमीर - जुही, अजय - काजोल यांच्या 'इष्क' या सिनेमामधले हे गाणे - 'नींद चुरायी मेरी किसने ओ सनम - तूने, चैन चुराया मेरा किसने ओ सनम - तूने' आणि त्याच सिनेमात 'जब नींद ना आये, जब याद सताये'

२०००: सलमान - संजय - करिष्माच्या 'चल मेरे भाई' सिनेमातले एक गाणे - 'मेरी नींद जाने लगी है, मेरा चैन खोने लगा है, मुझे इष्क होने लगा है' आणि हेच विचार त्याच सिनेमातील दुसऱ्या एका गाण्यात पहा - 'चोरी चोरी सपनों में आता है कोई, सारी सारी रात जगाता है कोई, दिल मेरा बेकरार हो गया, ऐसा लगता है मुझे प्यार हो गया'

शाळेत (हो गेलोय) इंग्रजी व्याकरणात आम्हाला 'मेक इट अफर्मेटिव्ह सेन्टेन्स' असा एक प्रकार असायचा..  म्हणजे दिलेल्या वाक्याचा अर्थ न बदलता ते वाक्य सकारात्मक शब्द टाकून तयार करा जेणेकरून त्यातला नकारात्मक भाव निघून जाईल.. तसं आहे हे - 'मेरी नींद जाने लगी है' मध्ये निद्रानाश विकार जाणवतो, पण तेच 'सारी सारी रात जगाता है कोई' म्हटलं की त्या जागवणाऱ्या एखाद्याचंच कौतुक वाटतं, उगाचच रोमँटिक वगैरे वाटतं.. आणि मग 'मुझे इष्क होने लगा है' ला समानार्थी म्हणून 'ऐसा लगता है मुझे प्यार हो गया' आहेच.. 

मग या सगळ्यावरून 'इन्स्पायर्ड' होऊन बँड ऑफ बॉईजने आपलंही एक गाणं आणलं होतं बघा - मेरी नींद उड गयी है, मेरा चैन खो गया है.. खूपच हिट झालं होतं. 

असो, जोक्स (हेतू नव्हता, पण जाणवले असतील तर) अपार्ट.. पण नींद, चैन हे फार पूर्वीपासूनच आहे म्हणा हिंदी गाण्यांमध्ये.. समीर यायच्या आधीपासूनच.. जरा डोक्याला ताण दिला तर सहज आठवतील. 

Wednesday, 22 March 2017

जेव्हा तळपायाची मस्तकाला जाते.. 

मध्यंतरी दोन व्हिडीओ पाहिले, वाईट वाटले.

बीएसएफचे जवान तेजबहादूर यादव यांनी जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट अन्नाविषयी केलेला व्हिडीओ व्हायरल झाला, तो पाहिला. चॅनेल्सच्या त्यावर चर्चा झडल्या. सीआरपीएफचे जवान जीत सिंग यांनी शेअर केलेला व्हिडीओही पाहिला. दोघांची बाजू पटते.

तेजबहादूर तर स्पष्ट म्हणतात की आमची कोणत्याही सरकारबद्दल तक्रार नाही, पण मिळणारी मदत लष्करी अधिकारीच त्या वस्तू, धान्य बाहेर विकून कमिशन खाऊन टाकतात. बीएसएफ जवानांना मिळणारे अन्न पाहिले आणि धक्काच बसला. खाऊन उरलेले अन्न लोक प्राण्यांना किंवा भिकाऱ्यांना खायला म्हणून टाकून देतात तेही याहून बरे असेल. आणि हे असले निकृष्ट अन्न खाऊन जवानांनी करायचंय काय तर ११-१२ तास गोठवणाऱ्या थंडीत उभं राहून ड्युटी. व्वा.. अपेक्षाच कशी करता येईल अशी? मग काय हरकत आहे उद्या या जवानांनी बंड केले किंवा संपावर गेले तर? देशात जरा काही झालं की ते ते लोक काम बंद करतातच की - बँकवाले, रिक्षा-टॅक्सीवाले, शिक्षक लोक सगळेच. तेजबहादूर यांच्यावर शिस्तभंगाची काही कारवाया यापूर्वी झाल्या आहेत, पण आधीचे काही चार्जेस वेगळे होते आणि आता ही बाब वेगळी आणि जास्त  गंभीर आहे. अशा अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं शिस्तभंग ठरत असेल तर असा शिस्तभंग झालाच पाहिजे. आय सपोर्ट हिम.

आता तर त्यांची बदली बीएसएफच्या मुख्यालयात केली असून त्यांना चक्क प्लंबरचे काम देण्यात आलेय. शिवायचे लष्करी वरिष्ठांनी तो व्हिडीओ मागे घ्यावा, यासाठी दबाव आणलाय असंही बाहेर आलंय, यापूर्वीही भारतीय लष्करातील भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली होती, मग ते बोफोर्स असो की टाट्रा ट्रक घोटाळा.. जवान भुकेने मरतात आणि मलई हे भ्रष्ट अधिकारी खातात. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई तर झालीच पाहिजे. नाना पाटेकर यांनीही हे तर जवानांचे खच्चीकरण असं म्हणून संताप व्यक्त केलाय आणि स्वतः ते कमांडर कमल नयन चौबे यांच्याशी याबद्दल बोललेतसुद्धा. पण ही वेळच का येते?

हे कमी म्हणून की काय आता सीआरपीएफचे जवान जीत सिंग यांनी सीआरपीएफ जवानांची व्यथा असाच एक व्हिडीओ करून मांडली आहे आणि या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लक्ष घालावे अशी विनंती केली आहे. आर्मी जवानांना मिळणाऱ्या सुविधांबद्दल काही म्हणणे नाही, पण आम्हाला मिळणाऱ्या अशा सुविधा बंद का केल्या हा या २६ वर्षांच्या सैनिकाचा प्रश्न बिनतोड आहे. लष्कराच्या जवानांना पेन्शन तरी मिळते. मात्र सीआरपीएफ दलाच्या जवानांना २० वर्षांच्या सेवेनंतरही माजी सैनिकांचा कोटा, कँटीन सोय, आणि वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत, निवृत्तीनंतर एक्स-सर्व्हीसमन हा टॅगच त्याना लागत नाही तर पुढे त्यांचं काय होत असेल? हे भयंकर आहे. पेन्शन आधी मिळायची तीच आता बंद केलीये. सीआरपीएफचे जवान म्हणजे असे लोक असतात ज्यांना त्यांची कामे करावी लागतातच, प्लस कमी तिथे आम्ही म्हणत त्यांना पाठवतील तिथे, किंवा ऐनवेळी देतील ते काम करावं लागतं त्यांना. मग पंचायतीपासून लोकसभेपर्यंत कोणत्याही निवडणुका असोत, किंवा संसद भवन, एअरपोर्ट्स, मंदिरे मशिदी चर्च आणि व्हीआयपींच्या सुरक्षेसाठीही नेहमी तैनात होते ती सीआरपीएफच. पूर, भूकंप, वादळ काहीही आलं कि आधी मदतीला येतात त्या बीएसएफ, सीआरपीएफ दलांना अशी वागणूक मिळत असेल तर हि किती शरमेची बाब आहे.

तिकडे कॅनडा अमेझॉनवर भारताचा तिरंगा पायपुसणं म्हणून विकतोय हे कळल्यावर उद्रेक होतोय ना, सुषमा स्वराजनी लगेच बिनशर्त माफी मागायला सांगून आणि ते प्रॉडक्ट्स हटवा म्हणत अमेझॉनवाल्यांची इंडियन व्हिसा प्रोसेस बंद केली ना लगेच.. जे चांगलंच आहे... मग तो तर बाहेरचा देश.. तर ही आपल्याच आतली पण सीमेवरची परिस्थिती पाहून काही वाटत नाही? चौकशी कसली होणार तर म्हणे त्याच्याकडे मोबाईल कुठून आला? व्वा.. बाकी मीडिया लगेच तेजबहादूर यांच्या आईवडील, मित्राकडे गेली विचारायला, त्यातून अजूनच गंभीर माहिती बाहेर आलीये. शिवाय काश्मीर, श्रीनगर आणि तिथल्या लष्करी कॅम्प्सजवळ राहणाऱ्या ग्रामस्थानीही याला दुजोरा दिलाय की 'हो, आम्हाला लष्करी कोट्यात येणाऱ्या वस्तू, मसाले, धान्य, तांदूळ वगैरे गोष्टी निम्म्या किमतीत मिळतात.. पेट्रोल-डिझेलही मिळते'.. भयंकर.. उद्या हेच लोक बुऱ्हान वानीसारख्यांचा जयजयकार करत तुमच्यावर दगडफेक करायला येतात ना, मग पॅलेट गन्स वापरल्यावर उत्तरे तुम्हालाच द्यावी लागतात ना? त्या कृतघ्न लोकांचं काय जातंय, ते दोन्हीकडून ओरबाडतात आणि खाल्ल्या थाळीत भोक पाडतात. तिथले फर्निचर विक्रेते तर म्हणतात की  आमच्याकडून सुमार दर्जाचं फर्निचर लष्कर खरेदी करते, हे पैसे वाचवून करतात काय हे अधिकारी? खोटी बिले दाखवून किती कमिशन खाल? कमिशन आणि एकूणच खाबुगिरीला छाप लावायला लष्करात -टेंडरची पद्धत का सुरु करत नाहीत? स्वार्थी लष्करी अधिकाऱ्यांची ही मनमानी आणि दलाली थांबलीच पाहिजे. हे मोजके अधिकारी अख्ख्या रेजिमेंटचं नाव खराब करतात हे याना लक्षात येत नसेल का?


शनिवार-रविवार सुट्ट्या प्लस बाकी इतक्या सणांच्या वगैरे सुट्ट्या ओरबाडत वर्षातले १०० दिवस सुट्टीवर असूनही तक्रार करणारे आपण.. आणि कोणतीही सुट्टी घेता कोणत्याही हवामानात, खडतर प्रदेशात  काम करणारे बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीएफ, फायरब्रिगेडचे हे जवान.. अशा तितकेच महत्त्वाचे काम करणाऱ्या जवानांना सुविधा का मिळत नाहीत? यांनी निवृत्त झाल्यावर काय करायचे? यांच्या कुटुंबीयांनी काय करायचे?
किशोर कुमार, सचिन पिळगावकर, साहित्य संमेलनाध्यक्ष आणि ळ

साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणाले की संस्कृतचा प्रभाव कमी होऊन मराठीत हिंदी, उर्दू, पारसी वगैरे शब्द जास्त आले पाहिजेत. (त्यांची भाषा समृद्धीची, संवर्धनाची व्याख्या वेगळी असावी. या अक्षयकुमारपेक्षा त्या अक्षयकुमारलाही मराठीबद्दल जास्त आत्मीयता वाटत असेल.) तर यावरून आठवला एक वाचलेला किस्सा - सचिन पिळगावकर यांच्या 'हाच माझा मार्ग' या आत्मचरित्रात वाचला होता. 'अश्विनी ये ना' हे गाणं गाण्यासाठी सचिनजींना किशोर कुमारच हवे होते. किशोरदांनी आधी यथेच्छ खिल्ली उडवली मराठी भाषेची.. म्हणाले,
"मुझसेही क्यूं चाहिये? वो तुम्हारे सुरेश वाडकरसे करो ना.. वो कैसे गाता है तुझ्झी माझ्झी करके.. जाओ, मराठी मुझे नही आता है"
"नहीं लेकिन आपही ये अच्छा गाओगे"
"अरे मुझे वो मराठी वर्ड्स नही आते है.. तो बोल सकता हूं, लेकिन वो और एक होता है ना तुम्हारा - अड.. अड, वो नही आता है"
"मजाक कर रह हो क्या.. मराठी मी 'अड' ऐसा कोई शब्द है ही नही"
"अरे वो होता है ना तुम्हारा.. कमल को क्या बोलते हो मराठी में - कमअड"
मग सचिनजींना लक्षात आले की हिंदी वळणाची जड जीभ असल्याने त्यांना म्हणता येत नव्हते, ला ते अड म्हणत होते. मग सचिनजींनी सांगितलं, "ठीक आहे, तुमच्या आवाजातल्या गाण्यात येणारच नाही असं गाणं मी लिहून घेईन, मग तर गाल."
किशोरदा तयार झाले आणि मराठीत पहिल्यांदाच त्यांचं पार्श्वगायक म्हणून आगमन झालं. 'अश्विनी ये ना' गाण्यात राणी, आणीबाणी, दिवाणा हे णमय शब्द त्यांनी झकास गायलेत. तर याच गाण्यात 'तुला छळून मी जळून गेले रे' अशी एक ओळ आहे, पण ती हुशारीने नायिकेला दिली आहे, त्यामुळं ते ळमय शब्द गायिका अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात आले आहेत.
हिंदीचाच मराठीवर प्रभाव हवाय तर अक्षयकुमार यांनी ऐवजी मराठीत अड चालेल असं पुढे जिथे कुठे भाषण देतील तिथे बिनदिक्कत सांगावं.


हे काय, ओहोहो.. चला पोस्ट आवरती घेतोऐन प्रपोज डे लातुझ्या गअडा माझ्या गअडा’ गाणं ऐकू येतंय कुठूनतरी.. ना बेटा  ना, गैरसमज नको.. घरी नअड आणि बादली एकमेकांना म्हणतायत हे असं.. पाणी झुअडूझुअडू वाहत चाललंय बहुतेक तर नअड बंद करतो आधी, भले त्याचा काअड आला असेल पण वेअड आली नसेल तरीही..  कअडालं का? नाही..? जाऊदे, अक्षयकुमार काअडेना कअडालं असेल नक्कीच.  
शुद्धलेखन - का आणि कसे ?

सध्या साहित्य संमेलनाध्यक्षांच्या (अव)कृपेने मराठी भाषा, शुद्धलेखन, व्याकरण यावर चर्चा सुरुच आहे तर एक सहज आठवण. २०११-१२ च्या सुमारास पुण्यात 'डायमंड पब्लिकेशन्स'मध्ये उपसंपादक म्हणून काम करत होतो तेव्हाची गोष्ट. एडिटिंग करणं, लेआउट डिझाईन करणं याबरोबरच प्रूफरिडींग अर्थात बरंच करावं लागायचं. एखादं अक्षर इकडचं तिकडे झाल्याने किंवा एखाद्या चुकीच्या वेलांटी, उकार, मात्रेनेही झालेल्या काही चुका वाचायला मिळायच्या. प्रा. सु. . जोशी सर हे गाढे मराठी भाषा अभ्यासक, निवृत्त प्राचार्य तिथे सिनियर प्रूफरीडर होते. आमची टेबलं लागूनच असल्याने आम्ही सख्खे शेजारी पक्के शेजारी होतो. त्यांच्याकडून मराठी भाषेविषयी आम्हाला बरेच शिकायला मिळायचे. त्यांची बरीच पुस्तकेही, प्रामुख्याने बालसाहित्याची, उपलब्ध आहेत. व्याकरणाची ओळख, त्यातली सहज लक्षात येणारी गंमत सांगण्यासाठी त्यांनी असाच एकदा सांगितलेला किस्सा या निमित्ताने सांगतो.

एका राजाच्या राज्यात एक गरीब वैद्य राहत असतो, जो रुग्णांवर उपचार ते जे देतील त्या मोजक्या पैशातून करत आपले पोट भरत असतो. जनता गरीब असते, अनेक रुग्णांचा खर्च हा राजाच्याच खजिन्यातून होत असतो. राजा आणि वैद्य यांची कधीकधी भेटही होत असते. एकदा बोलता बोलता वैद्य राजाला म्हणतो, "तुम्हीही रुग्णदेव आणि मीही रुग्णदेव"

राजाला आला राग, हा कोण स्वत:ची तुलना माझ्यासारख्या श्रीमंत शक्तिमान राजाशी करणारा.. फडतूस कफल्लक वैद्य कुठला.. राज्याच्या नियमानुसार तो त्याला राज्यातून बाहेर काढण्याची शिक्षा फर्मावणार इतक्यात वैद्याने आपलं म्हणणं जरा स्पष्ट करून सांगण्याची परवानगी मागितली. आता तो काय सारवासारव करतोय हे पाहायला उत्सुकतेने राजानेही ती दिली.
वैद्य म्हणाला, "महाराज मी आपल्या दोघांनाही 'रुग्णदेव' म्हणालो. आणि उगाच सारवासारव करत मी माझा शब्द मागेही घेत नाहीये. पण शब्द एकच असला तरी दोन्हीचे अर्थ वेगळे आहेत."
राजाला वाटले हा उगाच शेंडी लावतोय, त्याने विचारलं, "ते कसे काय रे? शब्द एकच आणि अर्थ वेगवेगळे, असं कसं होईल?"

"सांगतो ना", वैद्य म्हणाला, "अहो तुम्ही रुग्णदेव म्हणजे षष्ठी तत्पुरुष - रुग्णांचे देव या अर्थाने आणि मी रुग्णदेव म्हणजे बहुव्रीही, अर्थात रुग्ण आहेत देव ज्याचे. तुम्ही त्यांचा आर्थिक आधार आहेत, ते माझे आर्थिक आधार आहेत.. पण तुमच्याइतकाच रुग्णदेव ते मलाही मानतात पण तो प्रकृतीच्या दृष्टीने, आर्थिक नाही. म्हणजेच गंमत अशी की मी रूग्णांना औषध देऊन बरं करतो म्हणून ते मला षष्ठी तत्पुरुष चा रुग्णदेव समजतात, पण माझी आर्थिक परिस्थिती पाहता मला सत्य असे ठामपणे माहीत आहे की मी बहुव्रीही रुग्णदेवच आहे. आता याउपर तुम्ही जो निकाल द्याल तो मला मान्य आहे."
गरीब वैद्याच्या या चतुर उत्तरावर राजा खुश झाला आणि त्याने त्याची शिक्षा रद्द केली. त्याला राज्यातून कायमचा मिळणार असलेला नारळीभात रद्द झाला.

अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी सर्वांना सांगितल्या. अनुस्वाराचे तीन नियम सांगितले. आता काही शब्द पाहू. निवडणुकांचे वारे आहेत तर सुरूवात तिथूनच करू.
                                           ---------------------------------------
निवडणूक, (आणि निकालानंतरची) मिरवणूक अशा शब्दात णू दीर्घ, पण तोच निवडणुकीत, मिरवणुकीत होताना ऱ्हस्व होतो. म्हणजेच जेव्हा पुढचे अक्षर बदलते तेव्हा.

हाच नियम इथेही - 'जाहीर, माहीत' मध्ये ही दीर्घ, पण 'जाहिरात, माहिती' मध्ये हि ऱ्हस्वकोल्हापूर, पंढरपूर मध्ये पू दीर्घ..पण कोल्हापुरात, पंढरपुरात इथे पु ऱ्हस्व

'आणि' या अर्थाने येणारा नि हा नि किंवा नी असा दोन्ही चालतो, हे त्यांनी व्याकरणाच्या पुस्तकातून दाखवून दिले.

शब्दाला इय प्रत्यय लागत असेल तर अलीकडचे अक्षर दीर्घ (राष्ट्रीय, भारतीय इत्यादी)

शब्दाला इक प्रत्यय लागत असेल तर अलीकडचे अक्षर ऱ्हस्व (सामाजिक, आर्थिक, वाचिक इत्यादी)

षष्ठी तत्पुरुष समास असताना नेहमीच तो शब्द तोडून लिहिता एकच लिहावा (भाषा वैशिष्ट्य लिहिता भाषावैशिष्ट्य किंवा शाळा सोबती लिहिता शाळासोबती असे.. कारण चा, ची, चे, च्या हे विभक्ती प्रत्यय लागतात - शाळेचा सोबती.. समजा 'शाळेतला/ शाळेतील सोबती' असे सप्तमी द्वितीया अर्थाने असेल तरीही शब्द एकत्रच येतो)

हाच नियम द्वितीया विभक्ती साठी - जसे वरती 'निकालानंतर' असं लिहिलंय, निकाला नंतर असं नाही.. तोडून लिहायचे झाल्यास षष्ठी तत्पुरुष वापरावा - निकालाच्या नंतर

षष्ठी तत्पुरुष असताना जातींची व्यवस्था या अर्थाने असणारा शब्द जातिव्यवस्था असा होतो म्हणजेच ति ऱ्हस्व होतोहेच स्फूर्तिस्थान, शक्तिपीठ याबाबतीत.

जा, दे, पी, खा असे मूळ धातू असलेल्या क्रियापदाचे धातुसाधित होताना जाऊन, देऊन, पिऊन, खाऊन हे योग्य.. पण ठेव, अडकव चे शेवटी आल्याने तो बदलून ठेवून, अडकवून होते.. ठेऊन, अडकऊन असे लिहू नये हे त्यांनी सांगितले. राहणे, रहाणे, राहाणे हे तिन्ही प्रचलित असले तरी त्यापैकी राहणे हा शब्द जास्त योग्य.. तेच पाहणे, वाहणे च्या बाबतीत.

चिकटवणे की चिटकवणे याबाबतीत अनेकांचा गोंधळ होतो. पण मूळ शब्द चिकट असल्याने चिकटवणे हेच योग्य.

मुलाचे नाव म्हणून वेदांत चूक आणि वेदान्त योग्य, तेच 'वेदांमध्ये' या अनेकवचनी अर्थाने असल्यास वेदांत योग्य. दोन्हीचे उच्चार वेगवेगळे.

नवीन नियमांप्रमाणे ठराविक, लवचिक, दुर्मिळ हे चूक आणि ठरावीक, लवचीक, दुर्मीळ हे योग्य
'पेक्षा, हून' आणि 'प्रमाणे, नुसार, सम, सारखा' हे प्रत्यय तुलना किंवा साम्य दर्शवत असल्याने ते आधीच्या शब्दाला जोडूनच आले पाहिजेत, हाच नियम 'करिता, साठी, सुद्धा, ही, देखील' या प्रत्ययांसाठी.
'ज्या वेळी, त्या तिथे, त्या ठिकाणी' असे शब्द तोडूनच आले पाहिजेत.

एकारान्त आडनावे असताना त्या व्यक्तीविषयी बोलताना आपलं  त्यांच्याशी असलेलं अंतर लक्षात घेऊन बोलावं. मी पुल देशपांड्याना भेटलोय, वपु काळ्यांना पाहिलंय असं म्हणता देशपांडेंना, काळेंना असं म्हणावं. देशपांड्या, काळ्या यात उगाच सलगी, मैत्री जाणवते. थोडक्यात पाटील, दामले, गडकरी या माझ्या मित्रांना मी गपे पाटला, अबे दामल्या, गडकऱ्या म्हणू शकतो.. पण शंकर पाटील, केशवसुत किंवा राम गणेश (किंवा अगदी नितीन) गडकरी यांना तसं म्हणू शकत नाही.

आदर या भावनेलाही आदर द्यावा जरा.. आणि शुद्धलेखनालाही.

- पराग पुजारी