साधा वारकरी ते बालशिवाजी: एक प्रवास
ही फजिती नाहीये तर एक्च्युअली ध्यानीमनी नसताना मिळालेल्या प्रमोशनबद्दल बोलू काही असं आहे. म्हणजे त्याच झालं असं की वन्स अपॉन अ टाइम मी चौथीत होतो. बापट बाल शाळा या सांगलीतील प्रसिद्ध प्राथमिक शाळेत फायनल इयरला म्हणजे चौथीत होतो. पाचवीपासूनच्या माध्यमिक शिक्षणासाठी सांगलीतील दोन आघाडीच्या फेमस शाळा म्हणजे सिटी हायस्कुल आणि कन्या पुरोहित प्रशाला.. पैकी पुरोहित शाळा मुलींची असल्याने तिथे मी मुलगा असल्याने मला प्रवेश मिळणार नव्हताच (तिथले काही सुंदर चेहरे पुढे इंजिनियरिंगला वालचंदला भेटलेच). आणि तसही आम्हाला सिटी हायस्कुलच पाहिजे होतं. आम्हा गावभागवाल्याना सिटी हायस्कुल अगदीच जवळ. अर्थात तिथे मेरीटवरच प्रवेश मिळायचा.
आताशा वयोमानानुसार नेमके निमित्त स्मरत नाही, पण शिवजयंती किंवा असाच तत्सम प्रसंग असावा. बापट बाल, म के आठवले या प्राथमिक आणि सिटी हायस्कुल, मालू हायस्कुल, पटवर्धन शाळा, कन्या पुरोहित प्रशाला या माध्यमिक अशा सर्व शाळा या सांगली शिक्षण संस्थेच्या छत्राखाली असलेल्या. तर आम्ही चौथीत असताना कसलीशी दिंडी की मिरवणूक प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांतर्फे निघणार असे काहीसे होते. हे कशासाठी वगैरे आधी काही माहीत नव्हते. पण लेझीम जमते त्यांनी हॉलमध्ये जमा अशी काहीशी दवंडी पिटवण्यात आली होती. आम्ही काहीजण गेलो. तिथे कळले की बरेच वारकरी, काही मोजके मावळे आणि एक किंवा दोन बालशिवाजी यासाठी निवडले जाणार आहेत.
आमची हॉलमध्ये प्रॅक्टिस सुरू झाली. सुरुवातीला सगळेच वारकरी होते. मस्त रिदम पकडून ते ग्यानबा तुकाराम करायला मजा येत होती, म्हणून आम्हीही काही मित्र वारकरी झालो. मग वारकऱ्यांमधूनच ५-६ मावळे आणि १-२ बालशिवाजी निवडले जाणार होते. तसे ते निवडलेही गेलेत असं २-३ दिवसांनी समजलं. मग त्या मावळ्यांना आणि शिवाजींना वेगळ्या काही सूचना दिल्या जायच्या, आता ते आमच्यात नाचायला नसायचे. कारण मावळे आणि शिवाजी एका मोठ्या ट्रेकटरमध्ये किंवा ओपन टेम्पोत आणि त्या पुढे काही आणि मागे काही वारकरी असं त्या दिंडीच स्वरूप होतं.
पण मग आणखी मावळे लागणार आहेत असं काहीतरी ठरलं त्यांचं (बहुतेक ट्रेकटर किंवा टेम्पोत जिथे उभं राहायचं होत ती जागा बऱ्यापैकी मोठी आहे हे कळलं असाव त्यांना एव्हाना), मग पुन्हा वारकऱ्यांमधून काही मावळे निवडले जाणं आलंच, यात नेमका माझा नम्बर लागला. खरतर मला वारकरी म्हणून रस्ताभर ग्यानबा तुकाराम करत हातात लेझीम नाचवत फिरायला मिळणार म्हणून आनंद झाला होता. आता मात्र नुसत एका जागी उभं राहावं लागणार होतं. पण घरी आईबाबा म्हणाले, "अरे चांगलंय की. नुसतच खूप वारकऱ्याच्या गर्दीत हरवून जाणाऱ्या वारकऱ्यापेक्षा मावळा, तोही महाराजांचा मावळा करतायत तुला, तर नाराज कशाला होतोस".. मग मीही असूदे म्हटलं.
पुन्हा सराव सुरू झाला, पण आम्ही नेमकं काय करणार आहोत हे कळलं नव्हतं, फक्त कुठलीशी एक मूर्ती सांगली शिक्षण संस्थेत येणार होती, ती सिटी हायस्कुलमध्ये या ट्रॅक्टरमधून न्यायचीय आणि त्यासोबत हा सगळा लवाजमा असणार असं कळलं होत. आता आम्हा मावळ्यांना कस उभं राहायचं, ट्रॅक्टर सुरू असताना बाहेर न बघता शिवाजीकडे बघत राहायचं आणि हातात भाला घेऊन शांत उभं राहायचं, अधूनमधून घोषणा द्यायच्या, जयजयकार करायचा वगैरे धडे दिले जात होते. तर शिवाजी झालेल्या दोघांना मूर्तीसमोर नतमस्तक होऊन खाली बसून करंगळीवर तलवार धरून गुडघ्यावर कस बसायचं, हे सांगितलं जात होत, पण त्या दोन बालशिवाजींपैकी एक जण त्यांच्या मते शिवाजी म्हणून तितकासा शोभत नव्हता, पण तरी तो रिहर्सल्समध्ये तेव्हापुरता तरी शिवाजी होता.
सराव करत करत एक दिवस ड्रेपरीवाल्याकडे जाण्याचा दिवस उजाडला. आम्हाला सगळ्यांना घेऊन सर त्या दुकानात गेले. तिथला माहोल बघून आम्ही पोरं तर हरकूनच गेलो आणि मला खरच भारी वाटू लागलं की बर झालं आपण मावळा झालो ते. वारकरी म्हणून नुसतं धोतर सदऱ्यात जावं लागलं असत, आता मात्र आपल्याला हा मस्त मावळ्याचा पोशाख घालायला मिळणार, मावळे घालतात तसा छातीवरून एका बाजूला ओढलेला पूर्ण पांढरा सदरा, डोक्यावर मावळ्याची लाल आडवी पगडी, हातात भाला आणि छान मजबूत जोडे. आम्हा मावळ्यांना तयार केलं गेलं तेव्हा तिथेच दोन्ही शिवाजींनाही त्यांचा ड्रेस घालून तयार केलं जात होतं. शिवाजीचा ड्रेस तर एकदमच भारी होता. तो जो डाउटफूल बाल शिवाजी होता तो तर आता त्या ड्रेसमध्ये अजिबातच शिवाजी म्हणून शोभून दिसत नव्हता.
बरच फिरत फिरत गावातले बरेच भाग कव्हर करत शेवटी सिटी हायस्कुलमध्ये जावं लागणार होतं, किमान एक दीड तास तरी चालणार होती दिंडी.. त्यामुळे एक शिवाजी असून चालणार नव्हतं.. आळीपाळीने दोन्ही शिवाजींनी खाली गुडघ्यावर बसायचं, दुसरा गुडघा न वाकवता.. इकडे तिकडे न बघता.. करंगळीवर ती दिलेली छोटी तलवार धरून, मग एकावरच भार पडू नये, त्याचे बसून बसून हात, पाय आणि मान दुखू नयेत म्हणून ही खबरदारी की दोनजण असावेत. आता ऐनवेळी दुसरा शिवाजी कुठून आणायचा, अर्थातच तिथे तयार दिसणाऱ्या मावळ्यांकडे नजर फिरवली गेली, आणि अचानक अस्मादिकांना बोलावले गेले. "पराग, तू तो मावळ्याचा ड्रेस काढ आणि हा घालून दाखव" असा हुकूम सोडला गेला.
शिवाजीचा ड्रेस तर अर्थात मावळ्यापेक्षा भारी होता. भारी भरजरी अंगरखा, कानातले मोठे डूल, कपाळावर टिळा, दोन्ही मनगटावर आणि बाहूंवर छोटे बिल्ल्यासाखे काहीतरी, डोक्यावर जबरी जिरेटोप, पुढची बाजू मिशीसारखा पीळ मारून वरती वाकलेली असे पायातले वेगळेच कसलेसे जोडे, कमरेला तलवार आणि म्यान, बोटांमध्ये १-२ अंगठ्या आणि गळ्यात ३-४ मोत्यांच्या माळा असा मस्त ड्रीम पेहराव. तो पोशाख परिधान केल्यावर मला न्याहाळलं गेलं, त्यांचे चेहरे एकदम प्रफुल्लित झाले, बेस्ट, छानच शोभतोय की हा, यालाच का नाही केलंत आधी शिवाजी वगैरे ते एकमेकांत बोलत होते.
"हां झालं, आता तू शिवाजी"
मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच भारी वाटलं. परवापर्यंत मी गर्दीतला एक वारकरी होतो, आणि आता थेट एकदम शिवाजी. आईबाबाही प्रचंड खुश झाले. पण तलवार कशी धरायची, कस बसायचं वगैरे पुन्हा मला नव्याने त्यांना शिकवाव लागलं. दिंडीचा दिवस आला. ट्रॅक्टरमधून त्या मूर्तीसोबत दोन बालशिवाजी (सोमनाथ गाडगीळ, पराग पुजारी) आणि काही मावळे (समीर कुलकर्णी, अनिश शहा, निखिल देशपांडे, चेतन ढोबळे वगैरे) निघाले. आधी सोमनाथ तलवार घेऊन खाली ऐटीत बसला, मग थोड्या वेळाने त्याला विश्रांती आणि मी खाली बसलो.. हे असं आळीपाळीने सुरू राहिलं ५-६ वेळा तरी. उजवा गुडघा खाली टेकवून डावा गुडघा काटकोनात आणि उजव्या हातात तलवार धरून डाव्या करंगळीवर ती ठेवायची अशी आमची पोझिशन. आम्ही त्या भवानी तलवारीने करंगळी कापून रक्त सांडून त्या मूर्तीसमोर स्वराज्याची शपथ घेत आहोत असा तो सीन. आणि मावळे घोषणा देताहेत शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवबा, जय शिवाजी जय
ज्या ज्या रस्त्यावरून गेलो त्या प्रत्येक ठिकाणी, चौकात बरीच गर्दी दिसली. सगळे लोक थांबून थांबून त्या ओपन ट्रॅक्टरमध्ये कौतुकाने पाहत होते की कोण झालाय शिवाजी, मूर्ती कशी आहे, मावळे किती आहेत.. बराच वेळ फिरत फिरत शेवटी आम्ही सिटी हायस्कुलमध्ये पोचलो. संध्याकाळ झाली होती, मूर्ती सन्मानपूर्वक बाहेर आणून ठेवली गेली. आम्हाला एका वर्गात बसवून श्रमपरिहार म्हणून कांदेपोहे दिले गेले.
आता ही मूर्ती कोणती, तर मित्र हो, सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की सिटी हायस्कुलमध्ये प्रवेश करताच दर्शनी भागातील स्टेजच्या वरती उंचावर जी जिजाऊ आणि बालशिवाजी यांची तेजस्वी पांढरीशुभ्र मूर्ती दिसते, तीच ही मूर्ती होती. ती शाळेत आणण्यात आमचाही असा महत्त्वाचा वाटा होता. पुढच्या वर्षी याच शाळेत प्रवेश घेतल्यावर सहा वर्षे सतत अभिमानाने ती मूर्ती पाहत राहिलो. तेव्हा दहावीला निकालाची गुणवत्ता यादी म्हणजेच बोर्ड सिस्टीम होती, बोर्डात झळकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार असायचा तेव्हा त्यांना प्रमुख पाहुणे, अध्यक्ष आणि एखाद्या सरांसोबत तिथे वरती नेले जायचे आणि त्या मूर्तीला त्यांच्या हस्ते हार घातला जायचा, सोबत मैदानात बसलेल्या शेकडो मुलांचा टाळ्यांचा कडकडाट अशी प्रथा होती. मूर्ती घेऊन येत असताना आमचे बरेच फोटोही काढले गेले होते, पण इथे मूर्तीचा फोटो देतोय.
मूर्ती स्थापन केल्या दिवसापासून बाहेरून रस्त्यावरून जाणारे अनेक लोक जाता येता त्या मूर्तीला नमस्कार करून जातात... अगदी आजही. आणि आता तर आमचे घरच सिटी हायस्कुलसमोर आहे. भारी वाटत, ती प्रेरणादायी मूर्ती सतत डोळ्यासमोर.
--पराग पुजारी
No comments:
Post a Comment