Thursday, 25 August 2016

(प)रागदारी 1

बेशरमी की हाईट

(राग: स्वैराचार हाच शिष्टाचार)

नमस्कार, हिंदी चित्रपटसृष्टीची आजवरची वाटचाल जर नीट अभ्यासली तर असे दिसून येते की इंडस्ट्रीच्या यशाचा मोठा भाग चित्रपटांमधील गाण्यांनीही व्यापला आहे. सिनेमाच्या प्रमोशनमध्ये म्युझिक लॉन्चला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे ते यामुळेच. '(प)रागदारी’ या सदर सदरातून निरनिराळ्या अनोख्या रागांमधील गाणी नव्याने समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. याद्वारे आजच्या काळातील नवनवीन प्रचंड दर्जेदार, कायच्या काय असामान्य आणि अतिक्रिएटिव्ह अशा गीतांचे आपण रसग्रहण करणार आहोत. आम्हाला खात्री आहे की या गाण्यांमधून तुम्हालाही या शब्दांची न कळलेली ‘दुसरी बाजू’, किंबहुना न कळलेली महतीच आम्ही समजावून देऊ शकू. संगीत क्षेत्रात कार्यरत असणारे आजचेही कलावंत किती प्रतिभावान आहेत याचाही तुम्हास भस्सकन प्रत्यय येईल.

आज आपण आजूबाजूस पाहतो की जग किती झपाट्याने बदलत चालले आहे. मग सध्या 'आमच्या काळी असं नव्हतं हो' हा डायलॉग अधिकाधिक वेळा, ठिकाणी, प्रसंगी आणि वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींकडून ऐकू येत असल्यास त्यात नवल ते काय! आजकालच्या तरुण पिढीचेच घ्या ना - या पिढीवर घरातून नव्हे तर बाहेरून संस्कार होतात. प्रसारमाध्यमे, भोवतालचे जग, प्रगत तंत्रज्ञान यांनी केलेले संस्कार आणि त्यातून शिकायला मिळणाऱ्या कलाच ते पटकन अवगत करतात. म्हणजे काय हेच आज आपण थोडक्यात सविस्तरली पाहणार आहोत. 

तर आज आपण रसग्रहणासाठी निवडलेले पहिले गाणे आहे - 'मैं तेरा हिरो' या सिनेमातील आणि 'स्वैराचार हाच शिष्टाचार' या रागातील 'बेशरमी की हाईट'. साजिद वाजिद यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत गायलेआहे बेन्नी दयाल आणि शाल्मली खोलगडे यांनी. तर लिहिले आहे कुमार यांनी.



इमानदारी की बीमारी
छोड दे आजा, दौड के आजा
ओ करे दिल तुझको इन्व्हाईट
हो सारी नाईट बेशरमीकी हाईट

वा वा वा, कविवर्य म्हणतात की इमानदारी की बीमारीम्हणजेच प्रामाणिकपणा हा एक प्रकारचा आजारचआहे. खरेच आहे की, पटत नसेल तर प्रेमात पडूनआणि घरी खरे बोलून प्रेयसी वा प्रियकराला भेटायलाबाहेर जाऊ पाहणाऱ्यांना विचारा. म्हणूनच या काव्यात असा सल्ला देण्यात आला आहे की प्रियकराला भेटायला जाताना प्रेयसीने हे उगाच असले ओनेस्टीचे चोचले पुरवू नयेत. हे असले नसते भलतेसलते संस्कार आणि मूल्ये फॉलो करत बसली वेडी, तर भेट नाही झाली की किती सलते ते कळेल मग तिला. खरेच हेभलते अवघड असते.

उलट या जालीम बेरहम दुनियेची जराही चिंता न करताधावत धावत अपुल्या साजणाला (कितवा ते डझन्टम्याटर, पण शक्यतो पहिलाच) भेटायला जावे. कारण साजणाचे दिल साजणीला आर्त साद घालते आहे. तरतिनेही त्यास अनिवार्य प्रतिसाद देऊन पुढचा मागचा विचार न करता त्याच्या अनिवार ओढीने त्याचे दर्शनघेण्यास जावे. शक्यतो रात्री जावे, त्यातच जीवनातीलखरे थ्रिल सामावले आहे. आणि मग काय सारी रात्रभर मनसोक्त धिंगाणा घालावा. कोण माई का लाल त्याविषयी अधिक काही माहितीच्या अधिकाराखाली विचारणार आहे नाहीतरी? म्हणून आला क्षण एन्जॉय करावा आणि लाजलज्जा वगैरे अश्मयुगीन काळातील आउटडेटेड स्वभाव अलंकार सोडून प्रियकरासोबत रममाण व्हावे, अद्वैत साधावे. जगापासून लपूनछपून असे तादात्म्य पावण्यातील आनंद काही वेगळाच. तो या नश्वर भूतलावर सर्वांनाच घेता येत नाही.

मग पुढे जे होईल त्यास निसर्ग जबाबदार. बेशरम व्हा,निर्लज्ज व्हा आणि जीवनाचा पुरेपूर आनंद लुटा. हेआयुष्य तुमचे आहे, यावर फक्त तुमचा हक्क आहे, त्यातकाय घडावे काय नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्ततुमचा आहे, कुणाला कधी कुठे भेटावे हेही तुम्हीचठरवले पाहिजे, कुणाचाही मुलाहिजा बाळगू नका, अरे कोण आई कोण बाप, होत असतील डोक्याला ताप तरव्हा बेशरम निघा सुसाट, व्हा सैराट असा खोल संदेश देणारे हे गीत अप्रतिमच. आईवडिलांनी मुलांवर केलेले व्यर्थ संस्कार मुळातच भंगार असतात, तसल्या घाणेरड्या जोखडातअडकू नये. नम्र, आज्ञाधारक असणे ही शरमेची बाबआहे. निर्लज्जम सदा सुखी ही उक्ती लोकांना केवळ माहीत असते पण तीवर दे दणादण अंमलदेखील करावा असे यातून सुचविण्यात आले आहे.       

इक तू.. इक मैं.. और हो डीम डीम ये लाईट
हो सारी नाईट बेशरमीकी हाईट

लाईट्स डीम डीम होऊदेत म्हणजेच मंद व्हावेत अशी अपेक्षाही पुढे व्यक्त करण्यात आली आहे. काळबदलला तरी प्रेम चिरंतन असते, आधुनिक काळातही ते फक्त माध्यम बदलते, भावना नाही हे यातून कवीला सुचवायचे आहे. नाहीतर तुम्हीच सांगा - "सखी मंदझाल्या तारका, आता तरी येशील का"  आणि "दौड केआजा, हो डीम डीम ये लाईट" यात तत्त्वत: काय फरक आहे? काळाबरोबर पावले टाकत अभिव्यक्तीचे माध्यम भले बदलले असेल जरूर, तरी त्यामागील प्रेमाचीभावना तर तीच आहे ना, हे महत्त्वाचे. आशय शेम टूशेमच ना! करेक्ट, ही शेम अर्थात लाज तेवढी सोडली पाहिजे, बाकी काही नाही. त्याशिवाय बेशरमी की हाईट प्रत्यक्षात कशी बरे येणार, सुफळ संपूर्ण कशी बरेहोणार? आंग्लाळलेल्या तरुणाईस जोरदार प्रोत्साहन द्यायचे असल्याने कवीकडून शब्द हुशारीने गुंफण्यात आले आहेत (कर्मणि प्रयोग).

"लूक प्राणेश्वरी, तू तशीही दिवेलागणीची वेळ उलटून गेल्यावरच येणार आहेस, तर मग जाऊदेत ना सारे दिवे विझून. त्यांची कशाला अडचण. लोडशेडींगची इतकी भयानक समस्या आज सामान्य जनतेला भेडसावत असताना आपण आणखी दिवे जाळणे योग्य वाटत नाहीप्रिये. शेवटी काही झाले तरी आपण या समाजाचे काही देणे लागतो यार, होता होईल तितकी मदत केली पाहिजे मेरे प्यार", अशा उदात्त भावनेतून देण्यात आलेला संदेश केवळ विलक्षणच.    

अरे बिगडा हू मैं यू
थोडा तू भी बिगड जा
अरे आगे बढू मैं
थोडा तू भी आगे बढ जा

यापुढे नायक नायिकेस म्हणितो की ‘हे प्राणसखे, मी तरबिघडलोच आहे. माझ्यासोबत तूही बिघड’. माणसाची जडणघडण होणे किती महत्त्वाचे आहे हे यातून मनावर ठसवले गेले आहे. 'आम्ही घडलो एकदाचे, तुम्ही बीघडा' ह्या अर्थाने हे असावे. म्हणजेच तुम्हीसुद्धा घडा,स्वत:ला घडवा. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हाचअर्थ यातून निघत नाही काय? 'मी आवश्यक ते कष्ट घेतआहे, त्यासाठी इनफ पुढाकार घेत आहे, तर तूही चार पावले पुढे टाक आणि माझी साथ दे.' वा वा वा, ह्यालाम्हणावे आपल्यासोबत जोडीदाराच्याही प्रगतीचा, करियरचा विचार करणे, त्यालाही प्रोत्साहित करण्यातला आनंद मिळवावा तो असा.

आज नियत थोडी होने दे खराबसी
दिखने लगी है इन हवाओ मैं शराबसी

नायिकेच्या मते, हे उद्दिष्ट सत्कारणी लागण्यासाठी आज नियत थोडीफार खराब झाली तरी हरकत नाही, होऊदे खर्च लफडं आहे घरचं. शेवटी कामगिरी फत्ते होणे महत्त्वाचे. ही अवघी हवाच तिला आता जादुई भासू लागली आहे, मद्याचा अंमल जाणवू लागला आहे. या बेहोशीत आपणही सामील होऊ असे ती प्रियकरास विनवत आहे. .

सारी की सारी है जो खुमारी
आ दोनो पी ले लम्हे नशीले
करे हमको ये बडा एक्साईट
हो सारी नाईट बेशरमी की हाईट

हा माहोल सारखा सारखा मिळत नाही. ही नशा, ही मजा पुरेपूर अनुभवली पाहिजे. हे धुंद वातावरणआपणास आता आणखीनच बेधुंद करू लागले आहे. ही सारी रात्र  निर्लज्जपणा साजरी करण्यासाठी आपणचआपल्याला अलॉट केली आहे, तर तिचा पूर्ण आस्वाद घेऊ, सॉल्लीड सैराट होऊ नि फुल झिंगाट होउन धुडगुस घालू, हे म्हणणेही सिच्युएशनला धरून रास्तच.
दिल ये गायब होगया है अपनी जगह से
जो भी हुआ है वो हुआ है तेरी वजह से

हे हृदय आपल्या जागेवरून कुठेतरी गायब झाले आहे.आपली एखादी गोष्ट हरवली असेल, सापडत नसेल वा नजरचुकीने मिसप्लेस झाली असेल तर आपण किती भांबावून जातो. 'स्व'ची यथायोग्य जाणीव असल्यास स्वत:च्या हलगर्जीपणाला आणि दैववादी असल्यास नशिबाला दूषणे देऊ लागतो, पण येथे असे सुचविण्यात आले आहे की आपल्या हृदयाची केस मात्र जर वेगळीअसते. इतर गोष्टींच्या बाबतीत आपण हवालदिल होतो,पण हृदय अर्थात दिल या बाबतीत आपण संबंधितव्यक्तीला दोष देऊ शकतो. हृदय चोरीस जाणे ही एकमेव चोरी अशी आहे की ह्यात चोर महान वाटू लागतो, तो आपल्या आयुष्यात आला म्हणून आपणच स्वत:ला इन वन ऑर अनादर वे भाग्यवान समजू लागतो. तेव्हा त्या व्यक्तीचा अनादर न करताही तिला हे सांगण्याचे स्किल डेव्हलप केले पाहिजे. ते ऐकून तिलाही स्वत:बद्दल भारीवाटले पाहिजे राव.

लेनी है सांसे मुझे अब तेरे साथ में
कहीं भी लेजा हाथ लेके तेरे हाथ में

पुढे तर पहा, नायिकेचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्पष्टपणेदिसून येतो. ती म्हणते मला माझे उरलेले श्वासदेखीलआता तुझ्यासोबतच घ्यावयाचे आहेत माझ्या राजा. ये,आणिक माझा हात हातात घेऊन मजला कुठेही घेऊनजा. इथे मात्र काही चळवळे लोक असा आरोप करूशकतात की ही तर शुद्ध छळवणूक झाली. या पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुष जाईल त्यामागे स्त्रीनेदेखील गप मान खाली घालून जायचे हे कुठवर चालणार? आज एकविसाव्या शतकातही हेच होणार का राव? काय वाटेल तृप्ती देसाईला? पण नायक नायिका पुरोगामी असल्याने अशी शंका घेऊ नये.ते सज्ञान असून त्यांचा निर्णय ते घेऊ शकतातच की, किमान तेवढे स्वातंत्र्य तरी त्यांना द्या.

है जवानी, करे शैतानी
इस उमर में, दिल के सफर में
क्या राँग है, क्या है राईट

अरे तरुण वय आहे, थोडा चावटपणा, वात्रटपणाचालणारच. आत्ता नाही तर काय म्हातारपणी उटपटांग हरकती करणार? तेव्हा तर लोक अजून बोंबा मारतील - ' शी, काय हे, शोभतं का हे असलं या वयात. जनाची नाही मनाची तरी?' त्यापेक्षा आत्ताच जरा मजामस्ती केली तर काय बिघडलं. म्हातारपणी एन्जॉय करूच की काठी हातात, कवळी तोंडात आणि पोक थकल्या पाठीत, कळ गुडघ्यातल्या वाटीत. पण आत्ता काय? हाच तो क्षण हीच ती वेळ, करू एन्जॉय घालू धिंगाणा.  काय चूक काय बरोबर हा फडतूस विचार करण्याची ही वेळ नव्हेच मुळी.

संपूर्ण काव्य नीट पहा, इन्व्हाईट, एक्साईट, राईट, लाईट आणि हाईट - वाह, पहा यमकही काय अफलातून सहजगत्या जुळवले आहे. असे अजिबातच वाटत नाहीकी ते ओढून ताणून जुळवण्यात आले आहे. कवीची अलौकिक प्रतिभा!

असो, तर ह्या जवानीत आत्ता फक्त मजा मारू, उद्याकाय ते भोगू. हा जबर आत्मविश्वास, येणाऱ्यापरिस्थितीला सामोरे जायला एनीटाइम तयार असणेअशा गोष्टी शिकवणारे हे गीत अमूल्यच म्हटले पाहिजे.

तर हे होते आजचे क्वालिटी सॉंग. लवकरच असेच आणखी एखादे क्वालिटी सॉंग पाहू आणि जगण्याचा आनंद द्विगुणीत करू. तोपर्यंत गाठा उंची निर्लज्जतेची, त्यासाठी जी तोड मेहनत करा, झटका आळस गाठा कळस... अरे बघताय काय, सामील व्हा... होऊन जाऊदे बेशरमी की हाईट...

No comments:

Post a Comment