* दुसरा गांगुली होणे नाही * (८ जुलै २०१८)
२००३ वर्ल्डकप फायनलपर्यंत आपण जिद्दीने गेलो, तिथे ज्यांनी आपल्याला उपविजेते बनवलं त्यांच्या घरी त्याच वर्षाच्या शेवटी आपण दौरा केला. एडलेड टेस्टचा विजय, द्रविड सचिनची द्विशतके, लक्ष्मणची दोन शतके, आगरकरच्या सहा विकेट्स इत्यादी गोष्टींसाठी तो दौरा संस्मरणीय ठरला. पण मला नेहमीच असं वाटत आलंय की त्या दौऱ्याचा टोन खऱ्या अर्थाने पहिल्याच टेस्टमध्ये एका खेळाडूने सेट केला होता. या पहिल्याच ब्रिस्बेन टेस्टमध्ये त्याने जलद १४४ ठोकल्या, पावसामुळे टेस्ट अनिर्णीत झाली, पण त्या शतकी खेळीने आपल्या इतर फलंदाजांना मिळालेला आत्मविश्वास पुढच्या संपूर्ण सिरीजमध्ये दिसून आला. आपल्या कप्तानाने ब्रिस्बेनला ‘हे बघा, इतकी साधी आहे यांची बॉलिंग, मी १९६ मध्येच १४४ ठोकू शकतो, तर तुम्हीही पुढे हा दौरा गाजवू शकताच’ असं आपल्या बॅटने सांगत आपण त्यांच्याशी टक्कर घेऊ शकतो हा आत्मविश्वास स्वत: लीड फ्रॉम फ्रंट करत दिला होता. तो कप्तान होता अर्थात सौरव गांगुली - आजचा बर्थडे बॉय. हॅपी बर्थडे सौरव!!!
जून १९९६ पर्यंत खुद्द सौरवलाही वाटलं नसेल की तीन आठवड्यात येणाऱ्या आपल्या बर्थडेपूर्वी आपल्या नावावर दोन शतके असतील आणि आपण पदार्पणातच सामनावीर, मालिकावीर झालेले असू. त्या इंग्लंड दौऱ्यावर सरदारजी सिद्धूचे कप्तान अझरशी कहीतरी वाजले आणि मध्येच दौरा सोडून त्याने भारताचे विमान पकडले. मग सलामीला आपण नयन मोंगिया आणि विक्रम राठोड वगैरे महानुभाव पाठवले. संघात रिकामी झालेली सिद्धूची जागा गांगुलीला मिळाली, आणि त्याच लॉर्डस टेस्टच्या दिवशी सकाळी अनफिट ठरलेल्या संजय मांजरेकरच्या जागी राहुल द्रविडला संधी मिळाली. या लॉर्डसवर गांगुलीने दिमाखदार शतकी पदार्पण केलेच, पण लगेच पुढच्या टेस्टमध्येही शतक मारले. जोडीला काही विकेट्स घेऊन तो चक्क मालिकावीरही झाला. ही अशी सुरुवात कोणत्याही खेळाडूसाठी स्वप्नवतच, मग चार वर्षांपूर्वीच वनडेत संधी मिळूनही बाहेर झालेल्या खेळाडूसाठी तर अगदीच विशेष. पुढे सहारा सिरीजमध्ये तर पाक टीमवर जणू एकहातीच दादागिरी करत पाचपैकी चार सामन्यात तो सामनावीर झाला. १९९९ वर्ल्ड्कपला काय करावं या माणसानं.. गतविजेत्या श्रीलंकेची बॉलिंग वास, मुरलीसकट झोडपून काढत तब्बल १८३ धावा हाणल्या, पुढे तो आपला कप्तानही झाला. (किंबहुना वनडेत जो १८३ करेल तो टीमचा कप्तान हा सिम्पल क्रायटेरिया त्याच्यापासूनच सुरु झाला जो पुढे धोनी, कोहलीने आणखी मजबूत केला.)
२००० साली मॅच फिक्सिंगच्या वादात अडकलेल्या आपल्या टीमचा त्याला कप्तान करण्यात आले आणि त्याची खरी परीक्षा सुरु झाली. खेळाडू म्हणून त्याची सुरु असलेली दादागिरी आता कप्तान म्हणूनही सुरु राहते का याकडे अर्थात अनेकांचे लक्ष. अझरच्या अत्यंत नकारात्मक पॅसिव्ह नेतृत्वाची सवय झालेल्या आपल्या टीमला गांगुलीच्या सकारात्मक आक्रमक नेतृत्वाखाली रुळायला थोडा वेळ लागला जरूर, पण मग टीम जी काय सुटली ती सुटलीच.
गांगुलीचे कप्तान म्हणून खरे यश दोन गोष्टीत आहे. एक म्हणजे परदेशात आपल्याला कसोटी जिंकायला त्याने शिकवलं. हे कुंबळेने गांगुलीच्या फेअरवेल सेरेमनीतही अभिमानाने सांगितले होते. आणि दुसरं म्हणजे गुणी खेळाडूंना पारखून घेत त्यांना घडवणं. यात सेहवाग, युवराज, झहीर, हरभजन आणि धोनीही आला. पण तो फक्त तरुण खेळाडूंना पाठिंबा देत सीनियर खेळाडू त्यांची काळजी स्वत: घेतील असं म्हणत राहिला का? तर तसंही नाही. आणि इथेच तो जास्तच आवडून जातो. २००३-०४ च्या त्याच ऐतिहासिक ऑसी दौऱ्यावर फॉर्मशी झगडत असलेल्या कुंबळेला पाठवायला निवड समिती राजी नव्हती. तेव्हा हाच होता तो वॉरीयर प्रिन्स जो मीटिंगमध्ये म्हणाला होता की 'कुंबळे तिथे परफॉर्म करेल, विश्वास ठेवा. त्याचे नाव टीममध्ये नसेल तर मी इथून उठणारच नाही. आणि तो जर तिथे फेल गेला तर मी कप्तानी सोडेन'. स्वत:ची पोझिशनही पणाला लावत इतका टोकाचा सपोर्ट अनुभवी आणि योग्य खेळाडूला देताच काय झालं, तर कुंबळेने त्या दौऱ्यावर सर्वाधिक २४ विकेट्स घेतल्या. खेळाडू ज्युनियर असो की सीनियर, कप्तानाचा तुमच्यावर विश्वास असेल तर कामगिरी आणखी बहरते ती अशी. तो ऑसी दौरा गाजवून झाला, मग पाक दौरा जिंकून झाला, पहिले शतक ठोकल्यावर जिथे आपल्या सहकाऱ्याना टाळ्या वाजवताना पाहिले त्याच लॉर्डसच्या ऐतिहासिक गॅलरीत नॅटवेस्ट सिरीज जिंकल्यावर शर्टही काढून झाला.
मग २००४ नागपूर टेस्टच्याच वेळी या लढाऊ दादाला काय झालं? ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सुरु होताना काही वेळ आधी पिचवरचे गवत पाहून माघार घेणारा हा कप्तान टीमला नवीन होताच पण मनोबल खच्ची करत बुचकळ्यातही टाकून गेला. पुढे त्याच्या बॅटनेही संप पुकारायला सुरुवात केली. हे कमी म्हणून की काय ज्याला त्यानेच हट्टाने आपला कोच म्हणून आणले त्याच ग्रेग चॅपेलशी वाद झाल्यावर तर त्याच्यासाठी टीमचे दरवाजेच बंद झाले. २००३ फायनलला नेणारा कप्तान २००७ वर्ल्डकपला असेल तरी की नाही असं वाटू लागलं. हे सगळंच तमाम क्रिकेटप्रेमींसाठी शॉकिंग होतं. पुढे २००६-०७ साउथ आफ्रिका दौऱ्यासाठी त्याची निवड झाली ती त्याची चांगली डोमेस्टिक कामगिरी पाहून नि आफ्रिकेविरुद्धचे त्याचे चांगले रेकॉर्ड लक्षात घेऊन. महाराजाने संधीचे सोने केले आणि तिथे आपल्याकडून सर्वाधिक धावा त्याच्याच बॅटने ठोकल्या. मग वनडेतही चार अर्धशतके मारून वर्ल्डकपसाठी त्याची बॅट जोरजोरात निवड समितीचा दरवाजा ठोठावू लागली आणि निवड होताच तो २००७ वर्ल्डकपमध्येही चांगला खेळला. मग भारतात पाकविरुद्ध टेस्टमध्ये सलग दोन शतके, त्यातील एक २३९ हे तर त्याचे कारकिर्दीतील एकमेव द्विशतक. पण तरीही पुन्हा ऑस्ट्रेलियातल्या सीबी सिरीजसाठी त्याला डावलण्यात आलं. मग खराब श्रीलंका दौरा झाल्यावर आपल्याला सिरीजगणिक जज केलं जातंय हे लक्षात आल्यावर त्याने पुढे फार करियर लांबवलं नाही आणि सन्मानाने निवृत्त झाला. पण पुनरागमन कसं असावं हे त्याने दाखवून दिलं हे नक्की. अद्भुत टेस्ट पदार्पण केल्यावरही तो टेस्टपेक्षा वनडे क्रिकेटर म्हणून जास्त ओळखला गेला, पण पुन्हा संघात येण्यामागची त्याची प्रेरणा २००७ वर्ल्डकप खेळणे ही नव्हती तर शंभर टेस्ट्स खेळणे ही होती हे त्यानेही सांगितलंय, त्याच्या पुस्तकातूनही हे समजतं.
शेवटी गांगुली गांगुली म्हणजे कोण? तर शैलीदार गगनचुंबी षटकार ठोकणारा हुकमी एक्का म्हणजे गांगुली, समोर स्पिनर असताना तीनचार बॉल डॉट खेळल्यावर ‘आता पुढचा बॉल स्टेडियमबाहेर बघ’ अशा पैजा आम्ही ज्याच्या बॅटिंगवर लावल्या तो गांगुली, ज्याला अप्रोच करण्याची बुकींची जन्मात हिंमत झाली नाही तो कप्तान गांगुली, गाय विठ्ठल, महेंद्रसिंग ढोणी, लुंगी निगडी अशी नावे छापणाऱ्या मराठी वृत्तपत्रांनी ज्याचे नाव सुरुवातीच्या काळात बहुतेकवेळा सौरभ असे छापले तो गांगुली (आणि वर आपण म्हणतो की बंगाली लोक व ला ब म्हणतात), पहिल्या टेस्टपासून संपूर्ण टेस्ट करियरमध्ये एकदाही सरासरी चाळीसपेक्षा कमी न आलेला एकमेव भारतीय क्रिकेटर म्हणजे गांगुली, टेस्ट करियरचा शेवट शून्यावर बाद होऊन याबाबतीत ज्याने डॉन ब्रॅडमनशी साधर्म्य साधले तो गांगुली, फक्त भारतीयच नव्हे तर सर्वोत्तम जागतिक कप्तानांपैकी एक म्हणजे गांगुली, वनडेत एकवेळ सचिनच्या वेगालाही मागे टाकेल असा शतकांचा धडाका ज्याने लावला तो गांगुली, द्रविडसारख्या तंत्रशुद्ध खेळाडूकडून ‘गॉड ऑफ ऑफसाईड’ ही पदवी मिळून पुढे त्याच नावाने जगात फेमस झाला तो गांगुली, ज्याने भारतीय कोच निवडताना स्काईपवरून मुलाखत देणाऱ्या रवी शास्त्रीला आधी इंगा आणि मग ठेंगा दाखवला तो गांगुली, ज्याला भाजपने तू आमच्यात ये - तुला क्रीडामंत्री करतो अशी ऑफर दिली तो गांगुली, जो बंगालमधील आपल्या आवडत्या दुर्गापूजा यात्रेत लोकांनी आपल्याला ओळखून आपल्याभोवती गर्दी करू नये म्हणून दाढी लावून हरभजनची पंजाबी पगडी घालून गेला तो गांगुली, घरातून विरोध असताना डोनासोबत पळून जाऊन ज्याने लग्न केलं तो गांगुली (आणि बिचाऱ्या चॅपेलला कधी कळलंच नाही की हा इतका बंडखोर कसा), निवृत्तीनंतरही बंगाल क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआय टेक्निकल कमिटी ज्याने सांभाळली तो गांगुली, ज्याच्यामुळे ८ जुलै हा भारतीय मीममेकर्ससाठी नॅशनल अग्रेशन डे झाला आहे तो गांगुली. ऑस्ट्रेलियन क्रिकेटप्रेमी जर सिडनी क्रिकेट ग्राउंड SCG म्हणून मिरवत असतील तर आम्हीही ज्याला SCG म्हणून डोक्यावर घेऊन अभिमानाने मिरवतो तो सौरव चंडिदास गांगुली.
होय, गांगुली असा बराच काही आहे.. पण माझ्यासाठी तो दोन कारणांसाठी जास्तच खास आहे दिल के पास आहे. हे सौरवा, तुला माहीत नसेल तर तुला म्हणून सांगतो, की मी या लिखाणाच्या क्षेत्रात येण्यामागे आणि आल्यावरही तू कसा मला सोबत करत राहिलायस ते. म्हणजे असं बघ, इंजिनियरिंग सेकंड इयरला असताना आम्ही तुझ्या आणि चॅपेलच्या तेव्हाच्या वादावर कॉलेज गॅदरिंगमध्ये कॉकटेल ड्रामा सादर केला आणि प्राईझही जिंकलं. ते लिहिताना, बसवताना मला मजा आली. चॅपेलवर खूप टीका होते आणि तू पुनरागमन करून २००७ वर्ल्डकप भारी खेळतोस हे आम्ही दाखवलं नि पुढे झालंही तसंच. तेव्हा वाटलं की पुढेही लिहित रहावं. दुसरं म्हणजे अलीकडे आम्ही सचिनवर एक सचिन स्तोत्र केलं, त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला. नंतर मी माझा सबकॉन्शस जरा खणून पाहिला की हे गाणं मला का करावंसं वाटलं, तर तिथेही एका अर्थी तुझीच प्रेरणा होती. कारण सचिनचा मूव्ही येण्यापूर्वी काही दिवसच आधी तुझ्यावरची ‘द वॉरीयर प्रिन्स’ ही झकास डॉक्युमेंटरी मी युट्युबवर पाहिली होती (जी मला खरंतर सचिन मूव्हीपेक्षाही आवडली), त्यामध्ये शेवटी तुझ्यावर ‘ऑटोग्राफ दियो’ हे अप्रतिम बंगाली गाणं येतं, तेही अगदी अमिताभ बच्चन यांच्या आवाजात सुरुवात होऊन. तसं मग आमच्याकडूनही कदाचित सचिनवर एक मराठी गाणं झालं. अर्थात गाणं करताना हे खरंच काही डोक्यात नव्हतं, पण एडिटिंगच्या वेळी मात्र रेफरन्स म्हणून ‘ऑटोग्राफ दियो’च जेव्हा पहिल्यांदा आठवलं तेव्हा सबकॉन्शस खोदकाम सुरु झालंच. अजून एक यात वाढवायचंच तर आत्ता या लेखाच्या निमित्ताने लॅपटॉपवर तब्बल किमान दीड वर्षांनी काहीतरी लिहितोय तेही तुझ्यामुळेच, तुझ्यासाठीच.
असो, सौरव तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. भारतीय क्रिकेटसाठी तू प्रशासक, समालोचक म्हणून योगदान देतो आहेसच.. पण खरी इच्छा आहे ती तुला बीसीसीआय प्रेसिडेंट झालेला पहायची. तुझ्यावर लिहिलं नाही म्हणून मी आजवर (एक चॅपेल सोडल्यास) अनेकांकडून बोलणी खाल्ली आहेत, अगदी हे लिहित असतानाही व्हॉट्सअपवर एका जिवलग कट्टर गांगुलीप्रेमी मित्राकडून टोमणा पचवला आहे की ‘काल धोनीवर लिहिलास, आज गांगुली तेवढा महत्त्वाचा नाही वाटतं तुझ्यासाठी’.. अरे आम्ही द्रविडप्रेमी आहोत म्हणून किती परीक्षा घ्याल संयमाची. तसंही लिहिणार होतोच की. असो, या निमित्ताने खूप दिवसांची माझीही सल खरंच दूर होतेय. लेख मोठा झाला, पण तू माणूस पण मोठा आहेस ना..
कधी भेट झालीच तर नक्की ऑटोग्राफ दियो महाराजा...
#पराग_पुजारी
No comments:
Post a Comment