Thursday, 16 August 2018

भारतीय लष्कराला साथ देऊया


लष्करात जाणे तर सर्वांना शक्य नाही, किंवा प्रत्येकाला लष्करी जीवनाचा अनुभव यावा अशी आपल्याकडे काही इस्रायलसारखी पद्धतही नाही. पण किमान आपल्या लष्कराला सपोर्ट करत त्यांच्यासोबत ठाम उभे तरी नक्कीच राहू शकतो ना आपण. बाकी लष्कराच्या कामगिरीवर शंका घेणाऱ्यांची कीव येते. 'यांना पाठवा बॉर्डरवर' वगैरे मी त्यांच्याबद्दल नक्कीच म्हणणार नाही. उलट गरज पडेल तेव्हा आपण जाऊ, पण त्यांना अजिबात पाठवू नये या मताचा आहे मी. कारण हे तर बिनधास्त मागे हटतील आणि शत्रूला हवा तेवढा भूभाग लगेच देऊन टाकतील. 

आपण मात्र लढूया.

ही आधुनिक लढाई वेगळी आहे. आपला लष्करावरील विश्वास उडवणे हा या कटातला मुख्य भाग उधळून लावलाच पाहिजे. अर्थात तो झाला बॉर्डरचा भाग, पण सोशल मीडियावर या ना त्या कारणाने आणि जवळपास प्रत्येक बाबतीत पसरणारे विष संपवायला मात्र फार ताकदीने एकत्र यावे लागेल. कारण बऱ्याच देशांकडे आण्विक शस्त्रास्त्रे असताना आता सीमेवर जोरदार लढाया शक्यतो होणार नाहीतच. आर्थिक नाकेबंदी, हॅकिंग, सोशल मीडियाचा वापर, चिथावणीखोर वक्तव्ये हीच टूल्स असणार यानंतरच्या कोणत्याही संघर्षांची. 

परवाच मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले. त्यावर दोन मुंबईकर मित्रांची पोस्ट पाहिली. त्यांच्या उत्कर्ष मंदिर शाळेतील मुख्याध्यापिका राणे बाई यांचा कौस्तुभ मुलगा होता. नंतर अनुराधा प्रभुदेसाई यांच्या डॉ. उदय निरगुडकर यांनी झी २४ तास वर घेतलेल्या मुलाखतीचा एक युट्युब व्हिडीओ पाहिला. सैनिकांसाठी आयुष्य वेचत असलेल्या अनुराधाताईंची ती मुलाखत पाहून वाटले ही अशी माणसेच मानवजातीला आणखी सकारात्मक करत पुढे घेऊन जात आहेत, आपण जमेल तसा खारीचा वाटा उचलत त्यांना साथ दिलीच पाहिजे. असे राणे आणि अशा प्रभुदेसाई पाहून आपण काय करू शकतो देशासाठी हे नक्कीच वाटते ना? मग ज्यांचे काम बघून असे विचार मनात येतील आणि मग तशा काही कृती आपल्याकडून होऊ शकतील अशीच प्रेरणास्थाने निवडू हे तरी या १५ ऑगस्टच्या निमित्ताने नक्कीच ठरवू शकतो आपण. कारण आजकालची आपली युवाशक्ती कुठे कुठे खर्च होतेय हे आपण पाहतोच. ऑफिसातल्या कामात, मैदानात खेळात, इस्रोत संशोधनात, सीमेवर संरक्षणात ती जशी खर्च होते तशीच ती रस्त्यावर मोर्चात, ट्रॅकवर रेलरोकोमध्ये, आणि व्यसनाधीन टोळ्यांमध्येही वाया जातेय. आपली बाजू आपण निवडायची आहे. 

पोलिस दलात पाठीवर चपलेचे, बुटाचे शिक्के खायला कुणी जात नाही आणि सैन्यात आपल्याच लोकांनी मारलेली दगडं खायला कुणी जात नाही. हातात शस्त्र असून ते चालवण्यावरचे कायद्याने घालून दिलेले बंधन ते कसोशीने, संयमाने पाळतात ही त्यांची स्ट्रेन्थ आहे, ती कमजोरी समजून त्यांच्यावरच धावून जाऊ नये. ते आपले सेवक असतील तर आपणही त्यांचे तेवढेच सेवक आहोत हे जितके लवकर लक्षात येईल तितके चांगले. 

बाकी काय.. वेळेवर कर भरणे, स्वच्छता राखणे, वाहतुकीचे नियम पाळणे, माणसाशी माणसासारखे वागणे एवढं केलं तरी मोलाची देशसेवा आपण करूच शकतो.

संकल्प फक्त एक जानेवारीला करायचे नसतात.

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
जय हिंद!!!
भारत माता की जय!!!
 

No comments:

Post a Comment