'संजू' सिनेमा परवा रिलीज झाला आणि संजय दत्तच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे तो बघावा की नाही यावर बऱ्याच चर्चा झडल्या. मला याबद्दल जरा वेगळ्या पद्धतीने मांडायचंय.
तर आता मूलभूत फरक मांडण्याचा प्रयत्न करतो. दाऊद, मस्तान, शोभराज, गवळी, ओमर शेख अशा अनेक गुन्हेगारांवर मुव्हीज येऊन गेले आहेत.. पण संजय दत्त आणि त्यांच्यात फरक असा की ते लोक गुन्हेगार असा प्रॉपर शिक्का असलेले गुन्हेगार आहेत, संजय तसा नाही. त्याची ओळख अभिनेता म्हणून आहे, नंतर तो देशद्रोही कारवायांत सामील झाला व नंतरही त्याने गुन्हेगारी जगताशी संबंध ठेवले हे सिद्ध झालेय, त्यानेही कबूल केलेय, तो शिक्षाही भोगून आला. तो एक पब्लिक फिगर आहे.. एका सुसंस्कृत घरातील अभिनयक्षेत्रात गाजलेल्या जोडप्याचा आणि सर्वात जुन्या पक्षाच्या मोठ्या नेत्याचा मुलगा आहे. अशा मुलांनी काहीही केले तरी त्याची न्यूज होते हे सध्या आराध्या, तैमूरही अनुभवत आहेत. म्हणूनच यांच्यावर जबाबदारी वाढते. कित्येक सामान्य लोक अशा पब्लिक फिगर्सना, अभिनेत्यांना रोल मॉडेल मानत असतात, त्यांना प्रचंड फॅन फोलॉइंग असते. हे काहीही दाउद्सारख्याना लागू होत नाही. शिक्का गुन्हेगारांवर जगभरात फिल्म्स, सिरीज येतात गाजतात.. पण मुळातच ते तुम्हाला इतके वर्ष रोज टीव्ही, थिएटर, मैदान (अझरची सिनेमातून प्रतिमा सुधारण्याचा झालेला प्रयत्न) अशा ठिकाणी दिसून सार्वजनिक झालेले नसतात, आपल्याला माहीत होतानाच इमाने इतबारे गुन्हेगार म्हणूनच जगासमोर येतात. त्यांनी स्वतःही त्यांचे गुन्हेगार असणे आणि लोकांनी आपल्याला गुन्हेगार मानले आहे हेही मान्य केलेले असते. त्यांना कुणी सामान्य घरातले लोक फॉलो करत नाहीत, ज्यांना त्या मार्गाला जायचे आहे तेच फॉलो करतात. संजयचे तसे नाही, ९३ पूर्वीपासूनच तो पब्लिक फिगर होता. स्वत:चे मोठे घराणे आणि आपण अडकल्यावरही ठाकरेकृपा झाली म्हणूनच तो पुन्हा इंडस्ट्रीत सक्रिय होऊ शकला. नाहीतर इतके पाठबळ नसताना कारकिर्दीच्या सुरुवातीलाच असे भयानक अडकल्यावर त्याचाही शायनी आहुजा झाला असता.
थोडक्यात लोकांच्या मनात माणसाची मूळ ओळख अभिनेता / खेळाडू वगैरे म्हणून की गुन्हेगार म्हणून हा मुद्दा. कुणी लादेनवर पिक्चर करतोय किंवा नार्कोस सिरीज करतोय म्हणजे लोक गुन्हेगारांवरची कथा याच नजरेने पाहतात. संजयची मूळ ओळख ती नाही हा इथे प्रॉब्लेम आहे अनेकांचा. बाकी अलीकडे आलेला ओमेर्ता मी (राजकुमार राव प्रेमापोटी) पाहिला (डानियल पर्लला मारणारा व कंदहार विमान अपहरण प्रकरणात आपल्याला सोडावा लागलेला टेररिस्ट ओमर शेख).. पण उद्या मी किंवा कुणीही त्याला पैसे मिळवून देत मोठा तर करणार नाहीये ना.. झालं तर. संजय यानंतर जे सिनेमा करेल ते मात्र प्रेक्षक आपले पैसे घालून बघत त्याला मोठा करणारेत. रादर हाच हिरानीचा प्लान असू शकतो, कारण मुन्नाभाई तिसरा पार्ट (चले अमेरिका) अर्धवट होताच त्याला शिक्षा झाली, त्यामुळे तो पूर्ण होऊन रिलीज करताना संजयची इमेज थोडीफार सुधारलेली असणे हिरानीहिताचे आहे (संजू पाहून 'बिचारा संजय' ही इमेज पद्धतशीर तयार होते आहेच). नाहीतर हिरानी एक प्रोजेक्ट सुरू केल्यावर ते बाजूला ठेवून दुसरा प्रोजेक्ट कधीच करत नाही. पीके करताना ओ माय गॉड तशाच थीमवर येतोय (रादर तयारच झालाय) हे कळल्यावर त्याने पीकेचा नायक हा आधी ठरल्यानुसार आदिवासीएेवजी बदलून एलीयन दाखवला हे त्यानेच सांगितलं होतं.. असो, संजू हा फक्त हिरानी व रणबीर प्रेमापोटी चालतोय हा माझा समज अबाधित रहावा एवढीच इच्छा. या दोघांचा मीही फॅन आहेच.
गुन्हेगारांवर आलेले बरेच काही लोक बघतात, वाचतातच, नव्हे क्राईम वर्ल्डचे सुप्त कुतूहल उलट जास्तच असते.. पण ते क्रिमिनल 'एखादे वेगळे प्रोफेशन टर्नड गुन्हेगार' म्हणून लोकांना माहीत नसतात, तर गुन्हेगार म्हणूनच मास लोकांना माहीत झालेले असतात.. असं आहे सगळं. 
#पॉइंट_ऑफ_व्ह्यू
- पराग पुजारी
No comments:
Post a Comment