Wednesday, 31 May 2017

बुचर्ड बाय रिचर्ड्स

आजच्या दिवशी दोन महत्त्वाच्या घटना इतिहासात घडून गेल्या. त्यातली एक कोणती ते तर तुम्हाला माझ्या फेसबुक वॉलवरून दिसतेच आहे. पण अस्मादिक आजच्या दिवशी अवतार घेण्यापूर्वीच बरोब्बर तीन वर्षे आधी याच दिवशी ३१ मे रोजी घडलेली आणखी एक घटना क्रिकेटविश्वात जबरदस्त खळबळ माजवून गेली होती.

तर १९८४ चा मोसम सुरु होता.. वेस्ट इंडिज - इंग्लंड टेक्सको ट्रॉफीसाठी भिडत होते. पहिली मॅच आजच्या दिवशी ओल्ड ट्रॅफोर्ड. मँचेस्टर येथे होत होती. वेस्ट इंडिज आधी बॅटिंग करत होते. आदल्याच वर्षी भारताकडून वर्ल्ड कपमध्ये दोनदा हरत कप गमावलेला विंडीज संघ गेलेली पत मिळवण्यासाठी त्वेषाने खेळायला लागला होता. पण या मॅचमध्ये अति घाई संकटात नेई असं काहीसं झालं बहुतेक त्यांचं. नाहीतर इतकी भक्कम बॅटिंग लाईनअप असताना विंडीजची अवस्था १०२/७ व्हावी हे काही बरोबर नव्हतं. गॉर्डन ग्रिनीज, डेस्मंड हेन्स हे सलामीवीर, आणि नंतर आलेले रिची रिचर्डसन, क्लाइव्ह लॉइड, गोम्स, दुजाँ वगैरे सगळेच नुसते हजेरी लावून परतले. आणि हजेरी म्हणजे पण प्रॉपर हजेरी हां - प्रत्येकाचा स्कोर अगदी एक आकडी. पण पण पण व्हिव रिचर्ड्स नावाचा एक तगडा माणूस अजूनही टिकून खेळत होता. इयान बोथम, विलिस, प्रिंगल वगैरे त्याला आउट करण्यासाठी टिच्चून मारा करत होते, पण हा लेकाचा कुणालाही दाद देत नव्हता, ते त्याच्या जीन्समध्येच नव्हतं म्हणा ना. बाप्टिस्टला हाताशी धरत त्याने आठव्या विकेटसाठी ५९ जोडले, बाप्टिस्ट २६ वर गेला. पाठोपाठ जोएल गार्नरही पटकन आउट झाला. बाहुबली किंवा सचिन मूव्ही बघून येऊन फेसबुकवर त्याबद्दल पोस्ट टाकतानाची घाईही फिकी वाटावी इतक्या घाईत बाद झालेले इतर बॅट्समन एकीकडे आणि स्वत: मात्र एकटाच वेगळ्याच पिचवर खेळत असल्यासारखा आणि एव्हाना शतकाच्या उंबरठ्यावर असलेला व्हिव दुसरीकडे.. तो अजून खेळत असला तरी १६६/९ वरून वेस्ट इंडिज करून करून असा कितीसा करणार, मॅच आपलीच आहे म्हणून इंग्लिश खेळाडू खुशीत होते.


व्हिवला हे आवडलं नसावं, त्यालाही त्याच्या बॉलर्सचा कर्दनकाळ, जगातला सर्वात स्फोटक बॅट्समन वगैरे टॅग्जना जागायचं होतंच. मग हाताशी फक्त शेवटचा गडी मायकेल होल्डिंग असला म्हणून काय झालं. व्हिवने टप्प्याटप्प्याने धुलाई सुरु ठेवलीच होती. विंडीजच्या १७० मध्येच याचं ११२ बॉल्समध्ये शतक झालं होतं. मग त्याने अजून जरा हात मोकळे केले, आपल्या भात्यातले शॉट्स खूप प्रेमाने सढळ हस्ते बाहेर काढले. तेव्हा या वनडे मॅचेस साठ ओव्हर्सच्या असायच्या, ही मॅच ५५ ओव्हर्सची खेळवली जात होती. बॉलर्स पळत येत होते, फिल्डर्स मैदानभर पळत होते, दमत होते, पण हा पठ्ठया काय आउट व्हायचं नाव घेत नव्ह्ता, इतका हट्टी की शेवटपर्यंत घेतलं नाही. ५५ ओव्हर्स पूर्ण झाल्या तेव्हा शेवटच्या विकेटसाठी चक्क त्याने होल्डिंगसोबत नाबाद शतकी भागीदारी केली होती. १०६ च्या या भागीदारीत  होल्डिंगचा वाटा फक्त १२ धावांचा, यावरून व्हिवचा तडाखा लक्षात यावा. विजयी मुद्रेने हसत व्हिव पॅव्हेलियनकडे परतला तेव्हा त्याच्या नावावर नाबाद १८९ धावा होत्या, २१ फोर्स आणि ५ सिक्स. त्या काळात १८९ म्हणजे काय झालं राव.. हां काही महिने आधी कपिलने वर्ल्डकपमध्ये भारताला अशाच १७/५ बिकट अवस्थेतून बाहेर काढत १७५ ठोकल्या होत्याच, पण त्या झिम्बाब्वेविरुद्ध. इथे हा व्हिव राजा बोथमसारख्यांची धार बोथट करत होता, तेही त्यांच्याच घरात जाऊन.


जिंकायला २७३ टार्गेट घेऊन  उत्तरादाखल खेळताना इंग्लंडचीही सुरूवात खराबच झाली. आपला ६ फूट ८ इंची देह आणि बॉलिंगच्या वेळी बॉल रिलीज करताना त्या लांब हाताचे एक्स्ट्रा २ फूट धरले तर साडेआठ - पावणेनऊ फुटांवरून बॉल सोडणारा जोएल गार्नर बेक्कार तिखट मारा करत होता, ८ वरच इंग्लंडचे २ घालवले त्याने. त्यात  एक माईक गॅटींग. मग डेव्हिड गॉवरला घेत माल्कम मार्शल त्याला जॉईन झाला. एव्हाना होल्डिंगही एक विकेट घेऊन बसला होता. ५१ स्कोर असताना पाचवी विकेट म्हणून बोथम फक्त २ रन्स करून आउट झाला, आणि कोण जिंकणार हे स्पष्ट झालं. पण मग बेअरस्टो - मिलरची एक छोटेखानी तीसची भागीदारी झाली. होल्डिंग, गार्नर, मार्शल प्रयत्न करतच होते, पण चतुर क्लाइव्ह लॉइडने विचार केला की दिवस व्हिवचा आहे तर त्याच्याकडे बॉल  देऊन बघू. झालं, दिवस माझाच आहे हे व्हिवने त्या दोघांच्याही विकेट्स घेत लगेच सिद्ध केलं. इंग्लंड त्या दिवशी वेस्ट इंडिजला फारच मनापासून खुन्नस देत होते बहुतेक.. तुम्ही १०२/७ होता ना, तर घ्या - आम्हीपण १००/७.. पण अॅलन लॅम्ब अजून कुणाला बधत नव्हता, तळाच्या लोकांना साथीला घेत एक एक वीट कष्टाने जोडत होता, पडकी भिंत बांधत होता, त्यांना पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणत होता.. अर्थात त्यालाही माहीत होतं की अशक्य इनिंग खेळायला तो काही व्हिव नाही. ७५ वर असताना गोम्सच्या बॉलिंगवर रिचर्डसनकडे कॅच देऊन लॅम्ब शेवटचा गडी म्हणून आउट झाला, तेव्हा इंग्लंडचा स्कोर १६८ होता. व्हिवने बॉलिंग करताना ११ ओव्हर्सचा कोटाही पूर्ण केला आणि ४५ मध्ये २ विकेट्स घेतल्या.

विंडीज १०४ रन्सनी जिंकले होते आणि व्हिव - होल्डिंगची लास्ट विकेट पार्टनरशिप १०६ ची होती, हे एकच वाक्य खरं तर त्या दिवशी काय झालं हे कळायला बास आहे.

त्या आधी जगात कुणीच ९ विकेट्स पडल्यानंतर अशी इनिंग पाहिली नव्हती. व्हिवची ही जगावेगळी खेळी आजही निर्विवादपणे वनडेतली सर्वोत्तमपैकी एक मानली जाते. आणि ही स्पेशल खेळी तो ३१ मे रोजी खेळला म्हणून मीही त्याचे विशेष आभार मानतो आणि एवढं लिहून माझे १८९ पेक्षा जरा जास्त झालेले हे शब्द संपवतो.

- पराग पुजारी

Friday, 26 May 2017

देश का गौरव : राहुल - सौरव

 आज २६ मे.. आपलं वनडे क्रिकेट काही अर्थानी नक्कीच बदलणारा दिवस. कारण १९९९ साली इंग्लडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये या दिवशी टॉन्टनमध्ये काहीतरी अद्भुत घडलं होतं. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी करो या मरो स्थितीत असताना, प्रचंड अंडरप्रेशर खेळत आपल्या दोन तरण्याबांड खेळाडूंनी जागतिक बॉलर्सना जणू  आपल्या बॅटने संदेशच दिला होता होता की यापुढे सचिनबरोबरच आम्हालाही घाबरत चला..

पण ते पाहण्याआधी अशी करो किंवा मारो स्थिती ओढवलीच कशी ते बघू. आपल्या ए ग्रुप मध्ये भारत, श्रीलंका, साऊथ आफ्रिका, इंग्लंड, झिम्बाब्वे, केनिया हे संघ होते. सााऊथ आफ्रिकेविरुद्ध पहिली मॅच, आपण २५३ केल्या, पण मग कॅलिसने टिच्चून खेळत आपल्याकडून ती मॅच हिसकावून घेतली. झिम्बाब्वे आणि केनियाविरुद्धचे पुढचे दोन पेपर सोपे समजून आपण जरा रिलॅक्स होतो की काय माहीत नाही, पण घात झालाच. लिसेस्टरला टॉस जिंकून आपण बॉलिंग घेतली, झिम्बाब्वेला २५२ मध्ये थांबवलं. पण आपण छानपैकी ५१ एक्स्ट्रा रन्स दिल्याने तितक्या रिपीट बॉलिंगमुळे झालेल्या प्रचंड स्लो ओव्हर रेटच्या पायात आपल्याला चार ओव्हर्सचा दंड झाला आणि आता पुन्हा २५३, पण ४६ ओव्हर्समध्येच करायचे होते. सचिन त्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारांसाठी भारतात परतला असल्याने त्याच्या जागी संधी मिळालेल्या सदागोपन रमेशने पन्नास मारले. वर झिम्बाब्वेनेही आपल्या बॉलर्सना पुरेपूर टक्कर देत ३९ एक्स्ट्रा दिल्या होत्याच, म्हणजे साधारण ५०० पैकी ९० रन्स तर या दयाळू बॉलर्सच्या या महाप्रसाद वाटपातच झाल्या. पण शेवटी गडबड झाली. दोन ओव्हर्समध्ये ९ पाहिजे असताना आणि रॉबिन सिंग, श्रीनाथ चांगले खेळत असतानाही आपण हरलो. होय, आपल्या ३ विकेट्स हातात असतानाही आपण प्रॉपर ऑल आउट होऊन ती मॅच ३ रन्सनी हरलो होतो, याचे कारण ४५ व्या ओव्हरला हेन्री ओलोंगाने रॉबिन सिंग, श्रीनाथ, प्रसाद या तिघांना एकाच ओव्हरमध्ये आउट केलेले. आता सुपर सिक्स राउंडमध्ये जायचे तर उरलेल्या तिन्ही मॅचेस जिंकाव्याच लागणार होत्या. पुढची मॅच केनियाविरुद्ध, सचिन परत आला तो शतक करायलाच, सोबत द्रविडनेही शतक केले, आणि आपण दुबळ्या केनियाला सहज हरवले. आणि आता गाठ होती ती गतविजेत्या श्रीलंकेशी.

श्रीलंकेने टॉस जिंकून बॉलिंग घेतली आणि रमेशला पहिल्याच ओव्हरमध्ये चामिंडा वासने आउट केले. ही लंकेच्या बाजूने झालेली त्या दिवसातली पहिली आणि शेवटची गोष्ट. कारण वन डाऊन आला राहुल द्रविड, त्याने आणि सौरव गांगुलीने बडवायला सुरुवात केली. आधी द्रविड जास्त आक्रमक होता, ४३ बॉल्समध्ये त्याने ५० आणि मग १०२ बॉल्समध्ये शतक पूर्ण केले. गांगुलीने हेच टप्पे ६८ आणि ११९ बॉल्समध्ये गाठले. पण शतक झाल्यावर गांगुलीने सिक्सवर सिक्स मारायला सुरुवात केली. त्या दिवशी गांगुलीने सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती केली असेल तर मुरलीधरनला तीन सिक्स मारून अनेक बॅट्समनच्या मनातून त्याची भीती काढून टाकली. आधी ७ ओव्हर्समध्ये फक्त २१ रन्स दिलेल्या मुरलीचे आकडे १० ओव्हर्समध्ये ६० रन्स विदाउट विकेट असे झाले. द्रविडने त्याला कव्हरच्या डोक्यावरून मारलेला लाजवाब सिक्स तर अजूनही डोळ्यासमोर आहे. डिसील्वाला गांगुलीने स्टेडियमबाहेर सिक्स मारल्यावर 'हा बॉल नदीत गेला असेल' असं कॉमेंटेटर गमतीत म्हणाला होता.

४० ओव्हर्समध्ये आपला स्कोर सहापेक्षा किंचित जास्त गतीने म्हणजे २४५ होता, दोघांचे शतक ठोकून झाले होते. इतके सेट झाल्यावर  बॅट्समनना क्रिकेटचा बॉल एव्हाना फुटबॉलसारखा दिसू लागलेला असतो, तर गांगुली आता बिनधास्त बॉल उंच उडवत होता, लंकन फिल्डर कॅचेस सोडत होते. हेच दोघे शेवटपर्यंत खेळून नॉटआउट राहणार असं वाटत होतं, कारण वास, मुरलीसारखे जागतिक दर्जाचे बॉलर्स आणि सगळेच फिल्डर्स पूर्णपणे असे हतबल ठरत असताना अशी पार्टनरशिप तुटण्याचा एकच मार्ग होता तो म्हणजे रनआउट. आणि ४६ व्या ओव्हरला नेमके हेच झाले. गांगुलीसोबत तब्बल ३१८ रन्सची पार्टनरशिप झाली होती तेव्हा द्रविड मुरलीच्या एका अचूक थ्रोवर रनआउट झाला. आपल्यामुळे द्रविड आउट झाला हा राग गांगुलीला आता लंकेच्या बॉलर्सवर काढायचा होता बहुतेक, पण मुरलीच्या ओव्हर्स संपल्या होत्या आणि रणतुंगाने एक गुन्हा केला. होय, गांगुली खेळत असताना डावखुऱ्या स्पिनरला बॉलिंग देणे हा गुन्हाच असतो. तात्पर्य पुढच्याच  ओव्हरला जयसूर्याने गांगुलीकडून दोन सिक्स खाल्ले, पण त्याच ओव्हरमध्ये सचिनला बोल्ड केले. (या वर्ल्डकपला सचिन काही मॅचेस ओपनिंगला तर काही मॅचेस चौथ्या नंबरवर येऊन खेळला होता.) गांगुलीला पुन्हा आला राग.. वासला फोर मारली, पण शेवटच्या ओव्हरच्या गांगुली आठवा सिक्स मारण्याच्या नादात आउट झाला. १८३ - तेव्हापर्यंतचा तो भारताकडून हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर होता, कारण गांगुलीने कपिलचे १७५ मागे टाकले होते. अपेक्षेप्रमाणे आपण मॅच दणदणीत १५७ रन्सनी जिंकली, गांगुली मॅन ऑफ द मॅच झाला. (या वर्ल्डकपला दोन शतकांसह सर्वात जास्त ४६१ रन्स करणारा द्रविड एकाही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच होऊ शकला नव्हता हे विचित्रच..)

द्रविड-गांगुलीची ३१८ रन्सची पार्टनरशिप बघून जगाने तोंडात बोटं घातली होती, त्याआधी वनडेत म्हणजे जिंकण्यासाठी अख्ख्या टीमने ३०० चे टार्गेट दिले तरी भरपूर वाटायचे, अशा काळात दोघांचीच ३०० ची पार्टनरशिप होऊ शकते असा विचारच कुणी केला नसेल. लोकांनी विचार केला असेल की 'ठीक आहे, होऊ शकते असे एखाद्या वेळेस'.. बहुतेक द्रविडला हे आवडले नसावे, म्हणून त्याने पुढे सहा महिन्यांनी अहमदाबादला सचिनसोबत खेळताना पुन्हा हा विक्रम मोडून काढत न्यूझीलंडविरुद्ध तब्बल ३३१ ची पार्टनरशिप केली. यावेळी सचिन १८६, द्रविड १५३.. अलीकडे २०१५ च्या वर्ल्डकपला राक्षस कुळाऐवजी चुकून मनुष्य कुळात जन्मलेल्या ख्रिस गेलने सॅम्युएल्सला बरोबर घेत चक्क ३७२ ची पार्टनरशिप करत हाही विक्रम मोडून काढला.

१९९९ वर्ल्डकपमध्ये आपण पुढे इंग्लंडला हरवून सुपर सिक्समध्ये गेलो. आपल्या वर्ल्डकप प्रथेप्रमाणे पाकिस्तानला हरवलं, पण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडून हरलो आणि सेमीजला पोचू शकलो नाही. पण या टॉन्टनच्या एका मॅचने क्रिकेटजगतात बरेच मेसेजेस गेले.. * वनडेत एवढी मोठी पार्टनरशिप होऊ शकते, *मुरली-वास एकाच मॅचमध्ये निष्प्रभ ठरू शकतात, *द्रविडला आता फक्त टेस्ट प्लेयर म्हणता येणार नाही, *आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताविरुद्ध खेळताना यापुढे 'सचिन गेला की जिंकलो' असं म्हणत फक्त त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी आखून चालणार नाही. इतके पक्षी एका मॅचने, नव्हे एका पार्टनरशिपने मारले, तेही वर्ल्डकपमध्ये इतकी प्रेशर मॅच खेळत असताना, कारण भक्कम लंकेविरुद्ध ही मॅच आपण हरलो असतो तर बाहेर झालो असतो. त्या दिवशीच्या लंकेकडे बघून असं वाटलंच नाही की या टीमने तीन वर्षांपूर्वी वर्ल्डकप जिंकलाय.  

या विजयाने सचिनच्या खांद्यावरचा भर कमी व्हायला मदतही झाली, कारण टीम इंडियामध्ये अजून दोघे मॅचविनर आले होते. या तिघांपैकी कुणीतरी एक हमखास खेळणारच हा विश्वास, दबदबा, आणि बॉलर्सच्या मनातली भीती या तिघांनी त्यांच्या कामगिरीतल्या सातत्याने पुढे राखून ठेवण्यात यश मिळवले. मला १९९९ च्या वर्ल्डकपची आपली जर्सीही फार आवडते, आतापर्यंतच्या सगळ्या वर्ल्डकपमधल्या आपल्या जर्सीज पाहिल्या तरी हीच माझी फेव्हरेट आहे. तेव्हापासून एक झालंय... क्रिकेटबद्दल बोलताना, वाचताना मला गांगुली, किंवा द्रविड, किंवा तेंडुलकर असा शब्द जरी ऐकला किंवा वाचला तरी त्या नावाचा फक्त तो एक चेहरा डोळ्यासमोर येत नाही, तर हे तिघे एकदम दिसतात आणि मला याचा आनंद आहे. या तिघांनी मिळून भारतीय क्रिकेट खूप पुढे नेलंय आणि आपलं आयुष्य खूप सुंदर केलंय.  

(लेखाला नाव काय द्यायचं यावर बराच विचार केला.. आणि शेवटी - राजस्थान-पुणे २०१२ आयपीएल मॅच जी पुणे स्टेडियममध्ये पाहिलेली, तेव्हा जे लिहून बोर्ड तयार करून गेलो होतो तेच शब्द लिहिले. तेव्हा या दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स कोण होते हे आठवून सांगणाऱ्यांना काहीही बक्षीस नाही.)

-- पराग पुजारी 

Sunday, 21 May 2017

चॅम्पियन

"भलत्याच मुलीबरोबर संसार करायची पाळी आली होती ती टळली म्हणून विश्वनाथला अतोनात समाधान वाटत होतं. मुलीला रूप नाही, वर्णदेखील गोरा नाही."

अशी सुरुवात असलेली कथा विजय तेंडुलकरांनी त्यांच्या विशीत म्हणजे १९४७ च्या सुमारास लिहिली, जी तेव्हा प्रचंड गाजली होती. 'तेंडुलकरांच्या निवडक कथा' हे दर्जा पुस्तक - वर्षांपूर्वी वाचनात आलं होतं. पुस्तकाची सुरुवातच या दीर्घकथेने होते. कथेचं नाव आहे - 'आमच्यावर कोण प्रेम करणार'.

असं नाव का असावं? तेव्हाची पुरुषांची (की काहींची अजूनही) मानसिकता आणि रंगावरून मुलींना लग्नाच्या बाजारात येत असलेला न्यूनगंड याभोवती फिरणारी ही कथा आणि कथेत पुढे या मानसिकतेवरच हल्ला करत पेटून उठणारी ती कथेची नायिका - एक काळीसावळी मुलगी. आईच्या आग्रहाखातरदाखवण्याच्या’ कार्यक्रमाच्या वेळी तोंडाला पावडर फासणारी, आणि तसं तेव्हाच त्या मुलाला सांगणारी, पुढे साखरपुड्यानंतर मुलाकडच्यांनी निर्णय फिरवताच उसळून जाब विचारणारी. खास तेंडुलकर शैलीतली वैचारिक आक्रमक कथा

मग आठवतो 'विवाह' सिनेमा. सुंदर अमृता रावशी शाहिद कपूरचा विवाह ठरतो, आणि विवाहाआधी काही दिवस एका दुर्घटनेत ती भाजून तिचा चेहरा काहीसा खराब होतो, मुलीचे पालक नेहमीप्रमाणे आलोकनाथ असल्याने ते चिंतीत होतात (वडील नव्हे, पालक.. काका असतात ते सिनेमात तिचे).. पण तेव्हाही रंगावर नव्हे तर हाडामांसाच्या व्यक्तीवर प्रेम केलेला नि म्हणूनच विवाहाचा निर्णय बदलणारा शाहिद एका ‘विशिष्ट’ मानसिकतेसाठी एक छान मेसेज देऊन जातो.

झिम्बाब्वेची अर्थव्यवस्था (आणि त्यांचे क्रिकेट) सध्या कितीही बोंबललेल्या अवस्थेत असो, पण त्यांचे प्रेसिडेंट रॉबर्ट मुगाबे हे वर्णद्वेषाच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी चर्चेत असतात अधूनमधून. त्यांचे एक भाषण फार गाजले होते. काहींनी त्यातले मुद्दे गमतीत घेतले, तर काही ठिकाणी त्यावर गंभीर  परिसंवादही झडले. (त्यांची वाक्ये दाखवणारी इमेज सोबत जोडत आहे.)

काही खेळाडू जगात सगळ्यांसाठीच लव्हेबल असतात, त्यातलाच एक आणि खऱ्या अर्थाने एन्टरटेनर असा वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने 'चॅम्पियन' नावाचं एक गाणं केलं होतं मागच्या वर्षी, ते जरूर ऐका, त्याचे शब्द पहा. कोणत्याही क्षेत्रात चॅम्पियन असलेल्या काळ्यासावळ्या व्यक्तींना  डेडिकेट केलेले हे गाणे. लारा, गेल, ब्राव्हो, पोलार्ड, जॉर्डन, बोल्टसारखे पुरुष खेळाडू, किंवा सेरेनासारखी टेनिसस्टार, किंवा मिस युनिव्हर्स वेन्डी इतकंच काय ओबामा, मंडेला अशा नेत्यांपर्यंत अनेक कृष्णवर्णीय दिग्गजांना हे गाणं आपल्यासमोर आणतं. यंदाच्या ऑस्करमध्ये बेस्ट मूव्ही अवॉर्ड देताना गोंधळ झाला खरा पण 'मूनलाइट' ला हे बक्षीस मिळालं यावरून हॉलिवूडही आता 'ब्लॅक'ला आदर देताना दिसतंय. हा सिनेमा कृष्णवर्णीय पात्रांभोवती फिरणारा आहे. जिथे हॅले बेरीला ऑस्कर मिळालं कीचर्चा’ होते, किंवा विल स्मिथचं ऑस्कर हुकल्यावरही चर्चा’ होते ते ऑस्कर आता कृष्णवर्णीयांना आणि त्यांच्या कलाकृतींना पुरस्कार मिळताना फारशी चर्चा करता हा बदल स्वीकारत चाललंय हे पाहून बरं वाटलं.

माझ्या एका गोऱ्यापान कोब्रा मित्राला काळी (सावळी नव्हे, काळी) मुलगी आवडली होती, दोघे अफाट प्रेमातही होते, करियरही छान, दोघे इंजिनियर नि आयटीमध्ये.. पण एकतर तिची जात वेगळी, आणि मुलाच्या आईला गोरीपान मुलगीच सून म्हणून हवी होती.. 'होत असलेल्या विरोधात जातीपेक्षा रंगाचा भाग जास्त आहे, जोडी विजोड दिसेल असं आईचं मत आहे' हे मित्राकडून ऐकलं होतं. मुलीच्या घरूनही (एक अमुक लाख अमुक घराणे) जबर विरोध होता. फार विचारात टाकणारे होते ते मुद्दे. पुढे हवी तशी मुलगी त्यांना सून म्हणून मिळाली, त्यांचे लग्न झाले वगैरे. पण मुद्दा असा की मुलांच्या मनात हे बीज रोवतं कोण की 'बाबा रे, मैत्रीण असेल तर ठीक, पण सून मात्र गोरीच हवी हो'. यामागचे कारण कदाचित सुबोध भावे, गिरीजा ओक अभिनित 'अडगुलं मडगुलं' या सिनेमात सापडेल, इच्छुकांनी जरूर पहा. गोऱ्याघाऱ्या घराण्यात सावळे मूल जन्माला आलेच कसे यावरून घाणेरड्या शंकाकुशंका, सुनेला सहन करावा लागलेला त्रास यावर हा सुंदर सिनेमा भाष्य करत होता. 'नितळ' हाही असाच एक सुंदर सिनेमा - अंगावर कोड असलेल्या मुलीला सून म्हणून स्वीकारताना एका धुमसत्या सुशिक्षित घराची होणारी चिडचिड, छुपा विरोध दाखवणारा.

आपल्याकडे इंग्रज जे काय गोऱ्या चामडीचं आकर्षण ठेवून गेलेत, ते अजून तितकंसं कमी होताना दिसत नाहीये. पण मी कित्येक गोरी मुलं अशी पाहिलीत की ज्यांना सावळ्या मुलीच स्मार्ट वाटतात. (मी बऱ्यापैकी गोऱ्यात मोडतो आणि माझंही हेच मत आहे, थँक्स टू माय पहिलं प्रेम..) मग तमन्ना भाटियाकडे एकटक पाहता येईल की काजोलकडे असे प्रश्न त्यांना पडत नाहीत. प्रश्न पडतो तो हा की चित्रांगदाला, बिपाशाला ब्लॅक ब्युटी का म्हणायचं, नुसतं ब्युटी का म्हणायचं नाही? पण ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकली तरी पी व्ही सिंधूची जातच ज्या देशात आधी पाहिली जाते आणि सावळी असल्याने तिला मॉडेलिंगच्या फार संधी मिळणार नाहीत अशा चर्चा होतात तिथे इतका बदल एका रात्रीत तर होणे शक्य नाही. खरंतर विठ्ठलासारखे आपले देवही सावळे दाखवले आहेत, त्यावर कित्येक गाणीही आहेत. भक्ती करायला देव सावळा चालतो पण 'गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण' सारख्या गाण्यातून घरी येणारी सून मात्र गोरी हवी हे बालपणापासूनच मुलांच्या मनात का भरवले जाते हा जबाब कुणाकडे मागायचा? मुळात हे असे शब्द असणारे, असा संस्कार करणारे हे गीत 'बालगीत' का आहे? अशा गाण्यांवर रेसिस्ट म्हणून बंदी का घालू नये? कुणी सांगितलं मग सावळ्या मुली फुलासारख्या छान नसतात?

मुलगा असो किंवा मुलगी, आजकाल प्रेझेंटेबल राहण्याचा जमाना आहे, कॉर्पोरेट जगतात वावरायचे असते, मार्केटिंग, प्रमोशन करत सतत फिरायचे असते.. मग शाहरुख मुलांच्याही फेअरनेस क्रीमची जाहिरात करतो आणि अनेक मुलंही सौंदर्यप्रसाधनं वापरतात. कित्येक मुलांना क्लीन शेव्हन किंवा प्रॉपरली ट्रिम्ड दाढी असल्यावर जास्त कॉन्फिडन्ट वाटतं, तसं कित्येक मुलींनाही त्या गोऱ्या असल्यावर (किंवा झाल्यावरच) उत्साही, कॉन्फिडन्ट वाटतं का? (कम्फर्टेबल नसाल तर उत्तर नका देऊ, पण हे मी विचारलं कारण एक सावळी मैत्रीण तिचं लग्नाचं वय आलं तशी अचानक ब्युटी पार्लरच्या वरचेवर वाऱ्या करू लागली, वेगळीच दिसू लागली, काहीशी गोरी झालीही पण तिच्या चेहऱ्यातला गोडवा, जिवंतपणा, चार्मच निघून गेला. आणि मग स्वत: स्वत:ला गोऱ्या बनवलेल्या त्या मुलीचं लग्न झालं - एका सावळ्या मुलाशी)

टेलिशॉपिंग तसेच इतरही रोजच्या जाहिरातींचे कंबरडे मोडणारी आणि ग्राहक जनजागृती करणारी रझा मुरादची एक जाहिरात लागायची मध्यंतरी - 'कोई भी क्रीम ४ दिन में आपको गोरा नही बना सकता और कोई भी तेल ७ दिन में आपके सर पर बाल नही उगा सकता'.. अशावेळी तापसी पन्नू, कंगना राणावतसारख्या लौकिकार्थाने गोऱ्या नट्या स्वत:च जेव्हा फेअरनेस क्रीमची जाहिरात आणि त्याचे ब्रॅण्डिंग करणारे कार्यक्रम नाकारतात, तेव्हा खरंच 'चलो, कोई तो है' वालं फिलिंग येतं.

बाकी बऱ्याच मुलींचा खरंतर म्हणे त्यांच्यासाठी मुलगा निवडताना ‘टीडीएच’ (टॉल डार्क हँडसम) क्रायटेरिया असतो. म्हणूनच वैभव तत्त्ववादीवर भूषण प्रधान किंवा सिद्धार्थ चांदेकरपेक्षा जास्त मुली मरतात. मिलिंद सोमण हे दोन शब्द लिहितानाही असंख्य जळणारे पुरुष दिसतात.. साला म्हातारा होतच नाही.

छान, प्रेझेंटेबल दिसणं, राहणं वेगळं आणि गोरं दिसणं, राहणं वेगळं.. यात मुलांनी, मुलींनी, त्यांच्या पालकांनी कुणीच गल्लत करू नये. हे एकत्रित झालं कीच मोठ्या आवाजात म्हणता येईल - समाज गेला उडत... 


-- पराग पुजारी
आदर्श संवाद लेखन 

ती बागेत त्याची वाट बघत बसली आहे, तो येताच ती त्याला बिलगते

ती - श्याम.. उंहू उंहू (थोड़ी आहें, सिसकियाँ इत्यादी मोहजाल) मैं कबसे तुम्हरी राह देख रही थी
तो - सॉरी नीता मुझे देर हो गयी 9 स्प्राइट - सीधी बात नो बकवास) 
ती - क्या हो गया था कल.. क्यों लेके गये थे वो तुम्हे (--> पोलीस)
तो - रोज ही लेके जाया करे तो अच्छा है तुम ऐसे लिपटके तो मिला करोगी (डोळ्यात अशक्य रोमँटिकपणा)
ती - मेरी जान पे बनी है और तुम्हे लिपटने के पड़ी है (काजळ उतू जाणारे डोळे वागवणाऱ्या चेहऱ्यावर सगळे पुरुष असलेच हा भाव )
तो - याद रखो तुम्हे भी एक दिन पुलिसवाला पकड़के ले जाएगा (पुन्हा स्प्राइटगिरी)
ती - बात क्या है.. (मग पुन्हा तोच संवाद.. अति लाडिक नखरेल लाजत)
तो - बात.. बड़े राज की बात है.. बैठो
ती - ऐसी क्या राज की बात है
तो - बतादू? (काही गोष्टी लपवतोय, मग नम्रपणे तिची परमिशनही घेतोय म्हणजे हा पुढे नक्की तिच्याशी लग्न करून तिचा नवरा होणार.. आता गौप्यस्फोट..) जिस आदमी से तुम प्यार करती हो ना वो पुलिस में सीआयडी है
ती - तुम्हारा मतलब है तुम.. तुमने मुझसे झूठ कहा था की तुम आर्ट्स के स्टुडंट हो

मग एक ऐतिहासिक डायलॉग
तो - वो सच था.. मैं तुमसे प्यार करता हूं.. प्यार करना भी तो आर्ट है
ती - झूठे कही के (अरेरे इतक्या क्रिएटिव्ह बचावाला किती कोरडा प्रतिसाद)
तो - अरे अरे लेकिन.. जो भी कुछ हूं तुम्हारा हूं.. गुस्सा छोडो, हंसके देखो ना मेरी तरफ
ती - (नाटकी) मुझे तुमसे डर लगता है
तो - डरो मत देवी (अचानक भारतीय नारी देवीसमान).. पुलिस जनता की सेवा के लिये है.. जनता को डराने के लिये नहीं.. पास आओ ना, अरे आओ ना (कोण देवी? कसली देवी?)

मग तिचा जरा लटका विरोध, पण एव्हाना तिच्या मांडीवर डोके ठेवून पहुडलेला आणि तिथे बजरंग दलवाले येणार नाहीत हा विश्वास असलेला तो खुद्द सीआयडी पोलिसवाला तिला हळूच जवळ ओढून घेतोच.. आणि मग १९७० सुरु असल्याने कॅमेरा वरती पॅन होतो, काही झाड़े, फुले वगैरे दिसतात, प्रेक्षक कल्पनाशक्ती वापरतात तोपर्यंत ती ओठ पुसत उठते. (असले बाळबोध हिंदी सिनेमा बदलून ते वयात आणावेत म्हणून पुढे ९ वर्षांनी 'अजून राहिलीये का मनुंय; संघटनेचे संस्थपक अध्यक्ष सिरीयल केसर इम्रान हाश्मी यांनी जन्म घेतला आणि नकायिकेने ओठ का पुसले असा प्रश्न उद्या कुणी RTI अंतर्गत पुसू नये म्हणून पडद्यावर पारदर्शक कारभार ठेवला..) ती उभी राहताच  एखादे गाणे होईल असे वाटते, पण आदल्याच दिवशी त्याच ठिकाणी त्याच वेळी त्याने 'गुलाबी आँखे जो तेरी देखी' हे अवीट गोडीचे गाणे रफीच्या आवाजात गात ऐतिहासिक डान्सही केलेला असतो, मग पुन्हा गाणे नको असे ठरवून दोघे कारमधून निघून जातात. शेवटी क्लायमॅक्स सीनला हा सीआयडी मग व्हिलनशी ढिशूम ढिशूम करताना आमीर खानने 'गुलाम'मध्ये केलेला अल्मोस्ट ट्रेनच्या ट्रॅकवरचा स्टंटही तब्बल २८ वर्षे आधी करतो, आणि सिनेमाचे नाव सार्थकी लावतो.    

सिनेमा - द ट्रेन (१९७०)
तो, ती - राजेश खन्ना, नंदा
संवादलेखक - राज बलदेव राज ('वो सच था.. मैं तुमसे प्यार करता हूं.. प्यार करना भी तो आर्ट है' फेम)

काही नाही, सोमवारी युट्युबवर अपलोड होणार असल्याने आज ऑफिसात मला या सिनेमाचा मेटाडेटा करायला आला होता, काही सीन्स पाहिले, हा डायलॉग जबरी वाटला, म्हणून सहज.. आता सर्वानी बिनधास्त सांगा की आम्ही आर्ट्स स्टुडंट आहोत. शुभेच्छा..

-- पराग पुजारी
Attachments area

Thursday, 18 May 2017

इन्व्हिक्टस

२००९ साली आलेला मॉर्गन फ्रीमन, मॅट डेमन यांच्या अभिनयाने नटलेला हॉलीवूडचा  हाइन्व्हिक्टस’ सिनेमा. इन्व्हिक्टस म्हणजे अपराजित. शॉशांक रिडम्प्शन, बकेट लिस्टसारख्या सिनेमातून मॉर्गन फ्रीमन यांचा लाजवाब अभिनय पाहिला होताच, पण इन्व्हिक्टसमध्ये त्यांनी उभे केलेले नेल्सन मंडेला जबरदस्त छाप पाडून जातात. नव्वदीच्या दशकातल्या दक्षिण आफ्रिकेतील बऱ्याच छोट्यामोठ्या घडामोडींवर सिनेमा अलगद भाष्य करतो. मंडेला यांच्या सुटकेची घोषणा आणि मग त्यांनी दक्षिण आफ्रिकेचे प्रेसिडेंट होत स्वीकारलेला पदभार दाखवत सिनेमा सुरु होतो.

वर्णभेदाचा फटका बसलेला असूनही कार्यभार स्वीकारताच पहिलं काम ते करायला घेतात ते म्हणजे काळ्या लोकांचा आता गोऱ्या लोकांवर असलेला राग शांत करण्याचा प्रयत्न करणं. मंडेलांच्या सिक्युरिटीसाठी आणखी कुमक लागणार असतानाचा प्रसंग - चार गोरे प्रशिक्षित अधिकारी जेव्हा त्यासाठी येतात, तेव्हा मंडेलांचा मुख्य सिक्युरिटी इनचार्ज त्यांना धुडकावून लावतो, पण मंडेला त्याला समजावतात आणि मग काळेगोरे एकत्र काम करू लागतात. महागाई, बेरोजगारी, कुपोषण, अन्नटंचाई, वाढती गुन्हेगारी अशा कठीण परिस्थितीतून जात असलेल्या दक्षिण आफ्रिकेला योग्य मार्गाने पुढे नेण्याचं अवघड काम आता मंडेलांनी आपल्या खांद्यावर घेतलेलं असतं. सकाळी चहा पिताना रोज पेपरातही अशा नकारात्मक बातम्या दिसत असताना त्यांना अचानक एक दिवस एक बातमी दिसते - 'स्प्रिंगबॉक्स या दक्षिण आफ्रिकन रग्बी टीमच्या कोचची हकालपट्टी, पण कॅप्टन फ्रँकॉईस पिनार कायम'. खालावलेल्या परफॉर्मन्समुळे ही टीम आता देशभर चेष्टेचा विषय झालेली असते. १९९५ चा रग्बी वर्ल्ड कप तोंडावर आलेला असतो आणि पिनारला घरी एक फोन येतो. देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी त्याला चहासाठी बोलावलेलं असतं. आपल्याला का बोलावलं असेल या विचाराने तो गोंधळतो, पण जातो. तिथे मंडेला त्याच्यासाठी चहा बनवत विचारतात की तुझ्या मते लीडरशिप म्हणजे काय? बोलता बोलता ते सांगतात की तुरुंगात असताना एका कवितेने त्यांना प्रेरणा दिली, लढायची जिद्द दिली. पिनार भारावून जातो. टीमकडून येत्या वर्ल्डकपमध्ये असलेल्या अपेक्षांची पिनारला कल्पना येते आणि त्यांची भेट संपते. टीम सराव करू लागते तसे देशात ठिकठिकाणी कोचिंग कॅम्पस करण्याबद्दल टीमला सुचवले जाते. ही टीम बहुतांशी गोऱ्या खेळाडूंची, मग खळखळ करत पण कॅप्टनने आग्रह केल्यावर ते राजी होतात. सामान्य काळ्या आफ्रिकन्सशी गोऱ्याना जोडण्याच्या मंडेलांच्या प्रयत्नातला हा एक भाग असतो. टीम जिथे जिथे जाईल तिथे चेस्टर या टीममधल्या एकमेव काळ्या खेळाडूभोवती लोकांचा, लहान मुलांचा गराडा पडत असतो. त्याची ही लोकप्रियता इतकी वाढते की खेळाडूंना नेणाऱ्या विमानावरही चेस्टरचा मोठा चेहरा रंगवला जातो.


आपण गोऱ्याना सामावून घेऊ, तुम्ही मला तुमचा नेता म्हणून निवडलंय, आता मला नेतेपद निभावूदे असं आवाहन करूनही मंडेला यांना फारसा प्रतिसाद त्याआधी मिळालेला नसतो, पण आता ही रग्बी टीम त्यांना अप्रत्यक्षपणे देश एकत्र आणण्यासाठी मदत करणार असते. गरीब मुलांना मोफत वस्तूवाटप असते तेव्हाही एक मुलगा राष्ट्रीय रग्बी टीमची जर्सी त्याच्या वाट्याला येते ती नाकारून जातो, कारण गोऱ्या खेळाडूंच्या टीमची जर्सी घेतली तर 'आपले' लोक आपल्यावर रागावतील ही भीती त्याला असते. आता आपले राज्य आलेय तर आपण गोऱ्यांना ठेचू, हवे ते करू हा काळयांचा भावनिक उन्माद हळूहळू मोडून काढायला आणि हे देशातले गोरेही आपलेच आहेत हे त्यांच्या गळी उतरवायला मंडेला पूर्ण प्रयत्न करत असतात.

स्वत: तरुणपणी रग्बी खेळलेले मंडेला रग्बी वर्ल्डकपचे वेळापत्रक समजून घेतात, चार गटात प्रत्येकी चार टीम्स आणि दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या बलाढ्य टीम्सशी आधी लढावे लागणार हे त्यांना समजते. तयारी करत असलेल्या टीमला स्वत: हेलिकॉप्टरमधून जाऊन ते शुभेच्छा देतात तेव्हा टीमतर्फे त्यांना टीमची टोपी भेट देण्यात येते, ती ते अभिमानाने घेऊन परततात. पिनारला आता मंडेलांची इच्छा, त्यांचे स्वप्न बरोबर कळलेले असते. पहिल्या सामन्यात जिद्दीने खेळून ते ऑस्ट्रेलियाला हरवतात. स्पर्धेदरम्यान एकदा टीमला बोटीतून एका खास ठिकाणी नेले जाते. मंडेला यांनी १९६४ ते १९९१ अशी आयुष्यातली तब्बल २७ वर्षं ज्या तुरुंगात काढली, त्या तुरुंगाला टीम भेट देऊन येते. तिथे मंडेलाना ठेवलेली एवढीशी जागा पाहून पिनार हेलावून जातो. परतल्यावर विचारात पडलेल्या पिनारला त्याची मैत्रीण जेव्हा विचारते की 'उद्याच्या सामन्याचा विचार करतोयस का', त्यावर तो म्हणतो, 'नाही, एक माणूस सुमारे ३० वर्षे जेलमध्ये राहतो, आणि तिथून बाहेर पडताना मात्र ज्यांनी त्याला तिथं खितपत टाकलं त्यांना माफ करून बाहेर येतो, हा काय माणूस असेल'.

स्पर्धा रंगत जाते, पावसात झालेल्या सामन्यात फ्रान्सला हरवून दक्षिण आफ्रिका फायनलला पोचते. फायनलमध्ये टक्कर असते न्यूझीलंडशी. गाडीत मंडेला न्यूझीलंडने इतरांना कसं चिरडून टाकलंय हे ऐकतात, जपानला १४५-१७ ने तुडवताना एकाच सामन्यात त्यांनी १४५ हा स्कोर करत वर्ल्डरेकॉर्ड केलाय हे ऐकून ते थक्क होतात. आणि क्वार्टर फायनलला पोचली तरी खूप झालं अशी माफक अपेक्षा घेऊन आलेली आफ्रिकन टीम आता थेट फायनलला आल्यावर 'धिस कंट्री इज हंग्री फॉर ग्रेटनेस' असं म्हणून मंडेला आपली इच्छा सुचवतात. फायनल सुरु होण्याआधी ते स्प्रिंगबॉक्सची जर्सी घालून आणि टीमकडून त्यांना मिळालेली टोपी घालून मैदानावर येतात, प्रत्येकाला शेकहॅंड करत प्रोत्साहन देतात. सामना चुरशीचा होतो, न्यूझीलंडच्या लोमू या प्रमुख बलदंड स्ट्रायकरला रोखण्यात सगळ्या टीम्स अपयशी ठरलेल्या असतात. फायनलला मात्र पिनार त्याच्या सहकाऱ्यांना म्हणतो, 'मी माझा खांदा, हात, पाय, मान सगळं मोडून घेईन, पण लोमूला रोखीन'. इतर खेळाडूही त्याच्या सुरात सूर मिसळतात. सामना अटीतटीचा होतो, या रांगड्या रानटी खेळात आफ्रिकेचे खेळाडू जखमी होतात, पण जिद्द सोडत नाहीत, आणि शेवटी १५-१२ ने सामना, नव्हे वर्ल्ड कप जिंकतातइतिहास घडलेला असतो.  'तुला आज इथे स्टेडियममध्ये जमलेल्या ६३००० दक्षिण आफ्रिकन चाहत्यांचा पाठिंबा लाभला' यावर कॅप्टन पिनार म्हणतो, '६३००० नाही, आम्हाला ४३ मिलियन दक्षिण आफ्रिकन्सचा पाठिंबा मिळालाय.'

स्टेडियममधून बाहेर पडल्यावर रस्त्यावर प्रचंड गर्दी लोटलेली असते, वाट काढत जाण्यात बराच वेळ जाणार हे ओळखून मंडेलांची गाडी वेगळ्या मार्गाने नेऊ असं त्यांचा सिक्युरिटी ऑफिसर म्हणतो तेव्हा मंडेला म्हणतात, 'नको, कितीही वेळ लागूदे, काही घाई नाही.' एका खेळामुळे एक झालेला देश बघत, हे आनंदी लोक बघत हा मानवतेचा मसीहा हळूच डोळे पुसतो

सिनेमाची फ्रेम फ्रेम विचार करून पेश केलेली, म्हणूनच मनात घर करून बसलेली. फायनलची तिकिटे आपल्या कुटुंबियांना द्यायला पिनार येतो तेव्हा 'अरे आम्ही तिघे आहोत, हे चौथे तिकीट कुणासाठी' असं त्याचे वडील त्याला विचारतात त्यावेळी तो त्यांच्या घरी काम करणाऱ्या काळ्या मोलकरणीकडे पाहतो तो सीन, किंवा पिनार जेव्हा मंडेला असलेल्या तुरुंगात थोडा वेळ स्वत:ला बंद करून घेत खिडकीतून खाली पाहतो तेव्हा त्याला छिन्नी हातोड्याने दगडावर काम करत बसलेले मंडेला दिसतात तो प्रसंग, आपले मोदी जसे पंतप्रधान झाल्यावर अनेक देश फिरत होते तसेच त्याच कारणांसाठी म्हणजे देशाची इमेज आणि परराष्ट्र धोरण सुधारायला मंडेलाही तेव्हा अनेक देशांच्या दौऱ्यावर असताना 'फॉर या चेंज, मंडेला दक्षिण आफ्रिकेलाही भेट देणार आहेत' हे पिनारच्या गोऱ्या वडिलांचं खोचक वाक्य,  'सॉकर इज या जेंटलमन्स गेम प्लेड बाय हुलीगन्स अँड रग्बी इज या हुलीगन्स गेम प्लेड बाय जेंटलमन्स' असे संवाद, गोऱ्या खेळाडूंची नावे चेहऱ्यासह लक्षात ठेवण्याचा मंडेलांचा अभ्यासमहत्त्वाची मीटिंग मध्येच थांबवून टीव्ही चॅनेल चेंज करत टीमसोबत जल्लोष करणारे सामान्य लोक टीव्हीवर पाहून खुश होणारे मंडेलाउद्या इंग्लडशी सामना असताना माझा तो वेळ मोकळा ठेव असं सेक्रेटरीला सांगणारे मंडेला, प्रकृती खालावूनही टीमचे अपडेट्स घेणारे मंडेला असे अनेक प्रसंग निव्वळ अप्रतिम.

मॉर्गन फ्रीमन हे मुळातच त्यांच्या हुबेहूब चेहऱ्यामुळे नेल्सन मंडेला म्हणून परफेक्ट शोभून दिसतात. मॅट डेमनने साकारलेला कॅप्टन पिनारही खास. दोघांनाही या भूमिकांसाठी ऑस्कर नामांकन मिळालं होतंच, शिवाय चार ऑस्कर नावावर असलेल्या दिग्दर्शक क्लिंट इस्टवूड यांनाही दिग्दर्शनासाठी नामांकन होतंच. आवर्जून पाहावा असा सिनेमा.

रॉबेन आयलंड इथे तुरुंगात असताना मंडेलांना प्रेरणा देणारी विल्यम अर्नेस्ट हेन्ले यांची 'इन्व्हिक्टस' ही कविता मॉर्गन यांच्या आवाजात सिनेमाभर तुकड्या तुकड्यात ऐकू येत राहते, ती खाली देत आहे -
Out of the night that covers me,
Black as the pit from pole to pole,
I thank whatever gods may be
For my unconquerable soul

In the fell clutch of circumstance
I have not winced nor cried aloud.
Under the bludgeonings of chance
My head is bloody, but unbowed

Beyond this place of wrath and tears
Looms but the Horror of the shade,
And yet the menace of the years
Finds and shall find me unafraid

It matters not how strait the gate,
How charged with punishments the scroll,
I am the master of my fate,
I am the captain of my soul