द्रविड, गोपीचंद कोच म्हणून कसे आहेत?
वर्ल्डकप उंचावणे खेळाडू म्हणून जमले नाही, पण कोच म्हणून ते साध्य करता आले हा समान धागा पकडून परवा अनेकांनी द्रविडची तुलना चक दे इंडियाच्या कबीर खानशी केली. या फायनलच्या आधीही द्रविडने खेळाडूंना तसेच मोटिव्हेट केले. कारण स्पर्धा अंतिम टप्प्यात आल्यावर नेमके इकडे आयपीएल ऑक्शन सुरु झाले आणि अंडर १९ मधील कोण किती किमतीला जाणार याच्या चर्चा सुरु झाल्या. द्रविडने तिकडे खेळाडूंना सांगितले, 'बाबांनो, आयपीएल दरवर्षी असते, पण ही संधी एकदाच मिळतेय तुम्हाला (अंडर १९ खेळणारा खेळाडू पुन्हा दोन वर्षांनी होणाऱ्या अंडर १९ स्पर्धेत खेळू शकत नाही - वय बसत असले तरी) तर तुमचा बेस्ट परफॉर्मन्स द्या'. अर्थात हे तोच हक्काने सांगू शकतो आणि खेळाडू त्याच्या माघारी कुजबुजू शकत नाहीत, कारण ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट इंटरेस्ट परिस्थिती उद्भवल्यावर द्रविडने स्वत: दिल्ली डेअरडेव्हिल्सशी असलेला अफाट मलईदार करार मोडून त्या तुलनेने खूपच कमी मानधनात युवा टीमचे कोच होणे निवडले होते. कोच म्हणून त्याने २०१६ ला अंडर १९ मध्ये पूर्ण वर्ल्डकप उत्तम खेळून फायनलला मात्र १४५ ऑलआउट झाल्याने विंडीजकडून झालेला पराभव पचवला होता. म्हणूनच यावेळी फायनलला आल्यावर त्याने पोरांना फार रिलॅक्स होऊ न देता विशेष शिस्त लावली असावी. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात खेळाडू विचलित होऊ नयेत म्हणून त्यांना मोबाईल वापरावर बंदी घातली होतीच.
'वर्ल्डकप जिंकलो याचा आनंद आहेच पण आमची क्षमता पाहता फायनलमध्ये आमचा ए दर्जाचा खेळ झाला नाही' असं म्हणत अगदी आत्ताही तो खेळाडूंना सांगतोय की 'वर्ल्डकप जिंकलात, आता खऱ्या अर्थाने तुमची चॅलेंजेस आणि हार्डवर्क सुरु झालंय.' यंदा आपल्या महिला टीमनेही फायनलपर्यंत पोचून वर्ल्डकप गाजवला तेव्हा द्रविडने त्यांचे खास कौतुक मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांना भेटून म्हणूनच केले. यंदा आपल्या पुरुष नि महिला दोन्ही टीम आफ्रिका दौऱ्यावर जाताना तुझा सपोर्ट कुणाला या ट्रिकी प्रश्नावर त्याने उत्तरही तितक्याच चतुराईने दिले की 'रिझल्टच्या दृष्टीने वुमेन्स मुळातच फेव्हरेट्स म्हणून खेळतील तर मेन्स टीम अंडरडॉग म्हणून, त्यामुळे माझ्या शुभेच्छा मेन्स टीमला'. उत्तरही असे की बाजूलाच उभ्या मिताली, झुलननाही काही वावगे वाटणार नाही. (वुमेन्स टीमनेही आफ्रिकेत पहिली मॅच नुकतीच जिंकली) आयपीएलपेक्षा राष्ट्रीय टीमला (मेन्स असो की वुमेन्स) प्रोत्साहन, योगदान देणे निवडणारा द्रविड नेशन फर्स्ट हा पंतप्रधान मोदींचा नारा नेहमीच कृतीत आणत राहिलाय आणि मोदींनीही परवा आपण वर्ल्डकप जिंकल्यावर कर्नाटकात झालेल्या रॅलीमध्ये राजकारण जरा बाजूला ठेवलं आणि द्रविडकडून प्रामाणिकपणा आणि दुसऱ्यांसाठी जगण्याची वृत्ती शिका असं लोकांना आवाहन केलं!
द्रविडचा फक्त एक फॅन म्हणून नाही तर आताशा एक माणूस म्हणून आणि लेखक म्हणूनही काहींच्या मानसिकतेचा मला अभ्यास करावासा वाटतो, ती सवय लागलीये. मग कित्येकदा राहुल द्रविड, पी. गोपीचंद, विश्वनाथन आनंद अशा निस्वार्थी खेळाडूंचे मनोव्यवहार कसे असतील याची भुरळ पडते. या तिघांच्या खेळाडू म्हणून अचिव्हमेंट्स आणि निवृत्तीनंतर त्या त्या खेळात पुढची पिढी घडवण्यासाठी त्यांनी आखलेले उपक्रम, घेतलेली मेहनत, त्याचवेळी जाईल तिथे बराचसा मानसन्मान मिळत असताना त्यांचे समाजातले नम्र वागणे हे सगळे आपोआप दिसत जाते. यातून या तिघांच्या बाबतीत एक समान गोष्ट जाणवते. यांचे नेहमीच जमिनीवर असलेले पाय, आपल्या कारकिर्दीत आपलं काम झालं की बॅटन पासऑन करण्यासाठी पुढच्या पिढीला तितकंच सक्षम बनवण्यासाठी योगदान देणं, १५-२० वर्षांपूर्वी आपल्या खेळात दाखवलेली जिद्द, चिकाटी आता कोच म्हणून अमलात आणणं अशा अनेक गोष्टी. आनंद अजून खेळतोय, पण युवा खेळाडूंना तोही प्रोत्साहन देत असतोच. क्रिकेटव्यतिरिक्त अन्य खेळातला आवडता खेळाडू विचारल्यावर द्रविडने एकदा लगेच आनंदचे नाव घेतले होते.
सायना, सिंधू, किदम्बी यांचं यश वाचताना कळलं की गोपीचंद पहाटे चार वाजता अकॅडमी उघडून स्वत: हजर असतो. तुम्ही सहाला येऊन सराव सुरु करा, मी पोचतोच नंतर असं म्हणत स्वत: निवांत नऊ-दहाला येणाऱ्यांपैकी गोपीचंद, राहुल नाहीत. गोपीचंदने तर सामाजिक भान जपत शीतपेयांची जाहिरात करणेही नाकारले होते. काही वाद होऊन सायनाने कोच बदलला, कामगिरी खालावल्यावर पुन्हा गोपीचंदकडे आली. याउपर शक्य तितके लाइमलाइटपासून दूर राहिले तरच त्यांना पुढचे खेळाडू घडवण्याचं काम नीट करता येईल हेही असे गुरू जाणतात आणि तसा प्रयत्नही करतात, पण आता मीडियाच इतका विस्तारलाय की ते प्रत्येकवेळी साध्य होतंच असं नाही.
२०१६ आणि २०२० ऑलिंपिकमध्ये आपली मेडल्स टॅली वाढण्यासाठी २०१४ मध्ये शासनातर्फे पोटेन्शियल मेडल विनर्स हेरण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. त्यात गोपीचंद, द्रविड, अभिनव बिंद्रा होते. असे ७५ ते १०० खेळाडू निवडा, त्यापैकी २५-३० मस्ट वॉच ठरवा, मग त्यांच्यावर मेहनत घेतली जाईल अशा त्यांना सूचना. मग सिंधू, साक्षी, दीपा यांची कामगिरी आपण पाहिलीच.
स्पर्धेचा निर्णायक टप्पा जवळ आल्यावर खेळाडूंना मोबाईल बॅन करणाऱ्या द्रविडसारखीच गोपीचंदचीही शिस्त कडक. आणि असे नियम, शिस्त युवा खेळाडूंनाच लागू करता येतात, तेच आपलं ऐकू शकतात हेही अशा गुरूंना माहित असतं. सिनियर टीमचा कोच झाल्यावर हेल्मेट फोडून अणकुचीदार शिंगं बाहेर आलेल्या त्या खेळाडूंना शिस्त लावायला गेलेल्या कुंबळेचं काय झालं ते आपण पाहिलंच. तिथे मॅन मॅनेजमेंट नीट करू शकणारा मॅनिप्युलेटिव्ह रवी शास्त्रीच चपखल बसला. म्हणूनच द्रविड कधी सिनियर टीमचा कोच होईल असं आता वाटत नाही.
आणखी एक, आपल्यापेक्षा द्रविड जरा बियॉन्ड विचार करत असल्याने कोच म्हणून आत्ताही त्याची विचारसरणी जरा वेगळी आहे. तो म्हणतो की '२०१२ अंडर १९ वर्ल्डकपही आपण जिंकला, पण त्या टीममधला एकच खेळाडू (संदीप शर्मा) पुढे भारतीय टीममध्ये येऊ शकला, त्याउलट आपले तेव्हाचे प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाचे मात्र पाच-सहा खेळाडू (हेड, बॅनक्रॉफ्ट, पॅरिस, एगर, टर्नर, संधू) त्यांच्या सिनियर टीममधून पुढे खेळले, मग खरे जिंकले कोण?' असे विचार असल्यानेच तो त्याउपर एका वाक्यात असंही बोलून गेलाय की 'केवळ अंडर १९ विजेते ही या खेळाडूंची ओळख राहू नये'. या वाक्यातला अर्थ जरा डोकं खाजवलं की कळतो. तो कोच असलेल्या इंडिया ए आणि अंडर १९ या दोन्ही संघांचे प्रयोजनच यासाठी आहे की पुढे त्यातून भारताला उत्तम खेळाडू मिळावेत. आयपीएल काय तसंही ते खेळत असतातच. मुळातच आपल्याला युवराज, कैफ, कोहली, जडेजा, मनीष पांडे असे बरेच खेळाडू अंडर १९ वर्ल्डकप खेळलेले मिळालेत. हा इतिहास पाहता आणि आजकाल आयपीएलमध्ये छाप पाडली की थेट राष्ट्रीय टीममध्ये मिळणारी संधी ही तफावत पाहिली की काही गोष्टी प्रकर्षाने जाणवून येतात.
खेळाडू म्हणून एव्हरेज पण कोच म्हणून यशस्वी आणि व्हा
इसव्हर्सा अशी उदाहरणे आपण पूर्वी पाहिली आहेत. हे सध्या जरा वेगळं चाललंय. नियम हा अपवादाने सिद्ध करण्यासाठीच गॅरी कर्स्टन, द्रविडसारख्यांची योजना झाली असावी. सलग दोन अंडर १९ फायनल, अंडर १९ आशिया कप २०१६ विनर आणि २०१७ सेमीफाययनल, शिवाय इंडिया ए ने मागच्या वर्षी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड यांना दिलेली मात हे सगळं आत्ताच कोच म्हणून द्रविडच्या नावावर झालंय हे विशेष.
शेवट पुन्हा कालच्याच वाक्यांनी करतो.
तुम्ही ज्यांना फॉलो करता, ज्यांचे फॅन असता त्यांनी वागणुकीतून दिलेले धडेही आपसूक गिरवत राहण्याचा प्रयत्न करता, यातून तुम्हाला कधी फायदा होतो, कधी नुकसानही होते. तरीही आपण त्या मूल्यांपासून हटत नाही, तशी इच्छाच होत नाही. हे सगळं आपण शाळेच्या चार भिंतींबाहेरच शिकू शकतो. द्रविड, गोपीचंद, आनंदसारख्यांचा असा स्वभाव, ते असे का घडले हा स्वतंत्र पीएचडीचा विषय आहे.
- पराग पुजारी
No comments:
Post a Comment