Thursday, 16 November 2017

हाय सम्या,

कसा आहेस? काय चाललंय तिकडे? आज आपल्या पुलंचा बड्डे तर त्यांच्या अंतू बर्वा भाषेत म्हणायचं तर रंभा (तुझ्या सतत बदलणाऱ्या हेअरस्टाईल सांभाळत) तेल थापत असेल आणि उर्वशी पंख्याने वारा घालत असेल ना? बरोब्बर एक महिन्यापूर्वी आठ ऑकटोबरला तुझ्या घरी गेलो होतो सम्र्याबरोबर.. पहिल्यांदाच येत होतो मी तुझ्या पुण्यातल्या घरी, पण तसं  जाणवलं नाही.

शाळेत असताना एकाच वर्गात असून आपली फारशी मैत्री नव्हती, जेवढ्यास तेवढंच बोलणं व्हायचं, सर्कल्स वेगळी होती. बारावीनंतर जरा खऱ्या अर्थाने आपल्या भेटीगाठी वाढल्या. तू सांगलीत आलास की तू, मी, राम्या भेटायचो, वेगवेगळ्या विषयांवर गप्पा व्हायच्या. त्या काळात तुझ्या सहा सस्पेन्स कादंबऱ्या मी अधाशासारख्या वाचून काढल्या, भारीच आवडल्या. रहस्य शेवट्पर्यंत टिकवून ठेवायची तुझी हातोटी विलक्षणच. आपण मजेत एकमेकांना म्हणायचो की सेन्स ऑफ सस्पेन्स आणि सेन्स ऑफ ह्युमरची जरा उधारीत देवाणघेवाण करू, लिहायला आणखी मजा येईल. पण खरंतर तुझाही सेन्स ऑफ ह्युमर तितकाच जबरदस्त होता, सरकास्टिक बोलणं जास्त असायचं. अश्या एकदा म्हणालेला की सम्या कधीकधी इतका सरकास्टिक बोलतो की ऐकणाऱ्याला वाटतं की व्वा, हा आपलं तोंड फाटेस्तोवर कौतुक करतोय, पण नंतर विचार केल्यावर कळतं की तो तर आपली बिनपाण्याने करून गेला. बालदिनाला तू फेसबुकवर स्टेट्स टाकला होतास - Sameer wishes all friends a happy childrens day and also hopes that some of them grow up soon. माझी त्यावर 'टिपिकल समीर पोस्ट' अशी कमेंट. किंवा तुझा असाच आणखी एक स्टेट्स - The biggest tragedy with life is that there is no background music. And biggest tragedy with Indian news channels is that there is. कुठून सुचतं असलं देव जाणे असं वाटायचं, म्हणून तुला खरंच देवाने भेटायला बोलावून घेतलं बहुतेक लवकर.

पुण्यात आलो की नेहमी दोन समीरना भेटण्यासाठी फोन असतो माझा.. जमल्यास भेटही होते. पण मागच्या महिन्यात तुझ्या घरी गेलो तेव्हा बाहेर कुणी नातेवाईक बसलेच होते. तुझा भाऊ चैतन्य सरळ आतल्या खोलीत घेऊन गेला, दिवा दिसला - तुझ्या नावाचा. अशावेळी हात जोडून काय बोलायचं असतं माहित नाही. म्हणजे सद्गती, शांती लाभो वगैरे असतंच. पण आपल्याच वयाचा मित्र गेल्यावर काय म्हणायचं असतं हे आपल्याला माहित नाहीये हे मला तेव्हा डोळे मिटल्यावर कळलं, जाणवलं. मग मी एवढंच बोललो की 'सम्या तू आहेस, तू आहेस अजून आमच्यात, आपल्या आठवणीत, तुझ्या लिखाणात.. तू आहेस आणि कायम राहशील.' काकू, चैतन्य, नूपुरा यांनाही तसा पहिल्यांदाच डिटेल भेटत होतो, पण तसंही काही जाणवलं नाही. कारण त्यांना मी माहित होतोच - तुझ्या बोलण्यातून. टीव्ही वर शो असायचा तेव्हा तू सांगायचास घरी की माझ्या मित्राचा शो आहे, बघा. मी सांगून माझ्या घरीही कधी पाहिलं गेलेलं माझं काम, लेखन एकीकडे.. आणि तुझ्यासारखे मित्र एकीकडे.. बळ मिळतं. खूप कौतुक तुला मित्रांचं, आणि मदत करायलाही तू नेहमी तत्पर. मी अनेकदा अनुभव घेतलाय.

शाळेत तुझ्याबद्दल बऱ्याच जणांच्या मनात काही गैरसमज, पूर्वग्रहही होते. मी त्यातला एक नसलो तरी याच्याशी पुढेमागे चांगली मैत्री होईल असं वाटलं नव्हतं हेही खरंच. तुझे विचार अनेकांना झेपायचे नाहीत म्हणूनही तुला त्रास व्हायचा. क्वचित पुढे तुझ्या बोलण्यातून ते यायचंही, पण ते तेवढ्यापुरतंच. कारण तुझं तुला जाणवलेलं असायचं की आता तू खूप पुढे आलायस, टीकाकारांची तोंडे बंद करून. हां, हाही एक तुझाच वाक्प्रचार - टीकाकारांची तोंडे बंद केली हा एकेकाळी तकिया कलाम झाला होता बोलण्यात, सम्र्याही तुझ्या स्टाईलने ते म्हणायला लागला पुढे आणि हे शब्द मग अनेक संदर्भाने, अनेक स्थळ काळ व्यक्ती बदलून बोलण्यात यायचे. अजूनही 'टीकाकारांची तोंडे बंद' हे शब्द कुठे वाचले, ऐकले की तू आठवतोस. पण हे खरंच तुला जमलं होतं, म्हणूनच मला तुझ्यासारख्या लोकांचं खूप कौतुक वाटत आलंय नेहमीच. शाळेत असताना इतर लोक, शिक्षक, वर्गातले विद्यार्थी उगाच असा ग्रह करून घेतात की अमुकला  पुढे काहीच विशेष जमणार नाही आयुष्यात, किंवा तमुक हा खूप पुढे जाईल... मजा म्हणजे यातले बरेचसे अंदाज चुकतात. यासाठी 'जिद्दीने टीकाकारांची तोंडे बंद करणे' आणि 'अशा प्रकारे प्रचंड अपेक्षा वाढवून कालांतराने त्याचा बुडबुडा फुटला' असे शब्द तू मराठी भाषेला दिले होतेस. भाषेवर तुझं प्रभुत्व होतंच, मराठीपेक्षा इंग्लिशमध्ये पुढे तुझं लिखाण वाढलं. तेही तितकंच दर्जेदार, सकस होतं. उगाच नाही एखाद्याला मोठ्या पब्लिकेशनमधून ऑफर येत पुस्तक करण्यासाठी.

तुझ्या एखाद्या कथेवर आपण वेबसिरीज करावी असं आपलं ठरत होतं, त्यासाठी मर्डर क्लब, डायल मी फॉर मर्डर, अनपेक्षित अशा तुझ्या कादंबऱ्यांचा विचार माझ्या डोक्यात होता, पण तू उत्साहाने म्हणालास 'मग मी नवीनच लिहितो ना एखादी, भेटू निवांत आणि ठरवू.' ते निवांत भेटणं काही झालंच नाही ही खंत कायम राहील. २५ फेब्रुवारी २०१७ ला 'सचिनवर बोलू काही' हा एक कार्यक्रम माझ्या एका क्रिकेटवेड्या मित्राने आयोजित केला होता पुण्यात मराठा चेम्बर ऑफ कॉमर्समध्ये, तेव्हा आपण भेटलो.. तेही तू निव्वळ मला भेटायचं म्हणून आलास, कारण तशी तुला क्रिकेटची फार आवड नाही, पण मैत्रीसाठी तू बऱ्याच गोष्टी करायचास. (हर्षा भोगले आयोजित ऑनलाईन स्पर्धेत मी क्रिकेटवर लेख लिहिला तेव्हा त्याला मस्तपैकी टायटलही तूच सुचवलं होतंस, आठवतंय ना?) मी इतरही काहींना बोलावलं होतं की येऊन जा कार्यक्रमाला, भेटू..पण एकटा तू आलास. (तेव्हाचाच फोटो आता या लेखातही वापरतोय). ज्याने कार्यक्रम आयोजित केला तो आणि तू -लर्निंग या एकाच फिल्डमध्ये, मग ओळख करून दिल्यावर लगेच तुमच्या गप्पा रंगल्या. लगेच कुणाला आपलंसं करून घ्यायचं हे एक स्किल होतंच तुझ्याकडे.

त्यानंतर तुझ्या लग्नात मे महिन्यात भेटलो, आणि त्यानंतर थेट मी तुझ्या नावाच्या दिव्यासमोर हात जोडून... अरे ह्याला काही अर्थ आहे का? असं कसं वागू शकतोस तू? मग एक आठवतं, सातवीत चाचणी की सहामाहीचा कुठलासा पेपर लिहीत असताना स्पीकरवरून प्रत्येक वर्गात अनाउन्समेंट होते की 'समीर कुलकर्णीने ताबडतोब स्टाफरूममध्ये यावे', मग आम्हाला वर्गातून जाणारा गोंधळलेला पण शांत असा तू दिसतोस, तो तू परत काही पेपर लिहायला येत नाहीस. नंतर कळतं की सम्याचे बाबा गेले, तो थेट घरी गेला. काका ज्यामुळे गेले त्या ब्रेन ट्युमर, स्वादुपिंडाचा कॅन्सर याच आजारांमुळे तूही गेलास या वर्षी, हे आम्हाला हलवून सोडणारं होतं. तुला मायग्रेनचा बऱ्याच वर्षांपासून त्रास होता, ट्रीटमेंटही सुरु होती, आणि आताशा तर अर्ध्या टेनिस बॉलइतकी गाठ मेंदूतून निघाली तुझ्या, पण ती सर्जरी यशस्वी झाली आणि आता तू रिकव्हर व्हायला लागलेला होतास असं समजलं होतं. तू आणि सम्र्या तर सप्टेंबर लास्ट वीकमध्ये जेवायलाही गेला होतात. त्या रात्री तू आणि सम्र्या रात्री दीडपर्यंत बोलता काय, आणि पुढे सात-आठ दिवसात तू जातोस काय.. विचित्रच. पण त्या रात्री तू माझी, राम्याची आणि अनेकांची चौकशी करत होतास असं कळलं. माझ्याबद्दल डिटेल बोलणं झालं हेही कळलं. मी घेतलेल्या काही इम्पल्सिव्ह करियर डिसिजन्समुळे माझ्याबद्दल तुला काळजी वाटत होती, जी रास्तच होती. नोकरीत सतत धरसोड करणारा मी घरच्यांना, मित्रांना सतत डिसअपोइन्ट करतोय हे जाणवलं तेव्हा मीही एक धड जॉब करतोय रे आता.. बाकी स्वप्नं पूर्ण होतीलच की एक दिवस, त्यात काय... आणि तू आहेसच की माझ्यासोबत.

शेवटी राहते ती खंत.. मी दसऱ्याला शुभेच्छा म्हणून कधीच कुणाला फोन करत नाही, पण यावेळी ३० सप्टेंबरला दसऱ्याला तुला अगदीच फोन करावासा वाटत होता - अर्थात दसरा हे निमित्त पण मुख्य म्हणजे तब्येतीची चौकशी करायची होती... फोन केला नाही, मला खंत वाटतेय. आणि दुसऱ्या दिवशी एक ऑकटोबरला तू गेलास - ज्या दिवशी तू तुझ्या स्वत:च्या नवीन घरी शिफ्ट होणार होतास त्याच दिवशी. राम्याला तुझ्याशी फोनवर बोलायचं होतं त्याच्याकडूनही फोन झाला नाही, त्याला खंत वाटतेय. विश्व्या दुबईला आहे, त्याच्याशी मध्ये एकदा फोनवर तुझं बोलणं झालं तेव्हा तू त्याची ख्यालीखुशाली विचारलीस, त्याने तुझी नाही, त्याला खंत वाटतेय. या सगळ्या खंती अचानक बाहेर आल्या आणि मग कळलं तू कितीजणांना जोडून ठेवलं होतंस, पण आम्हीच इंसेन्सिटिव्ह की तुझी त्या त्या वेळी चौकशी केली नाही. विंड्याचा मेसेज होता ग्रुपवर की अजूनही लग्नातला सम्याचा मिश्कील चेहरा आठवतोय, मला आठवलं मी चारच महिन्यापूर्वी तुझा लग्नात तो फोटो काढलेला. ३० सप्टेंबरला सांगलीत असताना त्या रात्री मी का नेट बंद ठेवलं.. का का का. नंतर रात्री ११ पासून आपल्या 'दहावी ची कार्टी' ग्रुपवर मेसेजेस सुरु झाले होते, तू गेलास यावर कुणाचा विश्वासच बसत नव्हता. मी सकाळी मेसेजेस वाचले, धडाधड राम्या, राजा, सम्र्याला फोनाफोनी सुरु केली, पण दुर्दैवाने बातमी खरी होती. आदल्याच दिवशी कसा माहित नाही, पण मी रद्दी काढावी म्हणून कपाट उघडलं तेव्हा अनेक जुन्या फाईल्स दिसल्या, त्यातल्या एकीत काही चिट्ठ्या दिसल्या, एका वहीत ६२ नावे दिसली. आपण दहावी चं गेट-टू केलं तेव्हाची मुलांची लिस्ट आणि चिट्ठ्या म्हणजे फिशपॉन्डस. तू, सम्र्या, विश्व्यावरच निम्मे होते. तुझीच फार आठवण होऊन ते फोटो काढून मी ग्रुपवर टाकलेले संध्याकाळी साडेसहा-सातच्या सुमारास, आणि नेमक्या त्याच वेळी तू पूना हॉस्पिटलमध्ये एडमिट होऊन शेवटचे श्वास घेत होतास, हा दुर्दैवी योगायोग. हे काहीच तेव्हा माहीत नव्हतं.

तुझा ब्लॉग वाचतो अजूनही अधूनमधून.. आपले मेल्स वाचले अलीकडे, दुनियादारी सिनेमा येऊन गेला तेव्हा त्यावर झालेलं बोलणं वाचलं. सुशिंच्या कादंबऱ्या वाचायला मला सजेस्ट करणारा तू... दुनियादारीनंतर मला त्यांच्या कोणत्या कादंबरीवर सिनेमा करायला आवडेल हेही तू बरोब्बर ओळखलं होतंस. एक नक्की, तुझ्या एखाद्या कथेवर काहीतरी प्रोजेकट करेनच पुढेमागे, स्टोरी क्रेडिट तुझंच असेल. आपण नवीन काही लिहिलं की एकमेकांना आधी पाठवायचो, ते मात्र आता... मला लिखाणासाठी सतत प्रोत्साहन देणारा एकजण या एक ऑकटोबरला हरवलाय ना..

तुला एक सांगतो.. तुझ्या घरी गेलो तेव्हा आधी मी आणि सम्र्या दुर्गा कॉफी सेंटरजवळ भेटलो, पण तिथे तुझ्याविषयी बोलताना तुझे एकेक किस्से आठवून, वाक्ये आठवून, शाळेतले तुझे खवल्या मांजर वगैरे जोक्स आणि तुझा आपण त्या गावचेच नाही वाला सदा विनम्र साळसूद चेहरा आठवून आम्ही चक्क हसत होतो - आपसूकच. असं वाटेनाच की आपण नसलेल्या कुणाबद्दल तरी बोलतोय, उलट एका स्टेजला असं वाटायला लागलं होतं की आता आम्हाला फोन करून तूही तिथे येशील, आणि पुन्हा आपल्या गप्पा रंगतील. आणि हेच महत्त्वाचं आहे मित्रा, तू तुझ्या आठवणीतून आमच्या चेहऱ्यावर हसू ठेवून गेलायस, हे खूप कमीजणांना साधतं. दिवाळीसाठी सांगलीला गेलो तेव्हा लाख वाटलं की आपल्या इंग्लिशच्या कुलकर्णी सरांना जाऊन बातमी सांगावी.. त्यांचे आपण दोघे जरा लाडके होतो ना.. पण धीर झाला नाही, कदाचित आता जाईन तेव्हा जमेलही पण माहित नाही. इथे आम्हाला इतकं वाईट वाटतंय तर नुपूराला काय वाटत असेल, तुमची तर लग्नाआधी अकरा वर्षांची मैत्री. यूएसला तू कामानिमित्त काही दिवस होतास, तेव्हा कॅनडामधल्या चैतन्यला फोन करून सांगतोस की एक पार्सल पाठवलंय मित्राबरोबर, तो तिकडे अनायासे येतच होता म्हणून, अमुक गार्डनमध्ये जा, तो देईल.. आणि चैतन्य तिथे आल्यावर समोर साक्षात तूच उभा.. हे असं असायचं तुझं सरप्राईझ देणं. त्याला काय वाटत असेल? काकूंना काय वाटत असेल?

बऱ्याच आठवणी आहेत, लिहिण्यासारखं खूप काही आहे.. पण शेवटी अजून एकच सांगतो, आपल्या सांगली भाषेत - हे असं मध्येच जाऊन तू काय बरोबर केला नाहीस गड्या.. फसवलास आम्हाला.. असं कुठं असतंय काय भावा..
तरी चल आता आवरतं घेतो, लव्ह यू.. मिस यू.. तू आहेस इथेच.
                                                     
-- पराग पुजारी 
नोव्हेंबर २०१७











No comments:

Post a Comment