Friday, 21 October 2016

(प)रागदारी 4

जॉनी जॉनी 

राग: आटोकाट काठोकाठ सारवासारव आटोक्यात

अतिदर्जेदार नवीन हिंदी गीताभ्यासात आज आपण रसग्रहणासाठी निवडलेले गाणे आहे ते म्हणजे मयुर पुरी नामक गीतकाराने 'इट्स एन्टरटेनमेंट' या चित्रपटासाठी लिहिलेले 'आटोकाट काठोकाठ सारवासारव आटोक्यात' या रागातील गीत - जॉनी जॉनी'. संगीत आहे जिगर-सचिन यांचे, तर गायले आहे जिगर, माधव, प्रिया यांनी.

जॉनी जॉनी - हां जी
तूने पी है - ना जी
मुंह तो खोलो - हौ जी
झूठ बोलेया - ना जी
वा वा वा, पहा पहा, कविमहाराज काय म्हणतात,  कीआजच्या काळातील मनुष्यप्राणी दारू पितो की नाही हेच आज सत्य असत्याची पडताळणी करण्याचे परिमाण बनले आहे.किती सुंदर विचार! उगाच कशाला त्या महागड्या नार्को टेस्ट, लाय डिटेक्टरसारख्या टेक्नोलॉजीच्या डोंबलावर पैसे घालवायचे? ‘हे जॉनी, तू प्यायला आहेस का, तोंड उघड बघू,तू काही खोटे तर बोलत नाहीयेस ना बाळा...’ पहा,किती सौम्य भाषा. थोडक्यात कवीला असेसुचवायचे आहे की एखादा खोटे बोलतोय असा संशयआपल्याला येत असेल तर त्याच्यावर थेट तसा आरोप न करता,  त्याच्या कलाने  घेत हळूहळू एखादी गोष्ट काढून घ्यावी. होय, हीच शिकवण आपल्याला यातून मिळत नाही  काय? उगाच कशास्तव एखाद्यास लागेल असे बोलून त्याचा राग ओढवून घ्यायचा? पिणाऱ्यांना असे दुखावून अशाने आपलीच ड्राय डेला सोय झाली नाही तर आपले काय होईल अशी छुपी भीती तर यामागे नसेल ना? मोठमोठ्या कवींचे गर्भितार्थ आपल्यासारख्या पामरांना सहजासहजी लागत नाहीत हेच खरे.

नो नो नो, मैने पी नही है (गुणिले तीन)

म्हणजेच कविश्रेष्ठ पुढे (तीनदा) म्हणतात, “नाही नाही नाही, मी प्यायलेलो नाहीये”… आता हे वाक्य तीनदा म्हणायची काय गरज असा प्रश्न एखाद्या अडाण्यास पडूही शकतो. पण आजचा डेली सोपचा जमाना लक्षात घेत कवीने ही जी हुशारी दाखवली आहे तिच्यापुढे नतमस्तक व्हावेच लागेल. आपण दुसऱ्याकडे बघतो आहोत हे समजण्यासाठीही  तीनदा मान (डोळे मोठे करून) वळवावी लागण्याच्या या सांप्रत काळी 'मी प्यायलेलो नाहीये' ही गोष्ट तीनदा सांगितली तरच ती समोरच्यापर्यंत पोहचू शकेल हे त्यास पक्के ठाऊक आहे.
“नाय नो नेव्हर, शक्यच नाही राव, उगाच ऐकून घेतोय म्हणून कायपण काय, छे छे छे, अरे हा कसला घाणेरडा गलिच्छ आरोप”  पहा, जॉनीच्या कोमल मनाला असा आरोप झाल्याने किती यातना होत आहेत. तो ओरडून सांगतोय की नाही, त्रिवार नाही. मी (स्वत:हून) पिणे शक्यच नाही. देशी असो वा विदेशी, एकच प्याला असला तरीही नाही. पण खरी गोष्ट तर पुढे आहे जी तुमच्याआमच्यासारख्यांच्या मनातदेखील येणार नाही. पुढे कविवर्य जे  स्पष्ट करतात ते अधिक हेलावून टाकणारे आहे. हे ऐकून,वाचून कोणत्याही संवेदनशील माणसाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय, किंबहुना त्याचे लिव्हर खवळल्याशिवाय राहणार नाही.

हां जी, मैंनू पिलादी गयी है, जो भी है सही है, मजा आ रही है
म्हणजेच काय तर मला प्यायचीच नव्हती, मला जबरदस्तीने पाजण्यात आली. माझा काहीच पुढाकार वा सहभाग नव्हता. काय चुकीचं बोलला तो? असं होतंच ना की कधी  कधी वाईट संगतीमुळेआपल्याला प्यावी लागते. म्हणजे ४ जण जमले आहेत, कुणी खुर्चीवर, कुणी स्टुलावर, कुणी खांबाला टेकून. आणि प्यायला एक अख्खा खंबा उपलब्ध  आहे, पण इतर तिघे इतके हट्टी, हेकेखोर, दुराग्रही की जर्रा म्हणूनदेखील पीतच नाहीयेत. अन त्यामुळे एकावरच सर्व भार पडला आहे नि त्याला नाईलाजाने ती संपूर्ण दारू संपवावी लागतेय. दुष्ट रे दुष्ट, हायली स्वार्थी, सुपर करंटे मेगा दळभद्रे टेरा नतद्रष्टे गिगा हलकटे! कुठे फेडतील हे पाप, अशावेळी मित्राला दारूच्या  आहारी जाऊ न देणे हे आमचे मित्र म्हणून कर्तव्य होते, अशा लटक्या सबबी देऊ नयेत. इथे गरिबांना एकवेळसुद्धा धड खायला, प्यायला मिळत नाही, आणि तुम्ही अशी आयती मिळालेली खुशाल वाया घालवणार? मित्राचा भार हलका करण्यासाठी त्याला काहीच मदत करणार नाही, तो काय इंजीनियरिंगचा प्रोजेक्ट आहे काय की ग्रुपमधल्या एकानेच जीव तोडून काम करायचं आणि  बाकीच्यानी एक्जाम येऊपर्यन्त टिवल्याबावल्यात करियर करायचं? अरे थूत तुमच्या जिंदगानीवर. तो नाईलाजाने पीत असताना नुसते अक्षरश: बघ्याची भूमिका घेणारे, स्वत: मैदानात मदतीसाठी न उतरणारे हे मित्र.. छे छे, मित्र तरी कसं म्हणावं यांना.. एवढे माजलात होय रे? अशी नॉनप्रॉडकटीव्ह, नॉनकोऑपरेटिव्ह वाईट संगत  असताना जर कुणी अशा कारणाने अट्टल बेवडा बनलाच, तर यात दोष त्याचा की त्याच्यामित्रांचा? मग जे आहे ते योग्यच आहे, उलट याची मला मजाच येते आहे असे निरुपायाने त्या बळीच्या बकऱ्यास म्हणावे लागले तर त्यात आश्चर्य ते काय?



इन द बार इन द कार, इसके सियापे है हजार
पीती रहती है फिर कहती, मैने पी है पहली बार
इन द बार इन द कार, गिर गिर गिर चलता है यार
पीता रहता फिर भी कहता, कलसे छोड दूंगा यार
सुनता नाही बाप की, आदते खराब की
हर बोतल पे कहता है ये, लास्ट होगी आजकी

बार असो वा कार असो, भेदभाव करू नये. दारू तर निर्जीव असते, आपल्याला कोण कुठे बसून प्राशन करते आहे हे त्या बिचाऱ्या बापडीला कसे कळणार? अमुक ठिकाणी पिऊ नये, तमुक वेळी ढोसू नये इत्यादी मर्त्य मानवाने पाळलेले काही विधिनिषेध असोत की संस्कार वगैरे इतरहितकारी, विधायक, निरुपद्रवी, निरुपयोगी गोष्टी असोत, या सगळ्यांशी त्या निरागस मदिरेला काय देणे घेणे.
कुणीही प्यायल्यावर आणि नको त्या व्यक्तीकडून पकडला गेल्यावर असेच म्हणतो की पहिल्यांदाच घेतली... हम्म, होतेच की असे. आणि आयुष्यातील सर्वच गोष्टीना हे तत्त्वज्ञान लागू पडत नाही काय? राजकारणी घोटाळा करतो आणि समजा तो (चुकून) सिद्ध झालाच, तर तो असे सांगेल का हा माझा १८ वा घोटाळा. नाही ना, तो तर असेच म्हणेल की ‘अरेरे, हे काय बरेघडले माझ्या हातून, प्रथमच प्रमाद घडला हा, पुन्हा असे नाही होणार.’ परीक्षेत कॉपी करताना विद्यार्थी सापडला तर असे म्हणेल का की 'मी तर प्रत्येक पेपरला असे करतो मग आजच का बरे तुम्ही मला पकडलेत, तुम्हाला काही लाज?' नाही म्हणत ना तो असे, उलट तो साळसूदपणे म्हणतो की परत आयुष्यात असे करणार नाही. हे म्हणताना उद्याच्या पेपरसाठी काय नवी शक्कल लढवावी याचा विचार त्याच्या मनात सुरूही झालेला असतो. पण ह्यास दूरदृष्टी म्हणतात. देशाला महासत्ता व्हायचे असेल तर या भावी पिढीत असे हुशारी, प्रसंगावधान, हजरजबाबीपणा, संकटसमयी डगमगून न जाण्याची वृत्ती, दूरदृष्टी इत्यादी गुण विकसित होणे ही काळाची गरज नव्हे काय? भुरटा चोर असो की पाकीटमार, किंवा साधा विदाउट तिकीट प्रवासी, कुणीही असेच म्हणेल ना की अहो हे पहिल्यांदाच झाले माझे असे, उद्यापासून  नाही होणार.

काव्यात पुढे असे नमूद केले आहे की जास्त झाल्याने कितीही अडखळत, ठेचकाळत, पडत धडपडत चालणे होत असेल तर बेडरपणे उत्तर द्यावे की - 'आजचा दिवस माझा, हवं तर उद्यापासून सोडून देईन.'  'सुनता नाही बाप की' या ओळीचा अर्थ शब्दश: घेणारा तर मूर्खच म्हटला पाहिजे. खरेतर वाईट सवयीसोड बाबा आता असा वडीलकीचा सल्ला कुणीही देऊ शकतो. नाहीतर काय, एकट्याने बसून घेणे ही वाईटच सवय. घसा गरम करण्यासाठी मैफल जमवावी. जॉनी जॉनी, चुग इट चुग इट  यातून तर फुर्र फुर्र करत चवीचा पूर्ण आस्वाद घेत पी असेही जॉनीस सांगण्यात आले आहे.  त्यावरही सावध जॉनी ‘लास्ट होगी आजकी’ असे म्हणत हा प्याला शेवटचा असे बाणेदार उत्तर देतो.

जॉनी जॉनी - हां जी
दो दिखते है - हां जी
आंखे खोलो - हां जी
झूठ बोलेया - ना जी
यापुढे कवी दारूने पोटात ठाण मांडलेले असतानाही साधे गणित आणि व्यवहारज्ञान विसरू नये हे सुचवतो, यासाठीच तो जॉनीला डोळे उघडायला लावतो आणि "दो दिखते है का रे शिंच्या?" अशी प्रेमाने पृच्छा करतो. आणि हे योग्यच आहे कारण अशावेळी समोरचा नशेत आहे ह्याचा फायदा घेऊन एखादा रिक्षावाला वा ट्याक्सीवाला आर्थिक गैरफायदा घेऊ शकतो, बारमधून इप्सित स्थळी (शक्यतो घरी - स्वत:च्याच, पत्ता नीट सांगता आल्यास) सोडताना मीटरवरील आकडे काहीही असले तरी तो कितीही उकळू शकतो. म्हणूनच नशेत असले तरी भान राखले पाहिजे असा मोलाचा सल्ला हा गणितप्रेमी कवी अप्रत्यक्षरीत्या देतो.

कभी बर्थडे कभी शादी, कभी पूरी कभी आधी
यारो ने मिलके पिलादी मुझको
कभी हेप्पी कभी टेन्शन, डेली कोई नया रिझन
यारा बस चाहिये अटेन्शन तुझको
नो नो नो, मैने पी नही है मैने पी नही है मैने पी नही है
हांजी मैनू पिलादी गयी है पिलादी गयी है, ज्यादा हो गयी है
कलसे पार्टी नही है
जिंदादिल आणि सतत उत्साही असणारा माणूस उगाच काळवेळ बघत बसत नाही.  त्याचा प्रत्येक क्षण उत्सवी असतो. सेलिब्रेट करायला काही ना काही निमित्त शोधून काढतोच, हेच जिवंतपणाचे खरे लक्षण नव्हे काय? प्यायची इच्छा झाली की तोच दिवस जश्न-ए-दिन. अशावेळी कुणाचा वाढदिवस असो वा एखाद्याचे लग्न, अख्खी किंवा किमान अर्धी बाटली मित्रांच्या आग्रहाखातर संपवली तर त्यात वावगे ते काय? नाहीतर मित्राला काय बरे वाटेल? पहा, यातून आपल्यापेक्षा दुसऱ्यांचा विचार प्राधान्याने करण्याचे कौशल्य विकसित करण्यास सांगितले गेले आहे. कधी माणूस आनंदी मूडमध्ये असतो तर कधी एखाद्या काळजीने त्याचे मन पोखरले जात असते, अशावेळी आधार देते ती मदिराच. अशावेळी तू रोज रोज मुद्दाम अशी कारणे देऊन लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतोस असा आरोपही होऊ शकतो, पण त्यांना ठणकावून सांगावे की उद्यापासून पार्टी वगैरे काही नाहीये, ही आज पितोय हीच काय ती शेवटची. शिवाय असे प्रत्येक बाटली रिचवताना म्हणावे हीदेखील किती अभिनव कल्पना.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटात जॉनी नावाचे कोणते पात्रच नाही, वा वा वा, कळस रे बाबा कळस. थोडक्यात पिऊन इतके टुन्न व्हावे की स्वत:चे नाव गावही विसरून जावे. प्राचीन काळापासून संत महात्म्यांनीही हाच उपदेश केला नाही काय की नाव गाव जात धर्म प्रांत भाषा विसरून एक यावे, माणूस हा एकच आहे. माणुसकी हाच धर्म इत्यादी इत्यादी. समानतेचा हा संदेश कवी किती अलगदपणे देऊन जातो त्याला तर या त्रिखंडात काही तोडच नाही. आजकाल गावांची, विद्यापीठांची, रस्त्यांची, चौकांची नावे बदलण्याचा अट्टहास धरणारे यातून काही बोध घेतील काय?

तर असे हे एक दर्जात्मकदृष्ट्या खूपच वरच्या पातळीवर असलेले  गीत आज आपण अभ्यासले.. लवकरच असेच आणखी एखादे गीत आपण पाहू. तोपर्यंत नो नो नो...

No comments:

Post a Comment