Friday, 21 October 2016

हॅप्पी बर्थडे वीरू

२००३, इंग्लिश कौंटी क्रिकेट, लिसेस्टरशायरचे दोघे बॅटिंग करतायत आणि मिडलसेक्सकडून खेळणारा पाकचा अब्दुल रझाक मस्त रिव्हर्स स्विंग करून दोघांना छळतोय. नॉन स्ट्रायकरच्या जेरेमी स्नेपला हा बॅट्समन म्हणतो की, 'बॉल जुना झालाय, रिव्हर्स स्विंग होतोय'...'होय रे, खेळताच येत नाहीये'..'Hmm, I have a plan, See' आणि मग पुढच्याच ओव्हरला एक अवाढव्य सिक्स, थेट स्टेडियमबाहेर, स्नेप आ वासून बघतोय.. अम्पायर्स झक मारत बॉक्स मागवून "घ्या, आता या नवीन बॉलने खेळा" म्हणतात. रिव्हर्स स्विंग होणार नाही म्हणून लिसेस्टरशायर खुश, आणि मग 'मानलं भावा' असे भाव चेहऱ्यावर घेऊन पुढे आलेल्या स्नेपला हा म्हणतो. "आता किमान एक तासभर तरी काय टेन्शन नाही"

तंत्रशुद्ध फलंदाजी, ठराविक टेक्निक वगैरे गोष्टींवर त्याचा कधीच विश्वास नव्हता. लहानपणी सायकल चालवताना त्याने शेवटचे लयीत पाय हलवले होते असं वाटावं इतकं अप्रतिम त्याचं फूटवर्क होतं. अमुक परिस्थितीत तमुकरीत्या खेळल्यास बॅटिंग सोपी जाते एवढंच त्याला कळायचं आणि असं करून मग समोरचे बोलर्स लवकर फ्रस्ट्रेट होतात हेही पाहायला याला आवडायचं. सचिन-सौरव ही जगातली बेस्ट ओपनिंग जोडी धुमाकूळ घालत असताना ओपनर म्हणून स्वत:चं  स्थान निर्माण करणं सोपं नव्हतं. टेस्ट असो किंवा वन डे.. सचिन, सौरव, राहुल या तिघांपैकी एक तरी खेळतोच अशी आपल्या टॉप थ्रीची ख्याती सर्वदूर पसरली होती, त्यात हा अजून एक आला आणि आपली बॅटिंग अजूनच भक्कम झाली.

वीरेंद्र सेहवाग.. खरंच वाघासारखाच खेळायचा हा.. वाघ आपली शिकार कमजोर आहे की ताकदवान आहे हे बघत नाहीच, तो फक्त हल्ला करून फडशा पाडतो. सेहवागही हा असा वेगळाच होता.. समोर बॉलर कुणीही असो, पीच कोणतही असो, आपली बॅटिंग पहिली असो की दुसरी.. असं तसं जिंकायचं तर समोरच्या टीमवर दबाव टाकायचाच आहे त्यासाठी धुलाई तर करायची आहेच ना, मग पहिल्याच बॉलपासून का करू नये, असे महान विचार असल्याशिवाय माणूस २०११ च्या वर्ल्ड कपला जवळपास प्रत्येक मॅचला (सलग पाच मॅचेस) पहिल्याच ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर चौकार मारत नाही किंवा न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात टीम साउदीला सलग तीन सिक्स मारून करत नाही. २००७ वर्ल्ड कपला बांगलादेशने आपल्याला हरवून रडवलं होतं, आणि २०११ ला पुन्हा हीच टीम पहिल्याच मॅचला समोर. टीम मीटिंग सिरियसली सुरु असताना हा माणूस कानात गाणी ऐकत बसतो, आणि गॅरी कर्स्टनकाका ओरडल्यावर म्हणतो 'बांगलादेशला काय घाबरायचंय, आपण स्ट्रॅटेजी वगैरे आखावी एवढ्या लायकीची टीम तरी आहे का ती, नुसतं जायचं आणि तुडवून यायचं, झालं..' साधारण असंच तो प्रेसमध्येही बोलला की 'बांगलादेश ही एक अतिसामान्य टीम आहे'.. अर्थात हे त्यालाच शोभतं, कारण मॅचमध्ये आपल्या ३७०, त्यात याच्या १७५.. मॅन ऑफ द मॅच.

सेहवाग असाच बेदरकार, फुल केअरलेस एटीट्यूड पांघरून मैदानावर उतरणारा, पण बहुतेकदा आपला हा एटीट्यूड खराही करून दाखवणारा.. की 'या फालतू टीमला काय घाबरायचं, त्या बॉलरला काय एवढं महत्त्व द्यायचं.. म्हणत होतो ना'.. आणि मग कोच, कॅप्टन, इतर खेळाडू कुणीच काही बोलू शकायचे नाहीत.  कोच जॉन राईटनीही सांगितलं होत की सेहवागला त्याच्या पद्धतीने खेळू द्यावं, त्याला शिकवत बसण्यात काही अर्थ नाही.

हॅन्ड-आय को ऑर्डिनेशनचा वीरू हा आधुनिक बादशाह होता, सचिनबद्दलही वाचलं होतं की त्याची डाव्या डोळ्याची नजर तेज आहे, त्यामुळे  बोलरच्या दिशेने पाहत असताना त्याला चेंडूचा अंदाज लवकर घेता यायचा. हेच काहीशा फरकाने ब्रायन लाराच्या बाबतीत, त्याची बॅटिंग बघताना असं वाटायचं की कोणत्याही बॉलवर याच्याकडे तीन शॉट्स तयार आहेत आणि अति लेट खेळायच्या सवयीमुळे (पुढे ही शैली जयवर्धनेनेही शिकून घेतली) तो ऐनवेळी त्यातला हवा तो शॉट निवडून खेळू शकायचा, सतत शफल केल्याने बोलर आणि फिल्डर्सनाही कळायचं नाही. पण 'क्रिकेट हा माईंड गेम आहे' असं जे सचिन नेहमी म्हणत आला तेही सेहवागने जपलं.. कसोटीत जिथे गावसकर, तेंडुलकर, द्रविड याना त्रिशतक ठोकणं जमलं नव्हतं, तिथे हा पट्ठ्या दोन त्रिशतके नावावर करून बसलाय जे मानसिक कणखरता, एकाग्रता असल्याशिवाय शक्य नाही. तेही बांगलादेश, झिम्बाब्वेसारख्या आंडूपांडू टीमपुढे नव्हे, तर पाकिस्तान आणि साऊथ आफ्रिकेच्या बोलर्सना झोडपून त्यानं हे साध्य केलंय, याचं विशेष कौतुक. टेस्टमध्ये फास्टेस्ट अडीचशे आणि तीनशेचा विक्रम अजूनही नावावर मिरवतोय. वनडेत दोनशे आणि कसोटीत तीनशे करणारा हा एकटाच होता, आता ख्रिस गेलही जाऊन बसलाय त्याच्या बाकावर.  मॅक्ग्रा, वॉर्न, अक्रम, वकार, अख्तर, मेंडिस, मुरली, वास, पोलॉक, डोनाल्ड सगळेच कधी ना कधी डोकं धरून बसलेत याच्यामुळे. (तसे ते द्रविडमुळेही बसलेत... पण कारण अगदी उलट. 'अरे कधी हा बॉलला बॅट लावणार.. का इतक्या लांबून पळत येत सारखा पोपट करून घेतोय मी स्वत:चा')

मेंडिसवरून आठवलं, मिस्ट्री बोलर म्हणून याने लौकिक मिळवला होता, स्पिन चांगला खेळणाऱ्यानाही नाचवलं होतं, तेव्हा गॉल टेस्टमध्ये सेहवागने याला धू  धू धुतला, द्विशतक मारलं. पण त्यावेळी 'मेंडिसच्या सो कॉल्ड अद्भुत स्पिनला खेळताना काही स्ट्रॅटेजी केली होतीस का' यावर तो पत्रकाराला म्हणाला होता, 'भाईसाब, स्पिनर को स्पिनर बॅट्समन बनाता है, फिर उसका कॉन्फिडन्स बढता है और वो विकेट ले सकता है.. मैने उसे स्पिनर बननेही नही दिया, उससे क्या डरना?" मग पुढे जग मेंडिसला मारू लागलं.



सेहवाग बॅटिंग करताना बरेचदा किशोर कुमारची गाणी म्हणत खेळायचा हे सचिननेही सांगितलंय. (तेव्हा तो मनात असं काही ठरवत असेल का की 'पुढचं कडवं म्हणून होऊपर्यंत अजून दोन फोर्स मारेन, नाहीतर गाणंच बदलेन'.. शक्यतो त्याला गाणं बदलायला लागलं नसावं.) या गुरु सचिनला कुणी काही बोललं की याला अजिबात सहन व्हायचं नाही. याचेही काही किस्से फेमस आहेतच. नवख्या मायकेल क्लार्कने कांगारू बाण्याला जागून जेव्हा सचिनला  स्लेजिंग केलं तेव्हा वीरूने त्याला जाऊन विचारलं बाळा तुझं वय किती..  तो म्हणाला.. २५, होय ना, मग लक्षात ठेव, कारण तुझ्या वयापेक्षा जास्त तर सचिनची शतके आहेत. शोएब सतत बाउन्सर टाकून हुक मार की असं उकसावत असताना शांतपणे त्याला हा म्हणणार, 'बॉलिंग टाकतोयस की भीक मागतोयस.. नॉन स्ट्रायकर एन्डला तुझा बाप आहे, त्याला सांग'.. मग लगेच सचिन अख्तरला बाउन्सरवर सिक्स मारणार.. अशावेळी द्रविड, लक्ष्मण असते तर 'कशी जिरली' असं मनात म्हणत  फारतर गालात हसले असते, पण वीरूच्या अंगात इनबिल्ट किडे.. तो शोएबला जाऊन म्हणतो, 'बेटा बेटा होता है, बाप बाप होता है'.. हा किस्सा तर फेमसच. असे किस्से किंवा दंतकथा खऱ्या खोट्या असतीलही, पण त्या वीरूच्या नावाला जोडल्या तरच पटू शकतात हेही तितकंच खरं.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तीन त्रिशतके मारणाऱ्या ब्रॅडमन, ग्रेस (कवी नव्हे), हॅमंड, लारा, हसी वगैरेंच्या पंगतीत जसा सर रवींद्र जडेजा हा एकच भारतीय आहे, तसे टेस्टमध्ये दोन त्रिशतके ठोकणारेही दोघेच - ब्रॅडमन आणि सेहवाग. दोघेही एकदा २५४ वर आउट  झाले, शिवाय ब्रॅडमन एकदा २९९ वर नॉटआउट तर वीरू एकदा २९३ वर आउट. (दुसऱ्या दिवसअखेर सेहवाग २८४ वर नाबाद म्हणून आमचे टीसीएसवाले दोन मित्र शुक्रवारी ऑफिसला दांडी मारून ब्रेबॉर्नवर वीरुचं ३०० बघायला गेले आणि मुरलीधरनच्या बॉलिंगवर त्यालाच कॅच देत वीरूने २९३ वर आउट होऊन दाखवून दिलं की त्याला बेभरवशाचा का म्हणतात.) मेलबोर्नला १९५ वर असताना सिक्स मारायला जाऊन आउट झालेला, आणि 'दोनशे दिसत असताना असं का?' या प्रश्नावर 'उसमे क्या है, मूड हुआ तो किया स्टेपआउट, दोसौ फिर बनाऊंगा' असं उत्तर मुलतानला पहिलं त्रिशतकही सिक्स मारून ठोकणारा हा वाघच देऊ शकतो.

सध्या निवृत्त झाला असला तरी ट्विटरवर वीरू तुफान बॅटिंग करतोय.. मग ब्रिटिश पत्रकार पिअर्स मॉर्गन असो की आपले देशी राष्ट्रपुरुष अरविंद केजरीवाल.. कुणी सुटत नाही. परवा अगदी गुरु सचिनसोबतही त्याची झालेली खेळकर ट्विटाट्विटी फेमस झाली. आमच्यासाठी आधी आवडता खेळ, मग त्यातला आपला आवडता खेळाडू..  म्हणूनच २००३ फायनलला ३६० सारखा स्कोर चेस करताना तू आणि द्रविड एकत्र खेळत होतात, विकेट्स तर पडतच होत्या, तेव्हा त्याच्यापेक्षा तूच शेवटपर्यंत टिकायला हवास असं द्रविडभक्त असूनही वाटत होतं यातच सगळं आलं. आमच्यासाठी क्रिकेट हा नेहमीच फार सिरीयस होऊन त्यात इन्व्हॉल्व्ह व्हायचा खेळ, झालेली मॅच जर तर मध्ये बोलत ती परत जगायचा खेळ.. त्यात तू खरा एंटरटेनर म्हणून आलास आणि तेंडुलकर, द्रविडइतका फार अभ्यास न करताही पेपर गाजवता येतात हे दाखवून दिलंस. सचिन, राहुल, सौरवने तेव्हा आमची पिढी व्यापून टाकली असतानाही आमच्या मनात शिरकाव करणं सोपं नव्हतं, ते फक्त तुला आणि युवराजलाच जमलं. तुझं करियर अजून थोडंसं (या पोस्टइतकं) लांबलं असतं किंवा सलग झालं असतं तर तूही टेस्ट आणि वनडे दोन्हीत १०००० करू शकला असतास यात शंका नाही.

असो, २० ऑकटोबर  तुझा वाढदिवस.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. असाच आम्हाला एन्टरटेन करत राहा.. मिस यू...

(प)रागदारी 5

बॉस

राग: यथेच्छ माज यथेच्छ खाज

सलाम बॉस.. काय मग, कसे आहात बॉस.. सर्व काही कुशल मंगल ना बॉस? तुम्हाला वाटेल आज अचानक हे बॉस बॉस काय लावलंय, पण असं नाहीये ते. बास का बॉस,. आमचीपण काही क्रिएटीव्हिटी नको काय अधूनमधून? आणि हे उगाच नाही, तर अतिदर्जेेदार हिंदी गीतांच्या रसग्रहणात आजचे गाणेच असे बॉसपुराण गाणारे, बॉसची कायच्या काय महती विशद करणारे आहे. होय, अक्षयकुमार उर्फ अक्की यांचे बॉस हे गाणे. हे गीत अक्की महाराजांच्या बॉस नामक चित्रपटाचे शीर्षक गीत होय. 'यथेच्छ माज यथेच्छ खाज' या रागातील या गीतासाठी पेन वापरलंय कुमार यांनी, गळा साफ केलाय मीत ब्रदर्स, अंजान आणि द यो यो हनी सिंग यांनी तर बाजा वाजवलाय मीत ब्रदर्स अन अंजान यांनी. 

चला तर जरा वाट करून द्या.. ओह, तुम्हाला नाही म्हणत हे मी. सॉरी,. चुकून थेट रसग्रहणच सुरु केले. आधी प्रथेप्रमाणे या प्रारंभीच्या अप्रतिम काव्यपंक्ती पाहू...
मेक वे फॉर द बॉस...
ओह मदर फादर लिसन अप.. वोह
है गली गली में शोर, है बॉस में इतना जोर
इक बार भडक जाये, तो धरती देगा तोड

वा वा वा, म्हणजे सुरुवातीलाच असे म्हटले आहे की बॉस, सॉरी द बॉस यांचे थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे. तर ऐका हो ऐका, महत्त्वाची गोष्टेय, सर्व मातापिता वर्ग, नीट कान देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. चला हवा येऊ द्या, म्हणजे जरा वाट करून द्या. गल्लीगल्लीत ज्याच्या नावाचा डंका (आणि दणकाही) आहे तो बॉस येत आहे होsss, त्याच्यात इतकी मस्ती, सॉरी रग आहे, जोर आहे की तो भडकला तर या अख्ख्या धरतीचेच तुकडे तुकडे करून टाकेल. तो येत आहे होsss 

मिनिस्टर जैसे तेवर, हर कोई लेता फेवर
अपनी अप्रोच उंची, हम तो है दुनिया के बॉस
ह्याबिट अपनी है देसी, ट्रको में फुल है एसी
म्युझिक सुनते है हाय, हम तो है दुनिया के बॉस
बॉसचे वर्णन करताना पुढे असे मांडले आहे की या बॉसचे नखरे, म्हणजेच जीवनशैली, राहणीमान इत्यादी गोष्टी एखाद्या नेत्यासारख्या आहेत. याला म्हणतात उच्च राहणी आणि उच्चच्यापण वरची विचारसरणी.. मग कुणीही त्यांच्याकडे मदतीची अपेक्षा करत याचना करू लागला तर त्यात नवल ते काय? बॉसची ओळख वरपर्यंत आहे, म्हणूनच ते जणू अवघ्या विश्वाचे बॉस आहेत. (अतिशयोक्ती अलंकार) त्यांची सवय मात्र देसी आहे, उदाहरणार्थ: वातानुकुलित ट्रकमधून प्रवास करताना मोठ्या आवाजात संगीत ऐकणे. वा वा, आपल्या मातीशी मुळं घट्ट असावीत ती अशी. चला पटकन टेका डोके, बॉसच्या चरणी लीन व्हा. कारण,

बॉस... है हुकुम का इक्का, बॉस...है लाखो का सिक्का
बॉस...हर जगह पे लिख्खा, बॉस...बॉस...बॉस...बॉस...
बॉस...सिक्स पॅक का शहेनशाह, बॉस...बस ब्रांड पहनता
बॉस... अटीट्यूडसे बनता, बॉस...बॉस...बॉस...बॉस...
बॉस हाच खरा हुकमाचा एक्का आहे, तोच लाखात एक असा अस्सल सिक्का आहे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी असे यत्र तत्र सर्वत्र केवळ एकच शब्द लिहिला आहे - 'बॉस', नव्हे जणू शिलालेखावर कोरतात तसा कोरूनच ठेवला आहे. बॉसची बॉडी पण लय भारी आहे राव, सिक्स पॅकचा शहेनशहा या भूतलावर कुणी असेल तर तो एकमेवाद्वितीय असा बॉसच. तो केवळ ब्रांडेड कपडेच परिधान करतो (सांगितले ना तो उच्च राहणीवाला आहे म्हणून). असा बॉस बनणे म्हणजे कोणा सोम्यागोम्याचे काम नव्हे, ऐऱ्यागैऱ्याचेही नव्हे, येरागबाळ्याचे तर त्याहून नव्हे. (थोडक्यात आपल्यासारख्यांचे नव्हे.) जबरनाक खतरदस्त अटीट्यूडच्या सहाय्यानेच बॉस बनणे शक्य आहे. यातून कवी हलकेच जीवनात यशस्वी होण्यासाठी सुयोग्य दृष्टीकोन असणे किती महत्त्वाचे आहे हे अलवार सांगून जातो.  


   
अब अपनी के तारीफ करू, उपरवालेसे में डरू
जे कोई बने घन लेंडलॉर्ड, उने मार घुसांड मैं धरू
हम हरयाणा के इकलोते किंग, बहुत है अपनी फ्यान फोलोइंग
पर अपने को कोई फर्क नि पडता, वोई है सबका कर्ता धर्ता
यापुढे यो यो हनीसिंगांचा करिष्मा सुरु होतो. बॉसला शरण जाऊन त्याला सबस्क्राइब होऊन त्याची महती डिस्क्राइब करताना हनीभाऊ त्यांच्या अनोख्या शैलीत पण बॉसच्या वतीने म्हणतात, आता मी माझेच काय कौतुक करू? असामान्यत्वाला पोहोचूनही नम्र बॉस त्या परमेश्वराच्या चरणी मात्र नतमस्तक आहे आणि म्हणूनच आत्मप्रौढीचा धोका तो पत्करू इच्छित नाही. परंतु म्हणून कुणी बॉसच्या क्षमतेविषयी शंका घेण्याची हिम्मतही करू नये.
उदाहरणच द्यायचे झाले तर बॉसच्या इलाख्यात कुणी अन्यायी जुलमी जमीनदार असलाच तर गाठ बॉसशी आहे, त्यामुळे नीट जगायचे असेल तर गप (आपापल्या) चड्डीत राहावे. काही झाले तरी आपण हरियाणा प्रांताचे एकमेव राजे आहोत, आपले भक्त असंख्य आहेत.. पण ही जाणीव असूनही नम्र बॉसचे म्हणणे असे आहे की ह्या नश्वर इहलोकातल्या अशा भौतिक गोष्टीनी त्याला फरक पडत नाही, ही धुंदी त्याच्या डोक्यात जात नाही, कारण शेवटी कर्ता करविता तो परमेश्वर आहे हे तो मनोमन जाणून आहे. वा वा, अंगी नम्रता असावी ती अशी. नाहीतर आजकाल अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे काय कमी आहेत? सतत स्लेजिंग करणारे माजोर्डे ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू यातून काही शिकतील काय?      

दिल का हू थोडा रंगीन, पर भैंस के आगे न बजाता बीन
मुझको तो तू आगी पसंद, कमॉन बेबी डोन्ट बी मीन
आज तेणे सैर करादू, गुची लुइस तने दिलवा दू
अक्षय कुमार तो भाई है अपना, तू बोल तो सही फोटो करादू  
हा बॉस काही फक्त राकट, धटिंगण, रफ एन टफच नाही तर इनफ संवेदनशीलही आहे. म्हणूनच पुढे बॉसची हळुवार बाजूही मांडली आहे. तो रसिक मनाचा आहे, थोडासा रंगेलच म्हणा ना. पण म्हणून काही तो दिसली मुलगी, पड प्रेमात या कॅटेगरीतलाही नाही. अर्थात एखादी आवडल्यास तो तिला प्रेमाने जवळ बोलावतो, तुला फिरवून आणेन म्हणतो, इतकेच काय तर तुझे जे काय स्त्रीसुलभ हट्ट असतील तेही पुरवेन म्हणतो. असे लाडबिड पुरवणारा साथीदार मिळाल्यास स्त्रीची भीड आपसूकच चेपते नि मग फॉर फ़र्दर वाटचाल, ती शक्यतो कुणाची भीड बाळगत नाही.
'अगं तुला म्हणून सांगतो, अक्षय कुमार स्टार असेल जगासाठी, अपुन को तो भावासारखाच आहे, तुला हवा तर त्याच्यासोबत तुझा फोटोही करून देतो, बोल गं तू बोल फक्त, पायजेल तर बोलच. तेवढी वट आहे आपली.. टेन्शन नै बग.' वा वा, यातून बॉसमधला बंधूभाव हा अंगभूत गुण तर दिसतोच, शिवाय समोरच्याची आवडनिवड लक्षात घेऊन त्यानुसार त्या व्यक्तीला मदत करण्याची, त्याद्वारे आनंदी करण्याची वृत्तीही प्रकर्षाने दिसते. सांगा किती आहेत आज असे निर्मळ मनाचे लोक, मोजायलाच गेलात तर एका हाताची बोटेही जास्त होतील कदाचित. असो..

बादशाह सबके, बडे बडे रहते दबके
शाही नेचर, लार्ज हार्टेड बंदे रब के
असा हा बहुत जनांसी आधारू असणारा बॉस अर्थातच अगदी निर्विवादली सर्वांचा बादशाह ठरतो. भले भले त्याला वचकून राहतात ते म्हणूनच. मनाची श्रीमंती अपरंपार असल्याने ज्याचे मन मोठे आहे (डबल एक्सएल साईज तर सहज) आणि ज्याचा थाट राजेशाही आहे (डबल बहुव्रीही समास, आणि सांगितलं ना दोनदा ऑलरेडी की उच्च राहणी म्हणून) असा हा बॉस, याला काही तोडच नाही. 

ऑल वर्ल्ड में अपना डंका, फुंके ये दुश्मन की लंका
चॉपर बनाले सर का पंखा, दे दे रुकी ट्रेन को धक्का 
अशा या बॉसचा जगभर डंका पिटला जातोय आणि हे तो कम्प्लीटली डिझर्व्हच करतो. शत्रूच्या लंकेची तर हा अश्शी अश्शी वाट लावू शकतो. हेलीकॉप्टर तर बॉस डोक्यावर पंखा म्हणून वापरतो, आणि एवढेच नव्हे तर थांबलेल्या ट्रेनलाही तो एक हलकासा धक्का देऊन सुरु करू शकतो. वॉव, मुंबईचे लोकल ट्रेन व्यवस्थापन याकडे लक्ष देईल काय? स्पेशली सेन्ट्रल आणि हार्बर लाइन, उगाच किती रविवारी मेगा ब्लॉक घेत बसणार राव आणि पेंटाग्राफ तुटले म्हणून लोकलसेवा विस्कळीत झाल्यावर प्रवाशांच्या, चाकरमान्यांच्या शिव्या तरी किती दिवस खाणार? त्यांचे होणारे हाल तरी कमी होतील, दुवा मिळतील तुम्हाला... घ्या जरा मनावर. आमचा बॉस उदार मनाचा आहे, नाही म्हणायचा नाही.
   
हे यो लिसन एव्हरीबडी, द बॉस इज एव्हररेडी
टू ब्रेक अँड शेक इट डाऊन
बॉस खिलाडी है, सेक्सी बॉडी है
हरयाणा में खुद की पहाडी है, बॉस तो होते थोडे नॉटी है
बडी कूल उसकी बहन की लोरी है
हे यो, (अध्यात्मात, ध्यानधारणेत श्री आणि ओम यांना जे महत्त्व आहे तेच अशा आधुनिक गाण्यात हे आणि यो यांना आहे. ते म्हटलेच पाहिजे, दखल घेतलीच पाहिजे.) प्रत्येकाने ऐका, बॉस २४*७ तय्यारच असतो - कद्दीपन केव्वापन कुट्टेेपन. तोच खरा खिलाडी आहे, त्याची बॉडी तर तोबा तोबा प्रमाणात सेक्सी आहे. अरे टिचभर टू/थ्री बीएचकेचा रुबाब करणाऱ्यानो, हरियाणात बॉसचा स्वत:चा अख्खा एक डोंगर आहे डोंगर, आहात कुठे? या खोडकर बॉसची भगिनी अंगाई गाते तीही किती प्रसन्न वाटते. थोडक्यात त्याचे खानदानच कलासक्त आहे.

है बडे धुरंधर, दुनिया है अपने अंडर
अपने ऑर्डरसे, बदले हर साल कॅलेण्डर
ऑलराईट है अपने फंडे, माइंड गरम पर दिल के थंडे
टेस्ट को खेले समझके वनडे
करदे हर दिल को पक्का
हे ये सुनलो सारे, ये बॉस हमारे है तगडे चट्टाने फाडे
श्रीयुत बॉस हे सॉल्लिडपैकी रणधुरंधर आहेत. त्यांच्या रीतसर परवानगीशिवाय पानही हलत नाही. अहो साधे वर्षदेखील संपून नवे वर्ष सुरु होताना बॉसची परवानगी काळालाही घ्यावीच लागते. म्हणजेच काळही थिजवून ठेवणाऱ्या या बॉसच्या टाचेखाली जणू ही अवघी दुनियाच आहे. (बापरे, वामनावतार रिटर्न्स की काय!)
ते काही असो, पण बॉसला क्लिष्टता आवडत नाही. त्याचे सारे फंडे, त्याची तत्त्वे मात्र अगदी सरळ नि स्पष्ट आहेत. भडक डोक्याचा असला तरी तो सहृदय नि हळवा, कोमल मनाचा आहे. कसोटीही तो वनडेप्रमाणे खेळतो (सेहवागच्या डेट्स न मिळाल्याने अक्षयला सिनेमात घेतले असावे).. कमकुवत मनाच्या लोकांना मजबूत मन कसे आत्मसात करावे हेही तो शिकवू शकतो. उद्या बॉस मोटिव्हेशनल स्पीकर बनला किंवा त्याने काउन्सेलर म्हणून ऑफिस टाकले तर आश्चर्य वाटायला नको. अरे बॉस इतका तगडा आहे की मोठमोठे खडक वा शिळाही तो अस्से अस्से तोडू फोडू शकतो. (अशीच एखादी शिळा फुटून त्यातून आणखी एखादी अहिल्या बाहेर येईल काय?) ताकद का चेष्टा राव! तर असे हे बॉस द ग्रेट!       
             
तर हे होते या आजचे दमदार गाणे. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नव्या अतिदर्जेदार गाण्यासह. तोपर्यंत सर्वशक्तिमान बॉसला शरण जा आणि वेळच्या वेळी त्याने दिलेलं ऑफिसमधलं काम पूर्ण करत जा. समस्त नोकरदारो के हित में जारी.  तुमच्या दुनियेचा तोच बॉस आहे. आणि नवरे लोक्स, सात फेरे घेऊन तुम्हीच घरात हौसेने वाजतगाजत आणलेल्या बॉसला शरण जा. त्यातच तुमचे (दोनवेळच्या  जेवणासकट) भले आणि लाइफ़टाइम सौख्य सामावले आहे.
(प)रागदारी 4

जॉनी जॉनी 

राग: आटोकाट काठोकाठ सारवासारव आटोक्यात

अतिदर्जेदार नवीन हिंदी गीताभ्यासात आज आपण रसग्रहणासाठी निवडलेले गाणे आहे ते म्हणजे मयुर पुरी नामक गीतकाराने 'इट्स एन्टरटेनमेंट' या चित्रपटासाठी लिहिलेले 'आटोकाट काठोकाठ सारवासारव आटोक्यात' या रागातील गीत - जॉनी जॉनी'. संगीत आहे जिगर-सचिन यांचे, तर गायले आहे जिगर, माधव, प्रिया यांनी.

जॉनी जॉनी - हां जी
तूने पी है - ना जी
मुंह तो खोलो - हौ जी
झूठ बोलेया - ना जी
वा वा वा, पहा पहा, कविमहाराज काय म्हणतात,  कीआजच्या काळातील मनुष्यप्राणी दारू पितो की नाही हेच आज सत्य असत्याची पडताळणी करण्याचे परिमाण बनले आहे.किती सुंदर विचार! उगाच कशाला त्या महागड्या नार्को टेस्ट, लाय डिटेक्टरसारख्या टेक्नोलॉजीच्या डोंबलावर पैसे घालवायचे? ‘हे जॉनी, तू प्यायला आहेस का, तोंड उघड बघू,तू काही खोटे तर बोलत नाहीयेस ना बाळा...’ पहा,किती सौम्य भाषा. थोडक्यात कवीला असेसुचवायचे आहे की एखादा खोटे बोलतोय असा संशयआपल्याला येत असेल तर त्याच्यावर थेट तसा आरोप न करता,  त्याच्या कलाने  घेत हळूहळू एखादी गोष्ट काढून घ्यावी. होय, हीच शिकवण आपल्याला यातून मिळत नाही  काय? उगाच कशास्तव एखाद्यास लागेल असे बोलून त्याचा राग ओढवून घ्यायचा? पिणाऱ्यांना असे दुखावून अशाने आपलीच ड्राय डेला सोय झाली नाही तर आपले काय होईल अशी छुपी भीती तर यामागे नसेल ना? मोठमोठ्या कवींचे गर्भितार्थ आपल्यासारख्या पामरांना सहजासहजी लागत नाहीत हेच खरे.

नो नो नो, मैने पी नही है (गुणिले तीन)

म्हणजेच कविश्रेष्ठ पुढे (तीनदा) म्हणतात, “नाही नाही नाही, मी प्यायलेलो नाहीये”… आता हे वाक्य तीनदा म्हणायची काय गरज असा प्रश्न एखाद्या अडाण्यास पडूही शकतो. पण आजचा डेली सोपचा जमाना लक्षात घेत कवीने ही जी हुशारी दाखवली आहे तिच्यापुढे नतमस्तक व्हावेच लागेल. आपण दुसऱ्याकडे बघतो आहोत हे समजण्यासाठीही  तीनदा मान (डोळे मोठे करून) वळवावी लागण्याच्या या सांप्रत काळी 'मी प्यायलेलो नाहीये' ही गोष्ट तीनदा सांगितली तरच ती समोरच्यापर्यंत पोहचू शकेल हे त्यास पक्के ठाऊक आहे.
“नाय नो नेव्हर, शक्यच नाही राव, उगाच ऐकून घेतोय म्हणून कायपण काय, छे छे छे, अरे हा कसला घाणेरडा गलिच्छ आरोप”  पहा, जॉनीच्या कोमल मनाला असा आरोप झाल्याने किती यातना होत आहेत. तो ओरडून सांगतोय की नाही, त्रिवार नाही. मी (स्वत:हून) पिणे शक्यच नाही. देशी असो वा विदेशी, एकच प्याला असला तरीही नाही. पण खरी गोष्ट तर पुढे आहे जी तुमच्याआमच्यासारख्यांच्या मनातदेखील येणार नाही. पुढे कविवर्य जे  स्पष्ट करतात ते अधिक हेलावून टाकणारे आहे. हे ऐकून,वाचून कोणत्याही संवेदनशील माणसाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय, किंबहुना त्याचे लिव्हर खवळल्याशिवाय राहणार नाही.

हां जी, मैंनू पिलादी गयी है, जो भी है सही है, मजा आ रही है
म्हणजेच काय तर मला प्यायचीच नव्हती, मला जबरदस्तीने पाजण्यात आली. माझा काहीच पुढाकार वा सहभाग नव्हता. काय चुकीचं बोलला तो? असं होतंच ना की कधी  कधी वाईट संगतीमुळेआपल्याला प्यावी लागते. म्हणजे ४ जण जमले आहेत, कुणी खुर्चीवर, कुणी स्टुलावर, कुणी खांबाला टेकून. आणि प्यायला एक अख्खा खंबा उपलब्ध  आहे, पण इतर तिघे इतके हट्टी, हेकेखोर, दुराग्रही की जर्रा म्हणूनदेखील पीतच नाहीयेत. अन त्यामुळे एकावरच सर्व भार पडला आहे नि त्याला नाईलाजाने ती संपूर्ण दारू संपवावी लागतेय. दुष्ट रे दुष्ट, हायली स्वार्थी, सुपर करंटे मेगा दळभद्रे टेरा नतद्रष्टे गिगा हलकटे! कुठे फेडतील हे पाप, अशावेळी मित्राला दारूच्या  आहारी जाऊ न देणे हे आमचे मित्र म्हणून कर्तव्य होते, अशा लटक्या सबबी देऊ नयेत. इथे गरिबांना एकवेळसुद्धा धड खायला, प्यायला मिळत नाही, आणि तुम्ही अशी आयती मिळालेली खुशाल वाया घालवणार? मित्राचा भार हलका करण्यासाठी त्याला काहीच मदत करणार नाही, तो काय इंजीनियरिंगचा प्रोजेक्ट आहे काय की ग्रुपमधल्या एकानेच जीव तोडून काम करायचं आणि  बाकीच्यानी एक्जाम येऊपर्यन्त टिवल्याबावल्यात करियर करायचं? अरे थूत तुमच्या जिंदगानीवर. तो नाईलाजाने पीत असताना नुसते अक्षरश: बघ्याची भूमिका घेणारे, स्वत: मैदानात मदतीसाठी न उतरणारे हे मित्र.. छे छे, मित्र तरी कसं म्हणावं यांना.. एवढे माजलात होय रे? अशी नॉनप्रॉडकटीव्ह, नॉनकोऑपरेटिव्ह वाईट संगत  असताना जर कुणी अशा कारणाने अट्टल बेवडा बनलाच, तर यात दोष त्याचा की त्याच्यामित्रांचा? मग जे आहे ते योग्यच आहे, उलट याची मला मजाच येते आहे असे निरुपायाने त्या बळीच्या बकऱ्यास म्हणावे लागले तर त्यात आश्चर्य ते काय?



इन द बार इन द कार, इसके सियापे है हजार
पीती रहती है फिर कहती, मैने पी है पहली बार
इन द बार इन द कार, गिर गिर गिर चलता है यार
पीता रहता फिर भी कहता, कलसे छोड दूंगा यार
सुनता नाही बाप की, आदते खराब की
हर बोतल पे कहता है ये, लास्ट होगी आजकी

बार असो वा कार असो, भेदभाव करू नये. दारू तर निर्जीव असते, आपल्याला कोण कुठे बसून प्राशन करते आहे हे त्या बिचाऱ्या बापडीला कसे कळणार? अमुक ठिकाणी पिऊ नये, तमुक वेळी ढोसू नये इत्यादी मर्त्य मानवाने पाळलेले काही विधिनिषेध असोत की संस्कार वगैरे इतरहितकारी, विधायक, निरुपद्रवी, निरुपयोगी गोष्टी असोत, या सगळ्यांशी त्या निरागस मदिरेला काय देणे घेणे.
कुणीही प्यायल्यावर आणि नको त्या व्यक्तीकडून पकडला गेल्यावर असेच म्हणतो की पहिल्यांदाच घेतली... हम्म, होतेच की असे. आणि आयुष्यातील सर्वच गोष्टीना हे तत्त्वज्ञान लागू पडत नाही काय? राजकारणी घोटाळा करतो आणि समजा तो (चुकून) सिद्ध झालाच, तर तो असे सांगेल का हा माझा १८ वा घोटाळा. नाही ना, तो तर असेच म्हणेल की ‘अरेरे, हे काय बरेघडले माझ्या हातून, प्रथमच प्रमाद घडला हा, पुन्हा असे नाही होणार.’ परीक्षेत कॉपी करताना विद्यार्थी सापडला तर असे म्हणेल का की 'मी तर प्रत्येक पेपरला असे करतो मग आजच का बरे तुम्ही मला पकडलेत, तुम्हाला काही लाज?' नाही म्हणत ना तो असे, उलट तो साळसूदपणे म्हणतो की परत आयुष्यात असे करणार नाही. हे म्हणताना उद्याच्या पेपरसाठी काय नवी शक्कल लढवावी याचा विचार त्याच्या मनात सुरूही झालेला असतो. पण ह्यास दूरदृष्टी म्हणतात. देशाला महासत्ता व्हायचे असेल तर या भावी पिढीत असे हुशारी, प्रसंगावधान, हजरजबाबीपणा, संकटसमयी डगमगून न जाण्याची वृत्ती, दूरदृष्टी इत्यादी गुण विकसित होणे ही काळाची गरज नव्हे काय? भुरटा चोर असो की पाकीटमार, किंवा साधा विदाउट तिकीट प्रवासी, कुणीही असेच म्हणेल ना की अहो हे पहिल्यांदाच झाले माझे असे, उद्यापासून  नाही होणार.

काव्यात पुढे असे नमूद केले आहे की जास्त झाल्याने कितीही अडखळत, ठेचकाळत, पडत धडपडत चालणे होत असेल तर बेडरपणे उत्तर द्यावे की - 'आजचा दिवस माझा, हवं तर उद्यापासून सोडून देईन.'  'सुनता नाही बाप की' या ओळीचा अर्थ शब्दश: घेणारा तर मूर्खच म्हटला पाहिजे. खरेतर वाईट सवयीसोड बाबा आता असा वडीलकीचा सल्ला कुणीही देऊ शकतो. नाहीतर काय, एकट्याने बसून घेणे ही वाईटच सवय. घसा गरम करण्यासाठी मैफल जमवावी. जॉनी जॉनी, चुग इट चुग इट  यातून तर फुर्र फुर्र करत चवीचा पूर्ण आस्वाद घेत पी असेही जॉनीस सांगण्यात आले आहे.  त्यावरही सावध जॉनी ‘लास्ट होगी आजकी’ असे म्हणत हा प्याला शेवटचा असे बाणेदार उत्तर देतो.

जॉनी जॉनी - हां जी
दो दिखते है - हां जी
आंखे खोलो - हां जी
झूठ बोलेया - ना जी
यापुढे कवी दारूने पोटात ठाण मांडलेले असतानाही साधे गणित आणि व्यवहारज्ञान विसरू नये हे सुचवतो, यासाठीच तो जॉनीला डोळे उघडायला लावतो आणि "दो दिखते है का रे शिंच्या?" अशी प्रेमाने पृच्छा करतो. आणि हे योग्यच आहे कारण अशावेळी समोरचा नशेत आहे ह्याचा फायदा घेऊन एखादा रिक्षावाला वा ट्याक्सीवाला आर्थिक गैरफायदा घेऊ शकतो, बारमधून इप्सित स्थळी (शक्यतो घरी - स्वत:च्याच, पत्ता नीट सांगता आल्यास) सोडताना मीटरवरील आकडे काहीही असले तरी तो कितीही उकळू शकतो. म्हणूनच नशेत असले तरी भान राखले पाहिजे असा मोलाचा सल्ला हा गणितप्रेमी कवी अप्रत्यक्षरीत्या देतो.

कभी बर्थडे कभी शादी, कभी पूरी कभी आधी
यारो ने मिलके पिलादी मुझको
कभी हेप्पी कभी टेन्शन, डेली कोई नया रिझन
यारा बस चाहिये अटेन्शन तुझको
नो नो नो, मैने पी नही है मैने पी नही है मैने पी नही है
हांजी मैनू पिलादी गयी है पिलादी गयी है, ज्यादा हो गयी है
कलसे पार्टी नही है
जिंदादिल आणि सतत उत्साही असणारा माणूस उगाच काळवेळ बघत बसत नाही.  त्याचा प्रत्येक क्षण उत्सवी असतो. सेलिब्रेट करायला काही ना काही निमित्त शोधून काढतोच, हेच जिवंतपणाचे खरे लक्षण नव्हे काय? प्यायची इच्छा झाली की तोच दिवस जश्न-ए-दिन. अशावेळी कुणाचा वाढदिवस असो वा एखाद्याचे लग्न, अख्खी किंवा किमान अर्धी बाटली मित्रांच्या आग्रहाखातर संपवली तर त्यात वावगे ते काय? नाहीतर मित्राला काय बरे वाटेल? पहा, यातून आपल्यापेक्षा दुसऱ्यांचा विचार प्राधान्याने करण्याचे कौशल्य विकसित करण्यास सांगितले गेले आहे. कधी माणूस आनंदी मूडमध्ये असतो तर कधी एखाद्या काळजीने त्याचे मन पोखरले जात असते, अशावेळी आधार देते ती मदिराच. अशावेळी तू रोज रोज मुद्दाम अशी कारणे देऊन लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतोस असा आरोपही होऊ शकतो, पण त्यांना ठणकावून सांगावे की उद्यापासून पार्टी वगैरे काही नाहीये, ही आज पितोय हीच काय ती शेवटची. शिवाय असे प्रत्येक बाटली रिचवताना म्हणावे हीदेखील किती अभिनव कल्पना.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटात जॉनी नावाचे कोणते पात्रच नाही, वा वा वा, कळस रे बाबा कळस. थोडक्यात पिऊन इतके टुन्न व्हावे की स्वत:चे नाव गावही विसरून जावे. प्राचीन काळापासून संत महात्म्यांनीही हाच उपदेश केला नाही काय की नाव गाव जात धर्म प्रांत भाषा विसरून एक यावे, माणूस हा एकच आहे. माणुसकी हाच धर्म इत्यादी इत्यादी. समानतेचा हा संदेश कवी किती अलगदपणे देऊन जातो त्याला तर या त्रिखंडात काही तोडच नाही. आजकाल गावांची, विद्यापीठांची, रस्त्यांची, चौकांची नावे बदलण्याचा अट्टहास धरणारे यातून काही बोध घेतील काय?

तर असे हे एक दर्जात्मकदृष्ट्या खूपच वरच्या पातळीवर असलेले  गीत आज आपण अभ्यासले.. लवकरच असेच आणखी एखादे गीत आपण पाहू. तोपर्यंत नो नो नो...