Monday, 28 November 2011

हरभजन @ कौन बनेगा करोडपती ..

हा एपिसोड खरोखर शूट झाला आहे...हरभजन टीममधून  शूट झाल्यावर त्वरित...हरभजनच्या पंख्यांनी हे वाचू नये प्लीज....
तर एके दिवशी काय झाले...हरभजन  गेला कौन बनेगा  करोडपती' मध्ये खेळायला (काय करणार,तसंही सध्या काही काम नाही...चार पैसे मिळवायचे तर इकडे तिकडे जाऊन 'येस सर' म्हणत प्रेझेंटी लावली पाहिजे ना !)  अमिताभ बच्चन नेहमीच्या रुबाबात समोर बसलेले...हॉट सीट वर येऊन बसला भज्जी...

अमिताभ : आणि आता आपल्या सोबत आहे हरभजन सिंग ...एकेकाळचा टर्मिनेटर ऑफ टीम इंडिया ! भज्जी...एकूण १३ प्रश्न आहेत,४ पर्याय..आणि एकही लाईफलाईन नाही तुला..कारण तुझी लाईफलाईन तर भारतीय क्रिकेट निवड समितीकडे आहे.आणि हो,तू गेम क्विट ही करू शकत नाहीस,तुला संपूर्ण गेम खेळावाच लागेल.. पण तुला तुझा मनचाहा पडाव कुठ हवाय ते बोल...
भज्जी : अरे वा..ते मी ठरवायचं असतं? ते ते माझ्या हातात आहे का?
अमिताभ : मग काय...हे काय तुझं टीम मधलं स्थान आहे काय तुझ्या हातात नसायला...बोल बाळा.
भज्जी : पहिला प्रश्न ...कारण ५००० सुद्धा खूप आहेत सध्या माझ्यासाठी...तेवढे तरी नक्की मिळूदेत ..जय वाहे गुरु !

अमिताभ : ठीक आहे..तर पहिला प्रश्न - आजघडीला या जगत सर्वात दु;खी.फ्रस्ट्रेटेड,निराश,हताश,हतबल असा कोण मनुष्य आहे? -- पर्याय आहेत..हरभजन सिंग, भज्जी, टर्मिनेटर-वन्स अपॉन अ टाईम, वरील सर्व ?
भज्जी : वरील सर्व.

अमिताभ : सही जवाब...आता तू कमीत कमी ५००० तरी घेऊन जाऊ शकशील.पुढचा प्रश्न, यापैकी कोण सध्या तुझा सर्वात मोठा शत्रू आहे? --  प्रग्यान ओझा,अमित शर्मा, पियुष चावला,आर.अश्विन ?
भज्जी : आर. अश्विन...

अमिताभ : बरोब्बर..तू जिंकलेस १०००० ! तिसरा प्रश्न..'यापैकी कुणाला तू कधीच माफ करणार नाहीस?' --  आंड्र्यू सायमंड्स , एस.श्रीशांत, गीता बसरा, आर. अश्विन ?
भज्जी :  अश्विन .

अमिताभ : करेक्ट...चौथा प्रश्न..' यापैकी कोणत्या खेळाडूला सर्वात आधी भारत रत्न  दिला पाहिजे?' -- सचिन तेंडुलकर, ध्यानचंद, अभिनव बिंद्रा, आर. अश्विन ?
भज्जी : वेल..बाकी तिघे ग्रेट आहेतच..त्यानाही मिळावं अशी इच्छा आहेच. पण सर्वात आधी मात्र अश्विनच ..कारण माझ्यासारख्या अव्वल,जागतिक दर्जाच्या,गुणवान,अफलातून ,सामना एकहाती फिरवणा-या,अनेक सामने जिंकून दिलेल्या फिरकी खेळाडूला बाहेर करून माझी जागा मिळवणे हे महाकठीण  काम..ते त्याने करून दाखवलंय..त्यामुळे अश्विनच ! लॉक करा.

अमिताभ : ओके..लॉक अश्विनला तर करता नाही येणार..तो तर आता सुसाट सुटला आहे..विकेटपण  घेतोय,शतकपण करतोय,आता रे तू काय करशील? आणि जे जे काय स्वत:बद्दल बोललास बोजड अवजड विशेषणे लावून...तो सगळा तुझा गैरसमज आहे बाळा. उगाच आमची फिरकी घेऊ नकोस. पण तुझं उत्तर लॉक केलंय..आणि ते बरोबर आहे..ग्रेट..आता पाचवा प्रश्न..'रिकाम्या जागा भरा.समज तबेल्यात एक घोडा आहे..तर हे वाक्य पूर्ण कर. - ______ तबेला. -- घोडा अंदर, हॉर्स इनसाइड ,वारू आत , अश्विन ?
भज्जी : अश्विन..कारण स्पेलिंग ashw  in  असे होते ना ..म्हणजेच ती रिकामी जागा.

अमिताभ : सही उत्तर ! जशी तुझी संघातील जागा त्याने भरून काढली तशीच...ग्रेट ! सहावा प्रश्न १,६०,००० साठी..' नेहमीप्रमाणे भारतीय टीमला 'त्याने'च जिंकून दिले,तर यापैकी काय म्हणावं लागेल?'  -- अश्विनी ये ना,  ऐश बच्चन, अष्टविनायक, अश्विन नायक ?
भज्जी : अश्विन नायक..सध्या तरी तोच नायक आहे संघाचा..तोच टोचतोय मला सारखा...तोच तोच तोच !

अमिताभ : बिलकुल सही जवाब..आता सातवा प्रश्न. 'ज्याच्यावर सूर्य आणि चंद्र हे दोघेही प्रसन्न आहेत असा तो कोण? बहुव्रीही समास आहे नीट लक्षात घे..' --  सनमून, हनिमून,आचंद्रसूर्य नांदो, अश्विन ?
भज्जी : अश्विन...कारण त्याचे नावच 'रवी चंद्रन ' आहे हो..त्यामुळे तोच तोच तोच.

अमिताभ : हेही बरोबर आहे..जिंकलास तू ३,२०,०००. आता आठवा प्रश्न..नीट ऐक, ' एकदा अभिषेक आणि ऐश्वर्या क्यारम खेळत होते..यू नो क्यारम ना, अश्विन मस्त टाकतो बघ क्यारम बॉल. .जो तुला जन्मात जमणार नाही..हा,तर ऐक..खेळात ऐश्वर्या जिंकली तार यापैकी मी काय म्हणेन ? ' --  अभी जीत , सून जिंकली रे, पोरगा परत फ्लॉप, अश्विन
भज्जी : अश्विन..कारण स्पेलिंग ash win असे होते ना !

अमिताभ :  अचूक आहे रे,आता नववा प्रश्न, अगदी सोपा 'भाद्रपद्च्या नंतर आणि कार्तिकच्या आधी कोणता महिना येतो?' -- नववा महिना, मेरा नाम हिना, अधिक महिना, अश्विन ?
भज्जी : नववा प्रश्न आहे म्हणून नववा महिना असं काही नसतं ओ,अंधश्रद्धा आहे सगळी ... उत्तर आहे अश्विन...

अमिताभ : ग्रेट..तू जिंकलास १२,५०,००० ! आता दहावा प्रश्न...'समज एक दिवस सूर्य नि चंद्र दोघेही ना उगवता  संपावर गेले तर  या अफाट विश्वाचा कारभार सांभाळून तो सुरळीत चालवू शकेल असा
या जगातील एकमेवाद्वितीय महापुरुष कोण?' --  रजनी कान्ट, पॉवरफुल शरद पवार, चंद्र मी सूर्य मी पत्रिकेतला मंगळपण मी, अश्विन ?
भज्जी : अश्विनच हो परत...म्हटलंच आहे - 'रविचंद्र  न  अश्विन'...म्हणजे रवी-चंद्र नसले तरीही अश्विन आहे ना..

अमिताभ : अरे वा..हुशार आहेस..हेदेखील बरोबर उत्तर आहे. आता प्रश्न अकरावा...ज्या अकरामध्येही तुला आता घेत नाहीत..असा अकरा आकडा तुझ्या खास आवडीचा असेल ना..तर प्रश्न आहे, ' यापैकी तुझा आदर्श आणि गुरु कोण?' -- शेन वॉर्न,अनिल कुंबळे, मुथय्या मुरलीधरन, अश्विन ?
भज्जी : अश्विनच हो परत एकदा...बाकीचे तिघे महान आहेतच..पण सिनियर फिरकी गोलंदाजाला बाहेर करून आपण संघात कायमस्वरूपी स्थान मिळवावे यासाठी मी जे माझ्या कारकिर्दीत अखंड प्रयत्न नेहमी केले..हो,बरोबर अनिल कुंबळेच...पण ते मला काही जमलं नाही..अश्विनने मात्र मला बाहेर केलंय..त्यामुळे तोच तोच तोच !

अमिताभ : अरे वा..हेसुद्धा योग्य उत्तर आहे की रे ..आणि अशा प्रकारे आता तू जिंकले आहेस तब्बल पन्नास लाख रुपये ! पुढचा प्रश्न, बारावा, ज्या नंबरचाही खेळाडू म्हणून तुला सध्या संघात कोणी घेत नाही- पाणी नेवून देणे,ग्लोव्हज,बेंट,पॅड नेऊन देणे वगैरे कामे करणारा रे.. असो...तर प्रश्न नीट ऐक..अचूक उत्तर दिलेस तर तू जिंकू शकशील तब्बल एक करोड रुपये..'तू भारतीय क्रिकेट संघात कमबेंक कधी करणार ?' -- आणखी वर्षभरात, दोन वर्षांनी, ४ वर्षांनी, अश्विनचा नातू टीमचा कर्णधार म्हणून निवृत्त झाल्यावर ?
भज्जी : अश्विनचा नातू टीमचा कर्णधार म्हणून निवृत्त झाल्यावर.................त्या आधी तर काही स्कोप नावाचा प्रकारच नाही ना माझ्यासाठी..

अमिताभ : अभिनंदन........तू जिंकला आहेस एक करोड रुपये...वा वा वा..हार्दिक अभिनंदन...आता पुढचा आणि अंतिम प्रश्न ,तेरावा प्रश्न, संघातील तुझ्या स्थानाचा एव्हाना तेरावा झालाच आहे..आता या तेराव्यावर लक्ष केंद्रित कर...अचूक उत्तर तुला मिळवून देईल तब्बल पाच करोड रुपये...तय्यार?..तर प्रश्न आहे की...'तू क्रिकेटमध्ये शेवटची विकेट कधी घेतली होतीस?' - कॉलेजात असताना,
शाळेत असताना, जन्मलास तेव्हा, मागच्या जन्मी ?
भज्जी : ओ..कसला अवघड प्रश्न...नाही येत बघा उत्तर ..काय आठवतच नाय तर.........
अमिताभ : नाही नाही..असं नाही..उत्तर दिलंच पाहिजे तुला..अरे टीम सिलेक्टर्सना  तुला ते सांगता आलं पाहिजे ना-पुन्हा संघात यायचं असेल तर? स्मरणशक्तीला ताण दे आणि सांग बाळा..आणि फार वेळ घेऊ नकोस  हं, विकेट घ्यायला घेतोस तेवढा तर अजिबातच घेऊ नकोस बरं का..सांग आता .
भज्जी : (खूप खूप खूप विचार करून,बराच वेळ पगडी खाजवून..कारण पगडीच्या आत काही नाहीच ना )  मागच्या जन्मी !
अमिताभ : ओह ..
भज्जी : काय झालं सर..चुकलं का..जाऊ का ? माझे ते ५००० तरी द्या..निघतो मी..तुम्हांला भेटून बरं वाटलं !
अमिताभ : नाही बेवकूफ....काय हे कुणीपण येतं आणि पाच करोड जिंकून जातं असं म्हणायची वेळ आलीये आता तुझ्यामुळ...अरे भुरट्या,तू जिंकला आहेस तब्बल पाच करोड रुपये. अभिनंदन...तू या जन्मात एकही विकेट घेतली नाहीस त्याबद्दल..
भज्जी : आं ?
अमिताभ :  काही नाही काही नाही..काय हे..लायकी काय,जिंकतो किती! छे !! असो..तर आज तुला पाच करोडचा चेक देण्यासाठी इथे आली आहे एक खास व्यक्ती..टाळ्यांच्या काद्काडतात स्वागत करूया..(हरभजन सवयीप्रमाणे नखे खात उत्सुकतेने डोळ्यात प्राण अन्णून पाहू लागतो).........दि  ग्रेटेस्ट मिरेंकल ऑफ इंडियन क्रिकेट टीम एव्हर ...प्लीज वेलकम -- मिस्टर रविचंद्रन अश्विन !!!
(सर्वजण टाळ्या वाजवू लागतात..अमिताभ  अश्विनशी गप्पांमध्ये गुंग होतो..त्याला सांगू लागतो मीच तो दिवार,शोले,जंजीर,डॉन, अभिमान,बागबान,पा मध्ये काम केलेला इसम वगैरे..सगळे प्रेक्षक पटापट येऊन अश्विनची स्वाक्षरी मिळवण्यासाठी एकच गर्दी करतात..इकडे पाच करोड जिंकलेल्या हरभजनला कोणीच विचारात नाही...तो हिरमुसलेला..मनातून तुफान चरफडत असलेला,पण तितकाच हतबल..सर्व केंमेरेही  अश्विनवर रोखलेले...हरभजनचा घोर अपमान..त्याला हे सहन होत नाही...तो हळूच एका कोप-यातून निघून जाऊ  लागतो,ते अमिताभ पाहतो.)
अमिताभ : इस्टोप भज्जी...(मग हां लपंडाव नाही,करोडपतीचा सेट आहे  हे लक्षात येऊन ) स्टोप भज्जी...
(भज्जी थांबतो..बाणेदारपणे समोर येतो आणि म्हणतो..एक ऐतिहासिक डायलॉग..)

भज्जी : जीव गेला तरी चालेल ...पण या दुष्ट अश्विनच्या हातून हे बक्षीसच काय, पाणीसुद्धा घेणार नाही..
('वाह..वाह..,क्या डायलॉग मारा है..फिरसे बोलो ' असे प्रेक्षक म्हणतात...पण त्यावर तर सरदारजी भज्जी आणखीनच भडकतो..)
भज्जी: तुम्हांला चेष्टा वाटतेय..मला खरंच नकोयत हे पाच करोड रुपये..आता मी पुन्हा टीम मध्ये येऊनच  पाच करोड रुपये माझ्या खेळातून मिळवेन...ही इथली अशी भीक नकोय..जाता जाता एकच अमितजी..तुमचाच डायलॉग मारून जातो,पण तो या परमदुष्ट अश्विनला उद्देशून..."आज खुश तो बहोत होगे तुम..हांयी....."

आणि एवढे बोलून तो निघून गेला....सगळेच पुरेसे थक्क झाले ...खरंच गेला हो...खोटं नाही बोलत..अश्विन शप्पथ..
आता तर असंही कानावर आलंय की अमिताभच्या एबीकॉर्पतर्फे या पाच करोडमधून हरभजन-अश्विन यांच्यावर हिंदी सिनेमा तयार होणार आहे..आणि या दोन्ही प्रमुख पात्रांसाठी योग्य कलाकारांचा शोध सुरू आहे....

-- पराग पुजारी.

Saturday, 26 November 2011

*मी हरविंदर पवार बोलतोय.....*

*मी हरविंदर पवार बोलतोय.....*

   दिनांक २४ नोव्हेंबर २०११  ...पवारांवर 'हल्ला' झाला. ('हल्ला'..हा शब्द
तीनवेळा वेगवेगळ्या दिशेने चेह-यावर चित्रविचित्र भाव आणून म्हणा
पटकन...एखाद्या डेली सोपसाठी विचार करण्यात येईल -- हां, तर एका नाजूक
सरदारजीने प्रेमाने मारलेली एक हलकीशी चापट म्हणजे हल्ला ?...छे छे..काय हे
मिडीयावाले,उगाच राईचा कावळा आणि पराचा पर्वत करतात.) कुण्या हरविंदर सिंग
नामक शूरवीराने (याला समानार्थी शब्द म्हणून चानेलवाल्यानी 'भ्याड';'माथेफिरू'
असे काहीतरी पापभिरू शब्द वापरलेत..ते सोडा भिडू..माझच ऐका..आय मीन - वाचा.)
होय..माझ्याकडे जरा आतल्या गोटातल्या न्यूज आहेत...त्या मी देतोय...कुण्णा
कुण्णाला म्हणून सांगायच्या नाहीत बर का! प्लोमिश ?...वाचा तर मग !

सर्वप्रथम ...  मी गेलो भेटायला अजित पवारांना...
अजित : काय झु-या ...कसा आहेस..काय म्हणतोस?
मी : ठीक आहे...माझीच कृपा.
अजित : तुझी रे कशी...अशावेळी आपलीच कृपा असं उद्देशून म्हणावं आमच्यासारख्या
नेत्यांना..सत्ता आहे आमच्या हातात..अजिबात म्यानर्स म्हणून नाहीत हा
तुला..असा कसा रे तू..पण तू जर माझा सच्चा कार्यकर्ता झालास तर मी या ठिकाणी
असे आश्वासन देऊ इच्छितो की तू नक्कीच एक चांगला,सुजाण आणि कर्तबगार असा
नागरिक. . . 
मी : गट्टी फू करीन हां परत बोर करायला लागलात तर...
अजित: अरे नको रे बाबा...असे नको करू.बोल आज कसं काय येणं झालं गरीबाकड ? 
मी : ते काय ते...तुमच्या काकांवर कोणी हात टाकला म्हणे..
अजित: टाकला नाही रे ..उगारला म्हण...'टाकला' चा अर्थ वेगळा होतो..
मी : हां..ते नॉलेज तुम्हांला जरा जास्तच नाही का..विसरलोच..हसताय काय तुमच्या
काकांसारखे..आय मीन निर्लज्जासारखे..बोट काढा आधी ते नाकावरच..आणि उगारला तर
माझा मामा राहतो हॉ. असो तर कोण तो हरविंदरसिंग,त्याने काकांना थोबाडीत मारली
म्हणे..
अजित: म्हणे काय म्हणे..अरे मारलीच...पण आम्ही त्या अजाण नादान फड्तुसाला
मोठ्या मनाने माफ केलंय.

 मग काय..बोलणंच खुंटलं..निघालो तडक सुप्रिया सुळेन्कडे  . (असल्याना आपण
दादा,ताई,अक्का,माई,तात्या वगैरे म्हणून आपल्या जिभेची शान घालवत नाही
हां..सांगूनशान ठिवतो आधीच)
मी: हाय...व्होट्स अप?
सुप्रिया: सीलिंग पंखा आणि कोळ्याची २ जाळी,स्लाबचा फिक्कट पिवळा रंग..
मी: मंद...व्होट्स अप म्हणजे असं वर मान करून बघून नाही उत्तर द्यायचं...
तिकडे पिताश्रींवर हल्लाबिल्ला झालाय ना...काय मग..कसं वाटतंय आता?
सुप्रिया: हा हा ते होय..ते काही नाही रे...निवळेल सगळ..व्यर्थ हल्लागुल्ला
कशाला त्याचा एवढा ...जॉर्ज बुश, पी.चिदंबरमना तर चप्पल मारलेली की...उगाच
प्रसिद्धी मिळवायला काहीबाही करतात हे लोक.
मी: नाहीतर काय...उगाच थोबाडीत वगैरे खातात अनोळखी माणसाकडून..
सुप्रिया: तेच की...अरे परू...तसं नाही रे..तू कुणाच्या बाजूने आहेस..मी त्या
हरविंदर का फर्विन्दारच बोलतेय..काय गरज होती त्याला असं करायची...मेला वेडाच
आहे झालं. दिला सोडून...सुखरामाना काय मारतो...बाबांना काय मारतो..जळल मेलं
लक्षण ते!
मी: होय..तुम्ही पवार कुटुंबीय सोडून सगळे वेडेच की...सा-या 'बारा' गावची
'मती' तुम्हालाच नाही का! धान्य आहे..सॉरी..धान्य नव्हे..ते
कृषिमंत्र्यांकडे...धन्य म्हणायचय मला..निघतो..टेक केअर !

वाटेत यशवंत सिन्हा भेटले...
मी: काय हो...खुशीत दिसताय..जाणतो बरं आम्ही सगळं. परवाच म्हणालात की 'देशात
महागाई इतकी वाढत आहे की उद्या जर कुणा आम आदमीने  हिंसक मार्ग अवलंबला तर
आम्हास आश्चर्य वाटणार नाही '...आणि आज हे असं....योगायोगच ना?
सिन्हा: नाहीतर काय रे...पण आमचा काही हात नाही बर यामागे,आमचं तर कमळ
आहे.....तेच ओरडून सांगतोय जगाला माझ्या स्टेटमेंटचा काही संबंध जोडू नका
म्हणून..कुठे कर्णा मिळतो का बघ सेकण्ड ह्यांड...आवाज बसलाय आता माझा. आम जनता
तुम्ही..एवढी महागाई...भ्रष्टाचार पाहून गप्प का बसाल...चालायचंच. जातो
पुजारी..,बाय ...अडवाणींनी बोलावलंय हेल्मेट घालून..गेलं पाहिजे.

हेपण गेले निघून...मग दिसले सर्वांचे लाडके आर.आर.पाटील.
मी : अहो ते शरद पवारांना...
आर.आर. : कळलं ते...
मी: मग तुमची प्रतिक्रिया...आणि प्लीज मराठीतच बोला हं...तुमचं हिंदी जगजाहीर
आहे.
आर.आर. : प्रतिक्रिया काय देणार आता...काय बोलावं ते सुचत नाही अशा ज्या काय
मोजक्या वेळा येतात माझ्यावर - वर्षातल्या ३६५ दिवशी..तेव्हा जे बोलतो तेच
बोलतो...हिंदीतच बोलू दे रे...शेवटी मुंबईत राहतो म्हटलं मी..हा बोलतो हां..एक
दोन साडे माडे त्रिफळा , ''ऐसे बडे बडे शहरो में ऐसे छोटे छोटे हाद्से तो होते
रहते है "

ये तो हद से गुजर गये असे मनात म्हणत मी पुढे गेलो..तर दिसले लोकपालवाले 
किसन  हजारे. (सांगितलं ना...अण्णा,नाना,काकामिका काही म्हणत नाही मी कुणाला)
मी: मौनव्रत सोडलंय ना...उपोषणपण नाही  ना..मग बोलाल का,जे घडलंय त्यावर काही?
हजारे: एकच का मारली...अजून जरा...
मी: (शक्य तितके डोळे मोठे करत आणि आ वासत) काय?
हजारे: (सावरून घेत ) पण पराग, लोकशाहीत असं होणे ही खेदजनक गोष्ट आहे..या
गोष्टीमागचा खरा जनक कोण ते आता शोधून काढलं पाहिजे..शोधूदेत बापडे..मी आपला
जातो..काय त्या बेदी,केजरीवाल,भूषणनी घोळ  घातला नाही ना परत यावर काहीतरी
बडबडून, ते मलाच पाहिलं पाहिजे रे बाबा...

गेले की हेपण लगेच...आणि येताना दिसले राज ठाकरे.
मी : जय महाराष्ट्र...मला कुसुमाग्रजांच्या सगळ्या कविता पाठ
आहेत...शिवाजीमहाराज की.. असं कुणी कधीही म्हणालं तरी आपसूक माझ्या तोंडातून 
'जय' येतं,,,मी राहतो त्या इमारतीचे  नाव मराठीत लिहिलेले आहे..मी मराठी
माध्यमाच्या शाळेतच शिकलेलो आहे..मी मराठी मुलीशीच लग्न करणार आहे.. मी....
राज: बास बास....फार पुढे गेलास...लग्नाला बोलाव म्हणजे झालं...अभिमान वाटतो
तुझ्यासारख्या मराठी तरुणांचा..आता मुद्द्यावर ये.
मी : अहो...आज ते घड्याळवाले  ...त्यांना कोणीतरी दिल्लीत दिली गालावर ठेवून...
राज: चांगलं झालं की मग..तुमच्यासारखे तरुण रोज स्वप्नात काय वेगळं करतात
मग...फरक एवढाच की तुमचे हात फक्त शिवशिवतात...पण त्या हरविंदरने  ते करून
दाखवलं...लाज वाटते राजे लाज वाटते...हे शुभकार्य एखाद्या मराठी युवकाने का
नाही केलं !! हन्त हन्त...आणि श्रीमुखात भडकावायचीच होती तर मनमोहनसिंगापासून 
सुरुवात का नाही केली..पंजाबात तरी कुठे भ्रष्टाचारमुक्त सरकार आहे ?
असो...मला जायला पाहिजे...पेपर्स तयार करायचेत उमेदवारांसाठी...स्वस्थ बसून
नाही चालणार...
मी: ठीक आहे...बरोबर आहे तुमचं.
राज : ते तर नेहमीच असतं...जाता जाता एकच सांगतो..लग्न कर म्हणे..पण मुलांना
मात्र मराठी माध्यमाच्या शाळेतच घालायचं...नाहीतर तुझी काही खैर नाही...लक्ष
आहेच माझं तुझ्यावर...अरे,एक सांगू का..मी जन्मलो ना,तेव्हाही आवर्जून मराठीतच
रडलो होतो माहितेय का तुला...आता तुझ्यापासून काय लपवायचे रे पग्या...म्हणून
सांगितलं. निघतो...गर्वच नव्हे तर यथार्थ आणि यथेचछ माज बाळग मराठी असल्याचा..
जय महाराष्ट्र !!

काय रुबाब,काय माज,काय आत्मविश्वास!!!....पण थक्क व्हायला पण पुरेसा वेळ
मिळाला नाही मला...कारण समोरून चक्क चक्क सचिन  तेंडुलकर येताना
दिसला...आयला..टेस्ट चालू आहे तिकडे हिंदुस्थान - पश्चिम इंडिजची(राज अजून फार
लांब गेले नव्हते हो अजून...म्हणून ) आणि हा इथे काय करतोय...आता मला राहुल
द्रविडच कितीही आवडत असला तरी सचिन कुणी परका का आहे...त्याला जसा विनोद, तसा
मी...
मी : अरे सचिन...तू?
सचिन : अरे पराग ..तू?
मी: चल..परत हेच म्हणूया नावांची अदलाबदल करून..म्हणजे पुढच्या वेळी त्या
केडबरीच्या जाहिरातीत आपल्या दोघांना घेतील...
सचिन : व्होट एन आयडिया...ओके ! स्टार्ट... मी असा परत तिथून चालत येतो...तो
खांद्यावरचा आदिदासचा लोगो दिसत होता ना रे नीट मगाशी...टेन्शनच आम्हाला
नेहमी...आलोच.
मी: अरे थांब...जाऊदे ते ...आणि मी एयरटेल वापरतो...त्यामुळे विषयच मिटला..मला
सांग..तू इथे कसा? आणि तुझं ते महाशतक. . .
सचिन: अरे नको रे बाबा पुन्हा आठवण ...टेन्शन येते परत...शेवटी मीही माणूसच
ना. अरे ते पवारांवर कुणी हल्ला...
मी: हायला सचिन..हे माहिताय तुला ? मला वाटलं कसोटीत तू बिझी आणि ते
'महाशतक'चे  प्रेशर...त्यात न्यूज पोचली नसेल तुला.
सचिन : अरे असं कसं प-या...पवार आयसीसीचे अध्यक्ष होते...आमच्याच क्षेत्रातले
ना..माहिती ठेवावी लागते यार. पण थोबाडीत आज खाल्ली...आय मीन...बसली हे एका
अर्थी बरंच झालं म्हणायचं.
मी : हायला सचिन...हे काय बोलतोस तू?
सचिन : अरे ऐकून तर घे...गैरसमज नकोय प्लीज... हे बघ., मी आज ६७ वर नाबाद
राहिलोय...उद्या प्रोब्याबली सेन्चुरी ठोकेनच असं वाटतंय मला..आणि दिवस अखेर
६०+ स्कोर करून नाबाद राहिल्यावर मी गेल्या सलग ७ डावात दुस-या दिवशी येऊन १००
केलंय,आणि कारकिर्दीत तर असं १४ पैकी ११ वेळा केलंय...
मी : परत एकदा ह ह हायला  सचिन...एवढं कसं रे आठवत तुला ? काय मेमरी...व्वा !!
सचिन :नाही रे...मलाही मघाशीच कळलं हे आज तक वरून...असो. तर उद्या
शतक...नव्हे,महाशतक केले की मिडीयाच सगळा फोकस माझ्यावर...आज केले असते तर
अर्धा मिडिया गेला असता ना पवारांकडे...सो...आय मीन..यू नो...
मी : हायला सचिन..कुणाला काय तर कुणाला काय....चांगलाय चांगलाय.. कर महाशतक.
हार्दिक शुभेच्छा.
सचिन : धन्यवाद...जातो रे, बाय. माही धोनी आणि डंकन फ्लेचर येतील शोधत नाहीतर.

आणि तो गेलाही...मला वाटलं..चला,संपले आता सगळे...आता कोणी भेटणार नाही. .जावं
शांत घरी..तर तेवढ्यात कुठल्याशा कोप-यातून एक हुंदका ऐकू आला...मला आधी वाटलं
भास झाला असेल..पुढे गेलो..तर परत कानात...मग बघूयाच म्हटलं ..तर तिथे कोणीतरी
एक माणूस गुडघ्यात डोकं खुपसून बसलेला..हा रडत का असेल ? राष्ट्रवादीचा
कार्यकर्ता असेल का? जवळ गेलो....हातानी धरून उठवलं..

मी : काय रे,कोण तू ? कोणत्या गावचा ? आणि असा रडतोस का ?
तो : मला काही नाव-गाव नाही...फक्त आम आदमी म्हणा..आणि फक्त लढ म्हणा.
मी: बर..पण झालं काय? बोल तर खरं...
तो : आयला त्या पवारला एक मस्त हाणली आज त्या सरदारन... कलेजा खुश झाला...पण
कानाखाली लावली याचेच भांडवल नुसते चहूकडे...का लावली याचे त्याने जे कारण
दिले त्याबाबत कोणी चकार शब्द काढत नाहीये अजून...इथे रोज मरतोय आम्ही या
महागाईने..बोंबला...महागाई,भ्रष्टाचार,बेरोजगारी,काळा
पैसा,भारनियमन,निरक्षरता...एक ना अनेक... या समस्या सोडवू असे कुणी म्हणत
नाहीये नेता कुठला एवढ होऊनही,काय तर म्हणे 'पवार मोठ्या मनाचे,माफ केलं
त्याला,उदो उदो त्या पवारचा आणि त्याच्या पॉवरचा,साले काका-पुतणे आवाहन करतायत
जनतेला शांत रहा,जाळपोळ नको,बंद नको,संप नको...आणि नंतर हळूच फोन करून म्हणतील
गोटात "हे काय,त्या भागात सगळ आनंदी कसं काय,दंगल नाही,दुकाने उघडी
आहेत..तोडफोड नाही..झोपलात काय...लागा कामाला.."    ह्यांच्या तर....  वर काय,
तर तो म्हणे माथेफिरू होता...अरे तो तर मला 'डोंबिवली फास्ट'मधला माधव आपटे
वाटला..' एक अण्णा हजारे निर्माण नाही झाला तरी चालेल..पण असे हजारो हरविंदर
पाहिजेत...आणि  काय हा मीडिया पण..ऐश्वर्याचं बाळ दिसतं यांना...आमच्या
पोटातला जाळ नाही दिसत...थूत तिच्या आयला...कसं होणार या देशाचं...


 तो बरंच काही बोलत राहिला नंतर असं काय काय...पण मला काही ऐकूच आलं नाही..कान
ऐकायला अधीर होते खरतर,पण मन बधीर झालय ना,संवेदना तर बोथट १९४७ पासूनच
झाल्यात देशाच्या...
मान खाली घालून आलो घरी...टीव्ही लावलेला...'पवारने कहा की...','इंतजार होगया
खत्म,सचिन करेंगे अब महाशतक अपने घरेलू मैदान में ', 'पाहूया आपण उद्धवजी काय
म्हणताहेत या थप्पड प्रकरणावर ..','तर कशी स्थिती आहे आत्ता सांगली आणि
कोल्हापूरमध्ये ?...','भ्याड पवारांवर हल्ला झाला आहे...माफ करा,पवारांवर
भ्याड हल्ला झाला आहे ',' थप्पड से डर नही लगता साब,सरदार से लगता
है"......................

अखंड रे बाबा.....

--- पराग पुजारी.