Thursday, 30 June 2011

ए भाऊ डोकं नको खाऊ

(सदर फिल्मचे नुकतेच पुण्यात शूटिंग झालेले आहे..बट इट वॉज नॉट फॉर प्रोफेशनल पर्पज !)
 
सीन नं. १
डे - सकाळ          (पात्रे : नेत्रा)             इंटे/हॉल

नेत्रा:  (अक्राळविक्राळ  हसत येते - पूर्ण काळे कपडे )
 हा हा हा, मी पुन्हा जिंकत आहे.होय,मला कोणीही थांबवू शकत नाही. अनादिकाळापासून मी माझा प्रभाव दाखवत आले आहे. रामायण,महाभारतापासून ते आज या कलीयुगापर्यंत अनेक भांडणे मीच लावते. कलियुगात दोन भावांमध्ये  सत्ता,इस्टेट,जमीनजुमला,संपत्तीवर हक्क सांगण्यासाठी मीच त्यांना चिथावते.मी कोण ? मी कोण ? मी आहे - भाऊबंदकी. हा हा हा..पहायचंय  तुम्हांला,हे पहा..माझी ताकद.

सीन नं. २
डे - सकाळ              (पात्रे : उज्ज्वल,रोहित,साना,ऋजुता,गौरी,श्रुती)           इंटे/हॉल

(साना,ऋजुता या दोघी टीव्ही न्यूज चानेलच्या anchors आहेत.  गौरी,श्रुती या correspoandents आहेत. गौरी,श्रुती या अनुक्रमे मुकेश व अनिल यांची वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखत घेत आहेत.)

साना : हां,गौरी तर काय म्हणताहेत मुकेशजी ?
गौरी :  आपण मुकेशजीनाच  विचारूया. मुकेशजी,झालेल्या वाटणीबद्दल  आपलं काय मत आहे?
उज्ज्वल : हे पहा,वडील गेल्यानंतर कंपनीचा इतका मोठा डोलारा सांभाळताना आम्हा दोन्ही भावांमध्ये खटके उडू लागले.त्यांचा कंपनीच्या वाटचालीवर,प्रगतीवर अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून आम्ही दोघांनी विचारपूर्वक वेगळं व्हायचा  निर्णय घेतला आहे.नि पुढे तर माझीच कंपनी जास्त यशस्वी होईल.
गौरी : तर मग यापुढेही आपण एकत्र काम करणार नाही का?
उज्ज्वल : हं,मला नाही वाटत पुन्हा आम्ही एकत्र येऊ असं.
गौरी : साना,जसं की आपण ऐकलंच आहे की मुकेशजी या वाटणीबद्दल समाधानी आहेत आणि पुढेही त्यांना अनिलजीबरोबर  काम करायची इच्छा नाहीये.कमेरामन गौरवसह मी गौरी,'भाऊ माझा' न्यूज,मुंबई.
ऋजुता : हां श्रुती, तिथे अनिलजीच काय म्हणणं आहे?
श्रुती : त्यांच्याकडूनच जाणून घेऊ..अनिलजी,जे झालंय त्याविषयी आपल्याला काय म्हणायचं आहे?
रोहित : आमच्यातील मतभेदांचा कंपनीवर काही परिणाम  होऊ नये,म्हणूनच आम्ही वेगळे झालो. अन माझी खात्री आहे की माझीच कंपनी त्याच्या कंपनीपेक्षा पुढे जाईल.
श्रुती : तुम्ही दोघे पुन्हा एकत्र. .?
रोहित : ते शक्य नाही.
श्रुती : अनिलजीना झालेल्या वाटणीबद्दल कसलीही खंत नाहीये.नि हेच चित्र पुढेही कायम राहील असं त्यांचा म्हणणं आहे.कमेरामन श्रेयससह मी श्रुती,'भाऊ माझा' न्यूज,मुंबई.
साना : तर आपण पहिलाच की,मुकेश-अनिल या दोन भावांच चांगलं नातं आता बनलंय भाऊबंदकीचं - संपत्तीमुळे.
ऋजुता : 'सख्खा भाऊ पक्का वैरी' असंच एकूण चित्र आहे.तर आज आम्ही इथेच रजा घेतो, उद्या पुन्हा भेटू याचवेळी याच शोमध्ये - 'ए भाऊ डोकं नको खाऊ'

सीन नं. ३
डे - सकाळ              (पात्रे : उज्ज्वल,रोहित,साना,ऋजुता,गौरी,श्रुती)           इंटे/हॉल

साना : जाणून घेऊ गौरीकडून,काय म्हणणं आहे युसूफच ?
गौरी : युसूफ, भारतीय संघात तू इरफाननंतर आलास,पण आता तुझाही टीममधलं स्थान दलामली झालंय, काय वाटतं ?
उज्ज्वल : मीच त्याच्यापेक्षा च्नाग्ला खेळाडू आहे,अष्टपैलू आहे.मीच चौकार-षटकारांची आतषबाजी करू शकतो. IPL मध्येही आम्ही एकमेकाविरूद्धच खेळतो.मी नक्कीच संघातील स्थान टिकवेन.
गौरी ; युसूफ म्हणतोय की he is better than Irfan. कमेरामन गौरवसह मी गौरी,'भाऊ माझा' न्यूज,मुंबई.
ऋजुता ; तर श्रुती,तिकडे इरफान काय म्हणतोय?
श्रुती : इरफान,टीममध्ये तुझं पदार्पण दादाच्या आधी झालं,पण सध्या तू संघात नाहीस,तर काय वाटतं?
रोहित : वाईट तर वाटतंय,पण एक नक्की,मीच त्याच्यापेक्षा सरस अष्टपैलू खेळाडू आहे.मीच भेदक इनस्विंग,आउटस्विंग टाकू शकतो,तो कसला दादा. मैदानात तर IPL मध्येही  मीच दादा.लवकरच तुम्ही मला भारतीय संघात पहाल
श्रुती : इथ इरफानच मत आहे की, क्रिकेटमध्ये तर तोच युसूफचा दादा. (हसत) पण कदाचित दोघेही हे विसरतायत की खरा दादा तर सौरव गांगुली आहे. कमेरामन श्रेयससह मी श्रुती,'भाऊ माझा' न्यूज,मुंबई.
साना : तर युसूफ - इरफान य भावांचं नातं बनलंय भाऊबंदकीचं - क्रिकेट आणि संघातील स्थानामुळे.
ऋजुता : पुन्हा एकदा -  'सख्खा भाऊ पक्का वैरी'तर आज आम्ही आपली रजा घेतो, उद्या पुन्हा भेटू याचवेळी याच शोमध्ये - 'ए भाऊ डोकं नको खाऊ'

सीन नं. ४
डे - सकाळ              (पात्रे : उज्ज्वल,रोहित,साना,ऋजुता,गौरी,श्रुती)           इंटे/हॉल

साना : पाहूया, येत्या निवडणुकांसाठी वरुणजींची काय तयारी आहे? गौरी . .?
गौरी : वरुणजी, तर काँग्रेसविरुद्ध  तुमचा लढा . . .
उज्ज्वल : (तोडत) केवळ काँग्रेसविरुद्धच नव्हे,तर राहुलविरुद्धही..पण पहा पुन्ही,यंदा भाजपच सत्तेत येणार.मी एकसे एक आक्रमक भाषणे देऊन राहुलचा लोकांवरील प्रभाव नष्ट करून टाकेन.
गौरी : वरुणजी म्हणताहेत की ते यावेळी राहुलजींवर भारी पडतील. कमेरामन गौरवसह मी गौरी,'भाऊ माझा' न्यूज,दिल्ली.
ऋजुता : श्रुती,राहुलजींची योजना कशी आहे?
श्रुती : राहुलजी,याहीवेळी तुमचेच सरकार येईल असं वाटतं का?
रोहित : हो तर,आहेच कोण य देशात काँग्रेसला आव्हान देणारा? वरुण आणि त्याचा भाजप कितीही प्रयत्न करूदेत, पण जिंकणार काँग्रेसच. शिवाय माझ्यासमोर वरुण म्हणजे कीस झाड की पत्ती !
श्रुती  : हं, तर राहुलजीना पूर्ण विश्वास आहे की  याहीवेळी काँग्रेसच बाजी मारणार. कमेरामन श्रेयससह मी श्रुती,'भाऊ माझा' न्यूज,दिल्ली.
साना :  थोडक्यात, राहुल - वरुण दोघेही एकमेकांविरुद्ध यावेळी संपूर्ण ताकद पणाला लावणार हे नक्की.यांची भाऊबंदकी - सत्तेसाठी.
ऋजुता : 'चुलतभाऊ  पक्का वैरी'. तर आता आम्ही आपली रजा घेतो, उद्या पुन्हा भेटू याचवेळी याच शोमध्ये - 'ए भाऊ डोकं नको खाऊ'


सीन नं. ५
डे - सकाळ              (पात्रे : उज्ज्वल,रोहित,साना,ऋजुता,गौरी,श्रुती)           इंटे/हॉल

साना : तर आज शिवाजी पार्कवरील मेळाव्यात उद्धवजी काय म्हणाले ते जाणून घेऊया गौरीकडून. ..गौरी..?
गौरी : उद्धवजी, येत्या विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाची तयारी. . ?
उज्ज्वल  : अगदी जोरात सुरू आहे.फुटिराना,गद्दारांना  आम्ही चांगलाच धडा शिकवू. त्यांना नाक घासायला लावू. पक्ष सोडून स्वत:ची नवी चूल मांडल्याचा त्यांना पश्चात्ताप झाल्याशिवाय राहणार नाही.
गौरी : आपण राजसाहेबांबद्दल बोलत आहात का?
उज्ज्वल  : साहेब? तो कसला साहेब? होय,त्यालाच म्हणतोय मी. घाबरतो का काय? त्या राजला राजकारणातलं काय कळत ? शिवसेना,मराठी आणि हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब हे जनतेला आजही तितकेच  प्रिय आहेत, हे विधानसभेवर भगवा फडकल्यावर कळेलच तुम्हांला ..आणि त्या राजलाही. मग बस म्हणावं तुझी व्यंगचित्रं काढत !
गौरी : तर उद्धवजीना १००% खात्री आहे की यावेळी त्यांना राजसाहेबच  काय,तर कोणीही अडवू शकणार नाही. कमेरामन गौरवसह मी गौरी,'भाऊ माझा' न्यूज, मातोश्री,मुंबई.
ऋजुता : तर पत्रकारपरिषदेत आज राजसाहेबांचा एकूणच सूर कसा होता,सांगतीये आपल्याला श्रुती.  श्रुती. . ?
श्रुती : राजसाहेब,यंदा तुमचा पक्ष आणखी उंच भरारी मारणार का?
रोहित : नक्कीच,त्यात काही शंकाच नाही.जनतेने आम्हाला 'मनसे' पाठिंबा दिलाय नि आम्हीही 'मनसे' त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटत आलोय. आता इरादा पक्का - प्रस्थापितांना धक्का.
श्रुती : हं टोला उद्धवजीना समजायचा का?
रोहित : समजायचा काय ? आहेच..मी घाबरतो काय कुणाला? एक नक्की.माझं मराठीवर जेवढं प्रेम आहे ,तेवढाच प्रेम नि आदर काकांप्रती आहे.पण फोटोग्राफर्सना मी भाव देत नाही.यावेळी पहाच तुम्ही, निवडणुकात माजेल 'राज का रण' !
श्रुती : राजसाहेबांनी 'मनसे' ही सत्तास्पर्धा जिंकण्याची तयारी केलेली आहे. तसेच  उद्धवजीही त्यांचं काही वाकडं करू शकणार नाहीत असा त्यांना विश्वास आहे. कमेरामन श्रेयससह मी श्रुती,'भाऊ माझा' न्यूज, कृष्णकुंज.मुंबई.
साना : दोघंही भाऊ एकमेकांना भाव देत नाहीयेत. उद्धवचा उद्धार होणार की राजचं राज्य येणार ,हे आपल्याला कळेल निवडणुकानंतरच. या भावांचीही कट्टर भाऊबंदकी - महाराष्ट्राच्या गादीसाठी.
ऋजुता : इथेही तेच - 'चुलतभाऊ  पक्का वैरी'. तर आता आम्ही आपली रजा घेतो, पुन्हा पहायला विसरू नका आपला आवडता शो - 'ए भाऊ डोकं नको खाऊ'


सीन नं. ६
डे - सकाळ              (पात्रे : नेत्रा,साना,ऋजुता,गौरी,श्रुती)           इंटे/हॉल

नेत्रा : हा हा हा. पाहिलंत ना ..मीच लावते अशी भांडणं भावा-भावांमध्ये.माझा शाप असतो त्यांच्या नात्याला.ही आहे माझी अफाट शक्ती. हा हा हा
चौघी : थांबव हे सगळं,तुझ्यामुळे सर्वांचच नुकसान होतंय.
नेत्रा : हा हा हा ,होऊदे. होतच राहणार. मला कोण अडवणार ? हा हा हा
(चौघी नेत्राला पकडण्याचा प्रयत्न करतात;पण ती त्यांच्या तावडीतून निसटून जाते.)
चौघी : (प्रेक्षकांना)  काय ही भाऊबंदकी अशीच सुरू राहणार ? कधी थांबणार हे सारं ? कधी ?

                                                             ----   समाप्त  ----

Wednesday, 29 June 2011

श्रीगणेशा

ब्लॉग...
मी ब्लॉग सुरु केलाय ...खरंतर  आय एम एकदमच नवीन इंटू धिस बरं का !
सो..नेहमी ..नियमित लिहिनच असंही काही नाही..
पण बाकीचे लिहितात..म्हणून आपणही खरडाव काहीतरी..असंही नाही.
थोडक्यात काय..जेव्हा काही लिहिण्यासारखं असेल..तेव्हाच येथे भर पडेल.
अगेन..जेव्हा जेव्हा काही लिहिण्यासारखं असेल,तेव्हा तेव्हा ते मी इथेच लिहावं असं थोडंच आहे.
इंटरनेटवरून  कोणता शब्द,वाक्य,लेख,कविता कसं कुठे जाईल काही सांगता येते का भाऊ/ताई  (एज अप्लीकेबल  :P)
म्हणून अस्मादिक जरा खबरदारी घेतील एवढंच...
वाचणारे किती असतील माहीत नाही....त्यावर प्रतिक्रिया देणारे तर त्याहून कमी..दिलीच तरीही ''मित्राने लिहिलंय,तर नावं कशी ठेवणार? लिहू - 'छान आहे' म्हणून"...
वगैरे प्रकार होणार नाहीत कशावरून...
मग यातून माझी लेखक म्हणून जडण-घडण सुनिश्चित दिशेने आणि योग्य प्रकारेच होईल हे तरी कशावरून ??
छे !! खूपच प्रश्न बाबा..
जाऊदेच...
काय म्हणालात?
फॉलो करायलाच पाहिजे का?
नाही हो..असा नियम थोडाच असतो...
आपण गांधीवादी नाही..सावरकरवादी आहे म्हटलं.."याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याविना"
ओके...इट्स इनफ ना..तसंपण  आधीच दोन पोस्ट्स 'मार्गी' लावल्यात...आणि मग त्यानंतर  हा 'पहिल्यावहिल्या' पोस्टचा प्रपंच पाहिजेच कशाला? उगीच औपचारिकता...
असो...
चला...आटोपतं घेतो..
इथं काही कागद वाचवणे किंवा शाई वाचवणे हाही हेतू नाही..:P
की-बोर्डवरच्या कीजसुद्धा झिजत भिजत  नाहीत बरं ! (पावसात थोडाच बसलोय,पीजे होता..हसू नका)

भेटत राहूच अधून मधून... 
टेक केअर ...कीप रीडिंग ...कीप रॉकिंग :)






बदला

ही कहाणी आहे एका राष्ट्राची
मी रहात असलेल्या महान देशाची
तो होता छावणी ब्रिटीश,मुघल,डचांची
४७ ला झाली पहाट त्याच्या आजादीची..

आकाराने देश लईच मोठा
लोकसंख्येने तर लईलईच मोठा
बैल निपजतात जेथे यूपी - बिहारात
नि गोठा वाढतो सहिष्णू महाराष्ट्रात ...
कीड देशाला प्रचंड लागली
वाट सहजच तत्त्वांची लागली
घोटाळे करून नेत्यांची खाज नाही भागली
भ्रष्टाचाराची तोफ अभिमानाने  डागली ...
बाई इटली सोडून आली
सत्तेची किटली दिल्लीत बसली
साठ वर्षे पक्षाने सूत्रे हलवली
इमानी समाजाची गुणसूत्रे पळवली...
सवय पुढे मग झाली याचीच
आज ना उद्या होती होणार गोचीच ..

एक दिवस मग असा आला - कोणी कुणाला ओळखत नाही
निरक्षर बेकारी गलिच्छ रोगराई व्यसनी तरुणाई बोंब बारमाही
समाज हलकट - निद्रिस्त रहा
नेते नालायक - खातच रहा
सिनेमे लोचट - सेन्सॉर आडवा
क्रिकेट खेचक - वर्ल्डकप आठवा
चाललंय आपलं चालूदे
देश मातीत जाऊदे
मला पोटभर खाऊदे
गरीब भुकेने मरूदे...

लाख कोटी शब्द विसरले
पेटी खोका जिभेवर रुळले
आरक्षण - डोनेशन बहुत झाले
शिक्षणसम्राटच डॉन झाले
स्विस ब्यांकेत खातं 'आदर्श' ठरलंय
जाईल तिथे खाणं तत्त्वच जडलंय
भ्रष्ट पैशाने 'टेबलाखालून' पछाडलंय
ओवाळून सत्तेचा लिंबू राज्याराज्यात झपाटलंय
सगळीकडेच झाला अंधार
अखेर दोन डोळ्यांत फुलला अंगार
ही बदलली पाहिजे सिस्टीम भंगार
मिळूदे स्वच्छ निरोगी सरकार ...

हजारांत एखाद्यालाच एवढं सगळं जाणवलं
त्या हजारांत एकाचं नाव अण्णा हजारे निघालं
बसला गडी करायला उपोषण प्राणांतिक बिणान्तिक
जाणीवा जागृत झाल्या तुमच्या आमच्या सामाजिक बिमाजिक
सोबत ते डेंजर विकीलीक्स काढायचं उकरून टूजी -  थ्रीजी
देशही म्हणाला अण्णांना - 'व्हॉट एन आयडीया सरजी ! '
सरकारला दिसल्या ' हजारे ख्वाहिशे ऐसी '
त्यांच्या नियमांची झाली ऐशी कि तैशी
एक झाले सगळे एकदम
फुस्स झालं शासन बेरहम
लोकपाल विधेयक जिंकून गेलं
लिंबूपाणी  घेत उपोषण सोडलं
च्यानेल पेपर्सनी बरंच कमावलं
सिस्टीमनं बेअरींग डेअरींग गमावलं

शांत शांत ...
वाटलं..आता सगळं सुधारलं.. जिण वधारलं

काल स्वप्नात आले बोस,टिळक,आगरकर,सावरकर
विचारलं त्यांना "दादा,खुश ना ? सारं बदललं ना लवकर ?"
खाड्कन मग कानाखाली बसली
वर चार शब्द ऐकवून गेली
"होय बाळा, जरा बदललेलं दिसतंय हे तात्पुरतं,
जसं जेवणात लोणचं तोंडी लावण्यापुरतं
उद्या सर्व पुन्हा 'जैसे थे' होईल
'वो भी क्या दिन थे' म्हणत जिंदगी जाईल
स्वप्नात आलोय म्हणजे तू झोपलाच आहेस
पुढचा अण्णा बसेपर्यंत झोपेतच राहशील "

... ताड्कन उठलो आरशात पाहिलं
मी नाही समाज दिसला
आरती प्रेयर नमाज पाहिला
कुठूनसा मागून आवाज आला,
'जागे व्हा,विचार बदला,देश बदला
नाहीतर सोडा नाद नि सरळ 'देशच बदला'
पुढचा अण्णा आत्ताच अदला - बदला
प्रत्येकाने उठा नि घ्या हक्काने बदला
प्रत्येकाने उठा नि घ्या हक्काने बदला '

Sunday, 26 June 2011

** वपु **


        लेखकांचे वर्गीकरण करता येते का ? म्हणजे कथा-कविता-कादंबरी-समीक्षा इत्यादी प्रकार सोडून,किंवा ते धरूनच ? म्हणजे हे विनोदी लिहिणारे,ते गंभीर लिहिणारे,तिला कवितेपेक्षा चारोळयाच छान जमतात,किंवा चांगल्या कथा लिहित होता तर उगाच कशाला लांबलचक रटाळ कादंबरी लिहायच्या फंदात पडला. . . किंवा चरित्रात्मक,टीकात्मक,ललित,रहस्य,विज्ञान,व्यक्तिमत्त्व विकास,धार्मिक,सामाजिक,आर्थिक,राजकीय,मानवी नातेसंबंध . . . .

       बाप रे, बरीच मोठी यादी की ! संपणारच नाही बहुतेक ! 'अमुकच एक प्रकार चांगला हाताळू शकणारे' अशा वर्गात मोडणारे  अनेक लेखक होऊन गेले,आहेत,येत राहतील. सर्वच नाही पण बहुतेक लेखनप्रकार सारख्याच समर्थपणे हाताळणारे मोजकेच !मग अशांना 'सिद्धहस्त' म्हणण्यात गैर ते काय ? पण अगदीच 'दैवी देणगी' म्हणून त्यांना माणसातून बाजूला करून मोकळेही होऊ नये. नाहीतर ते त्या कलावंताला, आधी 'दैवी' म्हणून सुखावणारं नि नंतर सक्तीने आलेल्या 'एकटेपणा'तून दुखावणारं ठरू शकतं.मनात प्रचंड वेदना,अनेक समस्यांशी झगडा अन तरीही रसिकांना निखळ वाचनाचा आनंद देणारे,हसवणारे,हसता हसता डोळ्यात कारुण्याचे अश्रू वाचकाच्याही नकळत उभे करणारे,त्याला हळूच अंतर्मुख करणारे खूप म्हणजे खूपच कमी ! वपु त्यापैकीच एक !
       आज २७ जून..वपुंची पुण्यतिथी. पुण्यतिथी वगैरे शब्द फार जड,मोठे वाटतात ना; कारण आजवर आपण शिवाजी, सावरकर, टिळक, भगतसिंग अशा लोकोत्तर कार्य करून अजरामर झालेल्या हस्तींच्या मृत्युदिनालाच असं म्हणत आलोय.(यादीतील शेवटच्या नावावर खरेखुरे अभ्यासू वाचक आक्षेप घेणार नाहीत याची खात्री आहे.) असो, विषयांतर नको.
       बट वपु, यू आर ग्रेट...आर...हो,तुमच्यासारखी माणसं कधीच वेअर होत नसतात.
       एकच माणूस शिक्षण-व्यवसायाने आर्किटेक्ट असूनही अफाट गुणवान लेखक,कथाकथनकार,व्हायोलीन-हार्मोनियमवादक, उत्तम फोटोग्राफर...रसिक-वाचक-सुंदर हस्ताक्षर असलेला नि हरेक सुंदर  गोष्टीचं वेड असणारा असू शकतो ? वपुंची कारकिर्द सुरू होण्यापूर्वी या  प्रश्नाचं उत्तर 'नाही' असावं,असं वाटतं.
       आपण काय वाचतो ? पुस्तकं,वृत्तपत्रं,ई-मेल्स,ई-बुक्स,मेसेजेस......वगैरे वगैरे .
       आणि माणसं ?
वपुंकडे ही एक विलक्षण हातोटी होती,ते 'माणसं' वाचायचे. त्यात त्यांना 'घर हरवलेली माणसं' भेटली,'लोंबकळणारी माणसं' भेटली,'चतुर्भुज' मंडळी भेटली.गेलाबाजार 'कर्मचारी'ही भेटले...बरेच. सगळेच त्यांचे 'दोस्त' बनले,अनेकांनी वपुंना आपला 'पार्टनर' मानलं. 'काही खरं काही खोटं' असा हा दुनियेचा 'मायाबाजार'..'भुलभुलैय्या'च म्हणा ना हवं तर...
              "अहो,यात तुम्ही काय करताय?"
              वपु म्हणायचे,"मी यात काय करतोय? 'मी माणूस शोधतोय'."
      माणूस हा पदार्थ वपुंइतका स्पष्ट कितीजणांना कळाला माहीत नाही..पण तरीही ही नम्रता त्यांच्या ठायी होती हे खरं. महाराष्ट्र सरकारने त्यांना 'उत्तम लेखक' म्हणून गौरवलं. पु.भा.भावे पुरस्कार विजेत्या वपुंना अमेरिकेतील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवण्याचा मान मिळाला.
         
वपु एकेक करत त्यांचे 'प्लेजर बॉक्स' वाचकांसमोर रिते करत गेले. त्यातून वाचकांचेच रंगीबेरंगी 'रंग मनाचे' त्यांनी उलगडून दाखवले.
 "आमचं काय हो.इकडून एक टोलावतोय,तिकडून एक ढकलतोय..नुसता 'झोपाळा' झालाय आयुष्याचा ",असं उद्वेगाने म्हणणा-यांना 'मोडेन पण वाकणार नाही' हे फिलिंग देत वपुंनी त्यांच्या अवघ्या जगण्याचाच 'महोत्सव' करून टाकला असणार यात शंका  नाही. मग त्यांना 'आपण सारे अर्जुन' असं वाटलं असल्यास त्यात नवल ते काय ! अशा कित्येकांचा 'स्वर' वपुंनी अचूक ओळखला असेल....त्याची गणतीच नाही.
        'ऐक सखे' म्हणत  'सखी'ला 'तप्तपदी'तून पुढे ओघानेच आयुष्यात येणारा अव्यक्त मनाचा अस्फुट 'हुंकार' त्यांनी जाणवून दिला असेल. तिला " 'ही वाट एकटीची' गं,ती तुडवताना तू प्रत्येकच वेळी कशी गं 'इंटिमेट' होणार?,मनाची 'ठिकरी' होऊनही सारं सहन करणारी तू "..असं हलकेच सांगितलं असेल.
 त्या म्हणतील, 'नवरा म्हणावा आपुला' आणि गप्प बसावं झालं.
 ते म्हणतील,आमचं आयुष्य आम्ही जगू.मग ते 'वन फॉर द रोड'  झालं तरी हरकत नाही.नुसतं 'बाई,बायको,कलेन्डर' करत बसण्यापेक्षा तोच बेटर ऑप्शन वाटतो काहीवेळा.
अशांना वपु विचारतात, "एवढंच होतं माझ्या राजा,तर मग 'का रे भुललासी' "

        वपु एक लेखक होते? की एक तत्त्व होते? की एक वृत्ती होते?
        की एक विचार म्हणून जगले असतील?
        नेमकं उत्तर आमची मागची पिढी देऊ शकेल काय ? 
     खरंच, ही 'वपुर्वाई' म्हणजे अजबच ! 'वपुर्झा' काळजीपूर्वक,विचारपूर्वक वाचल्यानंतर तर आयुष्याकडे बघण्याची एक नवीनच दृष्टी मिळते. आपले सो कॉल्ड ह्यूज प्रॉब्लेम्स.दु:खं वगैरे आवाक्यातली वाटू लागतात ..पर्यायाने दुस-यांचीही ..आपण ते प्रॉब्लेम्स सोडवूही शकतो. हे असंच का? आणि हे माझ्या बाबतीतच का? हे जे दोन प्रश्न वेळोवेळी आपल्याला छळत असतात,त्यामागची कारणेही मिळू शकतात...आपल्याला न आवडणा-या,न पटणा-या अन तरीही सातत्याने घडत असणा-या  गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती मिळते.वाचकांना इतकी अफाट ताकद देणा-या या मनस्वी लेखक कलावंताला त्याच्या योग्यतेचं  विस्तीर्ण 'वलय ' लाभलं का? ....... नाहीच बहुधा.





       आमची पिढी नक्की कसं भाष्य करणार यावर? माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी जन्मलो १९८७ मध्ये...वपु गेले २००१ मध्ये. मी होतो १४ वर्षांचा...अन दुर्दैवाची अतिकरंटी महानतद्रष्टी गोष्ट अशी की तोवर मी वपुंचं एकही पुस्तक वाचलं नव्हतं. आज हे सांगायला लाज वाटते खरी..पण पर्याय नाही. तेव्हा चिं.वि.,पु.ल.,अत्रे अशा विनोदी लाटाच भेटायच्या खूपदा. मानवी नातेसंबंध वगैरे कुठले कळायला ?
सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतच राहुल द्रविड नावाचा हिरा भारतीय क्रिकेटला लाभला.....नंबर टू च राहिला..कोण काय करणार ? त्याप्रमाणेच पुलंच्या काळातील त्यांना समकालीन असे बरेच प्रतिभावान लेखक पुलंसमोर झाकोळले गेले...याचा सर्वात मोठा फटका वपुंनाच बसला असंही वाटतं. कथाकथनात मात्र पु.ल.,शंकर पाटील यांच्यापेक्षा वपु अधिक लोकप्रिय ठरले हे खरं. निखळ हसायचंय?... 'बदली' ऐका...हसता हसता अंतर्मुख व्हायचंय?...'हसरं दु:ख' ऐका.

असो..'वा गुरु' नाटकात एक डायलॉग आहे, "व्होट्स राँग इन बीइंग नंबर टू ?" 
हो..असूदेत मोठे सचिन आणि पु.ल...आम्हाला आपले राहुल आणि वपुच 'अधिक' आवडतात..काय म्हणणं आहे?

       वपुंना प्रत्यक्ष भेटता आलं नाही,ही खंत तर राहीलच नेहमी....इलाज नाही. हे टोचणंच काहीतरी नवनवीन सुचवत जाईल कदाचित.त्यांचं लिखाण वाचण्यापूर्वी  एक मन दुस-याला म्हणायचं  'तू भ्रमत आहासी वाया' ..नि पुढे वपु या 'पाणपोई'चं अस्सल अभिजात पाणी चाखायला  मिळालं. वाचनाचं समाधान मिळू लागलं. वाढती बौद्धिक भूक शमू लागली..पण अजून बरंच वाचायचं  आहे
अशी त्यांच्या पुस्तकांची  नावे वाक्यांत बसवून त्यांना बंदिस्त नाही करता येत...त्यांना जवळही नाही आणता येत.
हेही खरंच...आणि कहरच ! थिटा पडतोय..शब्द सापडत नाहीयेत..  वपु तुम्ही यात मावत नाही आहात ... गुड ! आणि गूढही !!

मिस्टर  वसंत पुरुषोत्तम काळे .....ते ..ते.. तेवढं भेटायचं राहिलं.
'गोष्ट हातातली होती'.

                                                                                                                                            ----- पराग