"ही आजकालची पोरं म्हणजे ना.. जर्रा म्हणून ताळतंत्र नाही"
"आमच्या काळी काही नव्हतं बाई असलं"
"अहो आणखी कुणाबद्दल बोलणार.. तरुण पिढी हो आजची... एकजात वाया गेलेली"
"छे, आमची अक्कल कशी काढतात हे.. चार पावसाळे जास्त पाहिलेत आम्ही ह्यांच्यापेक्षा याचं तरी भान ठेवावं"
काय.. ओळखीचे वाटतायत ना डायलॉग्ज..
अहो, वाटणारच. तुम्ही आम्ही वेगवेगळ्या ग्रहावर का राहतो !
पण मुळात कसं आहे माहितेय का, स्वतंत्र भारताची प्रामुख्याने दोन भागात विभागणी करता येईल. १९४७ ते १९९२ आणि १९९२ पासून पुढे... कारण त्यावेळी ग्लोबलायझेशन सुरु झाले, जे लोक 90s मध्ये वयाच्या पस्तीशी - चाळीशीत होते त्यातल्या काहींनी या वेगवान बदलाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आणि तेच आज थोडंफार तरुण पिढीला समजून घेऊ शकतात. (त्यांच्याशी आपलीही मैत्री चटकन होऊ शकली) पण कसंय, ज्यांनी ऑलरेडी 'जुनं ते(च फक्त) सोनं' वर मनात शिक्का मारून ठेवलाय आणि त्यामुळे फ़ेव्हिकोलसदृश त्या तत्वाशी त्यांची 'टुटेगा नही' केटेगरीतली मैत्री झालीय, त्यांची ती विचारधारणा 'आता' बदलणे फार मुश्किल आहे.
खरतर जनरेशन ग्याप असणारच, ती नसेल तर काय मजा मग! प्रत्येक पिढी आपल्या तारुण्यात थोडीफार बंडखोर असतेच. हां आजची यंग जनरेशन काहीशी चंचल आहे मान्य.. (दहाबारा वर्षे एकाच कंपनीत काम करणाऱ्याकडे एलिन पाहावा तसं पाहते) पण आजच्या पिढीला Calculated रिस्कच्या रूपाने का होईना पण सातत्याने धोका पत्करावा लागतोच, स्पर्धा आहेच तेवढी हे आजचे (वयाने) ज्येष्ठ नागरिकही मान्य करतील. आज फास्टफूड, टी ट्वेंटीच्या जमान्यात सगळंच एवढं मटेरियलीस्टिक झालंय की त्यामुळे आजच्या यंग जनरेशनला सगळ काही पटपट पटपट मिळवण्याच्या मागे लागणं भागच पडतंय. साधं उदाहरण - पूर्वी कसं बरं होतं, माणूस आयुष्यभर कुठेतरी चिकटून नोकरी करायचा, चाळीत/ लहानशा घरात राहायचा आणि निवृत्तीनंतर ग्रेच्यूइटी, पीएफचे पैसे आले की मगच एखाद घर घ्यायचा.. तेव्हा ते चालायचं हो. पण हेच लोक आज वधुपिते झालेले असतात आणि पंचविशीतल्या मुलाला त्याने पोह्याचा पहिला घास खायच्या आधी खुशाल विचारतात - तुझं स्वत:च घर आहे का.. (अहाहा, बाहेरून पुण्यामुंबईत येऊन काम करणाऱ्या मुलांना हे ऐकून कित्ती छान वाटत असेल ना). म्हणजे तरुणांना फास्ट व्हायला, रिस्क घ्यायला आपणच एका अर्थी असे भाग पाडतो आहोत नाही का!
आजची पिढी जास्त practical आहे, प्रत्येक गोष्टीमागच लॉजिक आधी शोधू पाहते, प्रत्येक सिच्युएशनच SWOT अनालिसिस करून पाहते. अजून एक, एवढं प्रदूषण, एवढी वाढलेली गुन्हेगारी, होणारे दहशतवादी हल्ले यातून कुणी बघितलय मग आमच्या नशिबी म्हातारं होणं तरी आहे की नाही. म्हणून मग 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मधल्या 'लेकिन तुम्हे किसने बताया तुम चालीस साल तक जिओगे" हा डायलॉग आपलासा वाटून हे तरुण 'नंतर केव्हातरी करू' वाल्या प्रवास, ट्रेकिंगसारख्या गोष्टीही याच वयात करायला प्राधान्य देतात, तेही नीट प्लानिंग करून. (म्हणजे शक्यतो पाच दिवस काम असलेले जॉब जॉईन करून)
चला आता आपल्या चष्म्यातून पैलतीर नीट दिसणार नाही हे मान्य करून म्हणा, किंवा अंगात किडे म्हणून म्हणा, पण जरा धाडस करून नाणं पलटू. "अरे ऐक माझं, मी सांगतो तसं कर, आफ्टरऑल हे काळ्याचे पांढरे काही उगाच नाही झाले" या उपदेशवर्गाची बाजू घेऊन बोलायचे झाले तरी एक भक्कम मुद्दा आहे.. तो म्हणजे सगळ्या चुका करायला आणि मगच त्यातून शिकायला हे आयुष्य अपुरं आहे, म्हणून दुसऱ्यांच्या अनुभवांतूनही (चुकीला हा एक भारी समानार्थी शब्द असतो बहुतेकदा) शिकलेच पाहिजे. आणि हो, हे प्रत्येक पिढीला लागू.. अगदी आपल्या पिढीलाही. कारण अजून १५-२० वर्षांनी "ह्या, असं कुठं असतं का" हे आपल्यालाही ऐकावं लागणार आहेच, सो आपणही आपली खिलाडूवृत्ती आत्ताच वाढवत नेलेली बरी. पण खरतर अशा लोकांना भेटून, पुस्तके वाचून (आजकाल टीआरपीवाल्या फेसबुक पोस्ट्ससुद्धा) वगैरे तरुण पिढीने त्यातून 'पुढच्यास ठेच..' या न्यायाने योग्य तो बोध घ्यावा.
पाडगावकरांनी सांगितल्याप्रमाणे या जगण्यावर शतदा प्रेम करतो आहेच आम्ही, म्हणूनच रडत कुढत नव्हे तर हसतखेळत जिंदादिल होऊन जगावंसं वाटतं. बाकी काय जिंदगी की कश्मकश में तर सगळे उलझलेले आहेतच, त्यातून जमेल तसा आवडीनिवडींसाठी वेळ काढत आहेतच. आणि हे जीवन सुंदर वगैरे आहेच,, निसर्गासारखा मित्र नाही, अनुभवासारखा गुरु नाही वगैरे वगैरे
-- © पराग पुजारी
Sundar arthpurn lekh..
ReplyDeleteThank you :)
Delete