Thursday, 31 December 2015

श्री श्री सलमान खान निर्दोष सुटल्यावर

श्री श्री सलमान खान निर्दोष सुटलेच शेवटी. आहे, देव अल्ला कोण म्हणाल तो आहे हे नक्की. पण फार उलटसुलट प्रतिक्रिया येतायत यावर. अर्थात एक मात्र खरं, न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कायच्या काय दृढ व्हायला या निकालाने मदतच झाली असे म्हणावे लागेल. मुळातच ह्या परोपकारी सोज्वळ अशा बीइंग ह्युमन टाइप व्यक्तिमत्वावर 'सदोष मनुष्यवध' असा काही हिणकस आरोप होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतंच, अहो खरंच, काळविटाची शप्पथ!! उगाच बिचाऱ्या खानसाहेबाना तब्बल तेरा वर्ष मन:स्ताप दिला राव. असं कुठं आसतं का? आजचा कोर्टाचा हा निर्णय योग्य सहिष्णू असाच आहे. पण ज्यांनी ही तक्रार नोंदवली होती, त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर कमालच दिसतो बाकी. म्हणे सलमान दारू पिऊन गाडी वेगात चालवत आला आणि ह्याला चिरडल, बाकी तिघेचौघे जखमी वगैरे सिनारिओ क्रिएट केला.

पहिली गोष्ट, मुळातच सलमान आणि दारू हे विरुद्धार्थी शब्द आहेत, पहा त्याचे पाणीदार डोळे आणि सतेज कांती याचा पुरावा आहेत. त्यामुळे तो दारू पिऊन गाडी चालवणं शक्यच नाही. तरी समजा कुणी त्याच्या नकळत त्याला त्याच्या नेहमीच्या ताकातून पाजलीच असेल तरी चूक त्या झोपलेल्या बेकरी  कामगारांचीच आहे. म्हणे आम्ही फुटपाथवर झोपलो होतो. अरे फुटपाथ ही चालण्याची जागा आहे लेको, झोपण्याची नाही. आता ते टिपिकल संत सलमानविरोधक म्हणतील की मग ती काय कार चालवायची जागा आहे काय.. अरे बाळानो, फार तर काय, गाडीची चाकंच तर गेली असतील ना त्या फुटपाथवरून, जाऊदेत की मग, आमचं लॉजिक असं सांगत की चाकं म्हणजे गाडीचे पायच असतात आणि फुटपाथ हा पायांसाठीच असतो, नाही का? पण तुम्ही तर अख्खेच्या अख्खे तुमचे भुईला भार असे देह आडवे तिडवे कसेही पसरून अस्ताव्यस्तपणे झोपला होतात तिथे, त्याचं काय. नॉनसेन्स.. अजागळ कुठले.. सलमानदादा, सॉरी, सलमानभाई या देशाचे सुजाण आणि जागरूक टाइप नागरिक आहेत, ते कर वगैरे भरतात, ज्यातून तो रस्ता आणि फुटपाथ तयार झाला होता. तुम्ही भरता का कर..आयतोबे, फुकटे लेकाचे. तेही सोडा, कदाचित तुम्ही तिथे झोपला नसालच. राईट, या देशात माणसाना ताशी १२०-१४० किमी वेगाने पळत पळत येऊन गाडीखाली आत्महत्या करण्याच्या स्टाईलपासून परावृत्त केले पाहिजे, नव्हे ही आता काळाचीच गरज होय. असे पळत येऊन लॅन्ड क्रूझरसारख्या आलिशान गाडीला धडक देतात म्हणजे काय.. उगाच त्या महागड्या गाडीचे नुकसान. फारच शेफारलेत लेकाचे. वर त्या देवमाणसावर खटलाही दाखल करतात.. वा रे वा.. बहोत खूब, तुमच्या चुकीची शिक्षा त्याला का म्हणून. चुकीला माफी नाही. 

त्याचे लग्न कधी होणार हा गेली कित्येक वर्षे राष्ट्रीय प्रश्न आहे, म्हणजेच तो स्वत: एक राष्ट्रीय संपत्ती आहे. वेगाने पळत येऊन धडक देत स्वत:च्या तसेच दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करणे हे चार्जेस लावून त्यांच्यावरच खटला चालवला पाहिजे. तुमच्या फडतूस जीवाची किंमत एका सुपरस्टारची तेरा मन:स्तापाची वर्षे कशी असू शकते? इतकी वर्षे ही टांगती तलवार (केस विरळ होत चाललेल्या) डोक्यावर राहिल्याने एका निष्पाप स्त्री जीवाचं आयुष्य का आपल्याबरोबर फरपटत न्या असा उदात्त विचार करून त्या सद्गृहस्थाने आजवर लग्नही केले नाही आणि आपले कौमार्यही जपले. होय, त्याची व्हर्जीनिटी अजून अबाधित आहे असे आम्ही या या कानांनी ऐकले, जेव्हा जोहरांच्या करणला त्याने डोळ्यात डोळे घालून ते उत्तर दिले. कित्ती निरागस! बोला, त्याच्या या नुकसानाला जबाबदार कोण? अरे त्याचे बाकीचे दोन स्पर्धक आणि वादापासून सतत दूर राहणारे खान सरोगसी वगैरे करून मल्टीपलवेळा अब्बूजान होतायत, मग यालाही वाटत असेलच ना की १२५ कोटींच्या या लाजाळू देशात आपलेही काही कॉनट्रीब्युशन असावे, पण लक्षात कॉन घेतो? 

चला हेही जाउद्या, पण ते जंगल.. तिथे ते हम साथ साथ है म्हणत भटकणारे काळविटस.. हां तेच तेच बेशिस्त वेडीवाकडी शिंगंवाले, त्या मूर्ख काळविटांचही तेच.. बेवडी कुठली. आला आयुष्याचा कंटाळा म्हणून पळवली बिचाऱ्याची बंदूक आणि त्याचे फिंगरप्रिंट्स तसेच ठेवून हुशारीने स्वत:च्याच शिंगाने गोळी झाडून घेतली स्वत:वर.. कपटी कुठले.. आणि दोष ह्याच्यावर, केस ह्याच्यावर.. कुठं फेडाल हे पाप क्रूर काळविटानो, तुम्हाला काही लाज. तुमच्या दारूच्या व्यसनापायी तुम्ही कर्जबाजारी झालात आणि सुटका म्हणून हा मार्ग अवलंबलात हे सरळ सत्य आता सलमानने कितीही टाहो फोडून सांगितले तरी या देशातील असहिष्णू जनतेला खरे वाटेल काय? ते काही नाही, त्या निरुपयोगी आणि वेड्यावाकड्या शिंगधारी काळवीट जमातीवर बंदी आलीच पाहिजे, किमान त्या संबंधित काळविटाच्या वारसांवर तरी खटला दाखल व्हायलाच हवा. काही ना काही कडक शिक्षा किंवा कठोर कारवाई व्हायलाच हवी. फार लाड चाललेत हल्ली प्राणी लोकांचे.


राहता राहिला त्या ड्रायव्हर रवींद्र पाटीलचा प्रश्न.. म्हणे त्याच्या आत्म्याला काय वाटत असेल. अरे तुला सांगितलंच कुणी होत अशा ऑटो ड्रिव्हन गाडीत बसायला? टेक्नोलॉजी कळत नाही आणि बसला लगेच गाडीत. हो, गाडी जर सलमान चालवत नव्हता तर ती आपोआपच धावत असणार त्या रात्री, तसच मेकेनिझम होतं त्या गाडीचं. तुझी साक्ष ग्राह्य धरली गेली नाही म्हणून तुझे काही पाठीराखे गळे  काढतायत, उद्या तुझ्या आत्म्याला प्लांचेटवरही बोलवायला कमी करणार नाहीत हे लोक.. पण तू काही दाभोलकर नाहीस ना तुझ्या मृत्युमागच सत्य शोधायला प्लांचेट वगैरे अत्याधुनिक एक्युरेट मेथड्स अमलात आणायला.

असो, या पर्टीक्युलर निर्णयामुळे कुणाच्या मनात 'सल' तसाच राहिला असेल, तर कुठे कुणाचा 'मान' वाढला असेल. पण न्यायव्यवस्थेचा विजय असो. 



   

No comments:

Post a Comment