** त्र्याण्णव नव्हे नव्वद तीन **
-- पराग पुजारी
ही आहे अभिनेते अतुल कुलकर्णी यांची त्यांनी गरीब, आदिवासी मुलांसाठी दुर्गम भागात सुरु केलेल्या 'क्वेस्ट' या अनोख्या शैक्षणिक उपक्रमाविषयीची २०१५ ची मुलाखत. १२.५० - १३.५० पहा, त्यामध्ये कल्पना येते की इंग्रजांनी इथे सुरु केलेली (लादलेली) मेकॉलेची शिक्षणपद्धती ही त्यांना सोयीस्कर अशी होती. इतकी वर्षे होऊनही आपण आपली शिक्षणपद्धती सुरूच केली नाही. १८.४० - २०.३१ पहा. यात अतुल सांगतात की एक ते शंभर आकडे मराठी आणि इंग्रजीत पाठ करण्यात काय फरक आहे. मराठीत दोन हा आकडा बे किंवा बेचाळीस मध्ये बे, बारा किंवा बावीस मध्ये बा, बत्तीस मध्ये ब, ब्याऐंशी ब्याण्णव मध्ये ब्या असे वेगवेगळे उच्चार आहेत. हाच नियम तीन, चार, पाच अशा सर्वच आकडयांना लागू होतो. इंग्रजीत मात्र एक ते वीस आकडे पाठ केले की पुढे तेच ते रिपीटेशन येत जाते. मराठीत ३२ बत्तीस उच्चारताना दुसरा आकडा (२) आधी ब च्या रूपाने उच्चारला जातो आणि मग दशमान एककातला पहिला आकडा (३) तीस या रूपाने, इंग्रजीत हेच उलट घडतं. मराठीत बाराखडी यासाठीच असते, ब बा बी बे हे सगळंच त्यात येतं. आता मराठी आणि इंग्रजी वर्णमालेतली स्वर आणि व्यंजने संख्या कशी ५२ आणि २६ आहे, मग मराठी कशी जास्त अंबानी (श्रीमंत असे वाचावे)..
त्या घिस्यापिट्या तर्कात आपण इथे अडकायला नको.
पण..
“बालभारतीने अभ्यासक्रम बदलास सुरुवात केली असून इयत्ता दुसरीच्या गणित पुस्तकातील गणित शिक्षणात आमुलाग्र बदल करण्यात आला आहे. संख्या वाचन करताना एकवीस ऐवजी वीस एक, त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, त्र्याण्णव ऐवजी नव्वद तीन असे वाचण्याच्या सूचना अभ्यास मंडळाने दिल्या आहेत. “
ही बातमी आली आणि लगेच ही अतुलजींची मुलाखत आठवली, ती (तुमच्यासाठी) शोधून काढली. शिक्षणमंडळाच्या त्या निर्णयावर आता उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. माझ्यासारख्या मराठी भाषाप्रेमींना हा निर्णय अर्थातच चुकीचा वाटतो आहे. कारण यापुढे हळूहळू मराठी भाषेचे सौंदर्य असेच इंग्रजी, हिंदी भाषांचे आक्रमण होऊन आणखी लुप्त होण्याचा धोका आहे. हा नवीन निर्णय झाला गणिती भाषेच्या प्रयोजनावर गदा आणणारा. हेच मराठी या भाषा विषयाबाबत तर सर्रास सुरु आहे. एक काकू अलीकडेच म्हणाल्या की मुंबईतील एका मराठी शाळेत शिक्षिका असलेल्या त्यांच्या एका मैत्रिणीने त्यांना सांगितलं की 'आता मुलांनी पेपरात पुस्तक भेटलं वगैरे लिहिलं तरी मार्क द्या, न आणि ण च्या गोंधळात मार्क कापू नका, देऊन टाका मार्क्स' अशा ऑर्डर्स त्यांच्या मराठी माध्यमाच्याच शाळेकडून आल्या आहेत. बोंबला.. अरे हे फारतर मराठी जिथे सेकंड लँग्वेज आहे तिथे म्हणजे इतर भाषेच्या माध्यमाच्या शाळेत ठीक, पण मराठी माध्यमाच्या शाळेत जिथे मराठी फर्स्ट लँग्वेज आहे तिथे कसे चालेल? इंग्रजी माध्यमाच्या शाळेत उमर अकमल, सर्फराज अहमद टाइप इंग्रजी लिहिले, बोलले तर मिळतील का मार्क्स? हे जर असेच होत जाणार असेल तर बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यातली दरी अगदीच मिटत जाईल, जे खरंतर अकॅडमिक शिक्षणासाठी योग्य नाही. आणि उगाच ब्राह्मणी भाषा म्हणून प्रमाणभाषेला हिणवून 'तुम्ही पुस्तक मिळतं' म्हणता म्हणून 'आम्ही मुद्दाम पुस्तक भेटतं' म्हणणार यालाही काही अर्थ नाही. (होय, मला खरंच शंका आहे की काही लोक मुद्दाम असं म्हणतात. कारण त्यांच्या इतर भाषेत, शब्दांत अशी विसंगती कुठेच आढळत नाही. जसे निलेश साबळे विशिष्ट ऍक्टस करताना ठरवून णमस्कार णमस्कार असं म्हणत येतो.) हां आता काहींचा जेन्युईन प्रॉब्लेम असूही शकतो. आमचे एक गणिताचे सर घणमूळ, समीकरन असे शब्द अगदी फ्लोमध्ये खणखणीत आवाजात म्हणायचे, म्हणजेच जिथे न तिथे ण आणि ण तिथे न.
बाकी मुंबईत आल्यापासून तर पेन, साबण, स्टेपलर, करियर, चहा, ट्रेन, गाडी, सायकल, पोस्टर, ट्रेलर, व्हिडीओ, पिक्चर, बाउंडरी, सिक्सर अशा शब्दांना मी चक्क तो, ती, ते अशा तिन्ही लिंगांमध्ये सर्वलिंगसमभाव जपत बागडताना ऐकलंय. फेसबुकवर म्हणाल तर वगैरे ऐवजी वेग्रे, लोक ऐवजी लोक्स, आहे ऐवजी आहेय असे शब्द कोण मुद्दाम विनोदनिर्मितीसाठी किंवा त्या टोनमध्ये जाऊन ठरवून टोमणेगिरीसाठी लिहितात तेही कळतं, आणि कोण 'हे शब्द असेच लिहायचे असतात' असं समजून लिहितं तेही कळतं. तसा मी बोलीभाषांचा प्रचंड चाहता आहे, सांगलीचा असल्यानं कोल्हापुरी भाषा जवळची. पण 'ढग तर्राट वर जायलाय असं दिसलं की वळकायचं गड्या हो, की आता विदाउट डाउट बाष्पीभवन होणाराय' किंवा 'एस्किमो लोक शून्य मिन्टात इग्लू बांधत्यात आन मग पटाक्किनी श्येकोटी पेटवून जाळ आन धूर संगटच करत्यात' अशी वाक्यं मला विज्ञानाच्या किंवा भूगोलाच्या पुस्तकात वाचायला खचितच आवडली नसती.
आता शिक्षणमंडळाकडून ही बातमी आली आणि अनेक चर्चा सुरु झाल्या. आज परदेशात राहूनही मराठी भाषेबद्दल कळकळ असणारे मित्रमैत्रिणी पाहतो तेव्हा खरंच छान वाटतं. पुण्यात मी एका प्रकाशन संस्थेत काम करत असतानाची गोष्ट.. मी सांगलीचा आहे हे कळल्यावर या पुण्यातल्या ऑफिसात एका जाज्ज्वल्य पुणेरी (पुणं नाही हां.. पुणे) कलीग मैत्रिणीने मला एकदा ७८ आकडा उच्चारून दाखव असं म्हणून मी अठ्ठ्याहत्तर म्हणतो की अष्ट्याहत्तर हे चेक केले होते. पण तिला बापडीला महिती नव्हते की मी आरतीतही संकटी पावावे म्हणतो, संकष्टी पावावे नाही. तिनेही आज या निर्णयावर उद्वेगाने पोस्ट टाकली आणि कळलं की अमेरिकेत असलेल्या मराठीप्रेमींनाही हा निर्णय दुखवून गेलाय.
मराठी जोडाक्षरे येतात ती उच्चारायला कठीण जातात हे लॉजिकच धन्य आहे. अहो आम्हाला
constantinople सारखा तेव्हा जिभेला निरगाठी पाडणारा शब्द फळ्यावर लिहून यातून जास्तीत जास्त इंग्रजी शब्द तयार करा असे (आम्हाला पाचवीपासून इंग्रजी असताना सहावीत) सांगितले जायचे. आता mississippi चा स्पेलिंगप्रमाणे उच्चार शिकवलात तर तो रमेश सिप्पीमधल्या सिप्पी सारखा होईल, शिकवणार का?
pneumonia, psychology, honest मध्ये पहिले अक्षर सायलेंट का हे शिकवणार का? आणि कसे? इंग्रजी भाषेला तिची मर्यादा माहीत आहे म्हणूनच ऑक्सफर्ड डिक्शनरी दरवर्षी इतर भाषांमधले शब्द आपल्यात सामावून घेत जाते. चुपके चुपके मध्ये तेरा खून पी जाऊंगा (धर्मेंद्र असे वाचावे) आणि नमक हलाल मध्ये हांय (अमिताभ असे वाचावे) यांनी इंग्रजीच्या मर्यादा सांगितल्या आहेतच. फाडफाड इंग्रजी बोलणारे भले भले जाणकारही (निकष: शेड्युलला स्केड्युल म्हणणारे म्हणजे जाणकार.. थेट शशी थरूर यांचा चेहरा डोळ्यासमोर आणू नये) सेपरेट, रिसिव्ह, डिसीझ, डेफिनेटली अशा शब्दांचं स्पेलिंग लेखी चुकताना अस्मादिकांनी या या (चष्म्याआडच्या) डोळ्यांनी पाहिलेत. अरे नव्वद तीन हा फारतर क्रिकेटचा स्कोरबोर्ड असू शकतो, आणि वीस आठ हा बास्केटबॉलचा स्कोर असू शकतो. त्र्याण्णव आणि अठ्ठावीस शिकताना आम्हाला त्रास नाही झाला तो! आम्ही कुठे म्हणतोय शिवतांडव स्तोत्राची भाषा आणि त्यातले उच्चार आलेच पाहिजेत म्हणून, गेलाबाजार मोरोपंत किंवा बालकवींची मराठी आली पाहिजे म्हणून.. पण 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' असं मराठी भाषेविषयी म्हणणाऱ्या सुरेश भटांचीही यायला नको?
हिंदीतही असंच -
'पहली ट्रेन मिस हो गयी तो दूसरा ट्रेन दस मिनिट बाद आयेगा' अशी वाक्यं मी मुंबईत खरंच ऐकलीत. एकाच वाक्यात ट्रेन पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी दोन्हीही कशी असू शकेल राव (तुम्हाला लक्षात आले का पोस्टकर्ता इथेही 'शकते, शकतो' लिहिण्याच्या फंदात पडला नाहीये आणि 'शकेल' लिहून मोकळा झालाय, त्याला भाषेची शकलं खरंच बघवत नाहीत). आता कोणत्याही भाषेत बोली आणि प्रमाण हे प्रकार येतातच हे मान्य, पण जगात कुठेही गेलात तरी शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी एक स्टॅंडर्ड भाषा ठेवावी लागतेच ना. मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये 'वो आरेला है, कररेला है' अशी टपोरी बोलीभाषा ऐकायला तेव्हा मनोरंजक वाटते, पण मेडिकलच्या विद्यार्थ्यांना या भाषेत शिक्षण दिलं गेलं तर? किंवा अगदी शाळेच्या साध्या हिंदी भाषेच्या पेपरात असं हिंदी लिहिलं जावं का? हिंदी पेपरात अशी भाषा वाचायची तुमची तयारी आहे का? 'आज यहां पे जैसा की आप अब्बी देखरेले हो कि उधरीच नही बल्की इधर बी भोत बारिश होरेला है, रूक्कीच नही रहेली ना बारिश आज भिडू' हे एखादा हिंदी वार्ताहर किंवा निवेदक हिंदी टीव्ही न्यूज चॅनेलवर बोलताना आपल्याला चालणार आहे का?
इंग्रजीचंही असंच होत चाललंय म्हणा. सोशल मीडिया बकासुरासारखा अक्राळविक्राळ होऊन भाषासौंदर्य आणि व्याकरण निर्दयीपणे पोटात घालत असताना आणि अघोरी एसेमेस लँग्वेज आल्यापासून मुलं पेपरात सर्रास
btw, imo, asap असे शॉर्टफॉर्म्स लिहीत चाललेत हे तुम्ही शाळेतल्या शिक्षकांशी बोललात तर कळेलच.
या मुलाखतीत शेवटी
'Children are not from you, Children are through you' हे खलील जिब्रानचं वाक्यही अतुल कुलकर्णी सांगतात. पटतंय हे मला तरी, आपण जे मुलांना शिकू देणार तेच ते शिकत जाणार, तेच पुढच्या पिढ्यांमध्ये झिरपत जाणार. संस्कार म्हणजे 'हे असं बोल, असं वाग' असं पालकांनी मुलाला सांगणं नसतंच, संस्कार म्हणजे मुलाने जसं बोलावं, वागावं असं वाटतं तसं पालकांनी त्याच्यासमोर, त्याच्या उपस्थितीत बोलत, वागत राहणं असतं. कोणताच बाप मुलाला शिव्या द्यायला शिकवत नाही, पण मुलासमोर बापाला कुणा मित्राचा फोन आल्यावर सहज जरी भकाराने सुरुवात झाली तरी मुलगा ते कॅच करणारच. विचार करण्यासारखा विषय आहे खरंच! 'इंग्रजी 'भाषा' शिकली पाहिजे, त्यासाठी अमुक एक 'विषय' इंग्रजीत शिकणं गरजेचं नाहीये, तो आग्रहच चुकीचा आहे' हाही अनेकांना पटणारा मुद्दा अतुल यांनी या मुलाखतीत मांडलाय. बघा याच मुलखात अशीही एक मुलाखत झाली होती. जमल्यास पूर्ण बघा.
- पराग पुजारी