Thursday, 31 October 2019

शेवटच्या पानावरून

शेवटच्या पानावरून
तू लिहू लाग कविता पहिल्या पानावरून
मी लिहू लागेन मागून
जर टिकलाच दम आपला.. आणि आपल्या कवितांचा
तर ठाशीव चेहरा घेऊन निघालेल्या आपल्या कविता
इतकी पानं ओलांडल्यावर अगदी जेनेरिक होऊन जातील
आणि त्यांच्या बिनचेहऱ्यांच्या ओळी कालवल्या जातील एकमेकांत
आणि मध्येच दम तुटला तर
तर थांबू.. असू तिथेच आपण
रिकाम्या पानांच्या पैलतीरी तू आणि ऐलतीरी मी
'वन्स अ इयर' या MX Player वरच्या मराठी वेबसिरीजमधली एक कविता, शेवटच्या एपिसोडमध्ये ज्या सिच्युएशनला येते ती सिच्युएशनही खास. मृण्मयी गोडबोले ती सादरही छान करते, आणि मग निपुण धर्माधिकारीला विचारते 'बरी वाटतेय?', त्यावर तो म्हणतो 'खरी वाटतेय'


Thursday, 26 September 2019

हॅपी बर्थडे लिंबू कलर साडी


"मिस्टर माने, मी तुम्हाला थोडा त्रास देणार आहे"
"अं.. त्रास.. हां मला दम ऐकू आलं, काय घाबरलो मी" (शक्य आहे, अगदीच यमक आहेत दोन्ही शब्द)
"माझ्याबरोबर साड्यांच्या दुकानात चला,. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरलंय, तिच्यासाठी दोन साड्या घ्यायच्यात.. तुमचा रंगाचा चॉइस बरा दिसतोय. मला जरा मदत करा."



'अशी ही बनवाबनवी' मध्ये सर्वानीच एकापेक्षा एक झकास विनोदी संवाद पेश केले आहेत, पण माझ्या मते सर्वात भारी विनोद या लिंबू कलर साडीवाल्या मॅडमच्या वाट्याला आला होता आणि तो त्यांनी मस्त क्रॅकही केला होता. अर्थात हे वाक्य इथे नुसतं वाचून तसं वाटणार नाहीच, पण 'ती' ऐतिहासिक फ्रेम आणि ते टायमिंग डोळ्यासमोर आणा.. एकदम छान सोज्वळ टापटीप सुंदर डिसेंट वगैरे, चष्म्याची मोठी फ्रेम, साध्याशाच पांढऱ्या साडीत आणि फारसा मेकअप नसतानाही मुळातच आकर्षक दिसणाऱ्या अश्विनी भावे आपल्या खुर्चीवर ऐटीत हातातल्या पेनशी चाळा करत बसल्या आहेत. आणि समोर दीड फुटांवर कसला तरी पांढरट पण मळकट रंगाचा शर्ट घालून आपले अशोकमामा टेबलावर आपले घामट हात टेकवून उभे आहेत, शर्टाची वरची अडीच बटणं नेहमीप्रमाणे म्हणजे पश्चिम बंगालमध्ये बांग्लादेशींना असतो तसा हवेला व्हेंटिलेशनसाठी मुक्त प्रवेश देत मोकळेपणाने उघडी सोडलेली आहेत, डार्क पार्ले बिस्कीट आणि फिकट डेरीमिल्क यांच्या मध्ये कुठेतरी न मोजता येणाऱ्या अंतरावर असणाऱ्या कलरची पॅन्ट, कालच ज्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला त्यांची जशी तेव्हा हिंदी सिनेमात दोन्ही कान अल्मोस्ट केसांनी झाकणारी हेअरस्टाईल असायची तशीच केशभूषा, चेहऱ्यावर विरार फास्ट लोकलमधून जीवाची बाजी लावून कसेबसे बोरिवली स्टेशनला उतरल्यावर जगाकडे पाहताना येतात तसे भाव आणि अचानक आपले धनंजय माने हा संवाद मॅडमच्या मुखातून ऐकतात -'तुमचा रंगाचा चॉइस बरा दिसतोय..' मॅडमही अगदी नाकावरून चष्मा सरकवत अगदी मनापासून त्यांना ही कॉम्प्लिमेंट देतात, आणि मानो या ना मानो पण मग मानेंचा आनंद त्या कॉस्मेटिक्सच्या दुकानात मावत नाही, त्यांना ते अख्खे दुकान ठेंगणे होते. निरंजन बाबांच्या आंब्याची शपथ हो...


हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे आज याच मॅडमचा वाढदिवस.

परवाच २३ सप्टेंबरला 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटाला ३१ वर्ष पूर्ण झाली आणि चित्रपटाचे कलाकार पुन्हा एकदा नव्यानं चर्चेत आले. अर्थात त्यात माधुरी हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री अश्विनी भावे हेही एक महत्त्वाचं नाव. मराठी इंडस्ट्रीतल्या एव्हरग्रीन सुंदर अभिनेत्रींच्या यादीत आणि अगदी आरस्पानी सौंदर्य वगैरे म्हणतानाही अर्चना जोगळेकर आणि अश्विनी भावे ही नावं खूप वर येतात यात शक्यतो दुमत नसावे.

'अशी ही बनवाबनवी’ हा त्यांचा 'शाब्बास सूनबाई' नंतर दुसराच मराठी चित्रपट होता. त्यानंतर 'धडाकेबाज’ 'कळत नकळत',  'आहुती', 'सरकारनामा, 'वजीर, 'हळद रुसली कुंकू हसलं' पासून अलीकडच्या 'आजचा दिवस माझा', 'मांजा' यांसारख्या मराठी चित्रपटात आणि १९९१ मध्ये 'हिना' चित्रपटातून हिंदीत प्रवेश करून मग'मोहब्बत की 'आरझू', 'अशांत, 'सैनिक, 'जुर्माना', 'जखमी दिल’ अशा काही हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली.



अश्विनी भावे एखाद्या साडीचे दुकान असणाऱ्या आणि लिंबाचा साइड बिझनेस करणाऱ्या बिझनेसमनशी लग्न करतील असे वाटले होते, गेलाबाजार कॉस्मेटिक्सचे दुकान असणाऱ्याशी तरी, पण सर्वाना आश्चर्याचा धक्का देत त्यांनी २००७ मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या किशोर बोपर्डीकर यांच्याशी विवाह केला आणि अमेरिकेत स्थायिक झाल्या. इकडे अनेक हृदये जाळणाऱ्या सुंदर मराठी अभिनेत्रीनी सासर निवडताना तसंही अमेरिका निवडायचे असते, नाहीतर तो फाऊल धरला जातो.. म्हणून मग माधुरी दीक्षित, अर्चना जोगळेकर यांच्याप्रमाणेच अश्विनीही लग्न करून अमेरिकेत गेल्या. तेव्हा उड्डाण करताना त्या लिंबू कलरच्या विमानातून गेल्या आणि त्यांच्या मोबाईलचे बॅककव्हरही लिंबू कलरचे आहे असे म्हणतात.


असो, एरवी रंगांच्या बाबतीत माठ पुरुष जातीला फक्त लाल, निळा, पिवळा, हिरवा असे बेसिक कलरच कळत असताना (पुण्याच्या वाहतुकीत या रंगांनाही किंमत मिळत नाही म्हणे) आणि रंगांच्या इतर शेड्स म्हणजे थोतांड, अंधश्रद्धा वाटत असताना लिंबू कलरसारख्या दुर्लक्षित कलरला जनमानसात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या आणि दुल्हेराजामध्ये लिफ्टमधील प्रसंगात रविना झुरळाला घाबरून गोविंदाच्या गळ्यात पडते तेव्हा तो सीन पाहताना आम्हाला ज्यांच्यामुळे दे जा व्हू झाल्यासारखे वाटले अशा सदाबहार आणि अर्थात लिंबू कलरच्या साडीने अनेक तरुणांच्या हृदयात वसंत फुलवणाऱ्या अश्विनी भावे यांना वाढदिवसाच्या हार्दिक मेनी मेनी रिटर्न्स शुभकामनायें बर्थडेच्या हॅपी शुभेच्छा...



Saturday, 20 July 2019

ए मेमरीच्या...



माझी मेमरी चांगली आहे असं बरेच जण म्हणतात. काही डॅम्बिस लोक्स तर त्यांना अमुक काही नंतर लक्षात राहील की नाही याची खात्री नसेल तर ती गोष्ट मला सांगून ठेवतात, आणि वेळ येताच एफडी मोडतात. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणून शाळेने तर शालेय जीवनातच माझे पाय एक पाळणा बांधून (पक्षी: स्पर्धा घेऊन) चेक केले होते. पहिला नंबर कुणाचा आला होता 'आठवत नाही'. पण त्याने/ तिने हिम्मत असेल तर आता माझ्याशी या बाबतीत टक्कर घेऊन दाखवावी. (टॉपिक शक्यतो राहुल द्रविडशी संबंधित कोणताही घ्यावा.) त्या स्पर्धेत होतं तसं त्या चाळीस पाच वस्तू (जुन्या सिलॅबसप्रमाणे पंचेचाळीस) वस्तू पुन्हा आठवून लिहून दाखवेन. तेव्हा चाळीस दोन की चाळीस तीनच लिहिता आल्या होत्या. (एका हॉलमध्ये 45 वस्तू ठेवलेल्या असायच्या, तिथे जाऊन एकवार फिरून दोन मिनिटांत त्या बघून यायच्या आणि दुसऱ्या वर्गात बसून त्या कोणत्या होत्या ते आठवून लिहून काढायचे असा पाळणा तत्कालीन युगात शाळेने यासाठी बांधला होता.)
पुढे मात्र इंजिनियरिंगचे पेपर्स लिहिताना सुरुवातीच्या काळात उत्तरं आठवूनही ती न लिहून वेगळंच काही लिहित मी युनिव्हर्सिटीला सक्सेसफुली गंडवले होते. फिक्शन लिहिण्याची उपजत आवड आणखीच वाढायची ते पेपर लिहिताना. नंतर नंतर तर लेखी पेपर्स आणि व्हायवा असताना त्या त्या वेळी मी योग्य ते न आठवून घेण्याची सिद्धीही महत्कष्टाने प्राप्त केली.



इंग्लंड - न्यूझीलंड वर्ल्डकप फायनलनंतर मान्यवरांच्या प्रतिक्रिया


संपादक कुबेर: हा अख्खा वर्ल्डकपच व्यापक कटाचा भाग आहे. आम्ही अग्रलेख मागे घेतो तर आयसीसीला त्यांचा एखादा नियम मागे का घेता येऊ नये?
संपादक टर्नड खासदार केतकर: न्यूझीलंडपेक्षा दोन विकेट्स जास्त गमावल्या याची नैतिक जबाबदारी घेऊन इंग्लंड हा वर्ल्ड कप परत करणार आहे का? कालच्या क्रूर निकालानंतर आज आपण पाहू शकतो की क्रिकेट जगतात सर्वत्र भीतीचे, दहशतीचे, संशयाचे वातावरण पसरले आहे. न्यूझीलंड दुष्ट आयसीसीच्या जाचक नियमांचा बळी ठरला आहे. इतकी असहिष्णुता पूर्वी कधीच नव्हती.
प्रसन्न जोशी: आज रात्री नऊ वाजता पहा आमचा विशेष कार्यक्रम - 'आयसीसीचे नियम: नायक की खलनायक?'. विशेष सहभागी: दुसरे कुणीच मिळाले नाहीत म्हणून अंबाती रायुडू आणि त्याचे जवळचे लांबचे सर्व कुटुंबीय आणि त्याचे फेसबुक फ्रेंड्स. कृपया विजय शंकर, रिषभ पंत, आणि मयंक अगरवाल यांच्या मित्रांनी, नातेवाईकांनी सहभागी होण्याविषयी विचारणा करू नये.
एबीपी माझा पत्रकार: इंग्लंडने वर्ल्ड कप जिंकल्यावर तैमूरने काय प्रतिक्रिया व्यक्त केली हे जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत सैफच्या बंगल्याबाहेर. पण आत्ता तैमूरसर मलविसर्जन करण्यात बिझी असल्याने त्यांना या क्षणी भेटणे आमच्या नाकाडोळ्यांसाठी सेफ नाही असं सैफने सांगितले आहे. सरांचा सदर कार्यक्रम होईपर्यत आपण टाकू पद्मश्री सैफ अली खान यांच्या उज्ज्वल कारकिर्दीवर एक नजर.
ओवेसी: वर्ल्ड कप जिंकल्यावर आदिल रशीदच्याच हातात तो कप यायला इतका वेळ का लागला? मीडियाने छापला का त्याचा वर्ल्ड कप हातात घेतलेला सोलो फोटो?
केजरीवाल: पूरे मॅच में और उसके बाद सुपर ओव्हर में भी दोनोही टीम्स का स्कोर सेम हुआ ये हम सबने देखा है जी.. फेडरर जोकोविक की विम्बल्डन फायनल छोडके देखा है.. लेकीन कप दिया गया इंग्लंड को, और किसी बकवास रूल को दुनिया के सामने रखा गया. यहीं तो स्कॅम है जी.. इसकी जांच होनी चाहिए, नहीं तो मैं धरने पे बैठ जाउंगा.. मेरे खांसी और मफलर की कसम..
अजित पवार: अगदी अंत:करणापासून सांगायचं झालं तर या प्रकरणावर काही मूत, सॉरी मत व्यक्त करावे असे मला वाटत नाहीये, पण आज या ठिकाणी प्रामुख्याने मी असे नमूद करू इच्छितो की केजरीवाल साहेबांनी इथे धरणे की काय म्हटल्यामुळे मी ताबडतोब इथे आलो. 2013 साली ऍशेस जिंकल्यावर पीटरसन, ब्रॉड, अँडरसन यांनी चक्क ओव्हलच्या खेळपट्टीवर मूत्र विसर्जन केले तेव्हा तर त्यांना कुणी काही बोलले नाही आणि नंतर त्यांनी सर लेन हटन यांच्या समाधीपाशी जाऊन काही आत्मक्लेश केल्याचेही ऐकिवात नाही. तरीही या ठिकाणी इंग्लंड संघाचे अभि, सॉरी इंग्लंड टीमचे अभिनंदन.
योगी आदित्यनाथ: दूसरा रन लेते समय गुप्टील ऐन मौके पर तेजी से मूड नहीं पाये, इसलिये नहीं क्यूंकी उनका मूड नहीं था मुडने का.. बल्की इसलिये की वो बीफ खाते है. अरे घर से जब रोज नेट प्रॅक्टिस जाते हैं तो रास्ते में ही जो गोशाला आती है वहां आजतक ना उन्होंने कभी किसी गोमाता को अन्न दिया है, ना किसी गोमाता को नमन किया है, तो कैसे करेगी इनकी किस्मत और वर्ल्ड कप इन्हे वंदन? कम से कम योगा तो कर ही सकते है ना, करें तो इनकाही फायदा है.. सारे गुप्तीले फुर्तीले हो जायेंगे..
मनमोहन सिंग: .........….
संदीप महेश्वरी: दोनों को मौका मिला, अच्छा खेले, फाईट करी, लेकीन जिता सिर्फ एक. वजह होती है आयसीसी का कोई एक रुल. लेकीन जब इस दुनिया में आयसीसी ही नहीं था तब क्या था? क्या तब क्रिकेट नहीं खेला जाता था? तब स्कोर्स सेम नही हुये होंगे? तो कैसे रिझल्ट लगता था उन दिनो? ज्यादा डीप तो नहीं हो रहा है? सोचो, समझो, दिमाग लगाओ.. समझने की कोशिश करो. सब आसान है. अरे मेरे प्यारे भोलेभाले खट्टरों, इंग्लंड जीता क्युंकी जिसका डिझायर जितना बडा है, उसकी सक्सेस भी उतनीही बडी है.. डिझायर इंग्लंड का बडा था.. बेन स्टोक्स अंदर से सिर्फ एक चीज बोलता रहा - 'मुझे कुछ करना है मुझे कुछ करना है मुझे कुछ करना है'.. नतीजा आपके सामने है..
पाटेकर नांगरे पाटील: आमचं जे काही म्हणणं असेल ते तुमच्यापर्यंत व्हॉटसअपवर येईलच, तसं ते आलं की आमच्यापर्यंतही पोचवा म्हणजे आम्हालाही कळेल की हे आम्ही बोललोय आणि पुढे कुणी विचारलं तर लक्षात ठेवायला बरं पडेल.
ईशा विक्रांत सरंजामे उर्फ ईशा गजा पाटील: दो रन दौडते वक्त दूसरे रन की कीमत तुम क्या जानो मार्टिन ल्यूथर किंग बाबू.. सॉरी मार्टिन गुप्टील बाबू
होडोर: होडोर होडोर
अक्षय कुमार: मला सांगा स्टोक्स बटलर मॉर्गन, तुम्ही आंबा कसा खाता?

Tuesday, 18 June 2019

त्र्याण्णव नव्हे नव्वद तीन


** त्र्याण्णव नव्हे नव्वद तीन ** -- पराग पुजारी


ही आहे अभिनेते अतुल कुलकर्णी यांची त्यांनी गरीब, आदिवासी मुलांसाठी दुर्गम भागात सुरु केलेल्या 'क्वेस्ट' या अनोख्या शैक्षणिक उपक्रमाविषयीची २०१५ ची मुलाखत. १२.५० - १३.५० पहा, त्यामध्ये कल्पना येते की इंग्रजांनी इथे सुरु केलेली (लादलेली) मेकॉलेची शिक्षणपद्धती ही त्यांना सोयीस्कर अशी होती. इतकी वर्षे होऊनही आपण आपली शिक्षणपद्धती सुरूच केली नाही. १८.४० - २०.३१ पहा. यात अतुल सांगतात की एक ते शंभर आकडे मराठी आणि इंग्रजीत पाठ करण्यात काय फरक आहे. मराठीत दोन हा आकडा बे किंवा बेचाळीस मध्ये बे, बारा किंवा बावीस मध्ये बा, बत्तीस मध्ये , ब्याऐंशी ब्याण्णव मध्ये ब्या असे वेगवेगळे उच्चार आहेत. हाच नियम तीन, चार, पाच अशा सर्वच आकडयांना लागू होतो. इंग्रजीत मात्र एक ते वीस आकडे पाठ केले की पुढे तेच ते रिपीटेशन येत जाते. मराठीत ३२ बत्तीस उच्चारताना दुसरा आकडा () आधी च्या रूपाने उच्चारला जातो आणि मग दशमान एककातला पहिला आकडा () तीस या रूपाने, इंग्रजीत हेच उलट घडतं. मराठीत बाराखडी यासाठीच असते, बा बी बे हे सगळंच त्यात येतं. आता मराठी आणि इंग्रजी वर्णमालेतली स्वर आणि व्यंजने संख्या कशी ५२ आणि २६ आहे, मग मराठी कशी जास्त अंबानी (श्रीमंत असे वाचावे).. त्या घिस्यापिट्या तर्कात आपण इथे अडकायला नको.
पण..


बालभारतीने अभ्यासक्रम बदलास सुरुवात केली असून इयत्ता दुसरीच्या गणित पुस्तकातील गणित शिक्षणात आमुलाग्र बदल करण्यात आला आहे. संख्या वाचन करताना एकवीस ऐवजी वीस एक, त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, त्र्याण्णव ऐवजी नव्वद तीन असे वाचण्याच्या सूचना अभ्यास मंडळाने दिल्या आहेत. “
ही बातमी आली आणि लगेच ही अतुलजींची मुलाखत आठवली, ती (तुमच्यासाठी) शोधून काढली. शिक्षणमंडळाच्या त्या निर्णयावर आता उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. माझ्यासारख्या मराठी भाषाप्रेमींना हा निर्णय अर्थातच चुकीचा वाटतो आहे. कारण यापुढे हळूहळू मराठी भाषेचे सौंदर्य असेच इंग्रजी, हिंदी भाषांचे आक्रमण होऊन आणखी लुप्त होण्याचा धोका आहे. हा नवीन निर्णय झाला गणिती भाषेच्या प्रयोजनावर गदा आणणारा. हेच मराठी या भाषा विषयाबाबत तर सर्रास सुरु आहे. एक काकू अलीकडेच म्हणाल्या की मुंबईतील एका मराठी शाळेत शिक्षिका असलेल्या त्यांच्या एका मैत्रिणीने त्यांना सांगितलं की 'आता मुलांनी पेपरात पुस्तक भेटलं वगैरे लिहिलं तरी मार्क द्या, आणि च्या गोंधळात मार्क कापू नका, देऊन टाका मार्क्स' अशा ऑर्डर्स त्यांच्या मराठी माध्यमाच्याच शाळेकडून आल्या आहेत. बोंबला.. अरे हे फारतर मराठी जिथे सेकंड लँग्वेज आहे तिथे म्हणजे इतर भाषेच्या माध्यमाच्या शाळेत ठीक, पण मराठी माध्यमाच्या शाळेत जिथे मराठी फर्स्ट लँग्वेज आहे तिथे कसे चालेल? इंग्रजी माध्यमाच्या शाळेत उमर अकमल, सर्फराज अहमद टाइप इंग्रजी लिहिले, बोलले तर मिळतील का मार्क्स? हे जर असेच होत जाणार असेल तर बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यातली दरी अगदीच मिटत जाईल, जे खरंतर अकॅडमिक शिक्षणासाठी योग्य नाही. आणि उगाच ब्राह्मणी भाषा म्हणून प्रमाणभाषेला हिणवून 'तुम्ही पुस्तक मिळतं' म्हणता म्हणून 'आम्ही मुद्दाम पुस्तक भेटतं' म्हणणार यालाही काही अर्थ नाही. (होय, मला खरंच शंका आहे की काही लोक मुद्दाम असं म्हणतात. कारण त्यांच्या इतर भाषेत, शब्दांत अशी विसंगती कुठेच आढळत नाही. जसे निलेश साबळे विशिष्ट ऍक्टस करताना ठरवून णमस्कार णमस्कार असं म्हणत येतो.) हां आता काहींचा जेन्युईन प्रॉब्लेम असूही शकतो. आमचे एक गणिताचे सर घणमूळ, समीकरन असे शब्द अगदी फ्लोमध्ये खणखणीत आवाजात म्हणायचे, म्हणजेच जिथे तिथे आणि तिथे .
बाकी मुंबईत आल्यापासून तर पेन, साबण, स्टेपलर, करियर, चहा, ट्रेन, गाडी, सायकल, पोस्टर, ट्रेलर, व्हिडीओ, पिक्चर, बाउंडरी, सिक्सर अशा शब्दांना मी चक्क तो, ती, ते अशा तिन्ही लिंगांमध्ये सर्वलिंगसमभाव जपत बागडताना ऐकलंय. फेसबुकवर म्हणाल तर वगैरे ऐवजी वेग्रे, लोक ऐवजी लोक्स, आहे ऐवजी आहेय असे शब्द कोण मुद्दाम विनोदनिर्मितीसाठी किंवा त्या टोनमध्ये जाऊन ठरवून टोमणेगिरीसाठी लिहितात तेही कळतं, आणि कोण 'हे शब्द असेच लिहायचे असतात' असं समजून लिहितं तेही कळतं. तसा मी बोलीभाषांचा प्रचंड चाहता आहे, सांगलीचा असल्यानं कोल्हापुरी भाषा जवळची. पण 'ढग तर्राट वर जायलाय असं दिसलं की वळकायचं गड्या हो, की आता विदाउट डाउट बाष्पीभवन होणाराय' किंवा 'एस्किमो लोक शून्य मिन्टात इग्लू बांधत्यात आन मग पटाक्किनी श्येकोटी पेटवून जाळ आन धूर संगटच करत्यात' अशी वाक्यं मला विज्ञानाच्या किंवा भूगोलाच्या पुस्तकात वाचायला खचितच आवडली नसती.
आता शिक्षणमंडळाकडून ही बातमी आली आणि अनेक चर्चा सुरु झाल्या. आज परदेशात राहूनही मराठी भाषेबद्दल कळकळ असणारे मित्रमैत्रिणी पाहतो तेव्हा खरंच छान वाटतं. पुण्यात मी एका प्रकाशन संस्थेत काम करत असतानाची गोष्ट.. मी सांगलीचा आहे हे कळल्यावर या पुण्यातल्या ऑफिसात एका जाज्ज्वल्य पुणेरी (पुणं नाही हां.. पुणे) कलीग मैत्रिणीने मला एकदा ७८ आकडा उच्चारून दाखव असं म्हणून मी अठ्ठ्याहत्तर म्हणतो की अष्ट्याहत्तर हे चेक केले होते. पण तिला बापडीला महिती नव्हते की मी आरतीतही संकटी पावावे म्हणतो, संकष्टी पावावे नाही. तिनेही आज या निर्णयावर उद्वेगाने पोस्ट टाकली आणि कळलं की अमेरिकेत असलेल्या मराठीप्रेमींनाही हा निर्णय दुखवून गेलाय.
मराठी जोडाक्षरे येतात ती उच्चारायला कठीण जातात हे लॉजिकच धन्य आहे. अहो आम्हाला constantinople सारखा तेव्हा जिभेला निरगाठी पाडणारा शब्द फळ्यावर लिहून यातून जास्तीत जास्त इंग्रजी शब्द तयार करा असे (आम्हाला पाचवीपासून इंग्रजी असताना सहावीत) सांगितले जायचे. आता mississippi चा स्पेलिंगप्रमाणे उच्चार शिकवलात तर तो रमेश सिप्पीमधल्या सिप्पी सारखा होईल, शिकवणार का? pneumonia, psychology, honest मध्ये पहिले अक्षर सायलेंट का हे शिकवणार का? आणि कसे? इंग्रजी भाषेला तिची मर्यादा माहीत आहे म्हणूनच ऑक्सफर्ड डिक्शनरी दरवर्षी इतर भाषांमधले शब्द आपल्यात सामावून घेत जाते. चुपके चुपके मध्ये तेरा खून पी जाऊंगा (धर्मेंद्र असे वाचावे) आणि नमक हलाल मध्ये हांय (अमिताभ असे वाचावे) यांनी इंग्रजीच्या मर्यादा सांगितल्या आहेतच. फाडफाड इंग्रजी बोलणारे भले भले जाणकारही (निकष: शेड्युलला स्केड्युल म्हणणारे म्हणजे जाणकार.. थेट शशी थरूर यांचा चेहरा डोळ्यासमोर आणू नये) सेपरेट, रिसिव्ह, डिसीझ, डेफिनेटली अशा शब्दांचं स्पेलिंग लेखी चुकताना अस्मादिकांनी या या (चष्म्याआडच्या) डोळ्यांनी पाहिलेत. अरे नव्वद तीन हा फारतर क्रिकेटचा स्कोरबोर्ड असू शकतो, आणि वीस आठ हा बास्केटबॉलचा स्कोर असू शकतो. त्र्याण्णव आणि अठ्ठावीस शिकताना आम्हाला त्रास नाही झाला तो! आम्ही कुठे म्हणतोय शिवतांडव स्तोत्राची भाषा आणि त्यातले उच्चार आलेच पाहिजेत म्हणून, गेलाबाजार मोरोपंत किंवा बालकवींची मराठी आली पाहिजे म्हणून.. पण 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' असं मराठी भाषेविषयी म्हणणाऱ्या सुरेश भटांचीही यायला नको?
हिंदीतही असंच - 'पहली ट्रेन मिस हो गयी तो दूसरा ट्रेन दस मिनिट बाद आयेगा' अशी वाक्यं मी मुंबईत खरंच ऐकलीत. एकाच वाक्यात ट्रेन पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी दोन्हीही कशी असू शकेल राव (तुम्हाला लक्षात आले का पोस्टकर्ता इथेही 'शकते, शकतो' लिहिण्याच्या फंदात पडला नाहीये आणि 'शकेल' लिहून मोकळा झालाय, त्याला भाषेची शकलं खरंच बघवत नाहीत). आता कोणत्याही भाषेत बोली आणि प्रमाण हे प्रकार येतातच हे मान्य, पण जगात कुठेही गेलात तरी शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी एक स्टॅंडर्ड भाषा ठेवावी लागतेच ना. मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये 'वो आरेला है, कररेला है' अशी टपोरी बोलीभाषा ऐकायला तेव्हा मनोरंजक वाटते, पण मेडिकलच्या विद्यार्थ्यांना या भाषेत शिक्षण दिलं गेलं तर? किंवा अगदी शाळेच्या साध्या हिंदी भाषेच्या पेपरात असं हिंदी लिहिलं जावं का? हिंदी पेपरात अशी भाषा वाचायची तुमची तयारी आहे का? 'आज यहां पे जैसा की आप अब्बी देखरेले हो कि उधरीच नही बल्की इधर बी भोत बारिश होरेला है, रूक्कीच नही रहेली ना बारिश आज भिडू' हे एखादा हिंदी वार्ताहर किंवा निवेदक हिंदी टीव्ही न्यूज चॅनेलवर बोलताना आपल्याला चालणार आहे का?
इंग्रजीचंही असंच होत चाललंय म्हणा. सोशल मीडिया बकासुरासारखा अक्राळविक्राळ होऊन भाषासौंदर्य आणि व्याकरण निर्दयीपणे पोटात घालत असताना आणि अघोरी एसेमेस लँग्वेज आल्यापासून मुलं पेपरात सर्रास btw, imo, asap असे शॉर्टफॉर्म्स लिहीत चाललेत हे तुम्ही शाळेतल्या शिक्षकांशी बोललात तर कळेलच.
या मुलाखतीत शेवटी 'Children are not from you, Children are through you' हे खलील जिब्रानचं वाक्यही अतुल कुलकर्णी सांगतात. पटतंय हे मला तरी, आपण जे मुलांना शिकू देणार तेच ते शिकत जाणार, तेच पुढच्या पिढ्यांमध्ये झिरपत जाणार. संस्कार म्हणजे 'हे असं बोल, असं वाग' असं पालकांनी मुलाला सांगणं नसतंच, संस्कार म्हणजे मुलाने जसं बोलावं, वागावं असं वाटतं तसं पालकांनी त्याच्यासमोर, त्याच्या उपस्थितीत बोलत, वागत राहणं असतं. कोणताच बाप मुलाला शिव्या द्यायला शिकवत नाही, पण मुलासमोर बापाला कुणा मित्राचा फोन आल्यावर सहज जरी भकाराने सुरुवात झाली तरी मुलगा ते कॅच करणारच. विचार करण्यासारखा विषय आहे खरंच! 'इंग्रजी 'भाषा' शिकली पाहिजे, त्यासाठी अमुक एक 'विषय' इंग्रजीत शिकणं गरजेचं नाहीये, तो आग्रहच चुकीचा आहे' हाही अनेकांना पटणारा मुद्दा अतुल यांनी या मुलाखतीत मांडलाय. बघा याच मुलखात अशीही एक मुलाखत झाली होती. जमल्यास पूर्ण बघा.
- पराग पुजारी